' या धाडसी “काकोरी-कांड”मुळे इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते! – InMarathi

या धाडसी “काकोरी-कांड”मुळे इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

=== 

आता भारतीयांची सहनशक्ती संपत आली होती. ब्रिटिशांचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालला होता! तरुण रक्त सळसळत होते, आता नाही तर मग कधी?

स्वातंत्र्य हवंय तर हाती शस्त्र घेणे हा एकच उपाय समोर दिसत होता, पण त्यासाठी भांडवल कुठून उभारणार? असे एक नाही तर अनेक प्रश्न त्यांना भेडसावत होते आणि ह्या प्रश्नातून जन्माला आले ‘काकोरी कांड’.

झाडाला कमकुवत करायचे असेल तर मुळावर घाव घालायला हवा इतकं साधं आणि अचूक लॉजिक होतं त्यामागे. ही योजना यशस्वी झाली तर दुहेरी फायदा होणार होता.

आपली शक्ती वाढणार होती आणि शत्रूला जबर धक्का बसणार होता, ही योजना काही अंशी यशस्वी झालीही मात्र शत्रूने डाव साधलाच. केवळ एका दरोड्यासाठी तिघांना फाशी सारखी टोकाची शिक्षा देण्यात आली. आपल्या देशासाठी ते तिघे हसत हसत फासावर चढले.

 

kakaori kand inmarathi

 

होय, हा तोच काकोरीचा दरोडा, ज्यामुळे ब्रिटिश हादरले होते. ह्याचा एवढा खोल परिणाम झाला की, केवळ ट्रेन लुटली म्हणून भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांना फासावर लटकावले गेले…

तुम्ही रंग दे बसंती पहिला असेलच. आमिर खान म्हशीवर बसून म्हशींना ट्रेन लुटून बॉम्ब खरेदी करूया असे सांगत असतो. हा सीन विनोदी असला तरी प्रत्यक्ष दरोड्याचे प्लॅनिंग मात्र जबरदस्त होते, हे आपण पहिलेच आहे.

 

rang de basnti seen inmarathi

 

स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून काकोरी ट्रेनने जाणार्‍या खजिन्याची लूट ही एक महत्त्वपूर्ण घटना होती. हे ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध एक महत्त्वाचे आणि फार मोठे षडयंत्र होते.

परंतु ह्या घटनेत खजिना लुटताना एका प्रवाशाला गोळी लागली आणि हीच गोळी पुढे ब्रिटीशांच्या पथ्यावर पडली. दरोड्याची केस आता हत्येची केस झाली होती आणि त्याचा व्यवस्थित फायदा इंग्रजांनी घेतला.

आजपासून जवळपास ९५ वर्षांपूर्वी रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक-उल्ला-खान आणि रोशन सिंह यांना काकोरी कटात सामील असण्याबद्दल फाशीची शिक्षा देण्यात आली होती. ही गोष्ट आहे १९२५ सालची.

 

kakori kand 1 inmarathi

 

काकोरी कटात सामील होण्याच्या आरोपात जवळजवळ चाळीस लोकांना अटक करण्यात आली होती आणि जास्तीत जास्त लोकांना कैद करण्यात आलं होतं.

ह्या योजनेमागे मुख्य होते, रामप्रसाद बिस्मिल. त्यांच्या मते ब्रिटीशांशी लढायचे तर तेवढ्या प्रमाणात दारूगोळा असायला हवा होता आणि त्यासाठी लागणार होता पैसा.

 

Ram-prasad-bismil kakori inmarathi

 

म्हणून इंग्रजांनी आपल्याकडून लुटलेला पैसा आपणच लुटून परत घ्यायचा अशी योजना आखण्यात आली. ह्यातून आलेला पैसा हत्यारे खरेदी करण्यासाठी महत्त्वाचा होता आणि स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने देखील हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार होते होते.

रामप्रसाद बिस्मिल हे एक लेखक होते शिवाय त्यांनी देशभक्तीवर अनेक उत्तम शायरी आणि कविताही केलेल्या आहेत. बिस्मिल आजीमबादी ह्यांची “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है ज़ोर कितना बाजूएँ कातिल मे है” ही नितांत सुंदर आणि वीररसाने परिपूर्ण रचना त्यांनीच प्रकाशात आणली.

ते जास्त शिक्षण घेऊ शकले नाहीत. काही कौटुंबिक अडचणींमुळे त्यांना आठवी नंतर पुढे शिकता आले नसले तरी आपले लेखन त्यांनी सुरूच ठेवले. अशातच त्यांची मैत्री अशफाक-उल्ला-खान ह्यांच्याशी झाली.

 

ashfaq ullah khan inmarathi

 

अशफाक चे मोठे बंधु आपल्या धाकट्या भावाला नेहमी बिस्मिल हयांच्या शायरी रचना ऐकवत. अशफाक़ आणि बिस्मिल ह्या दोघांचेही स्वप्न एकच होते आणि ते म्हणजे स्वतंत्र भारत.

बिस्मिल हे सशस्त्र क्रांति मानणारे होते. असा एक सशस्त्र उठाव करण्याच्या हेतूने त्यांनी इतर क्रांतिकार्‍यांना सोबत घेऊन १९२४ साली हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन (HRA) ची स्थापना केली.

या असोसिएशन च्या माध्यमातूनच चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, सुखदेव, अशफाकुल्ला खान, राजगुरु, गोविंद प्रसाद, प्रेमकिशन खन्ना, भगवती चरण, ठाकुर रोशन सिंह आणि राय राम नारायण सारख्या इतर क्रांतिकारी मंडळींची आपसात ओळख झाली.

१९२२ मध्ये चौरीचौरा घटनेनंतर महात्मा गांधींनी असहयोग आंदोलन थांबवले तेव्हा अनेक तरुण परत आले. त्यात एक अशफाक होते. त्यावेळी त्यांना तीव्रतेने जाणवले की देश लवकरात लवकर स्वतंत्र व्हायला हवा असेल तर, त्यासाठी सशस्त्र क्रांतीची गरज आहे.

तत्क्षणी त्यांनी क्रांतिकारी बनण्याचा निर्णय घेतला. असोसिएशन स्थापन झाल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी भक्कम पाऊल तर उचलायला हवे होते त्यासाठी राजेंद्र लाहिड़ी, दुर्गा भगवतीचंद्र वोहरा, रोशन सिंह, सचिंद्र बख्शी, चंद्रशेखर आजाद, विष्णु शरण, केशव चक्रवर्ती, बनवारी लाल, मुकुंद लाल आणि मन्मथनाथ गुप्ता ह्यांच्यासारख्या माणसांची साथही लाभली होती.

 

asahkar Andolan inmarathi

 

मात्र ह्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून हा एक मोठा सावाल होता… आणि शेवटी ह्यावर असा तोडगा निघाला की इंग्रजांनी आपल्याचकडून लुटलेला पैसा आपण परत लुटायचा.

त्यासाठी १९२५ साली, शाहजहाँपुर वरुन लखनऊला जाणारी आठ नंबरची ब्रिटीशांचा पैसा वाहून नेणारी ट्रेन काकोरी येथे चेन खेचून लुटायची आणि पैशांची पेटी लुटून लखनौला पळून जायचे असे ठरले.

ही ट्रेन ब्रिटिश खजिन्याशी संबंधित एक मोठी पेटी घेऊन जात होती ज्यात तब्बल ८,०००/- रुपये होते. हीच ट्रेन लुटण्याचे कारण असे की हा पैसा सरकारचा होता.

या पैशांचा वापर क्रांतिकारकांनी देशहितासाठी म्हणजे स्वातंत्र्यासाठी करण्याचे ठरवले. ठरल्या प्रमाणे योजना नीट पार पडली खरी मात्र लुटीच्या झटापटीत एका प्रवाशाला गोळी लागली आणि दरोड्याचे प्रकरण आता हत्येच्या केसमध्ये बदलले.

ह्या घटनेने चवताळलेल्या इंग्रजांनी घटना घडल्यावर अनेकांना अटक करण्याचा धडाका लावला. जवळजवळ चाळीसेक जणांना त्यांनी कैद केले त्यापैकी पंधराएक जण पुराव्या अभावी निर्दोष मुक्त झाले.

अटक झालेल्या लोकांमध्ये स्वर्ण सिंह, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिड़ी, दुर्गा भगवती चंद्र वोहरा, रोशन सिंह, सचिंद्र बख्शी, चंद्रशेखर आजाद, विष्णु शरण डगमार्क, केशब चक्रवर्ती, बनवारी लाल, मुकुंद लाल आणि मन्मथनाथ गुप्ता ह्यांचा समावेश होता.

ह्यांच्यावर लूटमार आणि हत्या यांसोबतच अनेक गुन्ह्यांचे आरोप लावले गेले. असल्या घटना पुन्हा घडू नयेत हा धडा देण्याच्या दृष्टीने खटला चालवला गेला आणि स्वर्ण सिंह, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहिड़ी आणि रोशन सिंह ह्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.

यात रोशन सिंह ह्यांचा सहभाग नव्हता तरी त्यांना फाशी दिली गेली असे म्हणतात.

 

thakur roshan sigh inmarathi

 

पैकी अंतिम निर्णय झाल्यानंतर सर्वांना वेगवेगळ्या तुरुंगात पाठवले गेले आणि १९ डिसेंबर १९२७ रोजी बिस्मिल, अशफाक आणि रोशन सिंह ह्यांना फाशी देण्यात आली. या महान देशभक्तांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

 

asfaq-ulla-khan 1 inmarathi

 

वो जिस्म भी क्या जिस्म है जिसमे न हो ख़ून-ए-जुनून,

तूफ़ान से क्या लड़े जो कश्ती-ए-साहिल में है,

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,

देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है।

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?