या १२ सेलिब्रिटीजचा दयनीय शेवट: जीवन कधीही कोणतंही वळण घेतं, याचा पुरावाच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
बॉलिवूड, चित्रपट सृष्टी हे खरोखरंच एक मायाजाल आहे. इथल्या झगमगाटाची प्रत्येकाला भुरळ पडते. तो नुसता झगमगाट नसतो तर ग्लॅमर, पैसा, प्रसिद्धी ह्याचं आकर्षण असतं.
काहीजण स्वतःचं करिअर हिरो किंवा हिरोईन म्हणून करायचं या वेडापायी बॉलीवूडमध्ये येतात. जे मेहनती, यशस्वी आणि नशीबवान असतात ते शेवटपर्यंत टिकून राहतात.
मात्र काहीजण प्रसिद्धीमुळे, मिळालेल्या पैशामुळे हुरळून जातात. व्यसनांच्या गर्तेत अडकतात. गँबलींग करायचं वेड लागतं आणि सगळं काही गमावून बसतात.
आयुष्याच्या शेवटी मग या लोकांकडे काहीच शिल्लक नसतं, कोणे एके काळी नाव कमावलेली ही माणसं नंतर मात्र कफल्लक होऊन एकाकी जीवन जगतात आणि जग सोडून जातात.
असेच काही बॉलीवूड सेलिब्रिटी जे शेवटी हलाखीचे जीवन जगले त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…
१. परवीन बाबी:
७०-८० चा दशकातील बॉलिवूडचा सर्वात ग्लॅमरस चेहरा म्हणजे परवीन बाबी. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर देखील तिचं नाव जोडलं गेलं. मॉडर्न लूक मुळे प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री तिला झालेल्या आजारामुळे एकाकी पडली.
ड्रग्स आणि दारूच्या आहारी गेली. किडनीच्या आजाराने त्रस्त झाली आणि तिचा तिच्या राहत्या घरी संशयास्पदरित्या मृत्यू झाला.
ती गेली हे जवळजवळ तीन दिवसांनी माहीत झालं.
२. मीना कुमारी:
पन्नास-साठच्या दशकातील ही अभिनेत्री. ‘ट्रॅजेडी क्वीन’ या नावाने बॉलिवूडला माहीत असलेली. सोज्वळ आणि सोशिक भूमिका तिने केल्या. वयाच्या चौथ्या वर्षापासून बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आली.
पुढे भारत भूषण, राजेंद्र कुमार, दिलीप कुमार, अशोक कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर प्रमुख भूमिका केल्या. कमाल अमरोही या प्रसिद्ध दिग्दर्शकाची बायको.
मात्र तिच्या खऱ्या आयुष्यातही तिच्या सिनेमातील भूमिकांप्रमाणेच ट्रॅजेडीच होती. तिचे विवाह अपयशी ठरले आणि ती एकटी पडली, दारूच्या आहारी गेली.
सिनेमातून काम मिळणेही बंद झाले. ती गेली तेव्हा हॉस्पिटलचे बिल देण्याचे पैसेही तिच्याजवळ नव्हते.
३. अचला सचदेव:
१९२० साली जन्म झालेल्या या अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून सिनेमात काम केले. नंतर पुढे चरित्र अभिनेत्री म्हणूनही काम केले. बऱ्याच सिनेमांमधून ती आईची भूमिका निभावताना दिसली.
तिचा गाजलेला सिनेमा म्हणजे ‘ वक्त’. मात्र तिच्या शेवटच्या दिवसात ती एकटी होती. पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये तिचा एकाकी अंत झाला.
४. विमी:
बी.आर. चोप्रा यांच्या यांच्या ‘ हमराज’ या सिनेमातून या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात केली.
‘ए नीले गगन के तले, धरती का प्यार पले’ हे तिच्यावर चित्रित झालेलं गाणं लोकप्रिय झालं होतं. पण तरुण वयातच तिचा मृत्यू झाला.
ती जेव्हा गेली तेव्हा तिच्याकडे ही काहीच पैसे नव्हते अगदी तिचा मृतदेह देखील क्रियाकर्म करण्यासाठी रिक्षातून न्यावा लागला.
५. ए के हंगल:
चरित्र अभिनेत्याच्या भूमिका ए.के. हंगल यांनी केल्या. अनेक प्रसिद्ध सिनेमांमधून ते लोकांसमोर आले. शोले सिनेमामध्ये अत्यंत छोटी भूमिका त्यांच्या वाट्याला आली, पण ती अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
या अभिनेत्याच्या आयुष्याचा शेवट देखील असाच शोकनीय झाला.
आयुष्यात पैशाची चणचण निर्माण झाली आणि अत्यंत हलाखीच्या आणि कफल्लक अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. “इतना सन्नाटा क्यूँ है भाई” हा त्यांचा शोले मधील डायलॉग त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्याच बाबतीत खरा ठरला.
औषधोपचारांसाठीही पैसे नाहीत अशा अवस्थेत त्यांचा करुण अंत झाला.
६. भारतभूषण:
हिंदी चित्रपट सृष्टीतील स्टारडम ज्याच्या पासून सुरु झालं असं म्हटलं जातं, तो पहिला कलाकार म्हणजे भारत भूषण. याने अनेक हिट चित्रपट दिले. त्यामुळे भरपूर यश आणि पैसे याच्या वाट्याला आले.
पण ते त्याला टिकवता आले नाही. या कलाकाराला नंतर रेसकोर्स, बेटिंग अशा गोष्टींचा नाद लागला, यातच पैसे गमावले. पुढे काम मिळणे पण दुरापास्त झाले.
नंतर इतकी हालाखीची परिस्थिती आली की एका चाळीत राहायची वेळ आली आणि कधी काळी प्रमुख भूमिका केलेला हा कलाकार एक्स्ट्रा कलाकार म्हणून छोट्या-मोठ्या भूमिका करू लागला.
असाच त्यांचा शेवट झाला.
७. भगवान दादा:
“भोली सुरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन छोटे” या गाण्याने प्रसिद्ध असलेले भगवानदादा. एखाद्या हिरोची प्रतिमा जशी असते तशी भगवान दादांची बिलकूल नव्हती.
बटबटीत डोळे, स्थूल देहयष्टी आणि कमी उंची अशी एकूण त्यांची मूर्ती होती. मात्र लेखक, दिग्दर्शक आणि हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांचे सिनेमे खूप चालायचे त्यांनी भरपूर पैसेही कमावले.
अगदी मुंबईत जुहुला २५ खोल्यांचा त्यांचा बंगला होता. मोठ्या सात-आठ कार्स यांच्या बंगल्यासमोर उभ्या असायच्या. परंतु नंतर एकापाठोपाठ एक त्यांचे सिनेमे फ्लॉप होत गेले आणि ते कर्जबाजारी झाले.
घर आणि गाड्या त्यांना विकाव्या लागल्या, लोक त्यांना टाळू लागले. मात्र दिलीप कुमार, सुनील दत्त, ओम प्रकाश, जॉनी लिव्हर त्यांना भेटायला जायचे.
परंतु त्यांनी कोणाकडून मदत घेतली नाही. नंतर त्यांनाही त्यांच्या आयुष्याचा शेवट एका चाळीतच करावा लागला.
८. नलिनी जयवंत:
जुन्या काळातील एक ग्लॅमरस चेहरा. १९४०-५० च्या दशकात या अभिनेत्रीने आपल्या अदांनी आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ केले. कालापानी, राही, शिकस्त असे अनेक गाजलेले सिनेमे तिच्या नावावर आहेत.
परंतु दुसऱ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने स्वतःला लोकांपासून अलिप्त केले अत्यंत एकाकी जीवन नंतर तिने व्यतीत केले तिचा मृत्युही अत्यंत कफल्लक अवस्थेत झाला.
९. महेश आनंद:
नव्वदच्या दशकातील खलनायकी चेहरा म्हणून महेश आनंद बऱ्याच जणांना आठवत असतील. शहेनशहा, मजबूर, ठाणेदार, गंगा जमुना सरस्वती हे त्यांनी भूमिका केलेले काही चित्रपट.
परंतु अचानक त्यांच्याही बाबतीत असंच काहीतरी झालं आणि त्यांना हिंदी सिनेमांमध्ये काम मिळेनाशी झाली अत्यंत कफल्लक अवस्थेत ते दहा वर्षे राहिले.
पैशांची गरज म्हणून पेहलाज निहलानी यांच्या ‘रंगीला राजा’ या सिनेमात एक छोटीशी भूमिका केली, पण नंतर त्यांचा मृत्यू झाला.
१०. सिताराम पांचाळ:
पिपली लाईव्ह, स्लमडॉग मिलेनियर अशा सिनेमांमधून काम केलेले सिताराम पांचाळ यांनाही कॅन्सर झाल्यामुळे पुढे सिनेमात कामं मिळालीच नाहीत.
आणि कॅन्सरच्या उपचारांसाठीही पैसे नाही अशा अवस्थेतच त्यांचा अंत झाला.
११. श्रीवल्लभ व्यास:
लगानमध्ये ईश्वरकाकांची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याला सिनेमाचं शूटिंग करताना ब्रेन स्ट्रोकआणि पॅरालिटिक अटॅक आला.
नंतर त्यावर उपचार करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
१२. रामी रेड्डी:
नव्वदच्या दशकातील हा अजून एक खलनायकाची भूमिका करणारा कलाकार. जवळपास २५० चित्रपटातून त्याने काम केले. पुढे दारूच्या आहारी गेल्याने त्याला लिव्हरचा त्रास झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
जेव्हा तो गेला त्यावेळेस तो ओळखूही येत नव्हता, इतका तो अशक्त झाला होता.
यासोबतच निशा नूर ही दाक्षिणात्य अभिनेत्री, गव्हीन पकर्ड हा खलनायकाचे काम करणारा ऐंशीच्या दशकातील कलाकार, कक्कू मोरी ही अँग्लो-इंडियन डान्सर या कलाकारांचे अखेरचे दिवस हे हलाखीत आणि दुनियेने दखल न घेता गेले.
आताही आपण पाहतो की या क्षेत्रात असणारी तीव्र स्पर्धा अनुभवून, त्याचा ताण सहन न होऊन काही काही कलाकार आपलं जीवन संपवतात.
बॉलिवूडमधील हे सेलिब्रिटी कधीकाळी प्रसिद्धीच्या झोतात होते, मात्र मिळणारं यश टिकून ठेवू शकले नाहीत.
काही जणांच्या डोक्यात यशाची हवा गेली तर काही जणांना नशिबाने साथ दिली नाही आणि शोकात्मकरित्या यांचा आणि यांच्या कारकिर्दीचा अंत झाला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
this might have wrong news but bad thing these are true news