' पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर या गोष्टी पाळाच – InMarathi

पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर या गोष्टी पाळाच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी पाऊस येतो. सर्वजण त्याची वाट पाहत असतात. उन्हाळ्यातल्या लाही लाही करणाऱ्या तापमानामुळे सगळेच वैतागलेले असतात. म्हणूनच पावसाचा थंडावा, शिडकावा सगळ्यांना हवाहवासा वाटतो.

निसर्ग, पृथ्वी, जमीन, प्राणी, पक्षी,माणसं सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि मग जून महिन्यात पाऊस येणार याची वर्दी येते.

ठरल्याप्रमाणे पाऊस येतोही, पण त्या बरोबरच येतात नेहमीच येणारी आजारपण. साथीच्या रोगांची जणू लाटच येते सगळीकडे. लोक मग सर्दी, पडसे, ताप, खोकला यामुळे आजारी पडायला लागतात.

 

unwell woman inmarathi

 

बऱ्यापैकी लोक बरेही होतात, परंतु काही काही जणांबाबतीत हे आजार जीवघेणेही ठरतात. या आजारांबाबत काळजी घेणे जरुरीचे असते. या आजारांपासून वाचण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहू.

 

सकस आणि गरम आहार घ्या :

 

cooking inmarathi

 

पावसाळा हा ऋतू असा आहे, की या ऋतूमध्ये आपल्या शरीरातील कुठल्या अवयवावर परिणाम होत असेल तर ते म्हणजे पोट. याकाळात पचनसंस्था कमकुवत झालेली असते. त्यात आपण काय आहार घेतो हे देखील महत्त्वाचे ठरते.

या काळात होणारे आजार हे मुख्यतः दूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच या काळात डॉक्टर उकळून गार केलेले पाणी पिण्याचा सल्ला देतात. तसेच खाण्यात देखील, बाहेरचे अस्वच्छ पदार्थ टाळण्याचा ही सल्ला देतात. यातूनच फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो.

भेळ, पाणीपुरी, वडापाव, कुल्फी आणि इतर स्ट्रीट फूड टाळले पाहिजे.

त्याच प्रमाणे कच्चा भाज्यांचे सलाड खाणे देखील याकाळात टाळले पाहिजे. कारण कच्चा भाज्यांमधूनही ईन्फेक्‍शन होऊ शकते.

म्हणूनच या काळातला आहार हा चौरस, सकस आणि गरम हवा. मोड आलेली कडधान्य, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आहारात असावा. सगळ्या पालेभाज्या पाण्यात स्वच्छ धुवून मग चिराव्यात.

 

आवश्यक तेवढे पाणी प्या :

 

water inmarathi

 

पावसाळ्यात बऱ्याचदा तहान कमी लागते, त्यामुळे शरीराला आवश्यक तितके पाणी प्यायले जात नाही. म्हणून मोबाईल मध्ये आलार्म लावून पाणी प्यायले पाहिजे.

याशिवाय बऱ्याचदा चहा-कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स , ड्रिंक्स घेतले जातात. ज्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि नको असलेली साखर असते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते.

त्याऐवजी जर ग्रीन टी, जिंजर टी असे अँटीबॅक्टेरियल घटक असलेले पेय घेतल्यास त्याचा फायदा होतो. “विटामिन सी” घेतल्याने देखील त्याचा फायदा होतो. म्हणजेच लिंबूवर्गीय फळ खाल्ली पाहिजेत.

 

पावसात भिजणे टाळा : 

 

rain mumbai 1 inmarathi
\

हे ही वाचा – जुलाब-अतिसाराचा त्रास असतांना हे ८ पदार्थ खाणे कटाक्षाने टाळायला पाहिजे!

पावसात भिजायला कोणाला आवडत नाही!! पावसात भिजणे आणि गरमागरम भजी खाणे आणि चहा पिणे. एकूणच पावसात भिजणे ही एक रोमँटिक कल्पना वाटते. म्हणून बरेच जण पावसात मुद्दाम भिजतात.

परंतु पावसाळ्यातच व्हायरल आजार जास्त पसरतात. साठलेल्या पाण्यातून चालल्याने लेप्तोस्पिरोसिस हा आजार होण्याची शक्यता असते. पायांच्या बोटांमध्ये- नखांमध्ये बुरशी होऊ शकते.

जर तुम्ही भिजले असाल, तर ए.सी चालू असेल अशा खोलीमध्ये जाऊ नका. भिजल्यास लगेच कोरडे कपडे घालून घ्या. शक्य असल्यास ऑफिसमध्ये कपड्यांचा आणि चप्पल, बुटांचा एक जोड ठेवायला हरकत नाही.

डायबिटीज असणाऱ्यांनी तर त्या काळात अनवाणी चालूच नये कारण जमिनीवर अनेक प्रकारचे जंतू, कीटक असतात आणि ते त्यांच्या पायाला इजा करू शकतात.

 

घरात ओलसरपणा ठेवू नका, स्वच्छता ठेवा :

 

cleaning inmarathi

पावसाळ्यात घरातल्या भिंतींना ओल धरली जाते. अशाच भिंतींवर बुरशी चढते ज्यामुळे आजाराचा प्रसार होण्याची शक्यता वाढते.

अस्थमा आणि श्वासोश्वास यांचे आजार असणाऱ्या लोकांनी तर घरातल्या भिंतींवर बुरशी ठेवूच नये.

 

घरात डासांची उत्पत्ती होईल अशा गोष्टी ठेवू नयेत : 

 

mosquitos-inmarathi

 

साठलेलं पाणी डासांचं उत्पत्तीस्थान असतं. घरातील कुंड्या खालच्या प्लेट्स, नारळाच्या करवंट्या याबरोबरच बादल्या, डबे यामध्ये पाणी साठले जाते. तिकडे डास अंडी घालतात.

त्यामुळे अशा गोष्टी मध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर मलेरिया, डेंग्यू सारखे आजार होण्याची शक्यता असते.

घराबाहेर जातानाही मॉस्किटो रिप्लेंट क्रीम लावून जावी किंवा आपल्या सोबतही ठेवावी.

 

दिवसातून दोनदा अंघोळ करा

 

 

पावसाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर संध्याकाळी अंघोळ करा. कारण दिवसभर पावसाळी हवामान असल्यामुळे दमट हवा असते आणि त्यामुळे शरीरावर घाम येतो.

प्रदूषणातील धूर, धूळ आणि घाम यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो, म्हणूनच पावसाळ्यात दोनदा अंघोळ करावी.

 

डोळ्यांना हात लावणे टाळा

 

corona prevention inmarathi

 

पावसाळ्यात डोळ्यांचे देखील आजार उद्भवतात. आपल्या हातावरचे इन्फेक्शन डोळ्यांमध्ये जाऊन डोळ्यांचे आजार होतात.

त्यामध्ये डोळे येणे, डोळे कोरडे पडणे, डोळ्याचा अल्सर होऊ शकतात आणि याकडे दुर्लक्ष केल्यास दृष्टी अधू होऊ शकते.

कम्प्युटरवर काम करताना, टीव्ही बघताना सतत रिमोटला हात लावून चॅनल बदलले आणि तेच हात डोळ्यांना लावले तर हातावरची धूळ डोळ्यात जाते त्यामुळे डोळे लाल होणे, कचकच करणे असे त्रास होऊ शकतात.

सतत तोंडाला. नाकाला, डोळ्यांना हात लावणे टाळा.

 

या आजारांपासून घ्यावयाची काळजी : 

रात्री जागरण बंद करून पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करावा. किमान आठ तास तरी झोप घेतली पाहिजे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.

 

indian guy sleeping inmarathi

 

दररोज नियमित व्यायाम केला पाहिजे त्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो आणि शरीरात येणाऱ्या आजारांना आपली प्रतिकारशक्ती परतवून लावू शकते.

सध्या तर covid-19 च्या प्रादुर्भावामुळे विशेष काळजी घ्यावी लागत आहे. हात सतत sanitize करणे आणि हँडवॉशने धुतले पाहिजेत. ज्यामुळे covid-19 बरोबरच इतर कोणताही आजार होणार नाही.

 

washing hands inmarathi

हे ही वाचा – अंघोळ करताना केलेली फक्त “ही” एक गोष्ट कित्येक आजारांना कायम दूर ठेवेल…

तसेच आजारी व्यक्तींपासून लांब रहा. मास्क घालूनच घराबाहेर पडले पाहिजे. ओले शूज घालू नयेत.  

याकाळात कपडे नीट वाळत नाहीत. म्हणून सगळे कपडे इस्त्री करून वापरले पाहिजेत. नाहीतर ओलसर कपड्यांमुळे त्वचेचे देखील आजार होण्याची भीती असते.

याकाळात नखे वाढवू नयेत.  वेळच्यावेळी नखे कापावीत, कारण त्याद्वारे देखील इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात, यासाठी कुठलाही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. यामध्ये कुठलीही हयगय करू नये.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?