' प्रोड्युसरच्या वाईट अनुभवाबद्दल विद्या बालन म्हणते, “आय फेल्ट लाईक…** !” – InMarathi

प्रोड्युसरच्या वाईट अनुभवाबद्दल विद्या बालन म्हणते, “आय फेल्ट लाईक…** !”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

म्हणतात ना, यशाचा मार्ग कधीही सोपा नसतो. संघर्षाचे खाच-खळगे ह्या मार्गात असतातच. मग ते कोणतेही क्षेत्र असू देत. ह्या सर्व अडचणींवर मात करत जो पुढे जातो, स्वतःला सिद्ध करतो तो खरा बहाद्दर.

हा प्रवास सोपा नाही; त्यासाठी लागते दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास!

ह्या दोन्हींच्या बळावर यशश्री खेचून आणता येते.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचा प्रवास अशाच खाचखळग्यांतून झालाय.

जिला तिच्या रूपामुळे हिणवले गेले. तिचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु ती त्या अनुभवातूनही तावून सुलाखून बाहेर आली आणि सगळ्यां धारणांना, संकल्पनांना फाटा देत आपली प्रतिभा सिद्ध केली.

ह्या गुणी अभिनेत्रीचे नाव आहे विद्या बालन.

vidya-balan-InMarathi-06

केवळ सौंदर्यानेच नव्हे तर आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले.

आज ती कितीतरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी आहे. तिचा मिशन मंगल चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांची मने जिंकून घेते आहे.

 

आपण भारतीय सुंदर दिसण्याला अगदी अवास्तव महत्व देतो. शिवाय आपल्या सौंदर्याच्या कल्पना अगदी ठराविक आहेत. त्याला चित्रपट सृष्टीही अपवाद नाही.

आपल्या चित्रपटसृष्टीत तर या कल्पनांचं अधिक साचेबद्ध स्वरूप पाहायला मिळतं. कलाकारांचं रूप, सौंदर्य आणि त्यातल्या त्यात स्त्री कलाकारांचं तर अगदीच “स्टिरीओ टायपिंग” झालं आहे. आपल्याकडे ठराविक साच्या बाहेरची नायिका पडद्यावर बघणे सहसा पसंत केले जात नाही. नायिका म्हटलं, की तिने सुंदरच दिसले पाहिजे, असा जणू अलिखित नियमच आहे.

vidya-balan-IM 04

“शो-बीझ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या चित्रपटसृष्टीत दिसण्याला अनन्य साधारण महत्व दिले जाते, अभिनय वगैरे सगळं नंतर! आधी महत्व तुमच्या दिसण्याला.

ह्या सुंदर दिसण्याच्या अट्टाहासापायी आज आपल्या चित्रपट सृष्टीत अशा अनेक नायिका आहेत ज्यांना अभिनय कशाशी खातात तेही कळत नाही, परंतु केवळ सौंदर्याच्या जोरावर त्यांची कारकीर्द घडलेली आहे.

विद्या बालन मात्र त्याला अपवाद आहे!

 

विद्या बालनचा बॉलिवूडमधील प्रवास अशाच उतार-चढावांनी भरलेला आहे.

आपल्या करियरची सुरुवात विद्याने “हम पांच” ह्या मालिकेपासून केली. तिला अभिनयात विशेष रस होता. दरम्यान ती पलाश सेन च्या म्युझिक अल्बम आणि काही जाहिरातींमध्ये सुद्धा झळकली. पुढे २००५ साली आलेल्या “परिणीता” ह्या चित्रपटांमुळे तिने प्रथम यशाची चव चाखली त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.

vidya balan inmarathi 1

अगदी अलीकडे २०१७ साली आलेल्या तिच्या “ तुम्हारी सुलू” सारख्या चित्रपटांपर्यंत तिची यशाची घोडदौड सुरूच आहे. शिवाय तिच्या मिशन मंगल सिनेमामध्ये तिचा सहज सुंदर अभिनय, प्रेक्षकांना तिची दखल घेण्यास भाग पाडतो.

परंतु ह्या उंचीवर पोहोचणे तिच्यासाठी एवढे सहज-सोपे कधीच नव्हते. स्टार-किड नसलेल्या, इंडस्ट्रीत कोणाशीही ओळख नसलेल्या विद्याला आपल्या करीयरच्या सुरुवातीलाच प्रचंड नकारांना तोंड द्यावे लागले होते. विद्यावर इंडस्ट्री पैकी कुणाचाही वरदहस्त नसल्याने तिला मोठ्या प्रमाणावर संघर्षाचा सामना करावा लागला.

हिंदी चित्रपटांत येण्यापूर्वी तिने दाक्षिणात्य चित्रपटात आपले नशीब आजमावायचे ठरवले, परंतु हा निर्णय तिच्यासाठी फारसा चांगला ठरला नाही. दाक्षिणात्य सिनेमे करताना तिला सतत वाईट अनुभव आले.

हयाबद्दल बोलताना विद्या आपला अनुभव सांगते त्यावेळी तिने एक मल्याळम चित्रपट साईन केला होता. त्याचा काही भाग तिच्यावर चित्रित झाला होता आणि अचानक तिला ह्या चित्रपट निर्मात्याचा फोन आला की त्या चित्रपटातून तिला काढून टाकण्यात आले आहे.

vidya-balan-IM 01

हे ऐकून ती हवालदिल झाली. ती आणि तिचे आई-वडील ताबडतोब त्या चित्रपटाच्या निर्मात्याच्या ऑफिसला गेले. त्या निर्मात्याला असे तडकाफडकी विद्याला का काढून टाकण्यात आले अशी विचारणा केली असता. निर्मात्याने त्यांना तिच्यावर चित्रित झालेल्या चित्रपटातल्या काही क्लिपिंग दाखवल्या आणि म्हणाला,

“ जरा बघा हिच्याकडे, कुठल्याही प्रकारे ही नायिका म्हणून शोभते का?”

– हे शब्द विद्याच्या जिव्हारी लागले.

 

ह्या रिजेक्शन नंतर कित्येक दिवस कित्येक महिने तिला स्वतःला आरशात बघताना चीड यायची. तिला वाटायचे की आपण किती कुरूप आहोत, आपल्यात अभिनेत्री होण्यासाठी लागणारी आकर्षकता नाही म्हणून ती बराच काळ या निराशेत राहिली. त्यांनंतर बरेच दिवस ती त्या निर्मात्याला माफ करू शकली नाही.

कालांतराने तिने स्वतःला आहे त्या रूपात स्वीकारत, “स्वतःवर प्रेम केले तरच आपण आयुष्यात पुढे जाण्यात यशस्वी होऊ” ह्या विश्वासाने प्रयत्न करायला सुरुवात केली.

तिने एक तमिळ चित्रपट साईन केला. हयाबद्दल केवळ फोनवर बोलणे झाले होते. त्याचे चित्रीकरण चेन्नईत होणार होते. मात्र त्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काही फारच विचित्र गोष्टी घडल्या. चित्रपटात द्विअर्थी संवाद असल्याचे तिला जाणवले. चित्रपटाचे नेपथ्य, कपडे यांचासुद्धा तसाच वापरण्यात आला होता, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि तिने तो चित्रपट सोडण्याचे ठरवले.

“मी हे करणार नाही” असा ठाम नकार तिने दिला. ती चित्रीकरणातून निघून आली. कालांतराने त्या चित्रपट निर्मात्याने ह्यासाठी तिला कायदेशीर नोटीसही पाठवली होती.

vidya balan inmarathi 2

 

 

ह्याशिवाय विद्याला मानसिक क्लेश देणारा आणखी एक भयंकर प्रसंग घडला.

चेन्नईमध्येच एका शूटिंगदरम्यान एकदा एका दिग्दर्शकाने बोलण्याच्या बहण्याने तिच्या हॉटेलच्या रूम मध्ये प्रवेश केला. विद्याला प्रचंड टेंशन आलं होतं. या कठीण प्रसंगाला कसं तोंड द्यावं हे विद्याला कळेचना. पण शेवटी तिने एक मस्त शक्कल लढवली. विद्याने त्याला हसतमुखाने आणि प्रोफेशनलिझम दाखवत रूम मध्ये येऊ दिले, पण –

दुसरी कोणतीही फालतू चर्चा टाळून आणि या अशा लंपट दिग्दर्शकाला अधिक एंटरटेन न करता त्याच्याशी बोलणी करतेवेळी आपल्या खोलीचे दार उघडेच ठेवले…!

हयातून त्याला योग्य तो संदेश मिळाला आणि जुजबी बोलून पाचव्या मिनिटाला तो तिच्या खोली बाहेर पडला.

 

vidya-balan-InMarathi-07

 

ह्या काही वाईट अनुभवांनंतर तिने आपला मोर्चा हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळवला. तिला पहीला ब्रेक मिळाला “परिणीता” मधून. त्यासाठीही तिला अनेक स्क्रीन टेस्ट आणि ऑडिशन्स द्याव्या लागल्या. अखेर या सर्व संघर्षामध्ये ती यशस्वी ठरली, आणि पुढे काय झाले हे आपण जाणतोच.

दरम्यान तिने “कहानी” सारखा चित्रपट दिला, ज्यासाठी तीला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले गेल. शिवाय भूलभुलैया चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यानंतर “डर्टी पिक्चर” ह्या चित्रपटासाठी तिला पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. ह्या चित्रपटात तिने वादग्रस्त दाक्षिणात्य तारका सिल्क स्मिता ची भूमिका साकारली होती. “पा” सिनेमातली तिने साकारलेली सिंगल मदर अविस्मरणीय ठरली.

विद्या तिच्या अभिनयासोबतच तिच्या खास भारतीय पहरावासाठीही प्रसिद्ध आहे. ही तीच विद्या आहे जिच्या फॅशन सेन्स वर एकेकाळी टीका केली गेली होती.

तिच्याच “तुम्हारी सुलू” चित्रपटातील संवाद तिने खरा करून दाखवला आहे – “मै कर सकती है”…!

 

vidya-balan-InMarathi-03

आज विद्याने स्वतःला आणि आपण विद्याला, ती जशी आहे तसे स्वीकारले आहे. ह्याला कारण तिची प्रतिभा आणि प्रामाणिक प्रयत्न. आज ती भारतातील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्रीपैकी एक आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?