' शहरी माओवादाचे आरोपी गौतम नवलखांना कोर्टाने मुक्त केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी… – InMarathi

शहरी माओवादाचे आरोपी गौतम नवलखांना कोर्टाने मुक्त केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांसाठी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

दिल्ली हायकोर्टाने गौतम नवलाखाला मुक्त केले आहे. याविषयी एवढेच म्हणेल कि कायदेशीर लढाई अजून संपलेली नाही. त्याबद्दल आत्ता काही सांगत नाही.

प्रस्तुत लेख ही बातमी ऐकल्यानंतर ” जीतं मया” चा आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांवर आहे.

काही लोकांना वाटत असेल आज तुषार दामगुडे, महाराष्ट्र पोलीसांचा पराभव झाला ते बरे झाले. त्यांना तसे वाटणे साहजिकच आहे कारण द्वेष पराकोटीला पोहचला की दृष्टीभ्रम व्हायला सुरुवात होते.

सदर लेखा बरोबर २४ ऑक्टोबर २०१० साली गौतम नवलाखाने काश्मीर वर दिलेले भाषण जोडले आहे ते एकदा पाहून, ऐकून घ्या. या विडीओ मध्ये गौतम नवलाखा काश्मीर स्वतंत्र झाला पाहिजे आणि तो कायदेशीर मार्गाने वेगळा झाला नाही तर बंदुकीच्या मार्गाने झाला पाहिजे असे विचार मांडताना दिसत आहे.

आणि हाच विडीओ नाही तर हे लोक आपल्या अनेक भाषणांमधे असेच विचार मांडताना तुम्हाला youtube वर दिसतील.

 

आपल्या पैकी काही जण मोदी, भाजपाचा तिरस्कार करता करता आज अशा वळणावर येऊन पोहचले आहेत कि या देशाचे हिंसक मार्गाने तुकडे करू पाहणारा गौतम नवलाखा देखील त्यांना आपल्या गटाचा, विचारांचा प्रतिनीधी वाटू लागला आहे.

पण हे वाटणाऱ्यांना हा आपल्याला आत्ता दिसत असलेला अखंड भारत निर्माण करण्यासाठी किती लोकांनी प्राण अर्पण केले आहेत याची थोडी तरी आठवण शिल्लक उरली आहे काय?

या देशात हिंसाचाराच्या ऐवजी संविधानीक मार्गाने समस्या सोडवण्याचा मार्ग उपलब्ध करुन देण्यासाठी किती महापुरूषांनी आपल्या वैयक्तिक जीवनाची राखरांगोळी करुन घेतली याचा आपल्याला विसर पडला आहे काय? गौतम नवलाखा मुक्त करायला निघालेला काश्मीर राखण्यासाठी आपल्या किती सैनिकांनी हौतात्म्य स्विकारले याचा आपल्याला विसर पडला आहे काय?

आपले राजकीय शत्रुत्व या देशाचे संविधान व सार्वभौमत्व पणाला लावण्याएवढे महत्वाचे झाले आहे काय?

सध्या तुम्हाला न आवडणारे नरेंद्र मोदी सत्तेमधे असतील पण २०१० साली तुम्हाला आवडणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार सत्तेमध्ये असताना देखील हा गौतम नवलाखा देश हिताचे कार्य व सरकारलापुरक भुमिका मांडताना या विडीओ मध्ये तुम्हाला दिसला काय?

 

Gautam-Navlakha_inmarathi
thewire.com

उद्या कदाचीत काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर या गौतम नवलाखाने त्याचे आजवर सुरू असलेले धंदे असेच सुरू ठेवले तर तुम्ही आजसारखेच त्याचे समर्थन करत राहणार आहात काय?

म्हणजे सरकार मनमोहन सिंग यांचे आहे की नरेंद्र मोदी यांचे आहे यामुळे गौतम नवलाखाचे विचार, कृती बदलत नाहीत परंतु सरकार बदलल्यामुळे चोविस तास कुठल्यातरी महापुरूषाचा जयजयकार करणाऱ्या भोंदुंचे विचार व कृती मात्र बदलतात.

कधीतरी शांतपणे आपल्या महापुरूषाने आपल्याला या देशाची अखंडता, स्वातंत्र्य मोडीत काढण्याचा संदेश तुम्हाला दिला का याचा विचार केलात का हो?

इथल्या पोलीस व सैन्यदलाचे खच्चीकरण तुम्ही तुमच्या आपमतलबी वागण्यामुळे असेच करत राहिला तर भविष्यात या भारतात काय घडेल ?

तर ज्या बंदुकांच्या जोरावर इथली राजकीय व संविधानीक व्यवस्था उखडून टाकण्याची भाषा गौतम नवलाखा करतो आहे त्यानुसार खरोखरच सगळ्यांनी बंदुका उचलल्या तर मग सर्वाधिक बंदुका इथल्या बहुसंख्याकांच्या हातात असतील. आणि मग इथल्या कमजोर व अल्पसंख्याकांचे रक्षण बहुसंख्याकांपासुन कोण आणि कसे करणार ?

 

muslim-women-inmarathi
seekershub.com

पोलीस व्यवस्था, सैन्यदल, संविधान, कायदा या गोष्टी म्हणजे या देशातल्या कमजोर, वंचितांच्या रक्षणाचे एकमेव साधन आहे. ते साधन नष्ट करण्यासाठी निघालेल्या शक्तींना राजकीय हेव्यादाव्यासाठी पाठिंबा देणे म्हणजे आगीशी खेळ आहे.

ही लढाई तुषार दामगुडे किंवा पोलीस दलाची नाही. हे सगळे लोक माझे/पोलिसांचे वैयक्तिक शत्रू नाहीत.

हे या देशाच्या कायदेशीर व्यवस्थेचे, सार्वभौमत्वाचे, संविधानाचे शत्रू आहेत म्हणजेच ते या देशाचा कायदा , संविधान व व्यवस्थेला मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे शत्रू आहेत. तुम्ही आज कोणता पक्ष निवडता त्यावर आपल्या भारताचे भविष्य अवलंबून आहे.

बाकी माझी काळजी करू नका. या फुटीरतावाद्यांशी कायदा , संविधान या मार्गानेच शेवटपर्यंत लढण्याचा निश्चय केला आहे पण हा देश फक्त गौतम बुद्धाचा नाही तर शत्रूच्या आतड्या बाहेर काढणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजीमहाराजांचा देखील आहे हे मी विसरलेलो नाही.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?