' जंक-फूड ला “पौष्टिक” बनवणाऱ्या भारतीय तरुण उद्योजकाची कहाणी! – InMarathi

जंक-फूड ला “पौष्टिक” बनवणाऱ्या भारतीय तरुण उद्योजकाची कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चिप्स हा शब्द ऐकला तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आवडीचा हा स्नॅक्स. सहजच तोंड चालवायला म्हणूनही खाल्ला जाणारा हा पदार्थ. मुलांच्या बर्थडे पार्टीतील कंपल्सरी असलेला हा खाद्यपदार्थ.

सर्वांच्याच आवडीचा हा पदार्थ. आपल्याला बटाट्याचे, केळ्याचे आणि फणसाचे चिप्स खाऊन माहिती असतात.

तरीही तळलेला, मीठ जास्त असल्यामुळे, अनहेल्दी असल्यामुळे तसा बदनाम असलेला हा पदार्थ. सगळ्या डाएट प्लॅन मध्ये वर्ज्य असलेला पदार्थ. पण अशा या पदार्थाला जर डायट प्लान मध्ये समाविष्ट केलं असेल तर!

आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट पदार्थ बनवला असेल तर! विश्वास बसत नाही ना!! पण ही किमया खरोखरच झालेली आहे.

कर्नाटकातील भारद्वाज कारंथ या तरुणाने असे अनेक पदार्थांचे स्नॅक्स बनवले आहेत.

 

bhardwaj karanth inmarathi
thebetterindia.com

 

कर्नाटकातील चिकमंगळूर मधील शृंगेरी येथील हा मुलगा. इंजिनीयर झाल्यावरही आपल्या गावाशी कनेक्ट असलेला हा तरुण. आपल्या गावातील इतर मुलं शिक्षणानंतर दुसरीकडे सेटल होताना त्याने पाहिले होते.

मग त्याच्या मनात विचार चालू झाला की, आपल्याच गावातील मुले इथेच का राहत नाहीत? मग त्याच्या लक्षात आले की इथे कोणत्याही नोकरीच्या संधी त्यांना उपलब्ध नाहीत.

जे काही उत्पादन तिथे होतं ते फक्त शेतीतून मिळतं. तेही दळणवळणाची सोय नसल्याने बरंच उत्पादन वाया जातं. त्याचा गाव शृंगेरी मठासाठी प्रसिद्ध आहे.तरीही त्या गावात इतर कोणत्याही करिअर विषयक संधी उपलब्ध नाहीत.

त्याला स्वतःला पीएचडी करायची होती आणि त्याचे पीएचडीचे मार्गदर्शक हे शृंगेरी मध्येच राहत असल्यामुळे त्याने तिथल्याच JCBM कॉलेजमध्ये कॉम्प्युटर लेक्चररची नोकरी स्वीकारली.

स्वतःचा अभ्यास आणि नोकरी करता करता त्याने आपल्या गावातल्या परिस्थितीचाही अभ्यास करायला सुरुवात केली.

 

bhardwaj karanth 2 inmarathi
rojgarsamachar.com

 

तो स्वतः एका शेतकरी कुटुंबातील मुलगा. म्हणून पहिल्यांदा शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या काय आहे याविषयी त्याने विचारणा सुरू केली. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून त्याने स्वतःचे काही निष्कर्ष काढले.

शृंगेरी मध्ये ८० टक्के लोक हे शेतीवर उदरनिर्वाह करतात. परंतु त्या शेतकऱ्यांना माल पोहोचवण्यासाठी कुठलीही जवळची बाजारपेठ उपलब्ध नाही.

शृंगेरी पासून सगळ्यात जवळची बाजारपेठ म्हणजे शंभर किलोमीटर अंतरावर असलेलं चिकमंगळूर किंवा शिवमोगा. आता शेतीतील उत्पादन त्या ठिकाणी नेणे म्हणजे शंभर किलोमीटरचा प्रवास.

या प्रवासातच शेतीचा नाशवंत माल बराच खराब होतो, हे त्याच्या लक्षात आले. शेतकऱ्यांनी इतकी मेहनत घेऊन काढलेले उत्पादन हे अक्षरशः फेकून देण्याची वेळ येते हेही त्याला कळले.

म्हणूनच या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी करावं, जेणेकरून त्या भागात नोकरीच्या संधीही निर्माण होतील असा विचार त्याच्या मनात आला.

शृंगेरी मध्ये फणसाचे उत्पादन खूप होतं, परंतु या नैसर्गिक रित्या उगवलेल्या फणसांना मागणी मात्र कमी आहे. आणि हे फणस वायाच जायचे. यांचं काहीतरी करायला हवं असं त्याला वाटायचं.

म्हणून त्याने २०१४  ते २०१७ पर्यंत त्यातील अनेक तज्ञ मंडळींची भेट घेतली. म्हैसूर मधल्या फूड इंडस्ट्रीजना भेटी दिल्या. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की सध्या एक असं तंत्रज्ञान उपलब्ध आहे की त्यामुळे त्या पदार्थाचा वापर करता येईल.

पण हे जे तंत्रज्ञान होतं त्यानुसार कुठलेही फळं किंवा फळभाज्या या साखरेमध्ये घोळवून त्यांना वाळवलं जायचं. पण यामुळे अतिरिक्त साखर खाल्ली जाईल हा धोका त्याच्या लक्षात आला.

ज्याचा आपल्या आरोग्याला काहीही उपयोग नाही. म्हणजे यानुसार आणलेले पदार्थ उपयोगी ठरणार नव्हते. म्हणूनच भारद्वाजने याविषयी आणखीन संशोधन चालू केले.

त्याच्या असं लक्षात आलं की इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि थायलंड या देशांमध्ये फळ आणि फळभाज्या या अशा एका व्हॅक्युम ड्रायरमध्ये सुकवल्या जातात की, त्यामुळे त्या पदार्थांमधील पोषणमूल्य अजिबात कमी होत नाही, परंतु ते पदार्थ खाण्यासही उत्तम लागतात.

हेच तंत्रज्ञान त्याने भारतात वापरायचे ठरवले. आणि अशाच पदार्थांची एक स्टार्टअप कंपनी चालु करण्याचा त्याने विचार केला.

पण इंडोनेशियामधले हे व्हॅक्युम ड्रायर ४० लाख रुपयाला मिळणार होते. इतकी गुंतवणूक करणे त्याच्यासाठी अशक्य होते. परंतु त्याच्या कुटुंबाने, मित्रांनी त्याला मदत केली आणि मग त्याने कर्ज देखील काढले.

२०१७ मध्ये त्याने त्याची “सुविधा फुड्स ब्रेवरेजेस” नावाची कंपनी सुरू झाली.

त्याच्या या कंपनीमध्ये अनेक प्रकारच्या भाज्यांपासून, फळांपासून चिप्स बनतात. ज्यामध्ये फणस, रताळे, केळी, भेंडी, लसूण, चिकू, गाजर, पपई, बीट आदीचे चिप्स मिळतात.

 

chips inmarathi
thebetterindia.com

 

फळांमधला किंवा भाज्यांमध्ये असलेला ओलावा नष्ट होऊन त्यांना कुरकुरीतपणा आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. शेवटी २०१८ मध्ये त्याच्या प्रयत्नांना यश आले. त्याला हवं तसं उत्पादन तयार झालं.

अर्थातच त्याचा प्रवास सुलभ नव्हता. त्याने जेव्हा सुरुवातीला शेतकऱ्यांकडे मालाची मागणी केली तेव्हा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मनात शंका होत्या.

हा नक्की त्या उत्पादनांचं काय करतोय असं त्यांना वाटायचं. पण हा माल घेऊन त्याचे पैसे देतोय म्हणून शेतकऱ्यांनी त्याला माल पुरवायला सुरुवात केली.

सुरुवातीला भारद्वाजला माल आणण्यासाठी जावे लागायचे पण आता शेतकरी एका कलेक्शन पॉइंटला माल आणून देतात.

शेतकऱ्यांचा जो माल पूर्वी वाया जायचा तो आता वाया जात नाही. त्यांनी केलेल्या मेहनतीला आता पैसाही मिळतोय म्हणून आता तिथले शेतकरी देखील समाधानी आहेत.

अशा प्रकारचे चिप्स तयार करण्यासाठी भारद्वाज कारंथला अनेक प्रकारची मेहनत करावी लागली. एक तर हे सगळेच पदार्थ कच्चे असताना त्यामध्ये पाण्याचा अंश खूप असतो.

तो घालवून त्या पदार्थातील नैसर्गिक पोषण तत्व तसेच ठेवून त्यांना सुकवणे हे अवघड होतं. त्यासाठी वेगवेगळ्या मशिनरीज लागत होत्या. तसेच मशिनरीज मध्ये वेगवेगळे सेटिंग करावे लागत होते.

 

chips making inmarathi
thebetterindia.com

 

विशेष म्हणजे कुठल्याही एक किलो पदार्थाचे फक्त १०० ते १५० ग्राम चिप्स तयार होतात. त्यासाठी माल भरपूर असणे गरजेचे होते आणि तो साठवून ठेवणे हे देखील गरजेचे आहे.

आता त्याच्या कंपनीत असे अनेक रेफ्रिजरेटर आहेत की ज्यामध्ये असा माल साठवून ठेवता येतो.

भारद्वाज कारंथचे हे जे चिप्स आहेत ते त्यातील नैसर्गिक गुण कायम ठेवून बनलेले असतात. ते अत्यंत कमी तेलात बनतात. त्यांच्यासाठी कोणतंही वेगळं सिझनिंग घातलं जात नाही. पण त्याची चव मात्र एकदम छान असते.

हळूहळू त्याच्या प्रोडक्टची माहिती लोकांना व्हायला लागली. बेंगलोर मधल्या आयटी इंडस्ट्री काम करणाऱ्या सुब्रमण्यम भट यांनी पहिल्यांदा त्यांच्या प्रॉडक्टची चव घेतली. आणि बेंगलोर मधल्या आयटी कंपन्यांमध्ये भारद्वाजचे हे प्रॉडक्ट पोहोचले.

आणि अल्पावधीतच त्याचा क्रिस्पीनेस आणि हेल्दी असण्याच्या गुणधर्मामुळे लोकप्रिय झाले.

गेल्यावर्षी त्याच्या कॉलेजमध्ये आलेल्या रंजन पै यांच्या भेटीमुळे तर त्याच्या या व्यवसायाला एक नवीनच दिशा मिळाली आहे. रंजन पै हे मणिपाल ग्रुपचे चेअरमन आहेत.

ते JSBM कॉलेज मध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. तेंव्हा कॉलेजच्या प्राचार्यानी कारांथचे प्रॉडक्ट त्यांना खाण्यासाठी दिले. त्यांना ते इतके आवडले की शेवटी त्यांनी त्याच्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली.

सध्या कारंथचे उत्पादन वेगवेगळ्या आयटी कंपनीच्या कॅन्टीन मध्ये मिळतात. त्याच बरोबर कॅफे कॉफी डे सारख्या कॅफेटेरिया मध्ये देखील मिळतात. तसेच बिग बास्केट सारख्या ई-कॉमर्स मार्केटमध्ये देखील मिळतात.

 

chips inmarathi 2
thebetterindia.com

 

आता आणखी नवीन मसाले आणि नवीन प्रकारचे प्रॉडक्ट त्याला ” रुचिरा ” या नावाखाली बाजारात आणायचे आहेत.

भारद्वाज च्या म्हणण्यानुसार भारतातला पश्चिम घाट हा असा प्रदेश आहे की ज्यामध्ये इंडस्ट्री उभी राहू शकत नाही. परंतु तिथे उत्पादन होणाऱ्या आणि तिथल्याच नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून नैतिक मार्गाने लोकांच्या हाताला काम देता येईल.

भारद्वाज कारंथ त्याच्या अनुभवावरून जे लोक नवीन काही करू इच्छितात त्यांना सांगू इच्छितो की,

“आयुष्यात कधीही हार मानू नका. नेहमीच नवीन नवीन गोष्टींचा ध्यास धरा. वेगळं काही तरी करण्याचा प्रयत्न करा आणि ते मिळवण्यासाठी मेहनत करण्याची तयारी ठेवा. तुमचं ध्येय ठरलेलं असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल.”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?