“तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी”: बाळासाहेबांची गर्जना अंडरवर्ल्डची झोप उडवते तेव्हा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
लेखक : सुधीर हसबनीस
===
१९५० ते ९० च्या चार पाच दशकात मुंबईतल्या अंडरवर्ल्डच्या एकेक करामती ऐकल्या किंवा वर्तमानपत्रात वाचल्या की अंगाचा थरकाप उडायचा.
करीम लाला, वरदराजन मुदलियार, हाजी मस्तान, अबू सालेम, दाऊद इब्राहिम, रमा नाईक, बाबू रेशम, अरुण गवळी, नंतर छोटा शकील, छोटा राजन, बडा राजन, मन्या सुर्वे, रवी पुजारी आणि अनेक छोटे मोठे अंडरवर्ल्ड गँगस्टर ह्या मुंबईने पाहिलेत.

त्यांच्या त्यांच्या विभागातल्या त्यांनी केलेल्या करामती, दहशत, अवैध धंदे, खून, हत्त्या, कट कारस्थाने मुंबईने अगदी जवळून पहिलीत.
१९२६ नंतरच्या काळापासून काळे किंवा अवैध उद्योग मुंबईत सुरू झाले होते.
करीम लाला, हाजी मस्तान हे सुरवातीचे गँगस्टर म्हणून ओळखले जातात. अफगाणिस्तानातून भारतात आलेले हे दहशतवादीच म्हणावे लागतील.
त्यांनी आपापली पाच पन्नास जणांची गँग तयार करून आपापल्या भागात दहशतीने जम बसवला. दारू, जुगार, स्मगलिंग सारख्या अवैध धंद्यातून अमाप पैसा कमावला आणि शस्त्रास्त्रे विकत घेऊन दादागिरीला सुरुवात केली.
अबू सालेम, दाऊद काळात बाकी अनेक छोट्या दादांनीही आपल्या गँग तयार केल्या होत्या. त्या आपापल्या भागात कार्यरत होत्या. त्यांच्यात अनेकवेळा टोळी युद्ध होत असे. आपापल्या एरियात कोणी कोणाला येऊ देत नव्हते, प्रत्येकजण आपल्या गल्लीतले शेर होते.

जर कोणी घुसलाच तर तो जिवंत परत जात नसे आणि नंतर त्याचा बदला म्हणून त्या टोळीचा एखादा मोहरा टोळी युद्धात मारला जायचा. अशी प्रचंड दहशत सतत मुंबईकर अनुभवत होते.
मुंबईतल्या कापडगिरण्या गिरणी कामगारांच्या संपात पूर्णपणे बंद पडल्या. त्या पुन्हा चालू झाल्याच नाही. त्यातले असंख्य कामगार बेरोजगार झाले, त्यामुळे पोट तर भरायला पाहिजे म्हणून अनेक जण अंडरवर्ल्डकडे आकृष्ट झाले.
ज्यांच्यात काहीही करायची धमक होती ते गँगस्टर झाले, त्यातलाच एक मोठ्या गँगचा नायक म्हणजे ‘अरुण गवळी’. तरुण आणि काहीही करायची धमक, ह्यामुळे ताबडतोब अंडरवर्ल्डचा मोठा नायक म्हणून त्याचं नाव झालं.
सुरुवातीला रमा नाईक – बाबू रेशम ह्या गँग बरोबर गवळी गँग काम करू लागली.
ह्यांचा सुरुवातीला लाल विटा चाळीत अड्डा होता. सगळे जण मिळून मटका, दारू जुगाराचे अड्डे चालवत होते. दक्षिण मध्य मुंबई हे त्यांचे कार्य क्षेत्र होते. दादागिरी, धमक्या, सुपाऱ्या, ह्यावर त्यांची आमदनी वाढत होती.

पुढे कोणत्यातरी कामात रमा नाईक आणि बाबू रेशम ह्यांनी दाऊदला साथ दिली. पण त्यावेळी झालेल्या टोळी युद्धात साधारण १९८० मध्ये रमा नाईक पोलिसांच्या एन्काऊंटर मध्ये मारला गेला.
–
- एका सामान्य स्त्रीचा मुंबईची ‘गॉडमदर’ होण्यापर्यंतचा प्रवास!
- सुषमा स्वराज यांचा बॉलीवूडला दाउदच्या तावडीतून सोडवणारा क्रांतिकारी निर्णय!
–
बाबू रेशमही कंजारी गँग कडून मारला गेला. जेकब सर्कल जेलमध्ये असताना ह्या कंजारी गँगने बॉम्ब टाकून बाबू रेशमला संपवला.
त्यानंतर ह्या सगळ्या गँगचा ताबा अरुण गवळीने घेतला. त्याने पण अनेक मारामाऱ्या केल्या आणि आपला वचक निर्माण केला. त्याने आपला अड्डा दगडी चाळीत बनवला. पण त्याचे दाऊद सोबत वैर होते. स्थानिक दादा म्हणून अरुण गवळी ताकदवान होता.
गिरणी कामगारांमधून तो त्याच भागात मोठा झाला होता. तिथल्या लोकांना तो जवळचा वाटत होता म्हणून लोकांची काही कामे तो करत होता.
एक मराठी माणूस आणि त्याचा त्या भागावर असलेला वचक ह्यामुळे तो ओळखला जात होता. त्या दगडी चाळीची दहशत संपूर्ण मुंबईत होती.
त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतल्या प्रचार सभांमध्ये एक ताकदवान मराठी माणूस म्हणून अरुण गवळीच्या चांगुलपणाचे कौतुक केले. त्याने शिवसेनेसाठी काम करावे अशा इच्छेने ‘तुमच्याकडे दाऊद तर आमच्याकडे आमचा अरुण गवळी’ अशी गर्जना केली.

ह्या गर्जनेने सगळेच भयभीत झाले. शिवसेना आणि अरुण गवळी म्हणजे जास्तच भीती. कारण त्यावेळी बाळासाहेब असताना शिवसेना मुंबईत ताकदवान होती. बाळासाहेबांनी एकप्रकारे अरुण गवळीला पाठिंबाच दर्शवला होता.
पण अरुण गवळीने शिवसेनेकडे न जाता स्वतःचा एक पक्ष काढला त्याचं नाव अखिल भारतीय सेना. ह्या पक्षातर्फे २००४ मध्ये चिंचपोकळी भागातून १०००० च्या मताधिक्याने तो निवडूनही आला.
पण अनेक गुन्हे आणि त्यावर चालणारे खटले ह्यामुळे अरुण गवळीचे वास्तव्य तुरुंगात असल्याने त्याला पुढे मतदार संघासाठी काम करता आले नाही.
म्हणून २०१४ च्या निवडणुकीत अरुण गवळीने आपल्या मुलीला गीता गवळीला उभे केले. पण MIM च्या उमेदवारापुढे तिला अवघ्या ४५००मतांनी पराभव पत्करावा लागला. पुढे २०१७ च्या निवडणुकीत मात्र गीता गवळी निवडून आली.
अरुण गवळीच्या ह्या सगळ्या धावत्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा “डॅडी” नावाचा एक चित्रपटही निघाला. त्यात अर्जुन रामपाल याने अरुण गवळीची भूमिका साकारली. ह्या चित्रपटाने चार कोटी साठ लाखांची कमाई केली.

अरुण गवळी हा एक खतरनाक गँगचा नायक असला तरी महाराष्ट्रात त्याच्याबद्दल लोकांच्या मनात प्रेम आहे. याचे कारण तो दाऊदचा कट्टर शत्रू होता म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणूनही.
त्यामुळेच तो नाही तर त्याच्या मुलीला तिथल्या लोकांनी निवडून दिलं. अरुण गवळीने सुद्धा त्या लोकांची काही कामे धाक दाखवून का होईना पण केली. त्यामुळे ही भावना असणे सहाजिकच आहे असे आपण म्हणू शकतो.
सर्वसामान्य लोकांना ह्या माणसाकडून काही त्रास झाला नाही. त्यामुळेच आज सुध्दा अरुण गवळीबद्दल अनेकांना घृणा वाटत नाही.
–
- संपूर्ण अंडरवर्ल्ड हादरवून सोडणाऱ्या “त्या” एन्काउंटर स्पेशालिस्टची रीएन्ट्री…!
- दाऊदला पैसे पुरविणाऱ्या ‘जावेद खनानी’ याची नोटाबंदीच्या निर्णयामुळे आत्महत्या
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
nice
Very nice