' मराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले! – InMarathi

मराठ्यांनी पानिपत गमावले पण शत्रूलाही लाजवेल असे शौर्य गाजवले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – विशाल दळवी

३ मार्च १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मराठ्यांना उत्तरेमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी चालून आली. १७५० च्या दशकामध्ये मराठ्यांनी उत्तरेकडील भागात अनेक मोहिमा पार पाडल्या. त्यांनी थेट ‘अटके’पार मराठा साम्राज्य वाढविले.

थोरले बाजीरावांची कारकीर्द संपेपर्यंत मराठ्यांनी एव्हाना भारतीय सीमा ओलांडत त्या पलीकडील इस्लामी राजवटींना देखील आव्हान देण्यास सुरुवात केली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे पाहून मराठ्यांचा वेळीच बिमोड करणे गरजेचे आहे असे या राजवटींना वाटू लागले. १७५८ साली दिल्ली काबीज करत मराठ्यांनी अप्रत्यक्षरित्या अखंड भारत आपल्या कवेत घेतला. पंजाब आणि आसपासच्या प्रांताचा कारभार सांभाळणाऱ्या तिमूर शहा दुराणी याला देखील मराठ्यांनी पळवून लावले. हा तिमूरशहा दुराणी म्हणजे अहमदशहा अब्दालीचा थोरला पुत्र होय.

 

Temur-Shah duranni InMarathi

ही घटना म्हणजे मुस्लीम धर्मावरील संकट मानून चवताळलेल्या अब्दालीने आपल्या १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील प्रांतांवर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. अब्दालीचे हे हल्ले म्हणजे त्याने सरळ सरळ मराठ्यांशी वैर पत्करल्याची ग्वाही देत होते. दिवसागणिक अहमदशहा अब्दालीचा उपद्रव वाढत चालला होता.

 

याला वेळीच आवर घालावा लागेल अन्यथा उत्तरेतील साम्राज्य हातून जाईल हा विचार करून १ लाखाहून अधिकची फौज घेऊन सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पानिपताच्या दिशेने कूच केले.

या फौजेला वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले,  राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट येऊन मिळाल्याने मराठ्यांची ताकद शंभर पटींनी वाढली.

या युतीने सर्वप्रथम दिल्लीवर आक्रमण केले. विश्वासरावांना दिल्लीच्या गादीवर बसवण्याचा भाऊंचा इरादा होता. पुरेशी रसद नसल्यामुळे त्यांनी दिल्ली लुटायचा आदेश दिला आणि येथे अघटीत घडले. जाट आणि शिखांनी भाऊंचा हा देश अमान्य करीत आपले सैन्य माघारी फिरवले. बरेच जण पानिपताच्या संपूर्ण नाट्यामधील ही घटना निर्णायक मानतात.

 

Panipat-marathipiza01

 

अब्दाली आणि मराठ्यांमध्ये बारीक सारीक लढाया सुरु होत्या. कुंजपुराच्या चकमकीमध्ये मराठ्यांनी अब्दालीची बरीच सेना कापून काढली आणि उर्वरित सेनेला बंदी म्हणून ताब्यात घेतले. यामुळे चिडलेल्या अब्दालीने बाघपत येथून यमुना ओलांडली. अब्दालीने यमुना ओलंडताच मराठ्यांनी आपला तळ पानिपत येथे टाकला.

पानिपत आणि सोनपत मधील संबलका येथे अब्दाली पोचताच मराठ्यांनी त्वेषाने अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविला पण इतक्यात अब्दालीची उर्वरित सेना दाखल झाली आणि मराठ्यांची ताकद कमी पडली. दोन्ही बाजूचे असंख्य सैन्य मारले गेले. या छोट्याश्या लढाईमध्ये अब्दालीला मराठ्यांची आणि मराठ्यांना अब्दालीची कुवत कळली.

पण अब्दाली स्वस्थ बसणाऱ्यातला नव्हता. त्याने मुख्य मराठा सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणणाऱ्या गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर जबरदस्त हल्ला चढवला. या घटनेमुळे मराठ्यांचा रसद पुरवठा ठप्प झाला आणि मराठी सैन्याची उपासमार होऊ लागली.

 

3 war panipath 1 InMarathi

हे ही वाचा – जेव्हा मुठभर मराठे दहा हजारांच्या गनिमाला कापून काढतात…!

पुढे दोन महिने दोन्ही पक्ष एकमेकांवर हल्ले करतच होते. पण अजूनही मोठ्या युद्धाला सुरुवात झाली नव्हती. दिवस सरत होते आणि मराठी सैन्यासही अन्न अपुरे पडू लागले. यावर उपाय म्हणून मराठ्यांनी स्थानिकांवर हल्ले करण्यास आणि लुटमार करण्यास सुरुवात केली. या पवित्र्यामुळे स्थानिकांचा मराठी फौजांवरचा रोष वाढीस लागला.

इतक्या वेळ स्वस्थ बसलेल्या भाऊंनी अखेर स्वतःहून पहिले पाऊल उचलले. अन्नसाठा देखील जवळपास संपला होता. आता युद्ध करण्यावाचून पर्याय नव्हता. १४ जानेवारी १७६१ रोजी मराठ्यांनी युद्धाचे रणशिंग फुंकले आणि पानिपतच्या तिसऱ्या लढाईला सुरुवात झाली. मराठ्यांतर्फे प्रथम चालून गेला इब्राहीम खान!

 

Ibrahim khan InMarathi

 

त्याने मराठ्यांच्या साथीने अफगाण आणि रोहिल्यांना सळो की पळो करून सोडले. भाऊंनी मध्यातून हल्ला चढविला. अफगाण गांगरल्याचे पाहून मराठ्यांच्या घोडदळाने जास्त वाट न बघता जोरदार आक्रमण केले. परंतु भुकेले उपाशी घोडे रणांगणामध्ये भिडण्यास सज्ज नव्हते. त्यांनी हाय खाल्ली.

बहुतेक घोडे अफगाणी सैन्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच कोसळले. ही चाल जरी अयशस्वी झाली असली तरी मराठे रणांगणावर अजूनही वर्चस्व राखून होते. त्यांनी अब्दालीची सेना पार धुळीला मिळवली होती.

 

Panipat-marathipiza02

 

येथवर सर्व ठीक होते. असेच सुरु राहिले असते तर मराठ्यांनी पानिपतामध्ये विजय देखील संपादन केला होता, पण या क्षणी अब्दालीने त्याचे १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा या स्वरुपाची राखीव सेना बाहेर काढली आणि मराठ्यांवर सर्वशक्तीनिशी हल्ला केला.

अब्दालीच्या या एका चालीमुळे दृष्टीक्षेपात असलेला मराठ्यांचा विजय पराभवात बदलला. थकल्या भागलेल्या मराठी सैन्याला नव्या दमाच्या अफगाणी सैन्याचा प्रतिकार करताना अडचण येऊ लागली. मराठे कधी नव्हे ते मागे हटू लागले. कुंजपुरामध्ये मराठ्यांनी बंदी बनवलेल्या अफगाण्यांनी याच  निर्णायक क्षणी उठाव केला. मराठे पुरते गोंधळात पडले.

ही गोंधळाची परिस्थिती हाताळण्यासाठी भाऊंनी आपली राखीव सेना पुढे न आणण्याची चूक केली आणि ते स्वत: हत्तीवरून उतरून अफगाण्यांना कापू लागले. लढणाऱ्या मराठी सैन्याच्या हे लक्षात आले नाही. त्यांची हत्तीकडे नजर जाताच त्यावर भाऊ न दिसल्याने त्यांना वाटले की सदाशिव भाऊ पडले.

 

Sadashivrao-Bhaus-InMarathi

 

भाऊ पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. मराठ्यांनी आशा सोडली. अफगाण सैन्याच्या गर्दीत लढताना भाऊंना शेवटचे नाना फडणीस यांनी पाहिले होते. याच दरम्यान विश्वासराव देखील गोळी लागून धारातीर्थी पडले. आपला पराभव झाला असे समजून अर्ध्याअधिक मराठी सैन्याने माघार घेतली. तर काही तुकड्या अजूनही निकराने लढत होत्या.

पण जसजशी रात्र झाली तसतसे ह्या तुकड्या देखील शत्रूपासून दूर गेल्या. अब्दाली जिंकला आणि मराठ्यांचे पानिपत झाले. पानिपतच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या युद्धात अगणित मराठ्यांना वीरमरण आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे अशी मातब्बर मंडळी या युद्धात मराठ्यांनी गमावली.

जणू मराठ्यांची कर्तबगार पिढी संपुष्टात आली आणि यानंतर मराठा साम्राज्य पुन्हा कधीही उभे राहू शकले नाही.

यानंतर गादीवर आलेल्या माधवराव पेशव्यांनी अपार कर्तुत्व दाखवत पानिपताचा कलंक पुसण्याचा प्रयत्न केला खरा परंतु त्यांना देखील अल्पायुष्य लाभल्याने मराठी साम्राज्याची पताका खाली आली.

मुघल सत्तातर आधीच खिळखिळी झाली होती आणि आता तर एकमेव मराठे साम्राज्य देखील घायाळ वाघाप्रमाणे निपचित पडून असल्याचे पाहून इंग्रजांनी आपला डाव साधला आणि भारतात आपले पाय रोवले.

 

Panipat-marathipiza03

स्रोत

असे हे पानिपतचे तिसरे युद्ध घडले आणि १४ जानेवारीचा हा दिवस मराठी इतिहासात काळ्याकुट्ट आठवणी सोडून गेला. पानिपतची लढाई ही मराठा इतिहासातील सर्वात जास्त चर्चिली गेलेली आणि लक्षात ठेवली गेलेली लढाई आहे.

पानिपतामध्ये जरी मराठ्यांना भगवा फडकावता आला नाही आणि तेथे त्यांचा दारुण पराभव झाला हे जरी खरे असले तरी त्यामुळे मराठा सैन्याचे शौर्य कमी लेखता येत नाही.

खुद्द अहमद अब्दालीनेच या युद्धाबाबत लिहून ठेवले आहे,

दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदरासारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य!

मराठा सैन्याने आपल्या मातीपासून १२००-१४०० किमी दूर अंतरावर जाऊन परकीयांविरोधात तेवढाच निकराने लढा दिला जेवढा त्यांनी इतर लढायांमध्ये दिला होता. पानिपताच्या रणांगणावर जर मराठा झेंडा रोवला गेला असता तर पुढचा इतिहास मराठा साम्राज्यासाठी किती गौरवशाली असता हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.

 

3 war panipath 3 InMarathi

लेखक अर्नाल्ड फ्लेचर हे त्यांच्या “अफगाणिस्तान हायवे ऑफ कॉनक्वेस्ट” या पुस्तकात म्हणतात,

पानिपतचे युद्ध हे इतिहासाला कलाटणी देणारे निर्णायक युद्ध होते. काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानवर एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता. त्यामुळे नंतर ब्रिटिशांना भारत विजय अशक्य झाला असता.

परंतु जणू कुठेतरी प्रयत्न अपुरे पडले आणि नशीबही! पण या पानिपताच्या युद्धामुळे एक गोष्ट मात्र चांगली घडली ती म्हणजे अहमदशाह अब्दालीला देखील मराठा साम्राज्याविरोधात जाणे चांगलेच महाग पडले होते, त्यामुळे पुन्हा कधीही अब्दालीने किंवा वायव्येकडील कोणत्याही साम्राज्याने भारतावर आक्रमण केले नाही.

म्हणजे मराठी जरी पानिपतामध्ये हरले असले तरी त्यांनी मरता मरता जे शौर्य दाखवले त्याचे चीज झाले असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

 

Panipat-marathipiza

स्रोत

गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात,

कौरव – पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती!

तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती!!

मराठ्यांच्या हिंमतीला एवढीच दाद देऊन चालणार नाही कारण युद्ध हरल्यावर बरचसे सैन्य जरी माघारी परतले असले तरी त्याहूनही जास्त सैन्य पानिपतामध्येच राहिले आणि आज पानिपत त्यांची कर्मभूमी झाली आहे. त्यांच्या वंशजांना रोड मराठा म्हणून ओळखले जाते.

आज २५० वर्षानंतरही ज्या भूमीत त्यांच्या पूर्वजांनी गुडघे टेकले त्याच भूमीत हे रोड मराठा समाजाचे आपले बांधव मराठी झेंडा अभिमानाने रोवून आपली छाप पाडत आहेत आणि आजही पानिपतातील मराठी सैन्याच्या पराक्रमाची ज्योत तेवत ठेवून आहेत.

हे ही  वाचा : मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज !

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 36 posts and counting.See all posts by vishal

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?