' पाकिस्तानचं करावं तरी काय? – उत्तर शांतपणे वाचा – InMarathi

पाकिस्तानचं करावं तरी काय? – उत्तर शांतपणे वाचा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

धगधगत्या काश्मीरची पार्श्वभूमी

स्वातंत्र्याच्या अगोदर लोकसंख्येच्या निकषावर कश्मीर पाकिस्तानातच समाविष्ट होणार असा जिनांचा अंदाज होता. यामुळेच तेव्हा त्यांनी आपल्या आरोग्यांच्या तक्रारींपायी हवापालटासाठी कश्मीरात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण ती राजा हरिसिंह यांनी नाकारली. नंतर जिनाने पाकिस्तानी सैन्य कश्मीरात घुसवले होते. यास हा नकारही जबाबदार होता.

भारत -पाकिस्तानात हा प्रश्न धुसमुसतोय. याचा शेवट काय होणार – याचा विचार आपण आताच केलेला बरा. तो शेवट सर्वार्थाने भारतास अनुकूल असा असण्यासाठी भारताने प्रयत्नशील असलेच पाहिजेत. स्वातंत्र्याच्या नंतर बरीचशी वर्षे भारत-पाकिस्तान यांच्यात फारसा फरक नव्हता. सैन्य, आर्थिक बाबतीत सत्तासंतुलन कायमच होते. भारताच्या अवाढव्य आकाराचे व आपल्या तुलनेने कितीतरी पट जास्त असलेल्या सैन्य सामर्थ्याचा मुकाबला करण्यासाठीच पाकिस्तान अमेरिकन वळचणीला गेले होते. अमेरिकन मदतीवर विसंबून राहून त्यांनी हा समतोल बराच काळ राखूनही ठेवला होता, पण २००१ मधील अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मात्र या परिस्थितीत झपाटयाने बदल झालेला आहे.

अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी युद्धातील पाकिस्तान हा मुख्य भिडू होता/आहे. अमेरिकन व नाटो सैन्याचा अफगाणिस्तानातील रसद पुरवठा पाकिस्तानी मार्गेच होतो, तसेच पाकिस्तानी विमानतळांचाही वापर अमेरिकेने या युद्धात केलेला आहे. या सगळ्या कृतींमुळे सोव्हिएत विरोधात आपणच पोसलेल्या, निर्माण केलेल्या, सुरक्षा पुरविलेल्या लोकांना एका रात्रीत पाकिस्तानने आपले शत्रू बनवून टाकले आहे. याची प्रतिक्रिया तर येणारच होती. तशी ती आलीही…

याच दहशतवाद्यांनी केलेल्या प्रतिक्रियेत हा देश अक्षरशः होरपळून गेलाय. आतापर्यंत पन्नास साठ हजार सर्वसामान्य पाकिस्तानी लोक या दहशतवादाचा बळी ठरलेले आहेत. अजूनही हल्ले सुरूच आहेत. मेलेल्या बहुसंख्य पाकिस्तानी लोकांना आपण का मेलोय, हे ही माहिती नव्हते. सैनिक आघाडीवरही पाकिस्तानी सैन्याला जीवांचे बरेचसे नुकसान सोसावे लागले आहे.

या देशात वर्गीय संघर्ष वाढलेत, अर्थव्यवस्था बसली आहे. कराचीत, बलुचिस्तान व वजिरीस्तानात सैन्य अभियाने सुरू आहेत पण अस्थिरता संपत नाही. अंतर्गत अतिशय अशांतता व अस्थिर परिस्थिती असतानाही हा देश कश्मीरसाठी भारताशी आपले शत्रुत्व आपल्या जन्मापासूनचकायम ठेवून आहे.

एकीकडे २००२ नंतर पाकिस्तान दिवाळखोर व आतून कमजोर होत असतानाच दुसरीकडे याच कालावधीत भारत मात्र एक मजबूत देश म्हणून जगात पुढे आलेला आहे. पाकिस्तानशी चर्चा करणे, शांतता प्रस्थापित होणे हे पूर्वी भारताच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक होते, ती जणूकाही पूर्वअट असायची. पण आताच्या भारतावर हे बंधनकारक राहिलेले नाही. भारत व पाकिस्तानात पहिल्यांदाच फार मोठे अंतर निर्माण झालेले आहे. वाजपेयी पाकिस्तानशी जास्त बोलत असत. मनमोहन सिंह वाजपेयींपेक्षा कमी बोलले. मोदींबाबतीत तर नं बोलले तरी फारसे अडणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे – याचकारणांनमुळे सध्या भारत ” चर्चा झालीच तर दहशतवादावरच चर्चा होईल” यावर आडून बसलेला आहे.

वाजपेयी व मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात कश्मीरवर तोडगा काढण्याचे अतिशय प्रामाणिक प्रयत्न झाले होते. दोन्हीही देश जवळजवळ अंतिम तोडग्याजवळ पोहचलेच होते. पण मध्येच मुंबई घडल्यामुळे ते सर्व बासनात गुंडाळून ठेवून द्यावे लागले होते.

ज्या फाँर्मुल्यानुसार या समस्येवर उपाय शोधला गेला होता त्याला चिनाब फाँर्मुला म्हणतात. चिनाब नदीच्या बाजुने जाणाऱ्या एलओसीमध्ये परस्परांना पुरक अशा अरेंजमेट्स करायच्या, दोन्हीही कडील कश्मीरींना परस्परांकडे जाण्यासाठी सिमा खुली करायची, व्यापार मोकळा करायचा, पुढे पन्नास वर्षांनी मग यालाच अंतरराष्ट्रिय सीमा म्हणून दोन्हीही देशांनी मान्यता द्यायची असा हा तोडगा होता.

तिकडे मुशर्रफ असल्यामुळेच ही प्रगती होऊ शकलेली होती, हे इथे महत्वपूर्ण आहे. या प्रश्नांवर केव्हाही तोडगा काढायचा असेल तर त्यासाठी भारतात भाजप व पाकिस्तानात सैन्य सत्तेवर असणे ही त्याची पूर्वअट आहे. दोन्हीही देशातील या उजव्या शक्ती मध्यममार्गी असलेल्या काँग्रेस व पिपीपी वगैरेला यावर एक इंचही पुढे सरकू देणार नाहीत.

आता भारताला फक्त एकच गोष्ट करायची आहे.

आपल्यात व पाकिस्तानात असलेला हा फरक दिवसेंदिवस जास्तीतजास्त वाढला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असणे. भारताने आर्थिक व सैनिक दृष्टिकोनातून जास्तीतजास्त मजबूत बनणे, ही समस्या सुटण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. पाकिस्तानला शस्त्रात्र स्पर्धेत गुंतवून त्यांचा सोवियत रशिया करण्याचे धोरण आखले पाहिजे. त्याला भारतीय धोक्याच्या भयाखाली जास्तीत जास्त खर्च सैन्यावरच करायला बाध्य केले पाहिजे. आपण हे सहजपणे सहन करू शकू पण या देशाची आर्थिक परिस्थिती बघता हा देश हे जास्त काळ सहन करू शकणार नाही. सैन्यावरील केलेल्या अतिखर्चामुळे नागरी सेवा कोलमडून असंतोष माजेल व मग त्याचा लाभ भारताला घेता येईल.

एलओसी हिट करत राहिले पाहिजे. पाकिस्तानात सैन्य प्रासंगिकच राहील. लोकशाही मजबुत होणार नाही याचीही काळजी भारताने घेतली पाहिजे. यातच भारताच्या पाकिस्तानी तुकडे करण्याच्या धोरणांची यशस्वीता समावलेली आहे…!

पण हे करण्यासाठी आपण ‘गरीब गाय आणि पोटात पाय’ अशी धोरणांची आखणी केली पाहिजे. तोंडात साखर घेऊन डोक्यात मागून सोटा घालणारे आपले धोरण असले पाहिजे. कारण आपण अजूनही अंतरराष्ट्रीय स्तरावर तितके प्रभावशाली देश बनलेलो नाहीत.

मोठ्या राष्ट्रांच्या मर्ज्या आपल्याला सांभाळाव्या लागतात. उद्या पाकिस्तानशी काही संघर्ष उद्भवलाच तर त्याला सांभाळण्यासाठी आपण पुरेसे आहोतच पण मोठी राष्ट्रे आपल्या सोबत जरी नसली तरी ती किमान विरोधात जाणार नाहीत वा तटस्थ तरी राहतील या दिशेने आपली कुटनिती आपण केली पाहिजेत.

यासाठी आपल्याला आपण “पिडीत” आहोत हे सतत दाखविता आले पाहिजे. भलेही आपण पाकिस्तानपेक्षा मजबूत असू पण प्रसंगी कमीपणा घेऊन जागतिक मत आपण आपल्या बाजूला राखून ठेवले पाहिजेत.

भारत पाकिस्तानचे तुकडे करणारच आहे. 🙂 भारत त्या दिशेनेच निघालाय, पण यासाठी लागणारा संयम मात्र आपल्याला आपल्या अंगी बाणवावा लागेल. यासाठी दहा वर्षे, वीस वर्षेही लागू शकतात. तोपर्यंत पाकिस्तान अस्थिर राहील याची काळजी घेत भारतात स्थिरता व आर्थिक विकास होत राहील यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजेत. या कालावधीत आपण पाकिस्तानशी युद्ध करण्यच्या भानगडीत पडून आपला आर्थिक विकास खुंटवून घेता कामा नये. तिकडून दहशतवादी हल्ले होतीलच पण त्यात फसून आपल्या अंतिम ध्येयावरून आपण लक्ष्य हटवता कामा नये.

पाकिस्तानचे चार भाग हेच आपले अंतिम लक्ष्य असले पाहिजे…!

फिचर्ड इमेज स्त्रोत

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?