' भागवतांचं विधान : “भारतीय लष्कराचे खच्चीकरण” हेच मोदी विरोधकांचे वैचारिक राजकारण  – InMarathi

भागवतांचं विधान : “भारतीय लष्कराचे खच्चीकरण” हेच मोदी विरोधकांचे वैचारिक राजकारण 

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

एखाद्याला सारखीसारखी एकच गोष्ट समजाऊन सांगणं, आणि तीही ज्याचा जयघोष घसा कोरडा होईपर्यंत जो करतो त्याला, हे कष्टप्रद आहे. एकीकडे राज्यघटनेचा जयघोष करायचा, मोदी सरकार त्याची पायमल्ली करतेय म्हणायचे आणि दुसरीकडे स्वतः मात्र साधं ट्वीट करताना राज्यघटनेचा विचार करायचा नाही.

देशाच्या सुरक्षेचा, देशाच्या सैनिकांच्या मनोबलाचा विचार न करता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सतत बोलत राहायचं आणि मोदी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बोलतात असा उलटा आरोप देखील करायचा.

लोकसभेत पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू असताना त्याची खदाखदा हसून बिभत्स टिंगल करायची आणि मोदींनी त्याचा खुसखुशीत समाचार घेतला की त्यांच्यावर टीका करीत सुटायचे. मोदींवर टीका करताना वैयक्तिक पातळी गाठायची हे तर यांचे ठरलेलेच. पुन्हा हे कोणी विरोधकांचा सामान्य कार्यकर्ता किंवा समर्थक करीत नसून खुद्द विरोधात असलेल्या पक्षाचा अध्यक्ष करतो हे तर खूपच केविलवाणे. हे असे बालिश आणि पोरकट विरोधक भारतीय संसेदेला लाभले हे खरच भारताचे दुर्दैव.

 

Winter session of Parliament
indianexpress.com

सरसंघचालकांच्या भाषणावरून टीका सुरु आहे. हे भाषण टीका करणाऱ्यांनी साधं ऐकलेलंदेखील नाही हे त्यांच्या टीकेवरून सहज जाणवतं. किती हा आतातायीपणा सत्ताभ्रष्ट झाल्यामुळे आणि सत्तेत पुन्हा येण्याची खात्री नसल्यामुळे. सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्या भाषणात म्हणाले,

‘आमचे संघटन हे मिल्ट्री संघटन नाही परंतु आमची शिस्त ही मिल्ट्री सारखी आहे. जर देशाला गरज लागली आणि जर संविधानाची परवानगी असेल तर जिथे सेना तयार करण्यासाठी जिथे सहा ते सात महिने लागतील तिथे आम्हाला तीन दिवसांचा कालावधी लागेल. परंतु आमचे संघटन हे मिलिटरी किंवा प्यारामिलिटरी संघटन नसून एक पारिवारिक संघटन आहे.’

 

Mohan-Bhagvat-inmarathi
financialexpress.com

आता यात विवादास्पद काय आहे हे प्रशांत भूषण, खानदानी पंतप्रधान उमेदवार कॉंग्रेसाधिराज राहुल गांधी यांच्यासारख्या विद्वानांना समजू नये याचा अर्थ ते विद्वान नसून केवळ गरम तव्यावर पोळी भाजून घेणारे स्वार्थी आहेत हे स्पष्ट होते.

महामहीम राहुल गांधी पहा काय म्हणतात यावर.

“देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचा अपमान करणारे हे वक्तव्य आहे. हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे कारण त्या ध्वजाला वंदन करणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा हा अपमान आहे. शहिदांचा आणि सैन्याचा अपमान केल्यामुळे भागवत तुमची लाज वाटते.”

हे जे काही राहुल गांधी ट्वीट करीत आहेत मुळात तसं काही घडलेलेच नाही. भागवत काय म्हणाले हे राहुल गांधींनी ऐकलेले आहे असे वाटतही नाही किंवा ऐकूनही केवळ विरोध करायचा म्हणून हतबल होऊन ‘सत्तातुराणा न भयं ना लज्जा’ या कॉंग्रेसपक्षीय नियमामुसार हे ट्वीट केले असावे. या सगळ्यासाठी राहुल गांधी हे शहिदांचा वापर करतात हे तर खूपच संतापजनक आहे.

 

Rahul-Gandhi-inmarathi
wikileaks4india.com

भारतीय सैनिकांचा हा अपमान सहन करण्यापलीकडचा आहे. किती खालची पातळी गाठणार १३० वर्षाचा इतिहास सांगणारा आणि सध्या एकाच कुटुंबाच्या गोठ्यात बांधलेला पक्ष ? भागवतांचे वक्तव्य स्पष्ट आहे. १३० वर्षाचा इतिहास सांगणाऱ्या कॉंग्रेसच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराने अश्याप्रकारचे बिनबुडाचे आरोप करणे हे तो उमेदवार किती कमकुवत आहे हेच दर्शवते.

या माणसाचा राज्यघटनेचा अभ्यास हा शून्य असून अश्या निर्बुद्ध माणसाच्या हातात भविष्यात देशाची सत्ता देणे हे प्रचंड धोकादायक आहे हे यामुळे अधोरेखित होते.

दहशतवादी अफजल गुरुचा जयघोष होतो तेव्हा एकाही शब्दाने त्याचा निषेध न करणारे मोहन भागवतांच्या या संपूर्णपणे घटनेशी बांधिलकी ठेऊन केलेल्या वक्तव्यावर मात्र तुटून पडतात तेव्हा त्यांची या देशाप्रती असलेली स्वार्थी भावना लक्षात येते.

भारतीय राज्यघटना कलम ५१घ म्हणते की

‘देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे हे भारतीय नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे.’ घटनेनेच सांगितले आहे की जर देशाला गरज लागली तर तुम्हाला देशाचे संरक्षण करण्यासाठी पुढे यावे लागेल.

राष्ट्रसेवा करणे हे देखील नागरिकाचे मुलभूत कर्तव्य आहे. याचाच आधार घेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचे विधान केले यात चुकीचे ते काय? संघ हा बाहेर राहून समजत नाही आणि संघाबद्दल जन्मतः डोक्यात पेरलेला द्वेष हा काहीजणांना संघाजवळही जाऊ देत नाही इथे खरी समस्या निर्माण होते.

 

sangh-inmarathi
o.aolcdn.com

कदाचित काहीजणांना संघ पूर्णपणे माहित असतो पण केवळ संघावर टीका केली की पूर्वजांनी केलेल्या संघाच्या बदनामीमुळे राजकीय फायदा होतो हे त्यांचे गणित पक्के असते. उद्या जर खरोखर देशासाठी प्राण द्यायची वेळ आली तर खरे देशभक्त हे मागे हटणार नाहीत आणि हे जे संघद्वेष्टे नेते आज मोहन भागवत यांच्यावर टीका करीत आहेत ते त्यावेळी मेणबत्त्या घेऊन आणि पंचे नेसून शहाणपणा शिकवीत फिरतील.

जिथे राष्ट्राचा प्रश्न येतो तिथे याआधी सर्वपक्षीय एकी दिसून आली आहे. सव्वीस अकरा घडले तेव्हा सर्व पक्ष सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. त्याकाळात भाजपसारख्या विरोधकाच्या कोणत्याही उच्च पदस्थ नेत्याच्या तोंडून कुठल्याही प्रकरची बिनबुडाची टीका झाली नाही.

उलट सत्तेत असताना देखील कॉंग्रेस इतकी हतबल झाली होती की मोदींना बदनाम करण्यासाठी त्यांच्या तत्कालीन मंत्र्याला दोन दोन प्रतिज्ञापत्रे (अर्थात त्यातील एक खोटे) न्यायालयासमोर सादर करावी लागली.

मोदींना आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करण्याचा त्यावेळी देखील कसून प्रयत्न झाला तरीही भाजप आणि संघ हा दहशतवादी कृत्ये जेव्हाजेव्हा झाली तेव्हातेव्हा राजकारण बाजूला सारून सरकारच्या बाजूने उभा राहिला. पण आज ज्यावेळी काश्मीर धुमसतंय त्यावेळी भाजपच्या पाठी मात्र कुणीही नाही.

कारण एकच आणि ते म्हणजे भाजप विरोधकांची या देशाशी कोणतीही मनस्वी बांधिलकी नाही. सतत भारतीय सैन्याला मध्यवर्ती ठेऊन मोदी सरकारवर टीका करायची, सैन्याचे खच्चीकरण करायचे आणि देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करायचे हे यांचे षड्यंत्र आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मोदींची अधिकाधिक मजबूत होत असलेली आंतरराष्ट्रीय प्रतिमा.

 

modi-inmarathi
livemint.com

ही अशी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची जी बदनामी विरोधकांनी चालवली आहे ती दुर्दैवी आहे. मुख्य म्हणजे हे सगळं केवळ एका कुटुंबाला भ्रष्टाचाराच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी होतंय आणि वेठीस मात्र देशाला धरलं जातंय. लोकसभेच्या निवडणुका येताच शाही खानदानावर कोसळणाऱ्या विजेची सर्वच विरोधकांना जाणीव आहे आणि म्हणूनच येनकेन प्रकारेण मोदींना खाली खेचण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे.

ते कदाचित यशस्वी होतीलही पण त्यामुळे देशाचे मात्र प्रचंड मोठे नुकसान होईल. आज काश्मीरमध्ये जे सुरु आहे ते केवळ भाजप करीत असलेल्या अतिरेकीविरोधी निष्ठुर तसेच कडक कारवायांमुळे आणि काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांमुळे. असे देशहितकारक आणि प्रश्नाच्या मुळाशी घाव घालणारे प्रयत्न सुरु केले तर काश्मीर धुमसणार. यात नवल ते काय?

अतिरेकी संघटनांना घाबरून थंड बसून राहिले की सगळेच शांत सुरळीत असणार आणि पूर्वी होतेच. त्यात तरी मोठे असे नवल ते काय होते ? 

एक भारतीय म्हणून प्रत्येक भारतीयाने भारतीय सैन्याच्या बाजूने उभे राहून या भारतीय लष्कराचे खच्चीकरण करणाऱ्या विरोधकांना खडे बोल सुनावणे ही काळाची गरज आहे. भारताचे सैनिक शहीद होत आहेत पण समोर अतिरेकी देखील मृत्युमुखी पडत आहेत हे विसरून चालणार नाही. शेवटी ते युद्ध आहे. पाकिस्तानला देखील त्यांच्या सीमेत घुसून उत्तर हे दिलं जातंय हे निश्चित.

 

army-inmarathi
tosshub.com

आपण भारतीय नागरिक, आपल्या चामड्याचे जोडे शिवून जरी या सैनिकांना दिले तरी त्यांचे आपल्यावरील आणि पर्यायाने या देशावरील ऋण फिटणार नाहीत. पण ते ऋण फेडण्याचा प्रयत्न हा भारतीय लष्कराचे खच्चीकरण करणाऱ्या राजकीय विरोधकांना खडसावून मात्र होऊ शकतो. शहीद होणारे मोजायचे नसतात तर शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी शहिदांची जागा घेणारे सैनिक घडवायचे असतात. आणि तेच नेमकं भागवतांना त्यांच्या भाषणातून सुचवायचे होते. दुसरे असे की हे वक्तव्य प्रचंड सूचक आहे.

भारत हा युद्धाचा विचार करतोय की काय? किंवा तशी परिस्थिती आता जवळ आली आहे की काय? हे प्रश्न हे वक्तव्य ऐकल्यावर उपस्थित होतात. जय हिंद.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?