' फक्त अलाहाबाद आणि फैजाबादच नव्हे, भारतातल्या या १० शहरांची नावे याआधी बदलली गेलीत – InMarathi

फक्त अलाहाबाद आणि फैजाबादच नव्हे, भारतातल्या या १० शहरांची नावे याआधी बदलली गेलीत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला. त्याचे स्वागतही झाले तसेच त्याला विरोधही केला गेला.

भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेले शिमला आता ‘श्यामला’ होणार आहे आणि हिमाचल प्रदेश मधील सरकार त्यासाठी अनुकूल आहे.

त्यानंतर ज्या शहरांची नावे बदलण्याची चर्चा असते अशा ठिकाणी नाव बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. सोशल मीडियावर देखील “नामकरण” मीम्सने मोठी जागा व्यापली आहे.

एकीकडे विविध राजकीय पक्ष आणि संघटना शहरांच्या नावात बदल करावा यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करत असतात तर दुसरीकडे शहराचे नाव बदलल्याने त्या शहराची अवस्था बदलेल का? असाही प्रश्न केला जातो.

आता लोकशाही आहे तर मतमतांतराला वाव असणारच ! तेव्हा काही शहरांची नावं बदलली जातात. अशाच काही शहरांची नावे जी मागील काही वर्षात बदलली गेली आहेत. केवळ शहरंच नाही तर राज्य आणि भाषा यांची पण नावे बदलली गेली आहेत.

१) अलाहाबादचे प्रयागराज

अलाहाबादचे नाव प्रयागराज होणार याला उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अर्थात हे नामकरण काही पहिल्यांदा झालेले नाही. इसवी सन १५८३ मध्ये मुघल सम्राट अकबर याने प्रयाग हे नाव बदलून इलाहाबाद असे केले होते. त्याचा अर्थ अल्लाहने वसवलेले शहर असा होतो.

 

Pragraj-inmarathi
rajexpress.co

गंगा – यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर वसलेले हे शहर कुंभमेळ्याचे देखील स्थान आहे. हिंदूंच्या तीर्थस्थानांपैकी एक महत्वाचे तीर्थ म्हणजे तीर्थराज म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रयागराज या नावाने हे शहर ओळखले जाते.

२) गुरगांवचे गुरुग्राम

एप्रिल २०१६ मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गुरगांवचे नाव बदलून गुरुग्राम करण्याची घोषणा केली.  मंत्रिमंडळाने त्याला मान्यता देत औपचारिकरित्या गुरगांव किंवा गुडगाव म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता गुरुग्राम या नावाने ओळखले जाते.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी निवडणुकीच्या वेळी जनतेला याबाबत आश्वासन दिले होते आणि आता त्या आश्वासनाची पूर्तता केली आहे. गुरुग्राम हेच या शहराचे प्राचीन नाव असून पुढे अपभ्रंश होत हे नाव गुरगांव/गुडगांव असे झाले होते.

महाभारतात देखील या शहराचा उल्लेख असून कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचे हे गाव आहे. तेव्हापासून हे स्थान गुरुग्राम या नावाने ओळखले जाते.

दिल्लीच्या जवळ असलेले हे शहर आजही तितकेच महत्वाचे शहर आहे. मिलेनियम सिटी म्हणून ओळखले जाणारे हे शहर हरियाणाचे आर्थिक केंद्र देखील आहे. जगातील फॉर्च्यून ५०० कंपन्यांपैकी २५० कंपन्यांची भारतीय कार्यालये या शहरात आहे.

 

gudgaon1-inmarathi (1)

या शहराची सांस्कृतिक ओळख जगभर पोहचावी आणि या शहराचे असलेले पौराणिक बंध जपण्याच्या दृष्टीने गुरुग्राम हे नाव योग्य असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

३) बॉम्बेचे मुंबई

बॉम्बेचे मुंबई असे नाव १९९६ मध्ये करण्यात आले. तत्कालीन शिवसेना आणि भाजप यांच्या युती सरकारने हे नाव बदलले होते.

मुंबईतील मुंबा देवीवरून मुंबई हे नाव प्रचलित झाले आहे. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदेवता आहे.

 

mumbaia-inmarathi
topinfowala.in

सुरुवातीला पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली सात बेटं म्हणजे मुंबई. पुढे आंदण म्हणून ते पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे आले. ब्रिटिशकाळात या शहराची मोठी भरभराट झाली. अनेक इतर भागातील रहिवासी इथे स्थायिक झाले.

१६ व्या शतकापासून मुंबई शहर हे अनेक नावांनी ओळखले गेले. काळ सरकत गेला तसा अनेक संस्कृतींचा ठसा या शहरावर उमटत गेला. परिणामी या शहराच्या नावाचा अपभ्रंश होत राहिला आणि अखेर बॉम्बे नावाने हे शहर ओळखले जाऊ लागले.

आज मुंबई संपूर्ण भारताचे आर्थिक केंद्र आहे. मात्र इथला भूमिपुत्र कुठे तरी आपली जागा यांत गमावून बसला होता. तेव्हा बॉम्बे हे इंग्रजाळलेले नाव बदलून मुंबई करण्यात आल्यावर सामान्य मराठी जनतेने त्याचे स्वागतच केले.

४) कलकत्ताचे कोलकाता

पश्चिम बंगालची राजधानी असलेले हे शहर आता कोलकाता या नावाने ओळखले जाते. एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याची राजधानी असलेले हे शहर आजही भारतातील तितकेच महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते.

बंगाली माणूस आपल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक ओळख जपण्यास आग्रही मानला जातो. त्यामुळे मूळ नावानेच या शहराचे नाव असावे हा मतप्रवाह होता. त्याला प्रतिसाद देत २००१ मध्ये कलकत्ता हे कोलकाता म्हणून ओळखले जाईल असे सरकारने जाहीर केले.

 

Calcutta1-inmarathi
flickr.com

कोलकाता ही भारताची “सांस्कृतिक राजधानी” म्हणून देखील ओळखली जाते. ‘सिटी ऑफ जॉय’ हे या शहराचे टोपणनाव असून ते त्या शहराचे वर्णनच आहे. कोलकाता हे नाव कोलिकाता या नावापासून आले आहे.

ब्रिटिश येण्यापूर्वी इथे तीन लहान खेडी होती पुढे ब्रिटीशांनी हे शहर म्हणून नावारूपाला आणले. ती तीन लहान खेडी म्हणजे कोलिकाता, सुतानुती आणि गोविंदपूर.

५) म्हैसूरचे म्हैसूरु

म्हैसूर राज्याची राजधानी असलेले हे शहर ऐतिहासिक आहे. जवळजवळ ६ शतकं हे शहर राजधानीचे शहर होते. (१३९९ ते १९५६).

 

maisur1-inmarathi
Findiarailinfo.com

२०१४ मध्ये या शहराचे नाव म्हैसूरु असे करण्यात आले. महिषाचे निवासस्थान म्हणजे म्हैसूरु. पुढे इंग्रजीच्या प्रभावाने हे नाव म्हैसूर झाले. हिंदू पौराणिक कथांनुसार, या स्थानी  राक्षस लोक राज्य करत होती. पुढे चामुंडेश्वरी देवीने त्यांचा निःपात केला.

६) मंगलोरचे मंगळुरु

कर्नाटकातील प्रमुख बंदर असलेले शहर म्हणजे मंगळुरु. २०१४ मध्ये या शहराचे नाव मंगळुरु असे बदलण्यात आले. मंगलादेवी या देवीच्या नावावरून या शहराचे नाव आले आहे. या देवीचे भव्य मंदिर येथे आहे.

येथे कन्नड सोबतच तुळू, कोंकणी, मल्याळी लोक स्थायिक आहेत. त्यामुळे हे शहर वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

 

manglur1-inmarathi
foursquare.com

७) बंगलोरचे बेंगळुरू

आपल्या देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी असा लौकिक या शहराचा आहे. नोव्हेंबर २००६ मध्ये बेंगळुरू असे नाव बदलण्यात आले. पूर्वीचे नाव इतर शहरांच्या नावाप्रमाणेच इंग्रजाळलेले होते. इसवी सन ८९० मध्ये येथे लढाई झाल्याचे उल्लेख इतिहासात मिळतात.

 

banglore1-inmarathi (1)

 

८) मद्रासचे चेन्नई

१९९६ मध्ये मद्रासचे चेन्नई असे नाव बदलण्यात आले. मद्रास हे नाव स्थानिक मच्छीमारांच्या वास्तव्यावरून आले होते. चेन्नई हे नाव देखील स्थानिक देवतेच्या नावापासून आले आहे.

 

chennai-madras-inmarathi
ibtimes.co.in

९) पाँडिचेरीचे पुडुचेरी

दिल्लीप्रमाणेच केंद्रशासित असलेला परंतु राज्य दर्जा असलेले पाँडिचेरी पुढे पुडुचेरी झाले. हे नाव २००६ मध्ये बदलण्यात आले. हे तामिळ नाव असून याचा अर्थ “नवीन शहर” असा होतो.

 

padducherry1-inmarathi
Findiarailinfo.com

१०) ओरिसाचे ओडिशा

२०११ मध्ये राज्याचे नाव ओरिसाचे ओडिशा आणि राज्यभाषेचे नाव ओरिया चे ओडिया करण्यात आले.

ओडिशा हा शब्द प्राकृत भाषेतील ‘ओड्ड विसया’ यापासून आला आहे. हा उल्लेख चोळ प्रथम राजाच्या काळातील आहे. साधारण इसवी सन १०२५ असा हा काळ आहे.

१५ व्या शतकात सरल दास यांनी महाभारताचा ओडिया भाषेत अनुवाद केला होता. त्यात ओड्र राष्ट्र आणि ओडिशा असा उल्लेख या प्रदेशाचा आहे. याशिवाय गजपती राज्यातील कापिलेंद्र देव राजाच्या शिलालेखात (१४५३-१४६७) पण ओडिशा, ओडिशा राज्य असा उल्लेख आहे.

 

odihsa1-inmarathi
bangaloremirror.indiatimes.com

ही काही महत्वाची शहरे आणि राज्य आहेत ज्यांची नावे बदलली गेली. दक्षिणेत हे प्रमाण अधिक आहे. कर्नाटकात तेरा शहरांची नावे २०१४ मध्ये बदलण्यात आली होती. पश्चिम बंगाल या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव विधिमंडळात संमत झाला आहे. त्यामुळे भविष्यात या राज्याचे नाव देखील बदललेले असेल.

यामुळे काय साध्य होते हा प्रश्न अनेकांना पडतो पण ही नावे बदलण्यामागे लोकांच्या भावना जोडलेल्या असतात, हे मात्र नक्की !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?