' भारताला मध्ययुगात नेणारे, वैदिक विमानांवर आरुढ होऊ पहाणारे शिक्षण! – InMarathi

भारताला मध्ययुगात नेणारे, वैदिक विमानांवर आरुढ होऊ पहाणारे शिक्षण!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : संजय सोनवणी

===

जेंव्हापासून मोदी सरकार सत्तेत आले तेंव्हापासून आपले मानव संसाधन खाते हे देशाच्या एकुण बौद्धिक व कौशल्य संपदेत भर घालण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याऐवजी आपला वैदिक अजेंडा रेटण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे असेच चित्र आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना रा. स्व. संघाच्या विद्याभारतीतील शिक्षणपद्धतीतील काही तज्ज्ञ प्रत्यक्ष भेटले होते. त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान वगैरेंतील भारतीयांचं योगदान अभ्यासक्रमात असायला हवं यासाठी त्यांना आपला कार्यक्रम दिला. त्यानंतर काही दिवसांत मानव संसाधन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सु.श्री. स्मृती इराणींनी काय केलं असेल तर अभ्यासक्रमात वेद-उपनिषदं, प्राचीन विज्ञान, सामाजिक शास्त्र, तत्त्वज्ञान, व्याकरण आणि भाषा यातील योगदान समाविष्ट करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली व तसे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेही. अर्थात यावर प्रचंड वादळ उठले व हा वैदिक कार्यक्रम थोडा मागे टाकावा लागला.

दरम्यान दस्तुरखुद्द मोदींनीच पुरातन काळात भारतात प्लॅस्टिक सर्जरी व जनुकीयशास्त्राचे तंत्र कसे प्रगत होते हे गणपती व कर्णाचे उदाहरण देऊन मुंबईत एका भाषणात सांगितले होते. जगभर हसू झालेली ही माहिती त्यांना अर्थात दिनानाथ बात्रांच्या इतिहासाच्या पुस्तकांतून मिळाली असावी!

Narendra modi.marathipizza
intoday.in

स्मृती इराणींनंतरचे आताचे मानव संसाधन मंत्री सत्यपाल सिंग यांनी तीच री ओढत नुकतेच इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण देतांना म्हटले की विमानाचे पहिले यशस्वी उड्डान राईट बंधुंनी नव्हे तर त्यांच्याही आठ वर्ष आधी शिवकर बापुजी तळपदे यांनी केले होते व हा इतिहास आता आय.आय.टी. च्या विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे! रामायणातील पुष्पक विमानाबद्दलही ते भरभरून बोलले.

एकंदरीत संघप्रभावाखालील या सरकारच्या एकुणातीलच बौद्धिक क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उभ्या करणा-या या बाबींकडे आपण अत्यंत गांभिर्याने पाहिले पाहिजे. पण आपण आधी त्यांच्या दाव्यातील तथ्यही तपासून पाहुयात.

satypal singh.marathipizza
jagran.com

भारतच नव्हे तर चीनी, बॅबिलोनीयन, ग्रीक व इजिप्शियन पुराणकथांतही विमानांचे उल्लेख येतात. रामायणातील पुष्पक विमान सर्वांना माहितच आहे. आकाशात पक्षांप्रमाणे उडता यावे ही जगभरच्या माणसाची पुरातन आकांक्षा त्याच्या पुराकथांतून येते. ती  खरोखरीच अस्तित्वात होती हे जगातील कोणताही देश समजत नाही. समरांगन सुत्रधार या भोजाच्या (अकरावे शतक) ग्रंथात वास्तुशास्त्र, विहिरी/बारव कसे बांधावेत हे वर्णन करतांना लाकडापासून ते पा-याचा उपयोग करत पाणी/जमीन व आकाशात प्रचालित होईल अशा विमानांचा उल्लेख येतो पण त्यात कसलीही तांत्रिक माहिती येत नाही. एवतेव तो एक कल्पनाविलास आहे हे उघड आहे. ज्या ग्रंथाबद्दल फारच चर्चा असते ते “वैमानिक शास्त्र” हे पुस्तक पुरातन नसून १९१८ ते १९२३ या काळात दाक्षिणात्य विद्वान सुब्बराया शास्त्री यांनी लिहिले. याच काळात “बृहदविमान शास्त्र” हे पुस्तक ब्रह्ममुनी पारिव्राजक यांनी लिहिले, पण प्रसिद्ध झाले १९५९ मध्ये. सुब्बराया शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकात दावा केलाय की ऋषी भारद्वाजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देवून विमानशास्त्राचे ज्ञान दिले. या ग्रंथावर आधारीत (कसे ते माहित नाही कारण पुस्तकच मुळात फार नंतर लिहिले गेले.) अथवा ऋग्वेदातील काही ऋचांवर आधारीत १८९५ मध्ये शिवकर बापु तळपदेंनी “मरुत्सखा” नामक विमान बनवुन दादर चौपाटीवर उड्डानाचे प्रात्यक्षिक सादर केले व त्याला टिळकही उपस्थित होते असे दावे केले गेले. पण या दाव्यांना पुष्टी देईल असा कोणताही पुरावा नाही. खुद्द केसरीतही असले कोणतेही वृत्त प्रसिद्ध झालेले नव्हते.

 

shivkar bapuji talpade.marathipizza
ytimg.com

१९७४ सालात इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्सच्या (बेंगळुरु) डॉ. एच. एस. मुकुंदा व अन्य ३ शास्त्रज्ञांनी या दोन्ही ग्रंथांचे अध्ययन करुन आपली निरिक्षणे “सायंटिफिक ओपिनियन”च्या अंकात नोंदवली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की विमानोड्डानासाठी आवश्यक असलेल्या अनेक ज्ञानशाखांपैकी कशाचेही दर्शन यात दिसून येत नाही. विमानासाठी जी भौमितीक रचना या पुस्तकांत गृहित धरण्यात आली आहे ती विमान प्रचालनासाठी वापरता येणे अशक्य आहे. शिवाय विमानाची डायमेंशन्स गोंधळाची व वारंवार बदलणारी आहेत…त्यात सातत्य नाही. विमानाचे प्रचालन व नेव्हीगेशन कसे होणार हेही या पुस्तकांत उल्लेखले गेलेले नाही. प्रत्यक्ष उड्डानासाठी विमानाचे वजन जसे हवे त्यापेक्षा हे कितीतरी पट जड असल्याने प्रत्यक्ष प्रयोग करुन प्रात्यक्षिक घेता येणार नाही. डायमेंशन्स देतांना विती, अंगुली अशी अशास्त्रीय परिमाने वापरली आहेत.त्यांचा प्रत्यक्ष उपयोग नाही आणि दोन्ही ग्रंथ संस्कृतात असले तरी त्यांची भाषा अर्वाचीन आहे. वैदिक संस्कृतशी त्या भाषेचा संबंध नाही. या विषयातील तज्ञ जे. बी. हेअर म्हणतात, या दोन्ही पुस्तकांत असे काहीही नाही जे ज्युल्स व्हर्न आपल्या विज्ञानिकांत सांगत नव्हता. एका काल्पनिकेपलीकडे त्याला महत्व देता येत नाही. या पुस्तकांना विज्ञान म्हणता येणार नाही. ही दोन्ही पुस्तके राइट बंधुंच्या प्रत्यक्ष विमानोड्डानानंतर लिहिली गेलेली आहेत. तळपदेंच्या प्रयोगाचे पुरावे उपलब्ध नाहीत.

 

h s mukunda.marthipizza
telegraphindia.com

विमानाबद्दल हे वास्तव असतांना व प्लॅस्टिक सर्जरी व जनुकीयशास्त्रांबद्दलची मोदींची विधाने सरळ सरळ हास्यास्पद असतांना हे विज्ञान म्हणून विद्यार्थ्यांना शिकवायचा नुसता विचार करणेही आपल्या शिक्षण पद्धतीला धोकेदायक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. सारे आधुनिक विज्ञान वेदांमध्ये होते असे अशास्त्रीय पण वैदिक अहंकार सुखावणारे विधान मानव संसाधन मंत्र्यांनी करावे हे दुर्दैवी आहे. आज भारतातील एकही विद्यापीठ जागतिक दर्जाच्या दोनशे विद्यापीठांत नाही. मानव संसाधन मंत्र्यांना त्याची अधिक काळजी वाटायला हवी. आपण जागतिक ज्ञानात, मग ते उपयुक्ततावादी असो कि निखळ सिद्धांतिक पातळीवर, कोणतीही भर घातलेली नाही. आम्ही सॉफ्टवेअरमध्ये स्वत:ला अग्रेसर समजतो पण आमच्या देशातील कोणीही आजतागायत एकही स्वतंत्र प्रणाली बनवू शकलेले नाही आणि याला कारण आहे आमची  शिक्षण व्यवस्था, जी आज केवळ बेरोजगार निर्मितीचे अवाढव्य कारखाने बनलेली आहे. शिक्षणामुळे आम्ही प्रज्ञावंत घडवायचा प्रयत्न करण्याऐवजी परिक्षा पद्धतीचे भारवाही हमालच बनवत चाललो आहोत. याची खंत मात्र कोणाला दिसत नाही.

मानव संसाधन मंत्र्यांचे काम हे असते की देशातील एकूण बौद्धिक व कौशल्यांनी सक्षम विद्यार्थी घडवता येतील या दिशेने एकूण शिक्षण व्यवस्था नेणे व भविष्यातील सर्व प्रकारची आव्हाने पेलण्यासाठी त्यांना सक्षम बनवणे. याऐवजी आमचे मंत्री मात्र जे सिद्धच झालेले नाही, अथवा सिद्ध होण्याचीही शक्यता नाही अशा गोष्टी शिक्षणक्रमात आणण्याचे सुतोवाच करतात आणि विद्यार्थ्यांना पुढे जायला प्रेरित करण्याऐवजी मिथ्याज्ञानात रममाण व्हायला सांगतात.  हे देशाच्या भवितव्यासाठी सुचिन्ह नाही. भारतात पुरातन काळी ज्ञान होतेच असा दावा असेल तर ते विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घ्यायला वेगळी यंत्रणा असायला एक वेळ हरकत नाही. भारतात ज्ञानशून्य लोक रहात होते, असेही कोणी म्हणत नाही. पण जे काही ज्ञान होते ते बीजरुपात अथवा संकल्पना स्वरुपात होते, त्याचा जो पुढचा तार्किक विकास व्हायला हवा होता तो न झाल्याने आज ते कुचकामी आहे हे समजत नसेल तर मंत्र्यांच्या बौद्धिक पातळीवर शंका घेणे स्वाभाविक आहे. वैदिक विमाने, ब्रह्मास्त्रे, जनुकीय शास्त्र वगैरे सर्वच बाबी आमच्या वैदिक पुर्वजांनी शोधल्या होत्या याचा मिथ्याभिमान बाळगत खूश व्हायला हरकत नसली तरी शिक्षण मात्र प्रत्यक्ष प्रमाणांवर चालते हे आपल्याला समजायला हवे.

skills devlopment.marathipizza
netdna-ssl.com

आपल्यापुढे भावी पिढी विज्ञाननिष्ठ होत जागतिक ज्ञानात भर घालू शकेल इतकी सक्षम करणे हे आव्हान आहे. बेरोजगारीचा विस्फोट पाहता आपल्याला ताज्या दमाचे नवे लघू ते महाकाय उद्योग उभे करण्याची क्षमता व प्रेरणा असलेले उद्योजक/व्यावसायिकही निर्माण करायचे आहेत. आपले समाज विज्ञान आजही थोड – थोडके नव्हे तर पन्नास-साठ वर्ष मागे रेंगाळते आहे,  त्यामुळे आपल्याला अजुनही अनेक सामाजिक प्रश्नांवरची उत्तरे सापडलेली नाहीत. आपल्याला नवप्रेरणांनी भारलेली पिढी घडवायची असेल, तर ती आधुनिक शिक्षणातुनच घडू शकते. आजचे शिक्षण पद्धती दोषांनी परिपुर्ण आहेच, पण ती बदलायची म्हणून ती दिनानाथ बात्राप्रणित करुन चालणार नाही. आजच्या शिक्षणपद्धतीला आकलनाधारित करत ती आजच्या जागतिक दर्जाच्या आधुनिक शिक्षणमुल्यांनाही पुढे नेणारी असावी लागेल. हे जमत नसेल तर मानव संसाधन मंत्र्यांनी किमान पुढच्या पिढ्यांना  मध्ययुगात न्यायचा प्रयत्न करू नये!

 

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?