' एक संत – ज्यांच्या मंदिरासाठी दलित आज तीव्र आंदोलन करत आहेत… – InMarathi

एक संत – ज्यांच्या मंदिरासाठी दलित आज तीव्र आंदोलन करत आहेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

भारताला संताची थोर परंपरा लाभली आहे. अशाच संतांपैकी १५ व्या शतकातील रविदास हे भारतीय कवी संत होते. पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू म्हणून त्यांची ख्याती होती.

रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ती चळवळीवर कायमचा प्रभाव पडला आहे. कवी संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.

रविदास संत हे कवी रामानंद यांचे शिष्य होते आणि संत कबीर हे त्याचे समकालीन संत होते. तर अशा या थोर संतांचे मंदिर दिल्ली येथे होतं. दिल्लीतील तुघलकाबाद मधील संत रविदासांचं हे मंदिर तोडलं गेलं त्यामुळे दलित लोक निदर्शनं करीत आहेत.

पाहुया नक्की काय घटना आहे.

 

sant ravidas mandir tughlakabad delhi
News18 Hindi News

रविदास हे १५ व्या शतकातील महान समाज सुधारक होते. त्यांच्या जन्माबद्दल असं बोललं जातं की, त्यांचा वाराणसी मध्ये १३७१ साली झाला. हिंदू पंचांगानुसार त्यांचा जन्म माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला.

त्यांना संत रैदास म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय चामड्याचा होता. ज्यांना त्या काळी हिंदुस्थानात अस्पृश्य असे मानले जायचे.

त्यांनी आपला बहुतेक वेळ गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये घालविला. सुफी संत, साधू आणि तपस्वी यांच्या सहवासात ते जास्त रमले. त्यांनी लोकांना अशी शिकवण दिली की, भेदभाव करू नका, तरच समाजाचे कल्याण होईल.

ते जरी संत सहवासात राहत होते, तरीही आपल्या वडिलांनाही चप्पल बनविण्याच्या कामात मदत करीत असत. आपल्या कामावर त्यांची निष्ठा होती, म्हणूनच ते त्यासाठी परिश्रम घेत.

जर काही लोकांना चप्पल तर हवी असायची, पण पैसे तर नसायचे अशा लोकांना रविदास चप्पल दान करत असत. पैशाची अपेक्षा करत नसत. ते अतिशय दयाळू असत. दुसर्‍याला मदत करण्यात त्यांना धन्यता वाटायची. जेव्हा साधू-संत त्यांना भेटत तेव्हा त्यांची खूप सेवा करत.

समाजात होणार्‍या वाईट गोष्टींबद्दल त्यांनी आवाज उठविला. जात-पात भेद, अस्पृश्यता याला विरोध केला. आणि या सर्व गोष्टींविरुद्ध ते आयुष्यभर काम करत राहिले.

 

ravidas inmarathi
punjabkesari.in

त्यांच्याबद्दल असे म्हणतात की, संत रविदास समाजातील वाईट गोष्टींबद्दल आवाज उठवत असत. त्यांनी मध्ययुगीन ब्राह्मणवादाला पण आव्हान दिले. त्यांनी लेखन केले. लिखाणातून समाजाचे प्रबोधन केले. त्यांनी हे दाखवून दिले की, कोणीही जन्मामुळे श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविले जात नाही.

‘रैदास बेभान मट पूजी जी हो जाएं हीन, पूजा चरण चंदल के जो हो जून परवीन’ या त्यांच्या ओळीतून समाजाला आजही शिकवण मिळत आहे.

त्यांनी समाजाला समतावादी सिद्धांत शिकवला. रैदास यांचं तत्त्वं होतं की,

‘रैदास जन्मामुळे जन्माला येत नाही, नम्रता नाही, माणसाची निकृष्टता नाही, तो दीन आहे, याचाच अर्थ असा आहे की कोणतीही व्यक्ती त्याच्या कृतीमुळे पुढे येते. जो माणूस चुकीची गोष्ट करतो तो तिरस्करणीय असतो, जन्मानुसार कोणतीही व्यक्ती कमी नसते.’

तर अशी शिकवण देणार्‍या संत रविदास म्हणजे संत रैदास यांचे मंदिर दिल्लीतील तुघलकाबाद भागात होते.

१० ऑगस्ट २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) हे रविदास मंदिर पाडले. त्यामुळे दलित लोकांच्यात संतापाची लाट उसळली.

मंदिर पाडण्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतरत्र हजारो दलित बुधवारी (21 ऑगस्ट) रोजी निषेधासाठी रस्त्यावर उतरले. हा मोर्चा हिंसक झाल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रुधूर सोडला आणि लोकांना सौम्य असा पोलिसी खाक्या दाखवला.

 

police ravidas inmarathi
Hindustan

यामध्ये अनेकजण जखमी झाले. पोलिसांनी दलित नेते आणि भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक केली आणि ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. भीम आर्मीने असा दावा केला आहे की, पोलिसांनी त्यांच्या सदस्यांवर गोळीबार देखील केला.

दलित नेत्यांनी केंद्र सरकारवर रविदासांचे अनुयायी असलेल्या दलितांच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. दलित नेते या प्रकारामुळे दुखावले गेले आहेत.

विरोधी पक्षानेही दलित नेत्यांना पाठिंबा दिला त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. पण सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला आहे की, मंदिर पाडायचा आदेश कोर्टाचा होता, त्याचे कुणी राजकारण करू नये, तसा प्रयत्न केल्यास कोर्टाचा अवमान होईल.

रविदास मंदिर पाडले यासाठी विरोधात सहभागी होण्यासाठी पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि इतर राज्यातील हजारो दलित दिल्लीत पोहोचले.

त्यांनी झंडेवालाणमधील आंबेडकर भवन ते रामलीला मैदानापर्यंत मोर्चाला सुरुवात केली. त्यांनी ‘जय भीम’ अशी घोषणा करत मंदिराच्या पुनर्बांधणची मागणी केली.

चंद्रशेखर आझाद, भीमा आर्मीचे अध्यक्ष यांनी असे विधान केले की,

‘मंदिर पाडणे हा आमच्या समाजाचा अपमान होता. मंदिराच्या जागेवर संत रविदासांचे देऊळ मी बांधेनच त्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. कोणतीही शक्ती आम्हाला रोखू शकत नाही.’

भीमा आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद आणि दिल्लीचे सामाजिक नेते राजेंद्र पाल गौतम यांच्यासह इतर दलित नेते या मोर्चात सामील झाले होते. नंतर संध्याकाळी पोलिसांनी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक केली.

 

azad inmarathi
ThePrint Hindi

१० ऑगस्टला हे मंदिर दिल्ली विकास प्राधिकरणाने पाडले. १६ व्या शतकातील संत रविदास हे आध्यात्मिक नेते होते. दलित आजही त्यांची उपासना करतात. त्यांचे विचार गुरु ग्रंथ साहिबा या शिखांच्या ग्रंथातही आहेत. त्यामुळे पंजाबमधील लोकही त्यांचे अनुयायी आहेत.

दलित लोकांचे म्हणणे आहे की, तुघलकाबाद मधील रविदासांचे मंदिर हे १५०९ साली बांधले गेले असावे. जेव्हा सिकंदर लोधीची कारकीर्द होती. त्यामुळे त्या क्षेत्राला आध्यात्मिक महत्त्व आहे.

असे हे मंदिर कोर्टाने का पाडले? त्यासाठी ८ एप्रिल २०१९ रोजी सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला होता. २०१८ च्या दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार हे क्षेत्र २ महिन्यात रिकामे करून द्यायला हवे होते. कोर्टाने संबंधित अधिकार्‍यांना तशी सूचनाही दिली होती.

‘जर ठरलेल्या मुदतीत ही जागा रिकामी केली नाही तर कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन मानले जाईल.’ अशीही ताकीद सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये दिली होती.

परंतु २ ऑगस्ट रोजी रविदास जयंती समारोह समितीने जी मंदिर व्यवस्थापनेची देखरेख करते त्या समितीने सांगितले की, हा परिसर रिकामा केला आहे असे कोर्टाला दर्शविले.

 

ravidas maharaj inmarathi
punjab.punjabkesari.in

त्याची पडताळणी करण्यासाठी डीडीने जेव्हा पाहणी केली तेव्हा ते क्षेत्र रिकामे झाले नसल्याचे दिसले आणि समितीने २ ऑगस्टला खोटं निवेदन देऊन कोर्टाची दिशाभूल केली आहे असे निदर्शनास आले.

डीडीएने असेही सांगितले रविदास जयंती समारोह समिती त्यांच्या कामात अडथळे आणत आहे.

त्यानंतर कोर्टाने आदेश दिला की, हा परिसर १ दिवसाच्या आत रिकामा करावा, त्यासाठी डीडीएने पोलिसांची मदत घ्यावी. कोर्टाच्या या निर्णयामुळे तुघलकाबाद येथील संत रविदास मंदिर पाडण्यात आले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?