पैसा “सब कुछ” नहीं है, लेकिन “बहोत कुछ” है!”
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
दाभाडकर साब, पैसा “सब कुछ” नहीं है, लेकिन “बहोत कुछ” है!”
MSEB तील नोकरी सोडताना बाबांचा साहेब बाबांना समजावून सांगत होता – ३ वर्षांपूर्वी. हे वाक्य तेव्हापासून मनावर कायमचं कोरलं गेलं. अर्थात, आयुष्याची ३३ वर्ष ज्या MSEB ला दिली, तिथेच शेवटी ज्या प्रकारचा त्रास सुरू झाला होता – त्याचे बाबांच्या आरोग्यावर दुष्परिणाम दिसू लागले होते. त्यामुळे मी बाबांना रिटायरमेंट घ्यायलाच लावली.
परंतु – बाबांनी नोकरीची ३ वर्ष अशी सोडून देऊ नयेत – ह्या हेतूने साहेबाने हरप्रकारे प्रयत्न केले. तेव्हा ते वरील वाक्य म्हणाले होते. आम्हाला ते पटलं होतंच – सवाल तब्येत, सुख-समाधान की पैसा – ह्या सौद्याचा होता. त्यामुळे सौद्यात घासाघीस शक्यच नव्हती.
पण का ते माहिती नाही, आपल्याकडे – पैसा सब कुछ नहीं है, लेकिन बहोत कुछ है – ही अक्कल फारशी रूजलेली दिसत नाही. आपल्याला “पैसा कमावणं” ही गोष्टच त्याज्य, हीन वाटते.
कर्तृत्व शून्य पोरं जेव्हा “मला पैसा नाही मिळाला तरी चालेल…पण मानाने जगायचंय” किंवा “मी पैश्याच्या मागे धावत नसतो” असली वाक्य फेकतात तेव्हा ह्यांना कसं कसं समजावून सांगू आणि त्यांच्या मेन्टॅलिटीचं काय काय करू असं होतं. हे डायलॉग्ज खिश्यात पैसे असल्यावर बोलायचे असतात – हे लॉजिक कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं.

“साधी रहाणी उच्च विचारसरणी” ह्या सुवचनाचा उलट अर्थ घेतल्यासारखा झालाय आपल्याकडे. विचारसरणी काहीही असू देत…आपण साधं रहायला हवं. साधं रहायचंच आहे, म्हणून मग मोठी स्वप्न नकोतच…ती बघणं वाईट असतं…अशी ही बौद्धिक दिशाभूल आहे.
पैश्यांनी चैन विकत घेता येते, सुख नाही – हे कितीही खरं असलं तरी प्रेमाच्या माणसांना समाधानी-सुरक्षित ठेवण्यासाठी पैसे लागतातच. पोराबाळांच्या शिक्षणासाठी, आईवडिलांच्या औषधपाण्यासाठी पैसा लागतोच!
एवढंच नव्हे –
कधी नाटक-चित्रपट बघावेसे वाटले तर…कधी McD-CCD त जावं वाटलं तर…कधी फिरायला जावंसं वाटलं तर – आणि हे फिरायला जाणं किमान वन-वे तरी विमानानं करावंसं वाटलं तर…पैसा लागतोच! ह्या गोष्टी आवश्यक नाहीत, चैनीच्या आहेत हे ठिके. पण ह्या गोष्टी जीवनात प्रचंड value addition करतात हे सत्यच आहे. मानवी ऍस्पिरेशनचा हा नैसर्गिक भाग आहे – हे लक्षात घ्यायला हवं.
“पैसा की सुख-समाधान” हा प्रश्न बाबांच्या बाबतीत पैश्याच्या विरुद्ध बाजूने सुटला – कारण बाबांची जबाबदारी संपली होती आणि तो पर्यंत त्यांचा मुलगा पुढची जबाबदारी उचलायला सक्षम झाला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबापुरता पैश्याच्या गरजेचा प्रश्न निर्माण होणार नव्हता.
जे नुकतेच कर्तृत्व गाजवण्याच्या फेजमध्ये प्रवेश करत आहेत, त्यांनी असा विचार करून कसं चालेल?!
हे सर्व लिहावंसं वाटलं कारण फेसबुक-WhatsApp वर मेसेजमध्ये अनेक मित्र गप्पा मारताना आयडियलॉजिकल आमिषात अडकलेले वाटतात. गांधी-आंबेडकर-सावरकर वाचून झपाटल्यागत झालेले दिसतात. पैसा नाही कमावला तरी चालेल, पण काहीतरी “भरीव” करायचंय अशी ऊर्मी असलेले किंवा “पैसा नको मान पाहिजे” असं म्हणणारे पोरं पाहून काळजी वाटते.
मित्रांनो, इथे देशहित, समाजहित वगैरे गोष्टींचे उपदेश करणारे, विविध विचारसरणी, संस्था, पक्षांचे झेंडे वागवणारे अनेक लोक आपापली सोय लावून बसले आहेत. त्यांचा व्यवसाय-नोकरीत जम बसलेला आहे. त्यांची पोरं बाळं अमेरिकेत शिकताहेत. तुमचं अजून सगळंच बाकीये. त्यांच्या मागे लागून किंवा पोकळ माज-अभिमानाच्या वल्गनांपोटी आयुष्याची नासाडी करून घेऊ नका.
बच के रहना यारो.
पैसा “सब कुछ” नहीं है, लेकिन “बहोत कुछ” है!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.