' सावधान! जंक फूडचा मेंदूवरही विपरीत परिणाम! जाणून घ्या संशोधन काय सांगतंय… – InMarathi

सावधान! जंक फूडचा मेंदूवरही विपरीत परिणाम! जाणून घ्या संशोधन काय सांगतंय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज-काल भारतामध्ये पाश्चात्यांचे अंधानुकरण करण्याचे ‘फॅड’ आले आहे. मग त्यांचे राहणीमान असो की त्यांची वेशभूषा! इतकेच काय त्यांच्या आहार पद्धतींचे देखील आपण अंधानुकरण करतो. त्यांची खाद्य संस्कृती अशी का आहे हे कोणी लक्षातच घेत नाही.

तिकडच्या हवेला साजेसा आहार तेथील लोकं सेवन करतात, मग त्यामध्ये ब्रेड-बटर आले, पिझ्झा, बर्गर आले, कोल्ड ड्रिंक्स येतात.

एकूण काय तर त्यांचे अन्न तिथल्या हवामानावर अवलंबून असते, जे तेथील लोकांच्या तब्येतीसाठी पोषक असते. आपल्याकडे असे खाद्य सेवन करणे म्हणजे उच्च दर्जाचे समजतात जे अत्यंत चुकीचे आहे.

आपल्या हवामानासाठी हे अन्न अत्यंत चुकीचे आणि हानिकारक आहे. त्याचा आपल्या शरीरावरच नाही तर मेंदूवर देखील विपरित परिणाम होतो हे संशोधकांनी सिद्ध केले आहे.

 

junk food inmarathi

 

आपल्याकडे आयुर्वेदामध्ये सत्त्व, रज आणि तम असे त्रिगुण सांगून त्यानुसार आहार असावा असे नमूद केले आहे. म्हणजेच आपल्या आहाराचा केवळ आपल्या शरीरावरच नाही तर आपल्या मेंदूवर परिणाम होतो.

याचाच अर्थ अगदी पूर्वीपासूनच आपल्या पूर्वजांनी सुद्धा ही गोष्ट नमूद केली आहे, जास्त तिखट-मसालेदार अन्नाचे सेवन केले की तामसीपणा वाढतो. तसेच आता जंक फूडचे आहे.

जंक फूडवर अनेक प्रकारचे संशोधन करण्यात आले त्यात असे आढळून आले आहे, की जंक फूडचा आपल्या शरीरावर तर परिणाम होतोच, म्हणजे शरीरावर अतिरिक्त चरबी वाढणे, मधुमेह, रक्तदाबाची समस्या, हृदयरोग ह्यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात शिवाय मेंदूवर देखील विपरित परिणाम होतो.

चवीला छान असणारे हे जंक फूड जीभेचे चोचले पुरवणारे असते, ‘एक बार खाओगे तो खाते ही रह जाओगे’ ह्याप्रमाणे त्याची चटक लागते.

ह्या खाद्य पदार्थांची चव वाढविण्यासाठी आपल्या ज्ञानेंद्रियांच्या संवेदनांच्या विरोधात प्रक्रिया केली जाते. खारट, मसालेदार, साखरयुक्त अशा ह्या पदार्थांना निरनिराळ्या सॉस, मेयॉनिज इत्यादी पदार्थांनी चविष्ट बनविले जाते.

त्यामुळे हे खाद्यप्रकार चवीला छान असतात, पण ते शरीरासाठी अजिबात चांगले नसतात हे तर सिद्ध झालंच आहे पण, आता असंही सिद्ध झालंय की मेंदूला देखील असे पदार्थ खूप घातक असतात.

 

fast food 2 inmarathi

 

ते कसे घातक आहेत हे आपण ह्या लेखातून पाहूया.

जंक फूड जीभेचे चोचले पुरवणारे असते, त्याची चटक लागते हे आपल्याला माहितच आहे, पण अशा गोष्टींमुळे आपल्या भूकेवर आपले नियंत्रण राहत नाही, खरं तर आपली भूक भागली आहे की नाही हेच कळत नाही, त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते.

मेंदू आपल्याला भूक लागली किंवा पोट भरलंय असे संदेश देतो. पण, ह्या पदार्थांच्या सेवनाने मेंदूची पोट भरलंय असा संदेश देण्याची क्षमता नष्ट होते.

त्यामुळे हे जंक फूड कितीही खाल्लं जातं आणि त्याचा सगळ्या शरीरावर विपरित परिणाम होतो. शरीराला आवश्यक तेवढ्याच अन्नाचे सेवन करणे योग्य असते. नाही तर त्याचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो.

शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनामधे असे सिद्ध केले आहे की, जंक फूडच्या अती सेवनाने एखाद्याच्या शरीरातील इंशुलिनची पातळी गरजेपेक्षा जास्त वाढते, ज्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिसाद देण्याची क्षमता मंदावते.

तसेच, त्याचा त्या व्यक्तीच्या स्मृतीवर देखील विपरित परिणाम होतो. काही वस्तू, काही महत्त्वाच्या गोष्टी विसरण्याची सवय लागते, विस्मृतीचा किंवा स्मृतीभ्रंशाचा आजार होतो.

 

junk food 2 inmarathi

 

जंक फूड मेंदू साठी हानीकारक असते हे अजून एका गोष्टीमुळे सिद्ध होते, ती गोष्ट म्हणजे उदासिनता येणे. नैराश्य येणे हा जंक फूडचा अजून एक मोठा दुष्परिणाम आहे.

हे अन्न मेंदूच्या स्वास्थ्यासाठी अजिबातच पोषक नसते. साहजिकच जंक फूडच्या अती सेवनाने मेंदूच्या नैसर्गिक क्रियांवर, मेंदूच्या पोषणावर विपरित परिणाम होतो.

ज्यामुळे निराशा येते, उदास वाटते कोणत्याही गोष्टीत स्वारस्य नसणे ह्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते.

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही कौटुंबिक असतात तर काही आपल्या कामाशी संबंधित असतात.

थोडक्यात काय तर ताण तणाव आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतात, ते ताण तणाव दूर करणे, संकटांवर मात करणे, अडचणींतून मार्ग काढणे आणि पुढचा मार्ग सुकर करणे हे आपल्या हातात असते.

पण, जंक फूडच्या अती सेवनाने संकटांशी सामना करणे, ताण तणावांना सामोरे जाणे, अडचणींवर मात करणे ह्या गोष्टी करण्यामध्ये असमर्थता निर्माण होते असे संशोधनात आढळून आले आहे.

मनुष्य हा अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनक्षम असतो. योग्य ठिकाणी योग्य ती भावना प्रकट करणे ह्याचबरोबर भावनांवर नियंत्रण ठेवणे हे मनुष्याचे वैशिष्ट्य आहे.

पण, जंक फूडमधे असणाऱ्या हानीकारक घटकांमुळे ह्या पदार्थांच्या अती सेवनाने भावनांवर नियंत्रण ठेवणे कठिण जाते किंवा क्षणात राग येणे, क्षणात भीती वाटणे, असुरक्षित वाटणे आणि ह्या भावनांचा उद्रेक होणे, Mood Swings अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

 

junk food eating inmarathi

 

ज्या समस्या खूपच गंभीर आहेत.

हिप्पोकॅंपस (hippocampus) हे मेंदूतील असे संप्रेरक आहे जे संदेश पोचवण्याचे किंवा प्राप्त करण्याचे काम करते. जंक फूडच्या अती सेवनाने ह्या संप्रेरकावर विपरित परिणाम होतो.

त्यामुळे योग्य त्या प्रतिक्रिया देण्यास मेंदू अक्षम ठरतो. एव्हढेच नाही तर त्यामुळे आपली (grasping power) आकलन क्षमता नष्ट होते आणि योग्य त्या गोष्टी शिकण्यास, महत्त्वाच्या गोष्टी कळण्यास किंवा समजण्यास आपण असमर्थ होतो.

हे जंक फूड सोयीस्कर आणि चविष्ट असले तरी आपल्या शरीराबरोबरच मेंदूवर देखील वाईट परिणाम करणारे असल्याने घातक असते हे तर संशोधकांनी सिद्ध केले आहे.

त्यामुळे जंक फूड सगळ्यांनीच विशेषतः लहान मुलांनी टाळणे खूपच गरजेचे आहे.

जंक फूड साठी पर्याय नक्कीच आहेत. जसे, फ्रूट सॅलड, फळांचा रस, पोहे, उपमा, इडली, डोसे वगैरे पदार्थ जंक फूडला नक्कीच उत्तम पर्याय आहेत.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?