' कश्मीरातला वाढता इस्लामिक कट्टरवाद चिरडणे भारतासाठी महत्वाचे – InMarathi

कश्मीरातला वाढता इस्लामिक कट्टरवाद चिरडणे भारतासाठी महत्वाचे

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सध्या मुस्लीम कट्टरवादाचा ताजाताजा बळी झायरा हीला ठरावे लागले, कारण काय तर एका हिंदी चित्रपटात काम केले व यासाठी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी तिला युवकांनसाठी आयडॉल वगैरे ठरवले. यामुळे कश्मीरातील कट्टरपंथी यांचे सोशलमाध्यमातील पाळलेले सांड उधळले व त्यांनी झायरा वर खालच्या भाषेत टिका केली. यामुळे बिचारी घाबरून गेली व तिला याबाबतीत स्पष्टीकरण द्यावे लागले. चार पाच वर्षापूर्वी पाकिस्तानात मलाला युसूफजई नावाच्या शाळकरी पोरीलाही असेच कट्टरवाद्यांनी निशाणा बनवले होते. तस्लीमा नसरीन यांनाही या कट्टरवादापायी आपला देश सोडवा लागला होता. दोन तीन वर्षापूर्वी फ्रान्स मध्ये शार्ली हेब्दो या मासिकावर हल्ला करून सात व्यंगचित्रकार यांना मारण्यात आले, म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लीमांवर अत्याचार झाले म्हणून भारतात अमरजवान ज्योतीची विटंबना करण्यात आली होती. ही यादी न संपणारी आहे. यातील समान सुत्र म्हणजे धार्मिक कट्टरवाद हे होय!

zaira-wasim-marathipizza

स्रोत

भारतात कश्मीरमध्ये याबाबतीत सगळ्यांत जास्त बिकट परिस्थिती आहे. भारतीय कश्मीरातील मुसलमान हे हिंदूमधूनच धर्मांतरीत झालेले आहेत. ते अजूनही हिंदूच्या काही चालीरीती पाळणारे आहेत. आजरोजी सगळ्यात जास्त कट्टरता येथील मुस्लीमांमध्ये बघायला मिळते. याला कारण कश्मीरचा इतिहास आणि तेथील राजकारण भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष हे होत. भारत स्वतंत्र झाल्यापासूनच या राज्यात अस्वस्थता आहे. शेख अब्दुला हे या अस्वस्थथेला प्रामुख्याने कारणीभूत आहेत. सुरवातीला भारतात विलीन होऊनही या माणसाने नंतर भारताशी दगाबाजी केली. आज कश्मीरातील नॅशनल कॉन्फ्रन्स असे नाव असलेला पक्ष त्यांनीच स्थापन केलेला आहे. तेव्हा त्याचे नाव मुस्लीम कॉन्फ्रंन्स असे होते. धर्मनिरपेक्षतेची व देशाशी एकात्म आहोत हे दाखविण्यासाठी मग त्याचे रूपांतर नॅशनल असे करण्यात आले होते. हा पक्ष, याची धोरणे याचेच फळ म्हणजे आजचा कश्मीरातील कट्टरवाद होय!

आपल्या सभेला लाखो लोक येतात, आपल्याला मानतात पण तरीसुद्धा ते भारताविरोधात उठाव का करत नाहीत ?पाकिस्तानच्या जिहादच्या हाकेला ओ का देत नाहीत ? असा विचार शेख अब्दुलाने जेव्हा केला तेव्हा पंजाबी व पाकिस्तानी मुस्लीमांप्रमाणे हे धार्मिक दृष्टीने तेवढे कडवे नाहीत. त्यांच्या इतके परधर्म- असहिष्णू नाहीत या निष्कर्षापर्यंत ते येऊन पोहचले होते. यामुळेच मग त्यांन कश्मीरची राष्ट्रीय व व्यावहारिक गरज म्हणून या मुसलमानांना धार्मिक दृष्टीने कडवे करण्याची गरज जाणवली व त्यांनी तसे करण्यासाठी पावलेही उचलली होती. यासंदर्भातील काही उदाहरणे पाहूयात.

kashmir-protest-marathjipizza

स्रोत

जमाते इस्लामीतर्फे राज्यात इस्लामची मुलतत्वे शिकविण्यासाठी अनेक पाठशाळा काढण्यात आल्या. त्याला शेख अब्दुलांच्या सरकारने जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. यात दारउल इस्लाम व दार उल हरब याचे शिक्षण दिले जाऊ लागले. थोडक्यात मुस्लीमांचे ब्रेनवाशिंग जोरात सुरू झाले. याला शेजारच्या पाकिस्तानातील कट्टरपंथी यांची व सरकारचीही सक्रिय मदत मिळाली. अशाप्रकारे मुसलमानांच्या धर्मभावना भडकावून आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच त्यांना समांतर अशा लष्करी संघटना उभारण्यात आल्या होत्या. JKLF ही त्यातील प्रमुख संघटना होती. हीलाही शेख साहेबांचा आर्शिवाद होता. मस्जिदीमधून धर्मयुद्धाचे आवाहन केले जात असे, काफीरांना कश्मीर सोडण्यासाठी धमकावले जाऊ लागले, शरियत,निजाम ए मुस्तफा आणण्यासाठी मुसलमानांना नित्यनियमाने आवाहने करण्यात येऊ लागली. अशी सगळी तयारी झाल्यानंतर कश्मीर आता उठावासाठी तयार झाले होते. ही संधी कश्मीरी दहशतवाद्यांना १९८६ साली मिळाली. त्यांनी निवडणूकीत धांदल झाली असा आरोप करून दंगलीला सुरूवात केली. यात चारशे हिंदूची घरे जाळली, शेकडो मंदिरांना तोडण्यात आले, हिंदूना मारण्यात आले, अथक प्रयत्नाने सरकारने दंगलीवर नियंत्रण मिळवले. परंतु ही वादळापूर्वीची शांतता ठरली.

शेख अब्दुला व पाकिस्तानने केलेल्या धार्मिक युद्धाच्या आवाहनात पहिला बळी कश्मीरी पंडीत यांचा घेतला गेला. त्यांना भारताचे एंजट असा शिक्का मारून गद्दार ठरवले गेले. मकबुल बट्ट या दहशतवाद्याला फाशीची शिक्षा सुनावली म्हणून एका पंडित न्यायाधीशाला लालचौकात गोळी घालून मारण्यात आले. हजारो पंडितांना मारण्यात आले. त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात येऊन त्याद्वारे त्यांना घाटी सोडण्यासाठी भाग पाडण्यात आले. त्या पोस्टरवर त्यांना कश्मीरी भाषेत ‘रलीव,सलीव व गलीव’ असे पर्याय देण्यात आले होते. आमच्यासोबत रहा म्हणजे मुसलमान बना(रलीव), पळून जा (सलीव) ,नाहीतर मरा(गलीव )! अशाप्रकारची जीवघेणी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पंडिताना अक्षरशः तेथून रातोरात जीव मुठीत घेऊन पसार व्हावे लागले होते.

सर्वसामान्य मुसलमानांनाही वाटले की आता स्वातंत्र्य जवळ आले तेव्हा त्यांनीही या हिंसाचारात सक्रिय सहभाग नोंदवून पंडितांच्या घरादारावर, मालमत्तेवर कब्जा जमवण्यास सुरूवात केली होती. पंडिताचे जे नुकसान झाले ते आपल्याजागी आहेच. त्याची भरपाई कशानेही होऊ शकत नाही, पण या सीमेबाहेरून आलेल्या कट्टरवादाने सगळ्यात जास्त नुकसान खुद्द कश्मीरी मुसलमानांचे केले आहे. आज कश्मीर खोऱ्यात शांतता असती तर हे प.आशियाचे हॉलीवुड बनले असते. पण आज राजकारणी व धर्माच्या अट्टाहासापायी तिथे मरणकळा पसरलेली आहे. हे जे गनकल्चर तिथे आले व रुजले यामुळे हा भाग कमालीचा मागास व अस्थिर झालेला आहे. कट्टरपंथी हे तेथील समाजावर वरचढ झालेले आहेत. झायरा वशीम हिच्या प्रकरणात याची चूणूक दिसली आहेच!

kashmir-protest-marathjipizza02

स्रोत

कश्मीरात मुस्लीमांनी काही जरी केले तरी भारत सरकार त्यांना कधीही स्वातंत्र्य देणार नाही. कलम ३७० द्वारे या आधीच त्यांना स्वायत्तता दिली गेलेली आहे. हे कलम रद्द करून कश्मीरचा वेगळेपणा निकालात काढला पाहिजे. जम्मू व लडाख यांचे वेगळे विभाग बनवून यांना श्रीनगरच्या राजकीय प्रभावाखालून बाहेर काढले पाहिजे. खोरे व पाकव्यात कश्मीरातील काही जिल्हे यांचा एक वेगळा विभाग बनवून उत्तर कश्मीर नावाने राज्य बनवले पाहिजे. कश्मीरात असलेली समस्या ही नकाशावर दिसते तेवढी मोठी नाही, ती फक्त कश्मीर खोऱ्यापूरतीच मर्यादित आहे आणि याचबरोबर आपले आतापर्यंत असलेले कश्मीर धोरण हे साफ अपयशी ठरलेले आहे, याची खुणगाठ मनाशी बांधून आपल्या धोरणकर्त्यांनी नवीन धोरण आणले पाहिजे. यात त्यांच्या स्वंयनिर्णयाचा अधिकार त्यांना सोडायला लावायचा हे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. तसेच खोऱ्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काही बदल करता येतील काय? ते करण्यासाठी काय काय करावे लागेल?  याकडेही यात प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. कश्मीरी मुसलमानांना भारत सरकारने आतापर्यत फारच लवचिकतेने वागवलेले आहे. आता वेळ जरा कठोर धोरण करण्याची आहे. ते तसे करून आधी तेथील कट्टरवादी व हुरियत वाले यांना अलगथलग केले पाहिजे. तिथल्या उदारवादी,लोकशाहीवादी व भारतवादी घटकांना बळ पुरविले पाहिजे आणि नॅशनल कॉन्फ्रन्स व पिडिपीला भारतवादी मानून धोरण आखणे बंद केले पाहिजे आणि त्यांना पर्याय उभे केले पाहिजेत, तरच काही वर्षांनी ही समस्या संपेल अन्यथा हे भिजतं घोंघडे कायमच राहील..!

थोडक्यात जायरा वशिमला माफी मागावी लागली, माघार घ्यावी लागली त्याचा इतिहास हा असा आहे. ही मानसिकता यातून आली आहे. या मानसिकतेला संपवायचे असेल तर भारताला आता पुढाकार घेऊन ठोस कृती करावी लागेल. तरच याठिकाणी शांतता नांदेल. नाहीतर दर दोन चार वर्षांनी आपल्याला तिथे उठावांचा व दंगलीचा सामना करावा लागेल..:-)

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Shivraj Dattagonde

लेखक राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक आहेत.

shivraj has 25 posts and counting.See all posts by shivraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?