' विठ्ठलाचे वारकरी विरुद्ध शिवप्रतिष्ठान चे धारकरी? – सत्य काय आहे हे वाचा – InMarathi

विठ्ठलाचे वारकरी विरुद्ध शिवप्रतिष्ठान चे धारकरी? – सत्य काय आहे हे वाचा

सदर लेखावर प्रतिक्रिया देण्याची इच्छा असल्यास आमच्या फेसबुक पेज – facebook.com/InMarathi.page वर मेसेज करावा. निवडक प्रतिक्रियांना प्रसिद्धी देण्यात येईल.

===

श्रीशिवछत्रपती हे धार्मिकच होते, आणि जिथं शक्य असेल, वेळ असेल त्यावेळी जवळ असणाऱ्या साधू संतांच्या दर्शनाला ते जात असत..हीच त्यांची भावना मनात ठेवून आणि राष्ट्रभक्तीला धर्मभक्तीची जोड असावी म्हणून २०१२ पासून भक्तीगंगा शक्तीगंगा म्हणजेच वारकरी धारकरी संगम श्री.संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शन घेऊन सुरू करण्यात आला.

sambhaji bhide guruji shivpratishthan marathipizza

आजवरचीच रीत पडून गेलीय की तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेऊन त्या पालखीसोबत काही पावले संभाजी पुलापर्यंत चालत जाऊन तिथेच माउंलींच्या पालखीचे दर्शन घेऊन सांगता करायची. आजवर हे कार्य निर्विघ्न पार पडत आलंय. यंदा काय झालं? पोलीस कमिशनर यांनी सुरुवातीसच येऊन शस्त्रे नकोत याबद्दल विनंती केली, त्याला मान देऊन यंदा शस्त्रपथक ठेवलेच नाही. त्यांनतर तुकोबांची पालखी येताच दर्शन घेऊन धारकरी मार्गस्थ झाले. पुढे पुढे सरकताना तुकोबांच्या पालखीत आणि ज्ञानोबांच्या पालखीत बरेच अंतर पडले. ते पाहून पोलीस कमिशनर यांनीच गुरुजींना भेटून धारकरी प्रवाहाला तुकोबांच्या मागून येण्यास सांगितले आणि गुरुजी आणि धारकरी त्यांच्या विनंतीला मान देऊन तुकोबांच्या पालखीमागून निघाले. याला जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटे लागली असावीत. हे सर्व इतका वेळ गाडीतच बसून पाहणारे राजाभाऊ चोपदार, धारकरी मार्गस्थ होताच पोलीस कमिशनर यांच्यापाशी जाऊन त्यांच्याशी हुज्जत घालू लागले. त्यांचं म्हणणं होतं –

तुकोबांच्या पालखीनंतर ज्ञानोबांच्या पालखीला जायला त्यांनी जागा का दिली नाही. भिडे गुरुजींच्या माणसांना मध्येच का घुसवलं? याबद्दल मी तुमचा राजीनामा मागतो!

– असे करत करत त्यांनी पालखी थांबवली…

हा सर्व प्रकार ना गुरुजींना माहीत होता ना धारकरी बंधूंना. कारण तोवर धारकरी समूह संभाजी पुलावर संभाजीराजे यांच्या मूर्तिजवळ पोचून ज्ञानोबांच्या पालखीची वाट पाहत थांबला होता. त्यांचं सर्व म्हणणं ऐकून पोलीस कमिशनर यांनी राजाभाऊ चोपदार याना जोरदार सुनावलं की –

मध्ये बरेच अंतर पडले असल्याने मीच धारकरी बंधूंना त्यामागे जाण्यास सांगितले…तोवर तुम्ही गाडीतच बसून सर्व प्रकार पाहत होता, त्याचवेळेस जर तुम्ही येऊन पालखीचे अंतर कमी करण्याबद्दल बोलला असता तर तुम्हाला त्याचवेळेस जागा करून दिली असती, पण ते करता तुम्ही सर्व झाल्यावर येऊन इथे विनाकारण वाद उकरून काढत आहात…तुम्हाला मी राजीनामा द्यावा अस वाटत असेल तर खुशाल कोर्टात जावा, तिथे मी माझे म्हणणे मांडून सत्य काय असेल ते समोर आणतो…

कमिशनर यांचा हा पवित्रा पाहून राजाभाऊंना पालखी मार्गस्थ करावी लागली!

तर नेमका प्रकार हा झाला. दुर्दैवाने सदर प्रकार गुडलक चौकात झाला आणि नेमकी तिथेच मीडिया उपस्थित होती…सदर वाद विवाद पाहून मीडियाने मुद्दामच धारकरी आणि वारकरी यांच्याच संभ्रम आणि अविश्वास निर्माण होईल अशा बातम्या दिल्या. म्हणे धारकरी शस्त्र घेऊन जबरदस्ती दिंडीत घुसले, दमदाटी झाली, आणि काय काय…!

मुळात तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेताना तुकोबांच्या दिंडीतील लोकांनी गुरुजींना रथात स्वार होऊन मुक्कामापर्यंत येण्याचा आग्रह केला. तो पूर्ण करता येणे शक्य नसल्याने गुरुजींनी त्यांच्यासोबत रथातून काही मीटर प्रवास केला, त्यात त्यांच्याशी बऱ्याच मुद्द्यांवर अगदी उत्तम चर्चा झाली. सुवर्णसिंहासन उपक्रमाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचलेली होतीच, त्याकामीही क्षमतेच्या बाहेर जाऊन देखील आम्हीही यात सहभागी होऊन सहयोग देण्याबद्दल त्यानी चर्चा केली.

हे सर्व वाचताना लक्षात आलेच असेल की, सदर कार्यक्रमात ना वारकरी धातकरी असा गोंधळ झाला, ना धारकरी सशस्त्र आणि जबरदस्तीने दिंडीत शिरले.

मुळात वाद हा “धारकरी बंधूंना आधी का सोडले?” या कारणावरून कमिशनर आणि राजाभाऊ चोपदार यांच्यात झालाय. अगदी राजाभाऊ चोपदार यांनीही गुरुजींना “आम्ही पुढे जातो, तो मान आमचा आहे” असं जरी सांगितलं असत तरी आम्ही धारकरी आणि गुरुजी सर्वानीच आदरपूर्वक त्यांना पुढे जाऊ दिल असतं.

त्यामुळे यावादाला वारकरी विरुद्ध धारकरी अस रूप देऊन ते सत्यच वाटेल अशा बातम्या देणारी इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वाला अधिक जबाबदार आहे, नंतर ज्ञानोबांच्या पालखीचे चोपदार असूनही ज्ञानोबांच्या शिकवणीचा काहीच अंगीकार न केल्याने लहान सहान गोष्टीचा बाऊ करून अहंकार दुखावला गेल्यापाई स्व अहंकारापोटी माऊलींच्या पालखीस सुमारे दहा मिनिटे रोखून धरणारे राजाभाऊ चोपदार मुख्यत्वे कारणीभूत आहेत.

याचाच फायदा घेत, ज्यांना गुरुजी, शिवप्रतिष्ठान आणि त्यांचं काम ज्यांना खुपतंय त्यानीं त्या बातमीची सत्यता पडताळून न पाहता घेतला आणि सोशल मीडियावरून बदनामी करण्यास सुरू केली. मुळात हे तेच आहेत ज्यांचा दावा असतो की ते सत्य इतिहास मांडतात, ज्यांना वर्तमानात नेमकं काय घडलं हेच मुळात सत्य समजत नाही, समजलं तरीही मुद्दाम खोट्याचाच आधार घेतात, त्यांच्या इतिहासाची सत्यता नेमकी किती!? आणि त्यांची लायकी किती?

हे तेच लोक आहेत, ज्यांनी सलग काही वर्षे ज्ञानोबा केवळ ब्राह्मण होते म्हणून त्यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत जाऊन टीका करत होते, ज्ञानोबांना परमा नावाचा रोग झालेला, संत नामदेव महाराजांनी लिहिलेले अभंग चोरून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली…एक ना अनेक अर्वाच्य भाषेत आरोप करणाऱ्या लोकांना म्हणे यात ज्ञानोबांचा अपमान दिसला…! अर्थात हे चालू असताना अशा माऊली द्वेषी लोकांचा जाहीर, सोशल मीडियावर सप्रमाण समाचार घेऊन त्यांचे दात त्यांच्याच घशात घालण्याचे काम करण्यात धारकरी बंधूनी खारीचा वाटा उचलला आहे. हे धारकर्यांना माहीत आहे, बऱ्याच वारकर्यांना माहीत आहे, ते राजाभाऊंना माहीत नसेल किंवा असेल काहीही असले तरी त्यांचे ते दुर्भाग्य आहे…आपल्या व्यक्तिगत अहं पाई आपण नेमकी काय चूक केलीय हे त्यांना जाणवलं नसावे…

असो, ज्यांना वास्तव समजूनच घ्यायचे नाही, समजले तरी स्वार्थासाठी खोटेच रेटून बोलायचे आहे, असे लोक सोडले तर ज्याना याबाबत काहीच माहिती नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता, अशा लोकांना वास्तव समजावे यासाठीच हे लिहावे लागले.

बाकी ज्यांना गुरुजी, धारकरी आणि शिवप्रतिष्ठान यांच्याबद्दल १००१% पूर्ण विश्वास आहे, अशाना अशा स्पष्टीकरण देण्याची देखील आवश्यकता नाही, याची मला कल्पना आहे. तरीही ही माहिती ज्याना पूर्णतः शिवप्रतिष्ठान किंवा कालचा उपक्रम यांच्याबद्दल नाही, त्यामुळे जो थोडा गोंधळ झाला असेल तो बंद करून वास्तव समोर दाखवण्यास वरील माहिती निश्चितच उपयोगी पडेल..

कळावे,
आपलाच एक धारकरी
योगेश देशपांडे

===

सदर लेखावर प्रतिक्रिया देण्याची इच्छा असल्यास आमच्या फेसबुक पेज –facebook.com/InMarathi.page वर मेसेज करावा. निवडक प्रतिक्रियांना प्रसिद्धी देण्यात येईल.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?