' युनेस्कोने गौरवलेल्या “सर्वश्रेष्ठ ८” लढायांपैकी एक – केवळ २१ भारतीय सैनिक विरुद्ध हजारो शत्रू! – InMarathi

युनेस्कोने गौरवलेल्या “सर्वश्रेष्ठ ८” लढायांपैकी एक – केवळ २१ भारतीय सैनिक विरुद्ध हजारो शत्रू!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सरागढीच्या युद्धाबाबत मराठी वाचकांना माहित असणे मुश्कीलच. पण ज्यांचा इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे, त्यांना मात्र या युद्धाबद्दल माहित नसेल तर नवलंच! कारण केवळ भारतीय इतिहासातील नाही तर जागतिक इतिहासात आजवर जेवढ्या सर्वोत्तम लढाया होऊन गेल्या आहेत त्यामध्ये सरागढीच्या लढाईचा आवर्जून उल्लेख केला जातो.

चला तर जाणून घेऊया या रोमांचकारी युद्धाची गाथा!

 

changez-khan-battle-marathipizza

 

सरागढी हे  अफगाणिस्तान व उत्तर पाकिस्तान यांदरम्यान पसरलेल्या हिंदूकुश पर्वतरांगेमध्ये वसलेलं एक छोटंसं गाव आहे. सध्या हे गाव पाकिस्तानच्या क्षेत्रात येतं. पूर्वी या भागावर भारताचा अंमल होता. आजपासून ११९ वर्षांपूर्वी केवळ २१ शीख योद्ध्यांनी या गावामध्ये आपली अमर पराक्रम गाथा रचून या गावाला जागतिक इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून दिले.

तेव्हा ब्रिटीशांच्या राजवटीत भीम पराक्रमी म्हणून नावारूपाला आलेली ३६ शीख रेजिमेंट ही सरागढीच्या परीसरामध्ये तैनात होती. ब्रिटीशांसाठी प्रादेशिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या गुलिस्तान आणि लाकहार्ट किल्ल्यांच्या मधोमध या रेजिमेंटची चौकी होती.

 

battle-of-saragarhi-marathipizza
ichowk.in

सरागढीची ही चौकी म्हणजे दोन्ही किल्ल्यांच्या दरम्यानचे संपर्क माध्यम होती. १८९७ च्या सप्टेंबरमध्ये शेजारील अफगाणांच्या सेनेने ब्रिटीश सत्तेविरुद्ध उठाव केला आणि या प्रदेशावर अगणित हल्ले केले. परंतु दरवेळेस ३६ शीख रेजिमेंटकडून त्यांनी सपाटून मार खाल्ला. काही केल्या त्यांचे हल्ले यशस्वी होत नव्हते.

१२ सप्टेंबर १८९७ चा दिवस उजाडला. दिवस उजाडतो न उजाडतो तोच १२ ते १५ हजार अफगाण सैन्याने लाकहार्ट किल्ल्याला वेढा दिला आणि हल्ल्याला प्रारंभ केला.

शत्रू सैन्याची ही अनपेक्षित चाल पाहून सिग्नल इंचार्ज ‘गुरुमुख सिंह’ यांनी लेफ्टिनेंट कर्नल जॉन हॉफ्ट याला होलोग्राफवर परिस्थितीचा सारांश दिला. पण एवढ्या सैन्याला तोंड देत वेढ्यामध्ये अडकलेल्या ३६ शीख रेजिमेंटच्या सैनिकांना मदत पोहोचवणे केवळ अशक्य होते.

पण त्या शीख वीरांनी हिंमत सोडली नाही. जीव गेला तरी बेहत्तर पण प्राण असेपर्यंत शस्त्र खाली ठेवायचे नाही असा निर्धार करत ते २१ शीख सैनिक सज्ज झाले.

 

battle-of-saragarhi-marathipizza03
m.livehindustan.com

लांसनायक लाभ सिंह आणि भगवान सिंह यांनी देखील एकटयाने युद्ध लढण्याचा निर्णय जाहीर केला. भीषण युद्धाला तोंड फुटले. आपली रायफल घट्ट धरीत शत्रूंच्या मस्तकाचा ठाव घेत, आवेशाने पुढे गेलेल्या भगवान सिंह यांना वीरमरण आले. पण एकही शीख सैनिक मागे हटला नाही.

विरोधी पक्षाचे हे मनोधैर्य पाहून अफगाण सेना देखील चपापली. त्यांनी लवकरात लवकर किल्ला हस्तगत करण्यासाठी किल्ल्याच्या भिंतीवर प्रहार करण्यास सुरुवात केली. पण त्यांचे ते प्रयत्न देखील निष्फळ ठरत होते, जणू तो किल्ला देखील त्याच्या रक्षणकर्त्यांच्या बाजूने ठाण मांडून युद्धात उभा होता.

पण त्या हजारोंच्या शत्रूपुढे हळूहळू एक एक शीख योद्धा शहीद होत होता. आता हवालदार इशर सिंह यांनी नेतृत्व आपल्या हातात घेतले आणि “जो बोले सो निहाल, सत श्री अकाल” चा घोष करत थेट शत्रूच्या तुकडीवर चालून गेले.

काही क्षणातच त्यांनी २० शत्रूंना यमसदनी पाठवले. इतक्यात शत्रूने त्यांना चारी बाजूने घेरले आणि त्यातच ते लुप्त झाले.

आपल्याला मार्गदर्शन करणारे योद्धे मृत्युमुखी पडत असल्याचे पाहून शीख शिपायांचा जोर ओसरण्याच्या ऐवजी अधिकच वाढला. त्यांनी देखील प्राणाची पर्वा न करता त्या रक्तरंजीत युद्ध कुंडात उडी घेतली.

आपण जिंकू शकत नाही हे त्यांनी ओळखले होते, पण जीवात जीव असेपर्यंत प्रतिकार नक्कीच करू शकतो याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे आत्मसमर्पण न करत शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले कर्तव्य बजावले.

हळूहळू सूर्य मावळतीला झुकू लागला होता आणि इकडे त्या २१ शीख योध्यांचा लढवय्या रवी देखील रणांगणातच मावळला.

 

battle-of-saragarhi-marathipizza02
ichowk.in

पण त्या २१ शीख योद्ध्यांनी मरता मारता ५००-६०० शत्रूंना यमसदनी पाठवत शत्रू पक्षाला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.

अवघ्या २१ शीख सैनिकांना तोंड देता देता अफगाण सैन्य चांगलेच थकले होते. यातच त्यांची संपूर्ण रणनीती ढासळली आणि याचाच फायदा घेत मागाहून आलेल्या ब्रिटीश सैन्याने अफगाण सैन्याची पार धूळधाण उडवली आणि त्यांच्या हातातील विजय आपल्या पदरात पाडून घेतला.

पण हे सर्व शक्य झाले केवळ त्या २१ योध्यांमुळेच!

इंग्लंडने देखील त्यांच्या पराक्रमाचा यथोचित सन्माना केला, संपूर्ण विश्वात या २१ शीख सैनिकांच्या पराक्रमाचे त्या काळी कौतुक केले गेले.

ही घटना निश्तिच फार मोठी आहे, यावर एक ब्रिटिश डॉक्युमेंटरी सुद्धा तयार करण्यात आली आहे.  यावर एक फेसबुक पेज देखील आहे,

https://www.facebook.com/watch/saragarhi/

 

आणि अक्षयकुमारचा सुपर हिट पिक्चर केसरी देखील कोण विसरू शकेल?

 

 

युनेस्कोने ही जगातील सर्वश्रेष्ठ ८ पराक्रमी लढायांमध्ये या युद्धाचा समावेश केला गेला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?