' ….बाहेर येऊन पाहिलं तर तरुणींनी चुंबने घेऊन त्यांची कार गुलाबी करून टाकली होती – InMarathi

….बाहेर येऊन पाहिलं तर तरुणींनी चुंबने घेऊन त्यांची कार गुलाबी करून टाकली होती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना ह्यांच्या लोकप्रियतेचे अनेक किस्से सांगितले जातात. सत्तरच्या दशकातील राजेश खन्ना असे पहिले अभिनेते होते ज्यांना इंडस्ट्रीचा सुपरस्टार म्हटले जात असे.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणाऱ्या राजेश खन्नांचा जन्म २९ डिसेम्बर १९४२ रोजी पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला होता.

त्यांना लहानपणापासूनच अभिनय करण्याची आवड होती आणि अभिनेता होण्याचे त्यांचे स्वप्न होते.

 

Rajesh-Khanna-

पण त्यांचे वडील मात्र त्यांच्या ह्या आवडीच्या सक्त विरोधात होते. राजेश खन्ना ह्यांचे खरे नाव जतीन खन्ना असे होते. त्यांना त्यांच्या आईवडिलांनी दत्तक घेतले होते. त्यांना शाळेत असतानापासून अभिनय करायला आवडत असे आणि ते अनेक नाटकांत कामे करत असत.

जेव्हा राजेश खन्ना ह्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या काकांनी जतीन ह्यांचे नाव बदलून राजेश असे करण्यास सांगितले. १९६५ साली त्यांनी युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअर ह्यांनी आयोजित केलेले ऑल इंडिया टॅलेंट कॉन्टेस्ट जिंकले.

त्यानंतर त्यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटात काम मिळाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९६६ साली चेतन आनंद ह्यांच्या “आखिरी खत” ह्या चित्रपटातून केली.राझ हा त्यांचा दुसरा चित्रपट होता.

ते चित्रपटसृष्टीत संघर्ष करत असताना त्यांना बहारों के सपने, औरत, डोली आणि इत्तेफाक ह्या चित्रपटांद्वारे यशाची चव चाखायला मिळाली.

१९६६ ते १९६९ ह्या काळात त्यांनी चित्रपटसृष्टीत पाय रोवण्यासाठी खूप संघर्ष केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि शक्ती सामंत ह्यांच्या “आराधना” ह्या चित्रपटात राजेश खन्ना ह्यांना संधी मिळाली.

 

Aradhana

उत्तम संगीत,गीते आणि अभिनयाने नटलेल्या ह्या चित्रपटाने गोल्डन ज्युबिलीचे यश मिळवले आणि राजेश खन्ना ह्या स्ट्रगलिंग अभिनेत्याचे एका सुपरस्टारमध्ये परिवर्तन झाले. आराधना ह्या चित्रपटाने किशोर कुमार ह्यांना सुद्धा लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान केले.

राजेश खन्नांचा आवाज म्हणजे किशोर कुमार हे समीकरण पक्के झाले.

आराधनाच्या यशानंतर राजेश खन्ना ह्यांच्या यशस्वी चित्रपटाची रांगच लागली. कटी पतंग, अनुराग, अमर प्रेम, अजनबी, अनुरोध ,आवाज ,आनंद,बावर्ची,सफर, दाग खामोशी, आखिर क्यों, नमकहराम, इत्तेफाक, मर्यादा, अंदाज, अगर तुम ना होते, अमृत, रोटी, आप की कसम

अश्या अनेक चित्रपटांतून त्यांनी लोकांच्या खास करून तरुणींचा मनावर जादू केली. ते लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार होण्याचा गौरव मिळाला.

तरुणी त्यांच्या प्रेमांतच पडल्या. बहुतांश तरुणींना राजेश खन्ना पती म्हणून हवे होते. त्यासाठी त्या राजेश खन्ना ह्यांना चक्क स्वतःच्या रक्ताने लिहिलेली प्रेमपत्रे पाठवत असत.

 

Mere Fans Mujhse Koi nahi Chhin Sakta

राजेश खन्नांच्या फोटोशी लग्न करून, स्वतःचे बोट कापून घेऊन ,फिल्मी स्टाईल “मांग में सिंदूर” भरून घेणाऱ्या वेड्या तरुणी अनेक होत्या. राजेश खन्ना खरं तर कुल ड्युड ,क्लासिक हँडसम वगैरे प्रकारात मोडणारे नव्हते.

ते एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय मुलासारखे दिसत असत. पण ज्या क्षणी ते मान थोडीशी झुकवून,ओठांवर थोडेसे स्मितहास्य घेऊन कॅमेराकडे बघून डोळे मिचकावत असत, तेव्हा त्यांची ही अदा बघून लाखो तरुणी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत असत. त्यांचे हेच रूप तरुणींना जवळचे वाटत असे.

त्या काळी त्यांची ती खास हेअरस्टाईल अनेक तरुण कॉपी करत होते.

त्यांची रोमँटिक गाणी,रूप तेरा मस्ताना, मेरे सपनो की रानी आणि ओ मेरे दिल के चैन बघून लाखो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकत असे. त्यांची संवादफेक, त्यांची नाचण्याची खास अदा बघून देशातल्या तरुणी त्यांच्यासाठी अक्षरशः वेड्या झाल्या होत्या.

लोक त्यांच्या कपडयांची म्हणजेच “गुरु कुर्त्यांची” स्टाईल कॉपी करत असत. टेलर कडे राजेश खन्नांसारखा कुर्ता जसा च्या तसा शिवून देण्याची मागणी करत असत.

केशकर्तनालयात केस कापून देणाऱ्यांकडे राजेश खन्नांसारखी हेअर स्टाईल करून मागणाऱ्या तरुणांची गर्दी असे.

 

Rajesh-Khannas-Kurta_v-1080x608

 

लोकप्रियतेच्या शिखरावर असताना राजेश खन्नांना अनेकवेळा चाहत्यांच्या गर्दीला तोंड द्यावे लागत असे. त्यांच्या स्त्री चाहत्या त्यांच्या एका कटाक्षासाठी जीवाचे रान करत असत. त्यांना स्पर्श करण्यासाठी धडपडत असत. काही नाही तर अगदी त्यांच्या गाडीचे सुद्धा चुंबन घेत असत.

राजेश खन्नांची गाडी लिपस्टिकच्या मार्कने भरून गेलेली असे. राजेश खन्ना जिथे जायचे तिथे चाहत्यांची गर्दी कित्येक तास आधीच पोचलेली असायची आणि त्यांच्या नावाचा जप करत असायची. चाहत्यांचे असे प्रेम क्वचितच एखाद्याला लाभते.

राजेश खन्ना ह्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत एकूण १६३ चित्रपटांत काम केले आणि त्यातील १०६ चित्रपटांत ते मुख्य भूमिका करणारे अभिनेते होते. आणि २२ चित्रपटांत त्यांच्या बरोबर दुसरे अभिनेते मुख्य भूमिकेत होते.

१९६९ ते १९७२ च्या काळात त्यांनी एकामागून एक असे १५ सुपरहिट चित्रपट दिले. त्यांचा हा रेकॉर्ड भारतीय चित्रपटसृष्टीत अजूनही अबाधित आहे.

राजेश खन्ना ह्यांना त्यांच्या कारकिर्दीत तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. आणि चौदा वेळेला त्यांना ह्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. २००५ साली त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

 

SD Burman, Rajesh Khanna & others received award in the function shown to user

 

त्यांना जसे दैदिप्यमान यश मिळाले तसेच नंतरच्या आयुष्यात त्यांना अपयशाचा सामना देखील करावा लागला. १९७६ ते ७८ मध्ये त्यांच्या चित्रपटांना यश मिळणे कमी झाले.

पण १९७८ सालानंतर त्यांनी फिर वोही रात, दर्द , धनवान, अवतार ,अगर तुम ना होते सारख्या सिनेमांत केले. ह्या चित्रपटांचे समीक्षकांनी खूप कौतुक केले. १९८० च्या दशकात त्यांच्या चित्रपटांना यश मिळेनासे झाले तरीही त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही.

१९९२ ते १९९६ पर्यंत ते काँग्रेसकडून लोकसभेत निवडून गेले होते.

राजेश खन्ना व अंजु महेंद्रू हे सत्तरच्या दशकात एकमेकांबरोबर नात्यात होते. पण नंतर त्यांनी १९७३ साली त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान असलेल्या डिम्पल कपाडिया बरोबर विवाह केला. त्यांना ट्विंकल व रिंकी ह्या दोन मुली झाल्या.

पण नंतर त्यांच्या नात्यात काही समस्या आल्यामुळे डिम्पल मुलींबरोबर वेगळ्या राहू लागल्या. त्यांनी कायदेशीर घटस्फोट घेतला नाही. असे म्हणतात की राजेश खन्ना ह्यांची काही काळ टिना मुनीम (अंबानी) ह्यांच्याशी सुद्धा जवळीक झाली होती. पण नंतर राजेश खन्ना एकटेच राहू लागले.

२०१२ साली त्यांची प्रकृती खालावू लागली. २३ जून रोजी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना ८ जुलै रोजी घरी सोडण्यात आले पण १४ जुलै रोजी परत प्रकृती बिघडल्याने त्यांना परत लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

१६ जुलैला घरी सोडण्यात आले. १८ जुलै २०१२ रोजी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी “आशीर्वाद” बंगल्यात अखेरचा श्वास घेतला आणि सुपरस्टार राजेश खन्ना ह्या पर्वाचा अंत झाला.

राजेश खन्ना ह्यांचे चाहते अजूनही आहेत आणि त्यांचे जुने चित्रपट अजूनही टिव्हीवर लागले की लोक आवडीने बघतात. त्यांची जादू अजूनही लोकांच्या मनावर कायम आहे. राजेश खन्ना ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?