' नरेंद्रचा विवेकानंद करण्याची महान प्रक्रिया घडवून आणणारा हा खडक भारताचा ऐतिहासिक वारसा आहे! – InMarathi

नरेंद्रचा विवेकानंद करण्याची महान प्रक्रिया घडवून आणणारा हा खडक भारताचा ऐतिहासिक वारसा आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

‘विवेकानंद रॉक मेमोरियल’ हे भारताच्या दक्षिणेकडील टोकावरील कन्याकुमारीच्या वावथुरायच्या पूर्वेस सुमारे ५०० मीटर पूर्वेकडील किनाऱ्यावर आहे.

लक्षद्वीप समुद्राच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या दोन जोडलेल्या खडकांपैकी एकावर तो बसला आहे आणि त्यामध्ये ‘श्रीपाद मंडपम’ आणि ‘विवेकानंद मंडपम’ या दोन महत्वाच्या वास्तूंचा समावेश आहे.

हे विस्मयकारक स्मारक थोर अध्यात्मिक नेते आणि भारताचे हिंदू भिक्षू स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ तयार करण्यात आले आहे!

 

swami vivekanand inmarathi
newsheads.com

 

असे म्हटले जाते की शिकागोच्या प्रवासाच्या दोन दिवस अगोदर ध्यानधारणा केल्यानंतर येथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.

 

खडकाचे महत्त्व –

स्थानिक लोकांच्या दंतकथेनुसार हा खडक देवी कुमारी या देवतेच्या आशीर्वादाने पावन झालेला खडक आहे.

त्या खडकावरचे विवेकानंद यांचे स्मारक हे भारतातील विविध स्थापत्यशैलीचे अनोखे दर्शन घडवणारे आहे. वर्षभर इथे हजारो पर्यटक येत असतात. या खडकापर्यंत जाण्यासाठी बोटीने जावं लागतं.

स्वामीजींची तपश्चर्या –

१८९३ साली शिकागो येथे भरणाऱ्या जागतिक धर्म परीषदेत भाग घेण्यापूर्वी दिनांक २४ डिसेंबर १८९२ रोजी स्वामीजी या खडकावर गेले होते आणि तिथे त्यांनी तीन दिवस आणि रात्र ध्यानधारणा केली होती.

त्या दरम्यानच तिथे त्यांना ज्ञानप्राप्ती झाली असे म्हटले जाते.

 

vivekanand rock memorial inmarathi
kanyakumaritourism.in

 

स्वामीजींना प्रेरणादायी ठरलेला हा खडक त्यानंतर भारतातच नव्हे, तर जगभर प्रसिद्ध झाला. प्रेरणादायी ठरला.

स्वामी विवेकानंद हे परमयोगी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते.

नंतर त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय योग आणि वेदांत या भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून देण्याची मोलाची भूमिका बजावली होती.

सततच्या आक्रमणाच्या काळात आपली ओळख हरवून बसलेल्या भारताला स्वामी विवेकानंदांनी जगासमोर आत्मविश्वासाने उभं राहण्याचे बळ दिले.

आपले भारतीय तत्वज्ञान किती थोर आहे याची त्यांनी जगाला ओळख करून दिली. त्यामुळे पाश्चिमात्य देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

स्मारकासाठी प्रयत्न –

जानेवारी १९६२ मध्ये ‘कन्याकुमारी कमिटी’ गठीत झाली.

त्यांनी स्वामीजींना ज्या खडकावर ज्ञानप्राप्ती झाली, त्या खडकापर्यंत लोकांना पोचण्यासाठी पूल तयार करण्यात यावा या उद्देशाने ही कमिटी गठीत केली होती.

 

vivekanand memorial inmarathi
flickr.com

 

त्याचवेळी मद्रास येथील ‘रामकृष्ण मिशन’ने देखील त्यासाठी पाठिंबा दिला होता. तिथे स्वामीजींचे एक स्मारक व्हावे अशी या सर्वांची इच्छा होती.

परंतु स्थानिक मच्छिमार कॅथलिक ख्रिश्चन लोकांनी त्या कल्पनेला विरोध केला आणि त्या खडकावर त्यांनी जाऊन ख्रिश्चन धर्माचे प्रतीक असलेला क्रूस लावला.

या गोष्टीला तिथल्या हिंदूंनी विरोध केला. अशारीतीने ह्या विषयाचे राजकारण होऊन हा विषय गंभीर बनला.

शेवटी हे स्थळ प्रतिबंधित स्थळ म्हणून कायद्याने घोषित करण्यात आले आणि तेथे संरक्षणासाठी सैन्यातील गार्ड तैनात केले गेले.

१७ जानेवारी १९६३ रोजी सरकारकडून हा खडक स्वामी विवेकानंद यांच्याशी संदर्भित असल्याचा निवाडा मिळाला आणि तिथे स्वामीजींचे स्मारक बांधण्याची परवानगी मिळाली.

एकनाथ रामकृष्ण रानडे आणि स्वामीजींचे स्मारक –

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक आणि प्रसिद्ध सामाजिक आणि आध्यात्मिक सुधारक श्री. एकनाथ रामकृष्ण रानडे हे स्वामी विवेकानंद यांच्या कार्याने आणि शिकवणुकीने प्रभावित झालेले एक थोर व्यक्तिमत्व होते.

यांनी स्वामीजींचे हे स्मारक उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांनी ‘विवेकानंद स्मारक समिती’ स्थापन केली.

 

eknath ranade inmarathi
postcard.news

 

आणि त्याच्या भारतभरात शाखा उघडल्या आणि भारतातल्या प्रत्येक विभागातून या स्मारकाला पाठिंबा आणि निधी मिळवून देण्यासाठी चळवळ उभी केली.

परंतु तत्कालीन शिक्षण आणि संस्कृती मंत्री हुमायून कबीर आणि मद्रास राज्याचे मुख्यमंत्री मिंजूर भक्तवत्सलम यांनी या कल्पनेला विरोध केल्याने अडचणी निर्माण झाल्या.

म्हणून मग रानडे यांनी स्मारकाच्या समर्थनार्थ ३२३ संसद सदस्यांच्या स्वाक्षऱ्या गोळा करण्याची मोहीम राबवली. या सर्व प्रयत्नांनंतर तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या स्मारक बांधण्यास परवानगी दिली.

एकनाथजी हे स्वामी विवेकानंद यांच्यावर उत्तम व्याख्याने देत.

१९६६ मध्ये स्मारकाचे काम सुरू होण्याआधी त्यांनी त्या स्मारकासाठी काम करणाऱ्या सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांना विवेकानंदावरची बरीच व्याख्याने ऐकवली होती.

त्यामुळे त्यांच्या मनात देखील विवेकानंद यांच्या स्मारकाबद्दलच्या कल्पना स्पष्ट झाल्या. त्यांची ती व्याख्याने आजही सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

 

eknath ranade 2 inmarathi
youtube.com

 

भारतीय ऐक्याचे स्मारक –

हे भारतीयांच्या ऐक्याचे देखील स्मारक आहे. कारण हे स्मारक व्हावे ही भारतभरातल्या सर्व लोकांची इच्छा होती.

या स्मारकासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे श्रम, रामकृष्ण मिशनचे आशीर्वाद, काची कामकोटी पीठाच्या परमाचार्य यांचे डिझाईन आणि चिन्मय मिशनच्या स्वामी चिन्मयानंद यांनी दिलेले प्रथम डोनेशन लाभले होते.

अखेर सहा वर्षांच्या अल्पावधीतच १९७० मध्ये हे स्मारक बांधून पूर्ण झाले. या स्मारकाच्या बांधकामात जवळपास ६५० मजूर सहभागी झाले होते.

नंतर त्याच वर्षी हे स्मारक देशाला समर्पित करण्यात आले.

२ सप्टेंबर १९७० रोजी रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष श्री. विरेश्वरानंद यांनी विवेकानंद स्मारकाचे विधीवत अभिषेक वगैरे करून राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते ते स्मारक देशाला समर्पित केले.

 

vivekanand rock inmarathi
katha.vkendra.org

 

विलोभनीय स्मारक –

या स्मारकाच्या रचनेत भारताच्या पारंपरिक आणि आधुनिक स्थापत्य शैलीचे मिश्रण आहे. विशेषतः तामिळनाडू आणि प. बंगालच्या स्थापत्य शैलीचे मिश्रण आपणास या स्मारकाच्या रचनेत पहावयास मिळते.

स्मारक मंडपम बंगालच्या बेलूर येथील श्री. रामकृष्ण मंदिरासारखे आहे तर त्या प्रवेशद्वाराच्या रचना अजिंठा आणि वेरूळ येथील स्थापत्य शैलीच्या आहेत.

या स्मारकात स्वामी विवेकानंद यांचा भव्य पुतळा असून तो त्यांच्या ‘परिव्राजक’ या स्थितीत आहे. हा पुतळा कांस्य धातूपासून बनलेला असून तो सुप्रसिद्ध शिल्पकार सिताराम एस. आर्ते यांनी बनवलेला आहे.

 

swami vivekanand statue
tripadvisor.in

 

हे स्मारक असलेल्या खडकाला ‘श्रीपाद पराई’ असे देखील म्हटले जाते. कारण देवी कुमारी या देवतेने आपल्या पवित्र चरणस्पर्शाने हा खडक पावन केलेला आहे अशी स्थानिक दंतकथा आहे.

या खडकाचा आकार मानवी पायासारखा काहीसा असल्याने त्याला पद्म असे संबोधले जाते.

हा खडक तपकीरी रंगाचा असून त्या ठिकाणी पूर्वी श्री पडपाराय मंडपम नावाचे मंदिर बांधले गेले होते.

स्मारकाच्या दोन मुख्य संरचनेपैकी एक मुख्य गर्भगृह म्हणजे ‘श्रीपाद मंडपम’ ते बाह्य विभागांतर्गत आहे.

हा एक चौकोनी हॉल असून त्यात एक गर्भगृह, एक ‘अंतर्गत प्रकर्म’ आणि एक ‘बाह्य प्रकर्म’ यांचा समावेश आहे.

आणि दुसरी मुख्य रचना म्हणजे स्वामीजींच्या सन्मानार्थ बांधलेली ‘विवेकानंद मंडपम’ आहे.

या विभागात ‘ध्यान मंडपम’ ‘मुखमंडपम’, ‘सभामंडपम’ आणि जगदंबेच्या मुलाला नमस्कार करणारा एक विभाग यांचा समावेश आहे.

ध्यान मंडपम किंवा मेडिटेशन हॉलची रचना भारताच्या मंदिर वास्तुकलेच्या विविध शैलींचे एकीकरण दर्शवते.

 

dhyan mandpam inmarathi
kanyakumaritourism.in

 

शांततापूर्ण आणि शांत वातावरणात अभ्यागतांना बसण्याची, विश्रांती घेण्याची आणि ध्यान करण्यास अनुमती घेणाऱ्यांना मंडपम जवळील ६ खोल्या आहेत.

‘सभा मंडपम’ असेंब्ली हॉल आहे ज्यात ‘प्रलिमा मंडपम’ नावाचा पुतळा विभाग आहे, हॉलला व्यापलेला एक कॉरीडोर आणि बाह्य अंगण आहे.

स्वामी विवेकानंदांची मूर्ती अशा ठिकाणी अशा रितीने स्थित आहे, जणू ते श्रीपादांकडे बघत आहेत असे वाटते.

असे हे जणू ऐक्य आणि शुद्धतेचे, अध्यात्मिकतेचे, भारतातील अध्यात्मिक तत्वज्ञानाचे आणि त्या तत्वज्ञानाचे प्रचारक श्री. स्वामी विवेकानंद यांचे कन्याकुमारी येथील हे स्मारक, सर्वांनी अवश्य एकदा तरी भेट द्यावी असे पवित्र ठिकाण आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?