' हैदराबादेतील बेघरांना आसरा देण्यासाठी सरकारची अभिनव शक्कल! – InMarathi

हैदराबादेतील बेघरांना आसरा देण्यासाठी सरकारची अभिनव शक्कल!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कुणी घर देतं का घर.. हा डायलॉग नटसम्राट या नाटकावर तयार करण्यात आलेल्या ‘नटसम्राट’ या सिनेमातून आपण नव्याने ऐकला असेल. माणसाच्या ज्या काही मुलभूत गरजा असतात त्यापैकी सर्वात महत्वाची गरज म्हणजे घर. छोटासा घर है ये मगर…, देखो मैने देखा है ये एक सपना फुलों के शहर में है घर अपना… वगैरे घराशी निगडीत गाणीही आपण ऐकली आहेत. घरं घेताना होणारी माणसांची धावपळ हे काही नवीन नाही. भारतातली अनेक शहरं ही लोकसंख्यावाढीमुळे बकाल झाली आहेत. लोकांना शहरात रहायला जागा नाही हे कारण नेहमीचं झालं आहे.

 

homeless-people-inmarathi
Express Photo by Vasant Prabhu

अन्न, वस्त्र , निवारा आणि शिक्षण या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून सरकार त्या पुरवण्याच्या प्रयत्नात आहे. तसचं गरीबी हटवण्याचाही प्रयत्न प्रत्येक वेळी केला जातो. आता तो किती यशस्वी होतो, याची आकडेवारी खाजगी संस्था आणि सरकारी यंत्रणा वेळोवेळी जाहीर करतातच. काही प्रमाणात या गोष्टी कमी झाल्या आहेत. शहरात असणाऱ्या नोकरीच्या संधीने अनेक लोकं शहराकडेच धाव घेतात. त्यांना तिथेच आपलं बस्तान बसवावं लागतं. त्याकरता रोजच्या जगण्याचा संघर्ष करून त्यांना डोक्यावरच्या छताची सोय करावी लागते.

 

Home in Railway - InMarathi01
24coaches

त्यावर उपाय म्हणून हैद्राबादमध्ये बेघर नागरिकांना घरं देण्यात येणार आहेत. या करता रेल्वेच्या जुन्या आणि वापरात नसलेल्या डब्यांचा वापर करण्यात येणार आहे. पालिका विभागातील गरिबी हटावच्या योजने अंतर्गत ही संकल्पना राबवण्यात येत आहे. २१ पैकी १६ पालिकांनी या योजनेकरता अर्ज केले आहेत. राज्याच्या यंदाच्या आर्थिक संकल्पामध्ये २१ प्रकल्पांकरता तरतुद केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला सुरवात झाली असून ६ प्रकल्प फक्त हैद्राबादमध्ये राबवले जात आहेत.

 

Home in Railway - InMarathi02
commons.wikimedia

आत्तापर्यंत रेल्वे हे फक्त प्रवासाचे साधन होते. पण आता या प्रकल्पामुळे रेल्वेचे डबे हे माणसांच्या निवाऱ्याचे साधनही होणार आहे. आहे ना आश्चर्य! रेल्वेची सुविधा काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत इंग्रजांमुळे झाली. त्यावेळी त्यांनी स्लिपर कोच म्हणून ज्या लाकडाच्या फळ्या टाकल्या त्याकरता भारतात जंगलतोड केली. त्यासाठी इंग्रजांनी सागाचा वापर अधिक केल्याचे म्हटले जाते. तसच काही ठिकाणी आजही आपण ते स्लिपर कोच बघतो. कला कुसर म्हणून काही ठिकाणी या स्लिपरकोचचा बसण्याच्या बेंचसाठी वापर केला जातो. टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना भारतीयांना नवीन नाही. अशीच एक संकल्पना हैद्राबाद व त्या जवळील काही शहरांमध्ये राबवली जात आहे.

 

Home in Railway - InMarathi04
ndtv

या संकल्पनेमुळे तेथील गरीब आणि बेघर लोकांना घरं मिळणार आहेत. गरीब व बेघर लोकांना नवी घरं मिळेपर्यंत केंद्र सरकारने या प्रकल्पाला पाणी पुरवठा व सांडपाणी वाहून नेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतू गरीब व बेघर जनतेला घरं देताना कोणतीही डागडूजी व डब्यांचे स्थलांतर रेल्वे करणार नाही. ते ज्या स्थितित आहेत त्याच स्थितित ते डबे वापरण्याकरता दिले जातील. वर सांगितल्या प्रमाणे हैद्राबाद व जवळच्या परिसरात ६ उपक्रम राबवले जात असून, अदिलाबाद, कामारेड्डी, करीम नगर, मंचेरीयल, मेडचल, भैसाना, निर्मल, अन्नुर, निजामाबाद, वेमुलवाडा, शादनगर, हुजूर नगर, कोदाद, येलांडू, आणि भोंगिर याठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.  ही पहिलीच अशी संकल्पना आहे जी रेल्वेच्या डब्यांमध्ये नागरिकांच्या निवाऱ्याची सोय करत आहे.

त्यामुळे येथील गरीब जनतेला तात्पुरता निवारा मिळणार असून, त्यांच्या निवाऱ्याची गरज भागवण्यात सरकारी यंत्रणा किती यशस्वी होते हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय आहे.

या घरात लोकं कशी राहतील हा कदाचित परदेशातून भारत भ्रमंतीवर येणाऱ्या लोकांच्या कुतुहलाचा विषयही होऊ शकतो. जसं या आधी डबेवाले, धारावी आणि अशा अनेक गोष्टी बघण्यास परदेशी लोक येतात…!

===

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?