' जुन्या झालेल्या इलेकट्रोनिक वस्तू, मोबाईल फोनचं करायचं काय? या कंपनीकडे आहे बिनतोड मार्ग – InMarathi

जुन्या झालेल्या इलेकट्रोनिक वस्तू, मोबाईल फोनचं करायचं काय? या कंपनीकडे आहे बिनतोड मार्ग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्या संपूर्ण जगाला कचऱ्याच्या समस्येने ग्रासून टाकले आहे. प्लास्टिकमुळे तर पर्यावरणाची अपरिमित हानी झालेली आहे. प्लास्टिक खालोखाल इ-कचरा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कचरा ही सुद्धा खूप मोठी समस्या भेडसावते आहे.

प्लास्टिक आपण कचऱ्यात फेकून मोकळे होतो पण इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न आपल्यापुढे उभा आहे.

जुने मोबाईल फोन्स, वापरात नसलेल्या किंवा खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्यांचे काय करायचे हे आपल्याला कळत नाही आणि असाच कितीतरी कचरा घराघरात साठलेला आपल्याला दिसतो.

ह्या वस्तूंमध्ये हेवी मेटल्स आणि मर्क्युरी, लेड आणि सल्फर असली घातक रसायने सुद्धा असतात. त्यामुळे ह्या वस्तू पर्यावरणासाठी अतिशय हानिकारक आहेत.

 

e waste inmarathi
newatlas.com

 

खरं तर ह्या गोष्टी रिसायकल करता येतात पण त्या कुठे करायच्या हे आपल्याला माहिती नसते. असोसिएटेड चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या मते आपल्या देशात जवळजवळ ३.३ दशलक्ष टन इतका इ-कचरा असण्याची शक्यता आहे.

आणि ह्या इ कचऱ्यात हानिकारक मेटल्स आणि केमिकल्स सुद्धा आहेत त्यामुळे तो असाच टाकून देणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.

२०२० सालापर्यंत हा कचरा ५.२ मेट्रिक टन इतका साठू शकतो असा इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलाजी मंत्रालयाचा अंदाज आहे.

त्यामुळे ह्या इ कचऱ्याचे काय करायचे ह्याचा विचार करणे आपल्याला अतिशय आवश्यक आहे. हा कचरा नष्ट करणे आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होता कामा नये अशी आव्हाने सध्या आपल्यापुढे आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाचे ह्याबाबतीत असे म्हणणे आहे की, “लेड, कॅडमियम, क्रोमियम, ब्रोमिनेटेड फ्लेम रिटार्डन्ट किंवा पॉलीक्लोरिनेटेड बायफिनील्स ह्यासारख्या विषारी आणि घातक रसायनांशी किंवा विषारी वायूंशी थेट संपर्क आल्यास शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

असली घातक रसायने आणि हेवी मेटल्स जर मातीत किंवा पाण्यात मिसळली गेली तर त्याने प्रदूषण होते आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. हे विषारी वायू हवेत मिसळले गेले तर त्याने वायू प्रदूषण होते.”

 

ewaste inmarathi
ensia.com

 

कंप्यूटर मॉनिटर्स, मदरबोर्ड्स, मोबाईल फोन, चार्जर्स, हेडफोन्स, टीव्ही,एयर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, ह्यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आज घराघरांत असतातच. संपूर्ण जगच ह्या वस्तूंनी व्यापले आहे.

पण जेव्हा ह्या वस्तू जुन्या किंवा निकामी होतात तेव्हा त्यांचे काय करायचे, त्यांची विल्हेवाट कशी लावायची ?

एक सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून ही आपलीच जबाबदारी आहे की आपण ह्या इ-कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो?

सर्वप्रथम आपण जेव्हा एखादी नवीन वस्तू घेण्याचा निर्णय घेतो तेव्हा जुन्या वस्तूची आधी विल्हेवाट लावली पाहिजे.

उदाहरणार्थ तुमच्याकडे जुना फ्रिज, टीव्ही, मायक्रोव्हेव अव्हन, कंप्यूटर चांगल्या स्थितीत असेल आणि तरी तुम्ही नवीन वस्तू घेतली तर ह्या सुस्थितीत असलेल्या वस्तू तुम्ही एखाद्या एनजीओला देऊ शकता.

जुने पण व्यवस्थित चालणारे कम्प्युटर्स एखाद्या शाळेला भेट देऊ शकता किंवा एनजीओला भेट देऊ शकता. फक्त ह्या वस्तू दुसऱ्याला देताना चांगल्या स्थितीत असायला हव्यात.तुम्हाला जर ह्या वस्तू कुणाला मोफत द्यायच्या नसतील तर OLX किंवा Quickr सारख्या वेबसाईट्सच्या माध्यमातून एखाद्या गरजू ग्राहकाला विकू शकता.

किंवा एक्सचेंज ऑफर मध्ये जुन्या वस्तू देऊन नव्या घेऊ शकतो. ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट तुमच्या जुने पण चालू स्थितीत असलेले फोन, लॅपटॉप एक्सचेंज करण्याची ऑफर देतात.

 

waste inmarathi
natgio.com

 

परंतु तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्णपणे निकामी झाल्या तर तुम्ही त्या वस्तू कृपा करून नेहमीच्या कचऱ्यात टाकू नका. तुमच्या रिमोट कंट्रोलचे सेल किंवा बॅटरीज तुमच्या नेहमीच्या कचऱ्यात टाकू नका.

तसेच एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडली असेल तर तुम्ही ती स्वतःच घरात उघडून त्याचे पार्टस वेगळे करण्याचा प्रयत्न करू नका. तसेच तुमच्या घरातील इ-कचरा हा कधीही भंगारवाल्याकडे देऊन टाकू नका.

आपल्या शहरांत जर इ-कचऱ्याचे अधिकृत कलेक्शन सेंटर असेल तर तिथेच हा इ-कचरा नेऊन द्या म्हणजे त्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येईल.

तुम्हाला जर तुमच्या शहरातील इ-कचऱ्याचे अधिकृत कलेक्शन सेंटर कुठे आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर त्या वस्तूच्या निर्मात्या कंपनीशी संपर्क साधून इ-वेस्ट कलेक्शन सेंटरविषयी माहिती मिळवू शकता.

एक्स्टेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटीच्या धोरणांतर्गत लॅपटॉप, मोबाईल फोन्स किंवा मायक्रोव्हेव ह्या वस्तूंच्या निर्मात्यांना ह्या वस्तूंपासून निर्माण होणाऱ्या इ-कचऱ्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे.

म्हणजेच थोडक्यात असे की इ-कचऱ्यासाठी कलेक्शन सेंटर्स तयार करणे किंवा त्यांच्या वस्तू परत घेऊन त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे हे ह्या निर्मात्यांचे कर्तव्य आहे. किंवा अधिकृत रिसायकलरपर्यंत हा इ-कचरा पोहचवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच असते.

त्यामुळे जर तुमच्याकडे इ-कचरा साठला असेल तर तुम्ही खालीलपैकी कुठल्याही ठिकाणी तो रिसायकल करण्यासाठी देऊ शकता.

 

waste management inmarathi
credibly.com

 

बंगळुरूमध्ये असे अनेक एनजीओ आहेत किंवा सरकारी सेंटर्स आहेत तसेच काही निवासी कल्याण संस्था आहेत जिथे तुम्ही तुमच्याकडील इ-कचरा देऊ शकता.

उदाहरणार्थ “साहस” ही संस्था सस्टेनेबल कचरा व्यवस्थापन त्यांच्या कलेक्शन सेंटरमध्ये तुमच्याकडील १० किलो किंवा त्यापेक्षा जास्त इ-कचरा स्वीकारते.

सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहा दरम्यान तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुमच्याकडील इ-कचरा देऊ शकता. आता एकाच माणसाकडे इतका इतका इ- कचरा निघत नाही.

पण संपूर्ण सोसायटीचा किंवा ऑफिसमधील सर्वांकडचा इ-कचरा एकत्र केल्यास त्याची एकत्र विल्हेवाट लावता येऊ शकते.

हैद्राबादमध्ये “संशोधन इ-वेस्ट एक्सचेंज” नावाच्या संस्थेद्वारे तुम्ही इ-कचऱ्याचा प्रश्न सोडवू शकता. ही संस्था देशातील महानगरपालिकांशी तसेच हैद्राबादमधील सोसायटींशी संपर्क ठेवून आहे आणि ह्या सर्व ठिकाणचा इ-कचरा ही संस्था अधिकृत रिसायकलर्सपर्यंत पोहोचवण्याचे काम करते.

कर्मा रिसायकलिंग ही दिल्लीची स्टार्ट अप संस्था जुने मोबाईल फोन तुमच्याकडून विकत घेते आणि जे मोबाईल दुरुस्त होऊन चालू शकतात ते दुरुस्त करून त्यांची कमी दरात विक्री करते.

तुम्हाला फक्त त्यांच्या वेबसाईटला भेट देऊन, तुम्ही विकू इच्छिणाऱ्या मोबाईल,लॅपटॉप किंवा टॅबलेटचा ब्रँड आणि मॉडेल निवडायचे असते आणि फोनची अवस्था विचारणाऱ्या काही प्राथमिक प्रश्नांची उत्तरे तिथे द्यायची असतात.

 

phones inmarathi
und.com

 

ही वेबसाईट अल्गोरिदम वापरून तुमच्या मोबाईलच्या अवस्थेनुसार किंमत ठरवते. विक्रेत्याने त्याचा फोन/लॅपटॉप किंवा टॅबलेट विकायचे ह्यावर शिक्कामोर्तब केल्यावर कर्मा रिसायकलिंगची माणसे मोबाईल घ्यायला स्वतः येतात.

नंतर तो फोन त्यांच्या दिल्ली किंवा बंगळुरूस्थित सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठवतात. आजवर ह्या कंपनीने ५.५ लाख मोबाईल फोन हँडसेट विकत घेऊन त्यांच्या ग्राहकांना १५ कोटी रुपये दिले आहेत.

नमो इ-वेस्ट ही फरिदाबादची इ-कचरा रिसायकलिंग स्टार्ट अप कंपनी आहे. ह्या कंपनीला २०१५-१६ साली बेस्ट ग्रीन स्टार्ट अप ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता.

ही कंपनी सर्व प्रकारचा इ-कचरा स्वीकारते आणि त्याचे रिसायकलिंग करून त्यापासून विविध वस्तू तयार करते. ही कंपनी देशातील १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील विविध कंपन्या, शिक्षणसंस्था, विविध संस्था आणि गृहनिर्माण संस्थांकडून इ-कचरा गोळा करते.

ज्या वस्तू दुरुस्त होऊ शकतात त्या दुरुस्त करून पुन्हा वापरण्यात येतात आणि ज्या दुरुस्तीच्या पलीकडे गेल्या आहेत त्यांचे पार्टस वेगळे करून त्यांचे वर्गीकरण करून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येते.

एक्सट्राकार्बन ही संस्था गुरुग्राम येथे २०१३ साली सुरु झाली. ह्या संस्थेच्या ऍपद्वारे ग्राहक देशातील नऊ शहरातील स्क्रॅप डीलर्सशी संपर्क साधू शकते. कंपनीद्वारे रिसायकल केलेल्या वस्तू घेण्यात येतात. आणि ग्राहकांना परत विकण्यात येतात.

ज्या वस्तू रिसायकल करायच्या आहेत त्या अधिकृत ठिकाणी पाठवण्यात येतात. वर्षाला जवळजवळ सहा हजार टन इ-कचरा ह्या कंपनीद्वारे गोळा करून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येते.

 

ewaste inmarathi
chronicle.com

 

सेरेब्रा इंटिग्रेटेड टेक्नॉलिजीज- ही देशातील सर्वात मोठ्या इ-कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांपैकी एक संस्था आहे. ह्याचे मुख्य कार्यालय बंगळुरू येथे आहे.

ह्या संस्थेद्वारे सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व विद्युत उपकरणांची दुरुस्ती, नूतनीकरण आणि पुनर्वापर करण्यात येतो.

तुमच्या उपकरणात सेव्ह असलेला तुमचा महत्वाचा डेटा चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागू नये म्हणून ही संस्था हा डेटा नष्ट करण्याची योग्य ती खबरदारी घेते.

त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तपणे ह्या संस्थेकडे तुमच्या वस्तू व उपकरणे रिसायकल करण्यासाठी देऊ शकता.

ह्या संस्था सध्या काही शहरांमध्ये काम करत आहेत. पण अश्या संस्थांनी हळूहळू संपूर्ण देशातच आपले जाळे विणले पाहिजे म्हणजे लोकांना इ-कचऱ्याचे काय करायचे ह्याची माहिती मिळेल आणि हा इ- कचरा साठून राहिल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायला गेल्यास होणारे गंभीर परिणाम आपल्या सर्वांनाच टाळता येतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?