' अवनी वाघिणीच्या हत्येच्या बाबतीत ह्या महत्वपुर्ण प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत आवश्यक आहे – InMarathi

अवनी वाघिणीच्या हत्येच्या बाबतीत ह्या महत्वपुर्ण प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत आवश्यक आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : हर्षद शामकांत बर्वे

===

शीर्षटीप :-

१. राजकीय चष्मा काढता येत नसेल तर हे वाचू नये.

२. ही कोणावरही वैयक्तिक टीका नाही. माझ्यावरच लिहिले आहे असे गृहीत धरू नये.

टी-वनचा किस्सा काल महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांच्या पद्धतीने संपवला. कायद्यात नमूद केलेले सर्व प्रोटोकॉल धाब्यावर बसवून. चालायचंच. हा काही पहिला वाघ नव्हता ज्याला माणसाने संपवले आणि शेवटचा देखील नसेल.

पण ज्या पद्धतीने लोक या केसमध्ये महाराष्ट्र सरकारला डिफेन्ड करण्याचा प्रयत्न करत आहेत ती पद्धत अत्यंत चुकीची आणि घातक आहे.

चूक माणसाची की वाघाची यात मला जायचे नाही. कारण डिफेन्सने तिचे बच्चे मोठे झाले आहेत असा देखील दावा केला आहे. पण चौदा पंधरा महिन्याचे वाघाचे बच्चे आपल्या सहा सात महिन्याच्या पिल्लांसारखे असतात हे त्यांना कुठे माहीत आहे.

 

avni-cubs1-inmarthi
dailyhunt.com

काही नरपुंगव तर ती वाघीण नव्हती वाघ होता हे देखील म्हणाले आहेत. तिची टेरेट्री हे झुडपी जंगल आहे, त्याला काही किंमत नसते असे देखील वारंवार सांगण्यात आले.

पण याच झुडपी जंगलात असलेला चित्ता आपण असाच गमावला आहे. चित्ता गेला आणि काळवीट तुमच्या माझ्या शेतकऱ्याच्या उरावर बसले. कायदा तुम्हाला त्यांना मारू देत नाही हे मात्र सगळे डिफेन्स लॉयर विसरत आहेत. हे प्राईम फॉरेस्ट नाही, इथे शेती आहे वगैरे वगैरे.

या सर्व डिफेन्स लॉयर्सनी जंगलासाठी काय केले आहे हे मात्र कोणी सांगत नाही. कृपया गुलमोहर आणि तसली झाडे लावणे म्हणजे वृक्षारोपण करणे यातून प्रथम बाहेर या. जंगल ही एक मोठी बायोसिस्टिम असते आणि वाघासकट आपण देखील त्याचा एक हिस्सा असतो.

ही बायोसिस्टिम तोडणे म्हणणे स्वतःचे घर तोडणे असे असते. डेव्हलपमेंट या नावाखाली सुरू असलेला ऱ्हास आपल्याच जीवाला किती घातक ठरू शकतो याचा अंदाज आज येणे कठीण आहे का? तर याचे उत्तर आहे अजिबात नाही.

निसर्गाने बनवलेल्या सिस्टिममधून एखादा जीव तुम्ही बाहेर काढला की त्याचे दुष्परिणाम लवकरच दिसतात. एक उदाहरण म्हणून सांगतो, चीनमध्ये एकेकाळी चिमण्या मारा असा आदेश काढण्यात आला, काय तर म्हणे त्या उभ्या पिकातले धान्य खातात.

मग सगळे चिमण्या मारायला लागले, त्यावर बक्षीस होते. याचे परिणाम असे झाले की चिमण्या नगण्य उरल्या, शेतात, झाडांवर पडणारे किडे खाणारे कोणी उरले नाही. जितके पैसे चिमण्या मारायला लागले त्याच्या कित्येक पट पैसे चिमण्यांची संख्या वाढवायला लागले.

एक झाड कापायला, एक वाघ मारायला किंवा एखादा जंगली प्राणी मारायला फारसा वेळ लागत नाही. उभे करायला मात्र अनेक दशके लागतात. आज कापलेले वडाचे किंवा पिंपळाचे झाड तसेच्या तसे उभे करायला कदाचित पुढची पन्नास वर्षे लागतील.

आज एक पाच वर्षांची वाघीण गेली म्हणजे अंदाचे पंधरा वाघ गेले. पंधरा वाघ गेले म्हणजे जवळपास वर्षाला पंधराशे वेगवेगळ्या प्रजातीची हरणे किंवा तत्सम प्राणी वाचले. हे प्राणी वर्षातून दोनदा बधाई हो असे म्हणतात.

यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाघ, सिंह, बिबटया, चित्ता असतो. उद्या हीच सगळी हरणे शेतात घुसली तर कोण जबाबदार असेल त्यासाठी.

मॅनगृव्हचे देखील असेच काहीसे आहे. पाण्याला वास येतो, त्यांचा काय उपयोग काय असे म्हणणारे विसरतात की हीच मॅनगृव्ह समुद्राला घरात घुसण्यापासून वाचवू शकतात. ही केस सुप्रीम कोर्टात पेटीशन दाखल करणारे हरले आणि कोर्टाने निकाल दिला.

टी-वनचे काय करायचे हे जरी वनखात्याच्या अधिकारात असले तरी पोचर/हंटर फिरवला वनखात्याने जंगलभर, तेही सहा आठ महिने. खडा न खडा माहिती झाली असेल त्याला.

उद्योगपतीला जमीन देणे आणि वाघाचा बंदोबस्त करायला (कायदा परवानगी देत नसतांना) हंटरला बोलावणे यातच सगळे हेतू क्लिअर होतात.

 

Avni1-inmarathi
indiatimes.com

विनाशाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. एक वाघ गेला म्हणून ना वाघ प्रजाती संपणार ना वाचणार. पण ज्या पद्धतीने हे केले गेले ते नक्कीच धक्कादायक आहे आणि टिकेला पात्र आहे.

लहानपणापासून वाघ बघतो आहे, बऱ्यापैकी अभ्यास आहे. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भयंकर काळे काहीतरी शिजते आहे. खालील मुद्दे वाचल्यावर व राजकीय चष्मा काढल्यावर ते आपल्या लक्षात येईल.

१. वाघ हा टेरोटोरीअल प्राणी आहे. जागा धरली की तो सहजा सहजी सोडत नाही. त्याच त्या रस्त्यावरून जायला त्याला आवडते. तो आपली टेरिटोरी सेंट मार्किंग करून ठेवतो. त्याच्या वागण्याचे घड्याळ जवळपास ९०% पक्का अंदाज बांधता येईल असे असते. हेच तर कारण आहे की एक्स्पर्ट गाईड्स तुम्हाला नॅशनल पार्कला वाघ दाखवू शकतात.

२. पिल्ले असलेली आई हिंस्त्र असते हे काही अंशी खरे आहे. हिंस्त्र तेंव्हा असते जेंव्हा तुम्ही काड्या करायला जाता. मी स्वतः दोन महिन्यांच्या पिल्लांचे फोटो काढले आहेत, अगदी जवळून. पण काड्या न करता. आई असलेल्या वाघिणीवर लोड फार असतो, ती सहसा टेरिटोरी सोडून जात नाही.

 

Avni-tigress1-inmarathi
.indiatvnews.com

ही दोन कारणे पुरेशी आहेत.

असे असतांना या लोकांना ही वाघीण सहा ते आठ महिने सापडली कशी नाही?

जंगल मॅपिंग सुरू होते का?

कायदा सांगतो की अशा प्राण्यांना मारण्यासाठी फक्त वन अधिकारी हत्यारे वापरू शकतात. ट्रांक्युलायझेशन गन आणि गन फक्त. असे असतांना कुत्रे, हंटर जंगलात फिरलेच कसे तेही सहा आठ महिने. कोणासाठी मॅपिंग सुरू होते?

माणूस या प्रजातीला कितीही दिले तरी कमीच पडणार आहे. पण तुम्ही आम्ही ट्रस्टी आहोत रे फक्त. उपभोग घ्यायचा आणि आहे तसे किंवा त्यात भर घालून पुढील जनरेशनला द्यायचे.

Let’s try to do something for us. So that, next generation or very next generation don’t say, Our grandfather or great grandfather were fucking irresponsible people !!

माणूस ही प्रजाती जगातली सगळ्यात मूर्ख प्रजाती आहे. सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेले असते, ओढू नका, खपाल तरी आपण ओढतो. दारूच्या बाटलीवर लिहिलेलं असते पिऊ नका, तरी आपण पितो.

सायन्स ज्याचा शोध आपणच लावला आहे, ते सांगते, जंगले संपवू नका, ती तुमची फुफ्फुसे आहेत तरी आपण ती तोडतो. अश्या प्रजातीला हुशार कसे काय म्हणायचे.

 

deforestation-inmarathi
cdn.yourarticlelibrary.com

असो, तुमच्या माझ्या बोलण्याने काही विशेष फरक पडेल का? उत्तर आहे नाही. पण आपल्या मनातल्या प्रेशरचा एक व्हॉल्व्ह ओपन करून टाकावा. म्हणजे समोर सुरू असलेल्या विनाशाकडे खुल्या डोळ्याने बघता येते.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?