भारत सरकारने हे बेट अनधिकृत म्हणून का घोषित केलं? जाणून घ्या या बेटाची चित्तथरारक कहाणी…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
तुम्ही ‘गॉड मस्ट बी क्रेझी’ नावाचा सिनेमा पाहिला आहे का? त्यात असलेला आदिवासी आणि त्याची छोटी मुलं पाहिलीत का? ते किती निरागस आणि पापभिरू दाखवले आहेत, पण सगळेच आदिवासी तसे नसतात.

या पृथ्वीतलावर अजूनही असे काही भाग आहेत की जिकडे आधुनिक जगाचा काहीच संपर्क नाही, तिथे असलेले आदिवासी अजूनही तसंच आदिम जीवन जगतात. आपल्या भारतातही असा भाग आहे असं म्हटलं तर कदाचित तुमचा त्यावर विश्वास नाही बसणार!
पण भारतात अंदमानात अशी काही बेटं आहेत ज्यामध्ये आदिवासी राहतात आणि त्यांचा आधुनिक जगाशी काहीच संबंध नाही. आपल्याला अंदमान माहीत आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगलेल्या काळ्यापाण्याच्या शिक्षेमुळे.

आणि सध्याच्या काळात म्हणाल तर एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून आपण अंदमानकडे पाहतो.
जगभरातले लोक अंदमानकडे आकृष्ट होतात ते तिथले निसर्गसौंदर्य आणि आदिवासींचे जीवनमान पाहण्यासाठी. भारत सरकारचेही तिथे पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरीही काही बेटांवर जाण्यासाठी आजही बंदी आहे.

किंवा परवानगी असली तरी अगदी सुरक्षारक्षकांच्या देखरेखीखाली एखाद्या मर्यादित अंतरापर्यंत जाता येते. आणि तिथले आदिवासी कसे दिसतात, कसे राहतात हे पाहण्यासाठी पाश्चात्त्य जगातील काही लोक उत्साहाने तिकडे जातात.
लोकांना या आदिवासी लोकांचं फार कुतूहल आहे. हे आदिवासी अगदीच आदिम काळात असल्यासारखे राहतात म्हणजे झाडावेलींची वल्कलं, पानाफुलांची वल्कलं आपल्या शरीराभोवती गुंडाळून ,अंगभर चित्रविचित्र रंगाच्या रेघोट्या मारून फिरताना हे क्वचितच दिसतात.

त्यासाठीच खरंतर पाश्चात्त्य लोक तिकडे जातात आणि तिथे शूटिंग करणे फोटो काढण्यासारखे प्रकार चालू करतात. पण या सगळ्याची त्या आदिवासींना सवय नसल्यामुळे ते लोक ह्या पर्यटकांच्या अंगावर शत्रू समजून येतात आणि बऱ्याचदा या पर्यटकांना संपवून टाकतात.
अशीच एक घटना २०१८ साली घडली. अमेरिकेतून आलेल्या चाऊ नावाच्या पर्यटकाला या सेंटेनियल आदिवासींनी मारून टाकलं. खरंतर या बेटावर प्रवेश करणं निषिद्ध आहे तरी तिकडे माहिती काढण्यासाठी चाऊला जायचे होते.
तो एक ब्लॉगर होता. त्याला त्याच्या ब्लॉग वर या लोकांची सगळी माहिती लिहायची होती. काहीजण म्हणतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी त्याला तिकडे जायचं होतं.
तिकडे जाण्यासाठी कोणताही वैध मार्ग नसल्याने त्याने मच्छीमारांना तिकडे घेऊन जाण्याबद्दल विचारलं. त्याला तिकडे नेण्यास मच्छीमारांनी नकार दिला आणि सांगितलं की तिकडे जाणे योग्य नाही, आम्ही तुला तिकडे घेऊन जाऊ शकत नाही.

तरी त्याने जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून एका मच्छीमाराला तयार केलं, आणि तो तिकडे गेला.
तो तसा पूर्वीही पाच वेळा तिकडे जाऊन आला होता. पण ह्या वेळेस तिकडे नक्की काय झालं हे मात्र कळलं नाही आणि त्याचं प्रेतंच दोन दिवसांनी पहायला मिळालं. आणि या गोष्टीचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले.
अमेरिकन सरकारचं म्हणणं होतं की भारताने तिकडे नीटशी सुरक्षा व्यवस्था ठेवलेली नाहीये आणि तिकडे जाणारे पर्यटक अत्यंत धोक्याच्या परिस्थितीत प्रवास करतात.
भारत सरकारचं म्हणणं होतं, की पर्यटकांना सांगूनही ते ऐकत नाहीत. पण या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी झाली.

वाढत्या पर्यटनाला याचा फटका बसू शकतो हे ओळखून आणि पुढे अशा घटना घडू नयेत म्हणून भारत सरकारने हे बेटच अनधिकृत आहे असं घोषित केलं.
म्हणून आता कुठलेही पर्यटक आले आणि त्यांनी तिकडे जायचं धाडस केलंच आणि काही दुर्घटना घडली तर भारत सरकार त्याला जबाबदार असणार नाही. आणि आता तिथली सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.

अंदमानातल्या बेटांवर साधारणपणे चार आदिवासी जमाती आहेत अंदमानी, जरावा, ओंगी आणि सेंटेनियल. ज्या संपूर्ण जगापासून अलिप्त आहेत. इंग्रज जेव्हा अंदमानात गेले तेव्हा त्यांनी तिथल्या लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
काही लोकांना त्यांनी नारळ, केळी आणि काही खाद्यपदार्थ, भेटवस्तू देऊन त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. त्यातल्या अंदमानी, जरावा, ओंगि या आदिम जाती थोडाफार माणसात आल्या.
तिकडे ख्रिश्चन धर्माचा प्रसार ब्रिटिश मंडळींनी केला पण सेंटेनियल मात्र अजूनही आत्ताच्या जगाशी संपर्क साधू इच्छित नाहीत ते त्यांच्याच विश्वात आहेत.
हे सेंटनियल आदिवासी जवळजवळ ६०००० हजार वर्षांपासून त्या बेटावर राहतात. त्यांच खाणं म्हणजे शिकार आणि मासेमारी.

डुकराचे मांस, मासे, कच्चे फळं, कंदमुळं हे त्यांचं खाद्य, त्यांना अजूनही शेती ,आग या गोष्टी माहीत नाहीत. भारत सरकारने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला!
१९६७ पासून हे प्रयत्न सुरू होते. त्यांचा वंश कोणता आणि मानवशास्त्राच्या दृष्टिकोनातून या लोकांचा अभ्यास करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले, पण या लोकांनी याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
परदेशी लोकांना, बीबीसी, डिस्कवरी अशा चॅनेलवर या आदिवासींवर डॉक्युमेंटरी बनवायची असते त्यासाठी पण हे परदेशी लोक तिकडे जातात आणि काही माहिती मिळते का हे पाहतात. पण सेंटेनियल लोक मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे दाद देत नाहीत.

उलट तिकडे जाणाऱ्या लोकांवर त्यांनी हल्ले मात्र केलेत. त्याचं शस्त्र म्हणजे त्यांच्याकडे असलेले तीरकामठे. जवळ जाणाऱ्या लोकांवर ते तीरकामठे यांनी मारा करतात. शेवटी १९९१ नंतर भारत सरकारने हे प्रयत्न थांबवले.
बेटावर साधारणतः तीनशे लोक असतील चार-पाच लोक एकत्र राहतात त्यांच्यात एवढेच कुटुंब असावं, पण बेटाच्या आसपास कोण आलं तर मात्र हे सगळे एकत्र येतात आणि येणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करतात. चुकून गेलेल्या दोन मच्छिमारांनाही त्यांनी ठार मारलं आहे.
२००४ साली आलेल्या त्सुनामी नंतर तिथली परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी हवाई पाहणी केली गेली. आणि त्या आदिवासींसाठी काही खाद्यपदार्थांचे पाकीटे तिकडे टाकण्यात आली. पण या लोकांनी तिकडे गेलेल्या हेलिकॉप्टर्सवरही बाणांचा वर्षाव केला.

त्सुनामीने या बेटाचं खूपंच नुकसान केले आहे. या सेंटेनियल लोकांनाही त्याचा फटका बसलाय. आता या लोकांची संख्या खूप कमी झाली असे म्हटले जाते. घनदाट जंगलामुळे एकूण किती लोक तिकडे राहतात हे कळत नाही.
२०११ च्या जनगणने नंतर फार फार तर पंधराच लोक शिल्लक आहेत असं म्हटलं जातं, पण खरी परिस्थिती अजूनही माहीत नाही.
एक तर या लोकांना कुठल्याही प्रकारचे मेडिकेशन मिळत नाही आणि नाही कोणत्या सोयी सुविधा. आणि जगापासून तुटलेलं असल्यामुळे त्यांची भाषा पण कोणालाच कळत नाही.

म्हणजे एकूण काय त्यांना त्या बेटावर फक्त त्यांचचं राज्य हवे आहे. आधुनिक जगाची ढवळाढवळ नको आहे.
म्हणून काही जणांना वाटतं की ते जसे जगत आहेत तसे त्यांना जगू द्यावं. ते आपल्याला जर त्रास देत नसतील तर त्यांना आपण का त्रास द्यायचा?
आणि जर ते इतर मानवांच्या संपर्कात आले तर कदाचित जगू पण शकणार नाहीत कारण त्यांना इथलं हवामान, आजार (अगदी सर्दी खोकला पण) सहनच होणार नाहीत कारण त्यांची इम्युनिटी सिस्टीम अजूनही आदिम काळातलीचं आहे.
काय अद्भुत आहे ना पृथ्वीवरचं जग! पृथ्वीवर काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी माणूस गेला नाही.
आणि अशी पण जागा की जिथे माणसं आहेत पण मानवजातीशी त्यांचा संबंध नाही. आता अशा बेटावर वैध किंवा अवैध पद्धतीने जाता येणार नाही हे मात्र खरं!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.