' तामिळनाडूच्या राजकीय पटलावरील खुर्चीचा खेळ समजून घ्या – InMarathi

तामिळनाडूच्या राजकीय पटलावरील खुर्चीचा खेळ समजून घ्या

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सध्या संपूर्ण देशभरात तामिळनाडू मधील हलत्या डुलत्या राजकीय अंबारीची चांगलीच हवा आहे. या अंबारीमध्ये विराजमान आहेत दोन व्यक्ती श्रीमती शशिकला आणि श्रीयुत पन्नीरसेल्वम! अंबारी कधी या बाजूला जातेय तर कधी त्या बाजूला पण अण्णा द्रुमूकचा हत्ती मात्र अंबारीचा हा डोलारा बऱ्यापैकी सांभाळून नेत आहेत. पण तो कितपत मजल मारेल याची शाश्वती देणे मात्र कठीण!

जयललिता यांना गमावल्याच दु:खद सावट आतास कुठे तामिळनाडूच्या जनतेच्या मनावरून दूर होऊ लागलं आहे आणि त्यातच त्यांना अम्माच्या वारसांचा हा सत्तासंघर्ष पाहावा लागत आहे हेच दुर्दैव! जयललिता यांनी तामिळनाडू राज्यासाठी आणि त्या जनतेसाठी जे काही केलं आहे ते नक्कीच कौतुकास्पद होतं. जनता त्यांना देवासारखं पुजायाची. (वाचा: तमिळनाडूच्या जनतेचा जयललितांवर इतका जीव का होता?) त्यांच्या याच प्रतिमेमुळे त्यांच्या नंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदी बसणारा व्यक्ती हा देखील त्यांच्यासारखाच असावा ही माफक अपेक्षा तामिळनाडूची जनता बाळगून होती.

jaylalitha-marathipizza02

अर्थातच जयललिता यांनी कमवलेल्या पदापर्यंत पोहोचण हे सध्यातरी पक्षातल्या कोण्या नेत्याला शक्य नाही, परंतु त्यांचा वारसा चालवणे मात्र शक्य आहे. याच भावनेतून पक्षातर्फे पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात आली. परंतु काहीच दिवसांत पक्षाअंतर्गत हालचाली अश्या काही बदलल्या की पन्नीरसेल्वम यांच्या जागी शशिकला यांनी मुख्यमंत्री व्हावे असा सुरु निघू लागला.

जयललिता याचा वारसा पुढे नेण्यासाठी पन्नीरसेल्वम पात्र नाहीत, त्याउलट ज्या जयललिता यांच्या छत्रछायेत वाढल्या त्या शशिकला ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडू शकतात हे प्रमुख कारण पुढे करण्यात आले. आता बरेच जण म्हणत असतील की जर हे कारण होतं तर पन्नीरसेल्वम यांच्या जागी शशिकला यांनाच मुख्यमंत्री करायला हवं होतं, म्हणजे वाद उद्भवलाच नसता. याचं उत्तर असं आहे की- शशिकला यांच्याकडे मुख्यमंत्री पद सांभाळण्याची कुवत नाही असे त्यांच्याच पक्षातील बऱ्याच जणांचे म्हणणे! सोबतच तामिळनाडूच्या जनतेला देखील शशिकला यांनी मुख्यमंत्री होणे आवडणारे नाही. याला कारण त्यांचा किंचितही नसलेला राजकीय प्रभाव होय.

sasikala-ops-marathipizza

स्रोत

जयललिता यांच्या निधनामुळे अगदी नाजूक परिस्थिती तामिळनाडू राज्यात उद्भवली होती. त्याच वळेस जर शशिकला यांना मुख्यमंत्री केले असते तर तामिळनाडूच्या जनतेचा रोष ओढवून घ्यावा लागला असता आणि परिस्थिती हाताबाबेर गेली असती. तसेच पक्ष फुटण्याची भीती होती. म्हणून अनुभवी पन्नीरसेल्वम यांना पुढे करून परिस्थिती निवळण्याची वाट पहिली गेली आणि आता वातावरण शांत असताना शशिकला यांना मुख्यमंत्री बनवण्याचा घाट घातला जातोय. अर्थातच शशिकला गटाने त्यांना विरोध करू शकतात अश्या बंडखोरांना देखील आपल्या बाजूने केलेच आहे. कदाचित हे सर्व पूर्ण नियोजीतही असेल आणि पन्नीरसेल्वम यांना पुढे करून हा खेळ खेळला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पण खेळाला अधिक रंग तेव्हा चढला जेव्हा पन्नीरसेल्वम यांनी देखील लढण्याची तयारी दाखवली. आपल्याला जबरदस्तीने मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होण्यास भाग पडले असा दावा करीत त्यांनी खळबळ उडवून दिली आणि शशिकला यांच्यावर पलटवार केला. सोबतच मध्यंतरी उगवलेले जल्लीकट्टू प्रकरण देखील पन्नीरसेल्वम यांनी शिताफीने हाताळले, जनतेच्या मागणीसोबत ते या खेळाच्या समर्थनार्थ उभे राहिले. त्याचा फायदा असा झाला की त्यांनी जनतेचा विश्वास बऱ्यापैकी संपादन केला, त्यामुळे सध्या त्यांच्या लहानग्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत या प्रकरणाने मोठा वाटा उचलला आहे. त्याचा परिणाम असा झाला की तामिळनाडूच्या बहुतांश जनतेला पन्नीरसेल्वम यांनीच मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळावा असे वाटत आहे. याउलट जल्लीकट्टू प्रकरणाचा फायदा शशिकला यांना मात्र करून घेता आला नाही.

(वाचा: जल्लीकट्टू विरोध : भूतदया की स्थानिक पशु-धन विरुद्ध आंतरराष्ट्रीय षडयंत्र?)

sasikala-ops-marathipizza01

स्रोत

शशिकला यांच्याकडे राजकारणाचा अनुभव देखील फार कमी आहे. त्यांना आपल्या कारकिर्दीमध्ये मोठी कामे करता आलेली नाहीत. त्यामुळे साहजिकच पन्नीरसेल्वम यांचा पगडा येथे भारी आहे. पण शशिकला यांच्याकडे जरी जनतेचा पाठींबा नसला तरी त्यांच्याकडे आहे आहे पक्षाचा सपोर्ट…जो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मुख्यमंत्री जनता निवडत नसते. मुख्यमंत्री निवडला जातो विधानसभेतील त्या लोक प्रतिनिधींकडून ज्यांना जनता निवडून देते. आणि सध्याच गणित असं आहे की सरकार स्थापन करण्यासाठी शशिकला यांच्याकडे सर्वात जास्त आमदार आहेत.

शेवटी हा सत्तेचा खेळ आहे. इथे कधी कोणता चमत्कार घडेल हे साक्षात देवालाही सांगता येणार नाही. चार भिंतींच्या आत घेतल्या गेलेल्या एका निर्णयाने दिसत असलेलं समीकरण झटक्यात बदलू शकतं. त्यामुळे येणाऱ्या काळात तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे अगदी ठामपणे सांगता येणार नाही. येणारा काळच त्याचं उत्तर उलगडू शकतो. तोवर या संगीत खुर्चीच्या खेळाचा आस्वाद घेत निकालाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?