सीबीआयची “जादू” दाभोलकर केसमध्ये अपयशी?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सात वर्षांपूर्वी शिक्षणाचं, कलेचं माहेरघर असलेल्या पुण्यात एक अविवेकी घटना घडली होती. २० ऑगस्ट २०१३ चा दिवस उजाडला तोच एका खुनशी प्रवृतीने…
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, मात्र ती हत्या व्यक्तीची होती, विचारांची, विवेकाची की दाभोलकारांच्या मार्गावर चालू पाहणाऱ्या अनेक संयमी पावलांची?
यातून एक प्रश्न निर्माण झाला आणि त्यानंतर अनुत्तरीत प्रश्नांचं वादळ सुरु झालं.
“दाभोलकर गेले पण तरी त्यांचे विचार आजही रुजलेत” या वाक्याने स्वतःचं समाधान करणाऱ्यांना एकदा तरी ही घटना का घडली, त्यामागची मनोवृत्ती काय असेल? दाभोलकरांना संपवणा-यांना नेमकं काय मिळालं? असे प्रश्न न पडणं हेच मुख्यतः खेदजनक आहे.
मात्र या घटनेपेक्षाही भयावह बाब म्हणजे त्यानंतर सुरु झालेलं तपासचक्र.
पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घटना घडली यावरूनच पुणे पोलिसांवर टिकेची तोफ डागली गेली. त्यानंतरही पोलिसांच्या हाती ठोस पुरावे न लागल्याने अखेरीस गुन्ह्याचा तपास कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयकडे देण्यात आला.
सीबीआयने या गुन्ह्यांचा कसून तपास केला. त्यानंतर त्यानंतर विरेंद्रसिंह तावडेसह डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार करणारा सचिन अंदुरे, शरद कळसकर, अमित दिगवेकर, अमोल काळे, राजेश बंगेरा यांच्यासह इतरांना अटक केली. या गुन्ह्यातील पिस्तुलदेखील जप्त केले.
मात्र, अद्यापही या गुन्ह्याचा ‘मास्टरमाइंड’ शोधण्यात सीबीआयला यश येत नसल्याने घटनेनंतर सात वर्षांनंतरही पहिले पाढे पंचावन्न अशीच गत झाली आहे.
ऐरवी दाभोलकरांविषयी तोंडातून ब्र न काढणाऱ्यांची लेखणी मात्र दाभोलकरांच्या सातव्या स्मृतिदिनाला सोशल मिडीयावर व्यक्त होण्यासाठी सरसावलीय.
राजकीय व्यक्तींपासून ते थेट माध्यम क्षेत्रातील अनेक तज्ञांमध्ये शाब्दिक हाणामारी रंगलीय. मात्र यामध्ये मुळे दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा मुद्दा काहीसा बाजूला राहिला असून सीबीआयला लक्ष्य केलं जात आहे.
दोन दिवसांपुर्वीच अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येची जबाबदारी कोर्टाने सीबीआयच्या खांद्यावर सोपवल्याने विरोधकांनी राज्य शासनाला आपल्या टिकांनी जेरीस आणलंय.
‘आता तरी सुशांत सिंग राजपुतला न्याय मिळेल’ असं म्हणत ज्या सीबीआयवर आपण अवलंबून आहोत, त्याच सीबीआयला “सात वर्षांनंतरही दाभोलकरांच्या खऱ्या मारेकऱ्याला पकडण्यास यश मिळत नाही की सवड नाही” अशी टिकांनी आज सोशल मिडीयावर गर्दी गेली आहे.
पाहूयात या विषयावरील असेच काही वाद-प्रतिवाद…
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीबीआयला कोपरखळी मारली आहे.
२०१४ सालापासून ज्यापद्धतीने डॉ दाभोलकरांच्या हत्येचा तपास होऊ शकला नाही, त्याची पुनरावृत्ती सुशांत सिंह राजपूत केसबाबत होणार नाही असा आशावाद व्यक्त करत त्यांनी सीबीआयच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली आहे.
पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी सकाळीच ट्विट करत सात वर्षांनंतरही दाभोलकरांच्या हत्येचा मारेकरी सापडला नसल्याची खंत व्यक्त केली.
महाराष्ट्र पोलिसांना फारसं यश न मिळाल्याने सीबीआयकडे केस सोपवण्यात आली, मात्र तरीही एकाही गुन्हेगाराला कठोर शासन झालं नाही, या सर्वांचं कारण म्हणजे दाभोलकर सेलिब्रिटी नसल्याने त्यांना प्राईम टाइम कव्हरेजचा स्लॉट न दिल्याचं सांगून त्यांनी वादाचा नवा मुद्दा छेडलाय.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण ताजं असताना त्याच पार्श्वभूमीवर हा आरोप चांगलाच व्हायरल झालायं.
मात्र या मुद्द्यांवरून काहींनी थेट सरदेसाईंनाचं लक्ष्य केल्याने आणखी नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
या आरोपावरून अनेकांनी खडे बोल सुनावलेत. या प्रकरणावरून केवळ इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः याबाबत पुढाकार घेता आला असता अशा अनेक प्रतिक्रिया या ट्विट्सवर उमटल्या आहेत.
आपल्या वक्तव्यांनी कायमच वादाच्या भोव-यात अडकणा-या निखिल वागळे यांनीही डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली अर्पण करताना सीबीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
त्यांच्या या आरोपाला अनेकांनी दुजोरा देत सीबीआयकडून न सुटलेल्या केसेसचा पाढा वाचला आहे.
राजकारणात येण्याचा प्रयत्न काहीसा निष्फळ ठरलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिनेही दाभोळकरांसह पासरे, कालबुर्गी, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना गजाआड करण्याची मागणी केली आहे.
राजु परुळेकर यांनीही राजकीय हिंदुत्वावर टिका केली आहे. त्यांच्या या ट्विट्सना अनेक नेटेक-यांनी प्रतिसाद देत सरकारच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.
कुठे सीबीआयच्या कार्यपद्धतीवर ताशेरे, तर कुठे सरकराच्या अक्षमतेवर बोट… सोशल मिडीयावर प्रत्येकजण आपलीच पोळी भाजताना दिसतोय.
डॉ. दाभोलकरांच्या मारेक-याला लवकरात लवकर जेलबंद करण्याची मागणी केली जात असली, तरी आणखी किती वर्ष याच विषयावर चर्चा करावी लागणार हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.
दाभोलकर जादूटोणा अंधश्रद्धा विरोधक होते, त्यासाठी ते आयुष्यभर झटले, मात्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणारी सीबीआय सुशांत सिंग राजपुत आत्महत्या केसमध्ये जादू घडवून आणेल.
मागील दोन दिवसांपुर्वीच सीबीआयकडे सोपविलेल्या सुशांत सिंगच्या प्रकरणावरून सीबीआयकडे लाखोंचे डोळे लागले असताना प्रत्यक्षात त्याच सीबीआय ने मागील ७ वर्षांत डॉ दाभोलकरांच्या हत्येचा शोध लावण्याबाबत सीबीआयची जादु मात्र फोल ठरली असाही आरोप केला जात आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.