हे चित्रपट प्रोड्युसर्सना इतके “जड” गेले की त्यांच्या जीवनाला कायमची कलाटणी मिळाली…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
बऱ्याच जणांना कला अवगत असते पण पैसा आडवा येतो तर बऱ्याच लोकांना फक्त हौस असते आणि पैसे खूप असून त्यातली समज कमी असते किंवा फक्त आवड असते. मग अशावेळेस ही दोघे एकत्र येतात आणि एक कलाकृती तयार करतात.
कलाकार आपली कला देतो आणि निर्माता आपला पैसा. कारण एखादा चित्रपट किंवा कलाकृती तयार करायची असेल तर कले बरोबरच या पैसा खूप महत्त्वाचा असतो जो ती कला अजून सुंदर बनवण्यात मदत करतो.
त्यातले त्यात निर्माते हे चित्रपट क्षेत्रात जास्त असतात. आजकाल नवीन तंत्रज्ञान आणि एकंदरीतच सगळ्या गोष्टींचा खर्च हा खूप असतो, तो पेलवण्यासाठी एका भक्कम निर्मात्याची गरज असते.

जसं आपण बोललो की खूप पैसा लागतो, पण तो जेव्हा एखाद्या चित्रपटावर लावला जातो तेव्हा तो चित्रपट चालेलंच याची काही पूर्ण खात्री देता येत नसते.
म्हणून मग बऱ्याचवेळा निर्माते खूप पैसे लावून चित्रपट चालला नाही तर ते तोट्यात देखील जातात. आता आपण अश्याच काही निर्मात्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
तिसरी कसम हा एक चित्रपट होता, ज्यात राज कपूर आणि वहिदा रहमान हे मुख्य भुमिकेत होते. उत्कृष्ट संगीत, अभिनय असं सगळं असूनही चित्रपट चालला नाही, आणि याच दुःखामुळे निर्माते शैलेंद्र यांचा वयाच्या ४३व्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

असाच गुरुदत्त यांनी निर्देशित केलेला चित्रपट कागज के फुल या चित्रपटाला सुरुवातीला सर्वांनी नापसंती दर्शवली. यामुळे त्यांना धक्का बसला आणि त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली.
दुर्दैव हे की त्यांच्या मृत्यू नंतर या चित्रपटाला खूप यश मिळाले. जगातल्या १०० उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत याची नोंद झाली. या नंतर बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले.

मीनाकुमारी यांचा पाकीजा या चित्रपटा बरोबर असंच काहीसं झालं, पाहिले प्रेक्षकांनी नापसंती दाखवली पण हा चित्रपट देखील मीनाकुमारी यांच्या मृत्यू नंतरच चालला.
या मध्ये या गोष्टीचं वाईट वाटतं की या लोकांना हयात असताना हे त्यांच्या चित्रपटाचं यश पाहता नाही आलं. पण आपल्याकडे पद्धतच आहे ना, व्यक्ती असते तोपर्यंत त्याच्याबद्दल वाईट बोलायचं आणि गेल्यावर त्याचं कौतुक करायचं. तसच काहीच या चित्रपटांबाबतीत झालं.

शशी कपूर यांनी अजूबा नावाचा एक चित्रपट बनवला होता. यात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया आणि ऋषी कपुर अशी स्टार कास्ट देखील होती.
या चित्रपटाचं बजेट हे ८० लाख होतं, पण चित्रपट चालला नाही आणि फक्त ४५ लाख एवढीच कमाई झाली. यामुळे शशी कपुर यांना खूप धक्का बसला, ते यातून बरेच दिवस सावरू शकले नाही. यानंतर त्यांनी कधीच चित्रपट बनवला नाही.

सिने सृष्टीत भगवान दादा हे नाव बरंच मोठं होतं. असंही म्हणतात की त्यांची डान्स स्टेप ही अमिताभ बच्चन यांनी घेतली. पण भगवान दादा देखील यातून चुकले नाही.
त्यांनी हंसते रेहना नावाचा एक चित्रपट बनवला होता ज्यामुळे त्यांना खूप रडावं लागलं. ह्या चित्रपटात किशोर कुमार हिरो होते, पण तरीही चालला नाही.

हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी आपला सर्व पैसा लावला, तसेच बायकोचे दागिणे गहाण ठेवले. पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. असं म्हणतात की किशोर कुमारांमुळे हा चित्रपट बंद करावा लागला होता.
चित्रपट बनवणे ही एका प्रकारची नशाच आहे. ती माणसाला काहीही करण्यास भाग पाडते. त्यामुळे आजकाल चित्रपट बनवताना निर्माते देखील सगळं तपासून पाहून मग निर्णय घेतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.