' नाश्त्यात या चविष्ट पदार्थांचा समावेश केलात तर आपल्याला होणाऱ्या एका त्रासापासून कायमची सुटका होईल – InMarathi

नाश्त्यात या चविष्ट पदार्थांचा समावेश केलात तर आपल्याला होणाऱ्या एका त्रासापासून कायमची सुटका होईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आजकाल धकाधकीच्या आयुष्यात ताणतणावाच्या काळात जेवणाखाणाच्या वेळा सांभाळणं थोडं कठिणच झालं आहे.

सततची कामं, टार्गेट पूर्ण करायची धडपड, जेवणाची वेळ नीट नसणं, कधीकधी जेवणच न होणं, झोपेच्या चुकीच्या वेळा हे सगळं एका ठिकाणी नेऊन पोहोचवतं.. ते म्हणजे वाढणारं पित्त!!

या पित्ताचा प्रकोप झाला की कुणाला डोकं दुखायला लागतं, कुणाला मळमळतं, उलट्या होतात. करपट ढेकरा येणं असे वेगवेगळे त्रास सुरू होतात. एकतर आता अन्नधान्य पूर्वीसारखं कसदार नाही. त्यात या सवयी यामुळेच आरोग्याचे अनेक त्रास सुरू होतात.

 

acidity inmarathi
indiatoday.com

 

वात-पित्त -कफ हे माणसाच्या शरीरातील रस. हे जर योग्य प्रमाणात राहीले तर शरीराचं कामही व्यवस्थितपणे चालतं. पण यातील एक जरी वाढलं तरी शरीराच्या तक्रारी सुरू होतात. या तिन्हीपैकी पित्त वाढण्याचा त्रास बहुतेक लोकांना होत असतो.

याचं कारण रात्री झोप पुरेशी न होणं, सतत तिखट मसालेदार पदार्थ खाणं, वेळेवर न जेवणं. म्हणूनच कदाचित पूर्वजांनी लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य आणि संपत्ती भेटे असं सांगून ठेवलंय.

आताही चुकीचा आहार, चुकीच्या जेवणाच्या वेळा, झोपेचं खोबरं या सर्वांमुळे आरोग्याची ऐंसीतैंसी झाली आहे.

आहारतज्ज्ञ सांगतात, जेवणाची वेळ सांभाळा. सकाळी पहील्यांदा जे खाणं खाल ते सकस आणि पौष्टिक असावं. म्हणजेच सकाळी जो नाश्ता कराल तो पौष्टिक असावा पण जड नसावा.

यामुळे तुम्हाला तुमच्या कामासाठी जी उर्जा लागते ती निश्चित दिवसभर पुरेल. आता सकाळचा नाश्ता हा वेगवेगळ्या पोषणमूल्यांनी युक्त असावा. असे वेगवेगळे पौष्टिक पदार्थ आज आपण पाहूया.

 

१. सॅलड-

 

eating-healthy-inmarathi01
foodmatters.com

 

वाचूनच एकदम खुश होतात सारे असा हा पौष्टिक पदार्थ!!! यामध्ये ढिगभर फळं नाही मिसळायची. अगदी मोजकीच फळं बरंका..

पपई, काकडी, सफरचंद आणि एक केळं हे तुकडे करुन बाऊलमध्ये ठेवा. काही मिनीटात बाऊल रिकामा होईल. यातील पपईमध्ये जो पाचक रस असतो त्याला एंझाईम म्हणतात. यामुळे आपल्या आतड्याची कार्यक्षमता वाढवतो.

तसेच सफरचंदातील अ आणि क जीवनसत्त्वे पचनशक्ती वाढवतात. आहारतज्ज्ञ सुचवतात की, दिवसाला एक केळं जरुर खा.. त्यातील फायबर्स एंझाईमची मात्रा वाढवतात.

त्याचा उपयोग आतड्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी होतो. काकडीचा उपयोग पचन व्यवस्थित होण्यासाठी होतो. पोट नीट तर सगळंच नीट.

 

२. पोहे-

poha-inmarathi
grofers.com

 

तांदळापासून बनवलेला हा अगदी घरोघरी केला जाणारा पदार्थ.. नाश्त्यामध्ये सर्रास वापरला जातो. कांदा, मिरच्या, शेंगदाणे, कडीपत्ता, मोहरी, डाळींबाचे दाणे हे सर्व वापरुन केला जाणारा हा पदार्थ लो कॅलरी आणि फॅट फ्री आहे.

त्यामुळं ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हे बहुगुणी पोहे नाश्त्यात अवश्य खावेत.

 

३. मध आणि लिंबूपाणी-

 

lemon juice-inmarathi
communitytable.parade.com

 

हा काही नाश्त्यात खाण्याचा पदार्थ नाही. पण नाश्त्यापूर्वी हे घेतले तर तुमची प्रतिकारशक्ती वाढवतेच शिवाय पचनक्रिया सुधारते.

रिकाम्या पोटी जर हे घेतलं तर तुमची चयापचय क्रिया सुधारतेच शिवाय वजनवाढीच्या समस्येला थोपवून धरते.

 

४. ओट्स आणि फळं यांची लापशी-

 

oats inmarathi

 

लापशी हा पदार्थ ऐकला की आजारी असल्याचा फील येतो ना? पण नाही.. ही पौष्टिक घटकांपासून बनवलेली लापशी आहे.

एका बाऊलमध्ये दही, ओट्स, आक्रोड, बदाम, सूर्यफूलाचे बी, अंबाडीचे बी, सबजा बी घालून चांगले एकजीव करावे. त्यावर त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या फळांचे तुकडे घालून सजवावे. तुमचा पौष्टिक नाश्ता तयार आहे.

ओट्स तुमच्या पचनसंस्थेचं काम चांगलं ठेवतात आणि आतड्याची कार्यक्षमता वाढून तुम्ही एकदम फिट् अँड फाईन राहता.

५. सातूचं सरबत-

 

satu sarbat inmarathi
lifestyletips.in

 

सातू हे अत्यंत पौष्टिक असतात. सातू, पाणी, भारतीय मसाले यांपासून तयार केलेलं हे सरबत अतिशय पौष्टिक आहे.

प्रथिने आणि फायबर्स यांनी परिपूर्ण असलेलं हे सरबत केवळ तुमची पचनशक्ती सुधारत नाही तर तुमची शारीरिक क्षमताही दीर्घकाळ चांगली ठेवते.

सातूचं सरबत घेत असताना त्याच्या सोबत रोज थोडा सुकामेवा, एखादं फळ खाल्लं तर अतिशय उत्तम आरोग्य लाभते.

तात्पर्य :

तुझे आहे तुजपाशी.. या म्हणीनुसार भारतीय हवामानाला अनुसरून असलेले खाद्यपदार्थ सोडून जर मैदायुक्त बर्गर फ्रेंच फ्राईज असे पदार्थ सतत खाल्ले तर अॅसिडीटी तर वाढतेच शिवाय वजनवाढीचा राक्षस पाठोपाठ येतो.

म्हणून वर दिलेले पदार्थ जर नियमितपणे खाल्ले तर तुम्हाला एकदाही पित्त वाढून डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे असे त्रास होणार नाहीत.

आहारतज्ज्ञ सांगतात, सकाळचा नाश्ता हा राजासारखा म्हणजे पौष्टिक आणि भरपेट करावा. दुपारचं जेवण सामान्य माणसासारखं करावं आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं करावं.

म्हणजेच सकाळचा नाश्ता वर दिलेल्या प्रकारे केला तर तब्येत सांभाळली जाईलच शिवाय पित्ताचा त्रास आणि त्यासाठी असणाऱ्या गोळ्यानी औषधं यांची जराही गरज पडणार नाही.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?