जाणून घ्या कोणती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारत देश एक असा देश आहे, ज्यावर परदेशी आक्रमणकर्त्यांनी खूप वर्ष राज्य केले. पण आजही आपला भारत देश एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो.
दारिद्र्य, भ्रष्टाचार, कुपोषण आणि अपुरी सार्वजनिक आरोग्य सेवा यांसारख्या आव्हानांचा सामना करत असून देखील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने ही आव्हाने खूप चोखपणे पार पाडली आहेत.
आपल्या भारत देशाचा क्षेत्रफळानुसार सातव्या क्रमांक लागतो. लोकसंख्येमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि लोकशाही असलेला सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे.
२०१७ च्या आकडेवारीनुसार भारताचा अर्थव्यवस्थेत जगामध्ये सहावा क्रमांक लागतो. आज आपण भारतामधील सर्वात जास्त जीडीपी (ग्रॉस डॉमेसटिक प्रोडक्ट) असलेल्या शहरांबद्दल जाणून घेणार आहोत…
१. मुंबई

मुंबई ही भारताची आर्थिक, व्यवसायिक आणि मनोरंजनाची राजधानी आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांपैकी एक मुंबई आहे.
तसेच भारतातील २१.२ मिलियन लोकसंख्येसह दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले महानगरीय क्षेत्र आहे. २०१५ च्या सुमारास मुंबईच्या मेट्रो भागाचा जीडीपी ३६८ बिलियन डॉलर होता.
२. दिल्ली

दिल्लीची लोकसंख्या ११ मिलियनपेक्षा जास्त आहे. तर संपूर्ण एनसीटीची लोकसंख्या १६.८ मिलियन आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले तिसरे मोठे शहर आहे.
उत्तर भारतातील दिल्ली सर्वात मोठे व्यवसायिक केंद्र आहे. दिल्ली शहराच्या शहरी भागातील अर्थव्यवस्थेचा जीडीपी १६७ ते ३७० बिलियन डॉलर इतका आहे. त्यामुळे दिल्ली हे भारताचे दुसरे सर्वाधिक उत्पादक मेट्रो क्षेत्र बनले आहे.
३. कोलकाता

कोलकाता हे शहर हुगली नदीच्या पूर्वेकडे वसलेले आहे. कोलकाता हे कलकत्ता म्हणून ओळखले जाते असे. कोलकाता हे पूर्व भारताचे व्यवसायिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे.
कोलकातामधील बंदर हे भारतातील सर्वात जुने बंदर आहे. भारतातील हे तिसरे सर्वात दाट लोकसंख्या असलेले शहर आहे. कोलकाताच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी ६० ते १५० बिलियन डॉलर्स इतका आहे.
हे भारतातील तिसरे सर्वात जास्त उत्पादनशील महानगरीय क्षेत्र आहे.
४. बँगलोर

बँगलोर ही भारताची सिलिकॉन व्हॅली किंवा आयटी राजधानी म्हणून ओळखली जाते. इस्रो, इन्फोसिस, विप्रो आणि एचएएल यांसारख्या तांत्रिक संस्थांचे मुख्यालय या शहरामध्ये आहे.
भारतातील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगाने वाढणारे शहर आहे. बँगलोरच्या मेट्रो भागाच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी ८३ बिलियन डॉलर आहे.
५. हैदराबाद

हैदराबाद हे मोती आणि हिरा व्यापार केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे लाड बाजार, बेगम बाजार आणि सुलतान बाजार अशा प्रकारच्या अनेक पारंपारिक बाजारपेठी अजूनही चालतात.
या शहराच्या ७४ बिलियन यूएस डॉलरच्या जीडीपी आऊटपुटसह हैदराबाद हे भारतातील पाचवे उत्पादनाचे मोठे शहर आहे.
६. चेन्नई

चेन्नई हे एक असे शहर आहे, ज्याला परदेशी प्रवासी देखील भेट देतात. २०१५ मध्ये जगातील सर्वात जास्त भेट देणाऱ्या शहराच्या यादीत हे शहर ४३ व्या स्थानावर होते.
नॅशनल जियोग्राफिकने चेन्नईला अन्नाच्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक दिला आहे, या यादीत हे भारतातील एकमेव शहर आहे. चेन्नईच्या मेट्रो भागातील अर्थव्यवस्थेचा जीडीपी अंदाजे ५८.६ ते ६६ बिलियन डॉलर आहे.
७. अहमदाबाद

हे शहर साबरमती नदीच्या काठावर वसलेलं आहे. भारतातील सर्वात मोठ्या शहरांच्या यादीत अहमदाबादचा सहावा क्रमांक लागतो. तसेच ती देशातील सातवी मोठी मेट्रो सिटी आहे.
अहमदाबादची लोकसंख्या ६.३ मिलियनपेक्षा जास्त आहे. तर अहमदाबादचा जीडीपी ६४ बिलियन यूएस डॉलर एवढा आहे.
८. पुणे

दख्खन पठाराच्या पश्चिमेस समुद्रसपाटीपासून जवळपास ५६० मीटर म्हणजेच १८४० फूट उंचीवर पुणे हे शहर आहे. हे शहर सह्याद्री पर्वत रंगांच्या निमुळत्या बाजूवर आहे, ज्या अरबी समुद्राला अडथळा निर्माण करतात.
हे शहर डोंगराळ भागामध्ये आहे. या शहराची जीडीपी ४८ बिलियन यूएसडी एवढी आहे.
अशी ही भारतातील सर्वात जास्त जीडीपी असलेली शहरं भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत बनविण्यासाठी मोलाचा हातभार लावतात.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.