“हमारे लोगाकूच तक्लीफ कायकू देते साब?”
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
मतदार ओळखपत्र आणि मतदार यादीतील नोंदी बाबत चुका दुरूस्त करण्यासाठी गेलो होतो. अचानक “हमारे लोगाकूच तक्लीफ कायकू देते साब?” हे वाक्य मोठ्याने ऐकू आलं. वाक्य ऐकून अंदाज आला होता – त्याप्रमाणे – ३-४ दाढी-टोपी-काजळ-पांढरा सदरा असलेले लोक घोळका करून तहसीलदार साहेबांशी भांडत होते. त्यांची तक्रार देखील निवडणूक काळात चटकन लक्षात येईल अशीच होती.
त्यांच्या ओळखपत्र, वॉर्ड सगळ्यांमध्ये चुका होता – आणि त्यांचं म्हणणं होतं की त्या चुका, फक्त मुस्लिमांच्या बाबतीतच मुद्दाम केलेल्या होत्या. हा आरोप करत असताना त्याच कचेरीत, त्यांच्या आजूबाजूला उभे असलेले २०-२५ लोक त्यांना दिसत होते. सर्वजण बहुतेक त्याच कारणांसाठी आलेले होते…!
पण ह्या चौघांचं लक्ष सेम प्रॉब्लम फेस करणाऱ्या बिगर मुस्लिम २५ जणांकडे गेलं नाही. साहेब समजावून सांगत राहिले…लोक भांडतच राहिले.
फार जुना प्रसंग आहे – पण नेहेमी आठवत रहातो.
“फक्त आमच्यावरच अन्याय होतोय” ही भावना एकदा मनात पक्की बसली की माणूस विनाकारण आक्रमक होतो, आजूबाजूचं वास्तव दिसेनासं होतं आणि आपल्या उत्कर्षासाठी आपल्यालाच कष्ट उपसावे लागणार आहेत – हे भान विसरून जातो.
वरील उदाहरण ३-४ मुस्लिम बांधवांचं असलं तरी ही गोष्ट आज प्रत्येक समूहात सारखीच दिसते.
बामणांनी वर्चस्व गाजवलं, मुस्लिम शासकांनी अत्याचार केले, हिंदुत्ववाद्यांनी दंगली पेटवल्या इत्यादी ऐतिहासिक सबबी देऊन “आज” एखाद्या समूहाला शत्रू भासवणं – हे वरील “माझ्यावरच अन्याय होतोय” अशी फसवी भावना मनात ठसवण्याचं पुढचं पाऊल आहे.
ह्या पुढच्या पावलात – माझ्या दारिद्र्यासाठी, निरक्षरतेसाठी, बेकारीसाठी – किंवा एकूणच मागास सामाजिक परिस्थितीसाठी दुसरा एक समूह कारणीभूत आहे — असं भासवलं जातं. हे सर्व आपोआप घडत नाही. अशी भासमान विचार प्रक्रिया फार व्यवस्थीशीर रित्या घडवली जाते. त्यामागे योजनाबद्ध प्रयत्न असतात. कारण त्यातूनच अनेक लाभ मिळतात.
“दुसऱ्या समूहामुळे आपला उत्कर्ष झाला नाही” अश्या फसव्या आभासातून दोन गोष्टी साध्य होतात.
एकतर “आपला” समूह खुश होतो. “तुझ्या प्रॉब्लम्सचं कारण आणि सोल्युशन – दोन्हीही तूच आहेस” हे कुणाला ऐकायला आवडतं? त्या ऐवजी दुसरीकडे बोट दाखवून – त्यांच्यामुळे तुमची परिस्थिती वाईट आहे – असं म्हटलं की पब्लिक टाळ्या मारतं, खुश होतं, उदोउदो करतं. बस्स, ह्या समूहाचा विरोध करत रहाण्याची झिंग चढत जाते आणि तुम्ही ‘शत्रूशी भिडणारा’ हिरो बनता.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे “आपणच जबाबदार आहोत” असं एखाद्या नेत्याने म्हटलं तर ऱ्हासाची कारणं दूर करण्याच्या युक्त्या/मार्ग सांगणे आणि त्यांची अंमलबजावणी करून घेणे – ही त्या समूहाच्या नेत्याची नैतिक जबाबदारी होऊन बसते! कोण करणार आ बैल मुझे मार? म्हणून मग वेगवेगळ्या समूहांकडे बोट दाखवा आणि हिरो बना असं सोपं तंत्र वापरलं जातं. प्रत्येक कंपूत असेच हिरो उभे रहातात.
भासमान शत्रू उभा केल्याने समस्या कधीच सुटत नाहीत, झखम जशीच्या चिघळत रहाते आणि त्याच जखमेवर वर्षानुवर्षे राजकारण चालूच रहातं.
ह्या सर्व प्रक्रियेत मजेशीर गोष्ट अशी की खरंतर सर्व समूहांच्या समस्या सारख्याच असतात. सर्वांचे सोल्युशन्स देखील सारखेच असतात – आणि समस्या सॉल्व्ह करू शकेल अशी यंत्रणा पण एकच असते…!
पण वेगवेगळ्या लढाया लढणारे हे गट एकत्र येऊन, एकमुठ करून समान समस्येवर काम करत नाहीत – आणि सर्वांच्या समस्या जशास तशा रहातात…!
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
छान लेख