चीनची मुजोरी उधळण्यासाठी या भारतीयाने उभारलेल्या “स्वदेशी” आंदोलनात तुम्ही सहभागी होणार ना?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
सोनम वांगचुक. लडाख मध्ये राहणारा एक सामान्य माणूस. सोनम हे IIT मधून शिकलेले मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. विज्ञानाची प्रचंड आवड असलेले सोनम हे एक शिक्षक आहेत.
लडाख मध्ये त्यांनी एक शाळा सुरू केली आहे. ह्या शाळेमध्ये मुलांना विज्ञानाचे प्रयोग प्रात्यक्षिकासह दाखवले जातात. आपण सर्वांनी ही शाळा ‘३ इडियट्स’ या सिनेमात बघितली आहे.
या सिनेमातील ‘फुंसुक वांगडू’ हे आमिर खान ने भूमिका केलेलं पात्र हे सोनम वांग्चुक यांच्यावरूनच प्रेरित आहे असं ही बोललं जातं.

कोणताही माणूस हा फक्त त्याच्या विचारांनी आणि कर्तृत्वाने मोठा होतो हेच खरं. सोनम वांगचुक बद्दल ही हेच झालं.
लडाख मध्ये म्हणजे चीन च्या सीमेलगत राहून त्यांनी चीन मध्ये तयार होणाऱ्या वस्तू विकत घेणं आपण कश्या टाळू शकतो या विषयाचा सोनम यांनी सखोल अभ्यास केला आहे.
आणि त्यांच्या अभ्यासातील काही मुद्दे त्यांनी व्हिडीओ स्वरूपात रेकॉर्ड केले. दोन विडिओ त्यांनी सोशल मीडिया वर share केले.
त्यांच्या या मोहिमेला त्यांनी #BoycottMadeInChina असं नाव दिलं आणि हे हॅशटॅग एखाद्या वणव्या सारखं पसरत आहे.
जगातील जवळपास ६० पेक्षा अधिक लोकांनी हे मान्य केलं आहे की कोरोना वायरस तयार करण्यात आणि पसरवण्यास चीन देशच जवाबदर आहे.

या पार्श्वभूमीवर या मोहिमेला पाठिंबा मिळणं अगदीच सहाजिक होतं. भारतीय गोष्टीच वापराव्या हे बऱ्याच जणांच्या मनात असतं पण कसं शक्य होऊ शकतं याचा एक रोड मॅप सोनम यांनी आपल्याला दिला आहे:
१. ‘चीन से लढो : बुलेट से नही वॉलेट से…’ :
हा एक अनोखा नारा सोनम यांनी भारतीय लोकांना दिला आहे. चीन ची जनता ही आर्थिक अडचण अजिबात सहन करू शकणारी नाहीये.
आर्थिक आणीबाणी आल्यास तिथली जनता ची चीनच्या सरकार विरुद्ध लढायला सुरुवात करेल याची तिथल्या सरकारला सुद्धा भीती आहे.
भारत देश हा चीन चा सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे.
चीन ला भारता सोबत व्यापार करून पैसे मिळतात आणि त्याच पैशात तो शस्त्र खरेदी करतो किंवा तयार करतो आणि ते शस्त्र, सैन्य भारता विरुद्धच वापरतो.
ह्याची जाणीव आपल्यापैकी प्रत्येकाला असली पाहिजे आणि त्यामुळे कोणतीही चीन ची वस्तू खरेदी करताना चीनकडून लडाख मध्ये होणाऱ्या घुसखोरीचा विचार मनात आला पाहिजे.
१९६२ मध्ये सुद्धा चीन ने असाच हमला भारतावर केला होता. तुम्हाला प्रश्न पडेल की, आम्हाला हे सगळं पटतं. पण, हे साध्य कसं करायचं? पुढच्या पॉईंट मधून याचं उत्तर मिळेल.

२. सॉफ्ट पार्ट आणि हार्ड पार्ट :
सोनम वांगचुक यांच्या प्रस्तावानुसार ही मोहीम आपण दोन भागांमध्ये राबवली पाहिजे. पहिला भाग म्हणजे चीन मध्ये तयार होणारे Apps वापरणं बंद करावेत.
चीन हा काही सॉफ्टवेअर चा एक्सपर्ट वगैरे अजिबात नाहीये. चीन ची ओळख ही प्रामुख्याने manufacturing giant अशी आहे.
मग, त्याला सॉफ्टवेअर बनवण्यात आणि त्यापासून करोडो रुपये कमावून देण्यास आपण का हातभार लावावा ?
भारतात इन्फोसिस, TCS सारख्या किती तरी IT कंपन्या असताना आपण चीन ने तयार केलेले टिक टॉक सारखे app का वापरावे ?
किंवा जर का अश्या app ची मनोरंजन होण्यासाठी जर गरज आहे तर असे app भारतानेच का तयार करू नयेत?

भारतीय IT सेक्टर हे प्रामुख्याने अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांना IT सपोर्ट देण्यासाठी काम करतं.
काही वेळासाठी जर या सेक्टर ने स्वतः चे काही काम करण्यात त्यांच्या मॅनपॉवर वापरली तर चीन मध्ये तयार होणाऱ्या app ला आपण नेहमीसाठी हद्दपार करू शकतो.
३. हार्डवेअर पार्ट :
आपण जर का इतिहास बघितला तर एक लक्षात येईल की,
कधीही कोणत्याही भारतीय व्यक्तीने जेव्हा चीन विरुद्ध काही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला की, भारतातलेच काही लोक त्याच्या विरोधात उभे राहतात हे म्हणून की ‘आपण चीन वर प्रत्येक गोष्टीच्या raw material साठी अवलंबून आहोत’.
जे की बऱ्याच अंशी खरं सुद्धा आहे. सध्याची परिस्थिती बघितली तर आपल्याकडे तयार होणाऱ्या फार्मा कंपनीतील गोळ्यांचं raw material सुद्धा चीन मधून येतं.
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा प्राण असलेला PCB (printed circuit board) हे चीन मधूनच आयात केले जातात.
सोनम वांगचुक यांना याबद्दल वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्विट करून “तुमचं हे अभियान किती कमकुवत आहे” हे सांगण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रश्नांना उत्तर देतांना सोनम वांगचुक यांनी असं सांगितलं आहे की,
एका वेळी एक सेक्टर अशी जर का आपण चीन वरची हार्डवेअर ची गरज कमी करत गेलो तर आपण निदान काही वर्षात त्या स्टेज ला पोहोचू शकतो जेव्हा आपल्याला चीन च्या वस्तूंची अजिबात गरज नसेल.
पण, त्यासाठी आपण त्या दिशेला आजपासून चालायला सुरुवात करणं आवश्यक आहे. भारतात काय नाहिये ? मनुष्यबळ आहे, तंत्रज्ञान आहे, जागा आहे, लोकसंख्या खूप असल्याने मोठं मार्केट आहे.
चीन मधून आयात होणाऱ्या वस्तूंची सेक्टर नुसार यादी जाहीर करण्यात यावी, त्या क्षेत्रातील मोठया उद्योजकांना या वस्तू भारतात तयार करण्याचं आवाहन करण्यात यावं.
आपण नक्की ह्या गोष्टी भारतात तयार करू शकतो.
सध्याचे आकडे बघितले तर भारत चीन ला ५ लाख कोटी च्या आसपास बिजनेस देतो. तर चीन हे भारताकडून फक्त सव्वा लाख कोटींच्या वस्तू आयात करतो.

४. सरकार की जनता :
चीन चा विषय आल्यावर कोणत्याही सामान्य माणसाचा हा एक कॉमन प्रश्न असतो की, चीन आणि भारत यांच्यात इतका संघर्ष आहेत तर मग भारत सरकार त्यांच्या वस्तूंना भारतात येऊ देणं का बंद करत नाही?
यावर बोलताना सोनम वांग्चुक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे की, जर का या वस्तूंवर बंदी आणली तर भारतीय लोक पर्याय शोधतील, स्मगलिंग करतील आणि त्या वस्तूंना भारतात आणतील.
दुसरी एक गोष्ट अशी आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अशी कोणती भूमिका जाहीर करू शकत नाही. शिवाय, भारतातील लोकांचा एक वर्ग भारत सरकार वर असं केल्याने ताशेरे ओढेल ते वेगळंच.
#BoycottMadeInChina हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी ते एक जन आंदोलन होणं अत्यंत आवश्यक आहे.
कारण, भारतात कोणतंही आंदोलन तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा लोकांना मान्य आहे. लोकशाही असल्याने आपण कोणतीच गोष्ट लोकांवर लादू शकत नाही. लोकांनी ती गोष्ट माझं कर्तव्य आहे असं समजून आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे.
सैन्य तर बुलेट ने त्यांचं काम करेलच. वॉलेट ने आपण आपलं काम करत रहाणं ही आजची गरज आहे.

कोणतीही वस्तू कमी वेळात आणि कमी पैशात देण्याचं चीन चं धोरण भारतीय उद्योगांनी सुद्धा जर अंगीकारलं तर अशक्य काहीच नाहीये.
सध्या ची परिस्थिती अशी आहे की गणेश चतुर्थी असो किंवा दिवाळी असो; आपल्या घरात किती तरी चायना मेड वस्तू आपण कळत नकळत घरात घेऊन येतो.
आपण प्रत्येकाने स्वतःला हे समजावलं पाहिजे की, भारतात तयार झालेले एअर कुलर, पंखे हे सुद्धा चांगली हवा देतात आणि आपण ज्या लायटिंग लावून आपले सण साजरे करतो तोच प्रकाश आपल्याला पणत्या लावून सुद्धा मिळू शकतो.
प्रत्यक्षात हे सगळं आमलात आणण्यासाठी भारताला विजेचे दर, पाण्याची मुबलकता आणि पक्के रस्ते यावर खूप काम करण्याची गरज आहे.
उद्योजकांना जमीन हस्तगत करताना होणारा त्रास आणि त्यांनी उद्योग सुरू केल्यानंतर त्यांना स्थानिक नेत्यांकडून मनुष्यबळ पुरवताना होणारी अरेरावी जर का रोखता आली तर भविष्यात भारत नक्कीच एक महासत्ता म्हणून ओळखल्या जाऊ शकतो.
गरज आहे ती जपान, जर्मनी सारख्या देशातील लोकांमध्ये त्यांच्या देशात तयार झालेल्या वस्तूंबद्दल असलेला कडवटपणा प्रत्येक भारतीयाने स्वतः मध्ये आत्मसात करण्याची.
सोनम वांगचुकचं हे आंदोलन यशस्वी होवो यासाठी आमच्या शुभेच्छा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
सोनम वांगचुक यांनी केलेली ही खूपच छान संकल्पना आहे आणि माझ्याकडून सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे आणि हे आंदोलन पुर्णपणे यशस्वी होवो यासाठी शुभेच्छा