' भारतीय लिबरल लोकांना रविश कुमार आवडण्यामागे ही आठ कारणे आहेत – InMarathi

भारतीय लिबरल लोकांना रविश कुमार आवडण्यामागे ही आठ कारणे आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतातील सर्वसामान्य,वंचित, शोषित घटकाचा हक्काचा आवाज वाटणारा सच्चा पत्रकार म्हणून रविश कुमार यांची जगभर ओळख आहे, यावर त्यांना मिळालेल्या रेमन मॅगसेसे पुरस्काराने शिक्कामोर्तब केला आहे.

भारतातील उदारमतवादी आणि शांतताप्रेमी लोकांना रविश हा आपलाच आवाज वाटतो, यामागची करणे नेमकी काय आहेत जाणून घेऊया.

१. शांतपणे बोलणे –

१९९६ पासून रविशने एनडीटीव्ही सोबत आपल्या पत्रकारितेच्या करिअरला सुरुवात केली. बिहारच्या एका छोट्या खेड्यातून दिल्लीसारख्या शहरात आलेल्या रविश सुरुवातीला थोडासा बुजरा होता.

रविश की रिपोर्ट हा त्याचा पहिला शो ज्यामध्ये तो दिल्लीच्या रस्त्यावरील काही ज्वलंत प्रश्न मांडत असे.

 

ravish inmarathi
AaoBihar – The Story of Bihar

रविशने उपस्थित केलेले प्रश्न आणि ते प्रश्न मांडण्याची त्यांची शैली खूप अनोखी आहे. अनेक टीव्ही चॅनेल्स वरून घसा कोरडा होईपर्यंत ओरडून ओरडून अँकरिंग करणारे पत्रकार आणि शांतपणे संयत भाषेत सामन्यांचा जगण्या-मारण्याच्या प्रश्नावर भाष्य करणारा आणि तरीही अनेकांचा हृदयापर्यंत पोचणारा आवाज म्हणूनही अनेकाना रविश आपला वाटतो.

रविशच्या आवाजात आवेश नसला तरी, त्याच्या काळजात मात्र एक अकृत्रिम कळकळ असते जी लोकांच्या भावनेला साद घालते.

इतर टीव्ही चॅनेल्सवर सहभगी वक्त्यांशी तावातावाने आवेशपूर्ण चर्चा सुरु असताना रविश कुमार मात्र प्रत्येकाला आपली मते मांडण्याची संधी देतो आणि विषयाची व्याप्ती कळेल अशा प्रकारे त्याची साधकबाधक मांडणी करतो.

२. अभ्यासू –

रविश कुमार हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक आयकॉन आहेत. आजच्या तरुणांना पत्रकारितेत करिअर करण्याची इच्छा आहे आणि विशेषतः ज्यांना प्रामाणिक पत्रकारिता करण्याची आस आहे त्यांच्यासाठी रविश कुमार एक आदर्श आहेत.

 

ravish arnab 6 inmarathi
YouTube

रविश कुमार यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांचा चहोबाजूंनी सखोल अभ्यास केला.

कोणत्याही विषयातील अभ्यास केल्याशिवाय त्यांनी कधी तो प्रश्न हाताळला नाही. त्यामुळे टीव्हीच्या पडद्यावरून जेंव्हा ते प्रश्न उपस्थित करतात तेंव्हा त्या प्रश्नांची दाहकता किती तीव्र आहे याची जाणीव होते.

त्यामुळे नुसताच आक्रस्ताळे निवेदन न करता हाती असलेल्या संपूर्ण माहितीनिशी त्यांचे निवेदन सुरु असते जे अस्सल वाटते. हाती असलेली आकडेवारी, सर्वंकष माहितीच्या आधारे जेंव्हा रविश कुमार प्रश्न विचारतो तेंव्हा यंत्रणेची झोप उडते. सत्ताधाऱ्यांविरोधात त्वेषाने आपले मत मांडणारे पत्रकार अशी त्यांची ओळख आहे.

३. मुलभूत समस्यावर बोलणे –

लोकांच्या दैनंदिन समस्या केंद्रस्थानी ठेवून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर रविश कुमारचा आढळ विश्वास आहे.

लोकांना तुम्ही आपला आवाज वाटत असाल तर तुम्ही सच्चे पत्रकार आहात अशी त्यांची पत्रकार असण्याची साधीसोपी व्याख्या आहे.

त्यामुळे टीव्हीची नेहमीची चौकट तोडून रविश अशा प्रश्नांवर भर देतो ज्या प्रश्नांवर निवडणूक लढवली जात नाही, ज्या प्रश्नांचे राजकारण होत नाही किंवा ज्यांना टीआरपी देखील नसतो.

 

ravish arnab 3 inmarathi
ndtvindia.com

शिक्षण आणि बेरोजगारी, निवडणुकीतील मुद्दे, नोटबंदी, शेतकऱ्यांचा मोर्चा, कामगारांचे प्रश्न असे कित्येक मुद्दे त्यांनी हाताळले. डेव्हलप्ड इंडिया ही भलेही इंग्रजी पत्रकारितेतील प्रसिद्ध संज्ञा असेल पण, रविशने आपल्या बोलीभाषेतून भकास भारताचे दर्शनही घडवले.

चर्चेतील प्रसिद्ध मुद्दे सोडून तरुणांनी कोणत्या प्रश्नांवर बोलले पाहिजे याची जाणीव करून देणारा आणि लोकाशाहीच्या चौथ्या खांबाची भूमिका काय असते हे नेमकेपणाने दाखवून देणारा हा अभ्यासू पत्रकार आहे.

४. निडर पत्रकरिता –

सत्य बोलून सत्तेला प्रश्न विचारण्याऐवजी सत्तेचे गोडवे गाण्यात समकालीन पत्रकारिता धन्यता मानत असताना रविशने मात्र निर्भय आणि निडर पत्रकारिता काय असते याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

 

ravish arnab 1 inmarathi
The Wire

त्याच्या या सरकारला प्रश्न विचारण्याच्या आणि सातत्याने समस्यांची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी त्यांच्यावर आरोप करताना त्याला मेसेज, फेसबुक, ट्विटर, इमेल्स, मेसेंजर, अशा सर्व माध्यमातून त्याला धमकावण्यात आले, ट्रोल केले गेले, आरोप करण्यात आले.

त्याचे चॅनेल बंद पडण्याची किंवा त्याचा शोच बंद पाडण्याची भाषा केली जाते.

आजूबाजूची परिस्थिती इतकी विषण्ण असताना देखील तो पुन्हा पुन्हा आपल्या प्राईम टाईम मधून त्याने सामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांवर आवाज उठवणे सोडले नाही.

५. इंग्रजी भाषेच्या वर्चस्वाला नाकारणे –

रविशने इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा हे माध्यम इंग्रजी भाषेच्या वर्चस्वाखाली दबले गेले होते. अनेक टीव्ही चॅनेलवरील अँकर सतत आपल्या निवेदानातुन इंग्रजी मिश्रित हिंदीचा मारा करत असतात.

 

ravish inmarathi
National Herald

पण, रविशचे कार्यक्रम ऐकले तर आपल्याला जाणीव होईल की त्याच्या सगळ्या कार्यक्रमांचे निवेदन हे शुद्ध हिंदीतून होते.

मातृभाषेतून आपल्या समस्या मांडल्यास त्या जास्त प्रभावी ठरतील आणि आपण जे बोलतो ते सामान्य माणसाला देखील कळणे महत्वाचे आहे, यावर त्याचा दृढ विश्वास आहे.

जनसामान्यात मिसळण्यासाठी इंग्रजीपेक्षा त्याची बिहारी लहेजा असलेली हिंदीच जास्त प्रभावी ठरलेली. त्याच्या या वेगळ्या शैलीमुळेच पत्रकारितेच्या बदलत्या रुपातही त्याचे स्वंतत्र अस्तित्व तो निर्माण करू शकला.

६. कट्टरता विरोध –

सामान्यांच्या जगण्यात काही बदल व्हावा या उद्देशाने पत्रकारिता करणाऱ्या रविशला धार्मिक कट्टरतेचा तिटकारा आहे. धार्मिक कारणावरून होणारे दंगे, मॉब लीन्चींग, यासारख्या घटनांना देखील त्याने प्राईम टाईमचा मुद्दा बनवला होता.

त्याची ही शांतताप्रिय सहकार्याची आणि सलोख्याची भाषाच अनेकांना आकर्षित करते. कट्टरता द्वेषाला जन्म देते. प्रेम, करुणा आणि शांतीसाठी कट्टरतेची आवश्यकता नसते.

 

ravish kumar inmarathi
NewsAndStory

सामान्य लोकांचे दैनंदिन प्रश्नही कट्टरतेने नव्हे तर सलोख्याने सुटतात. कट्टरत विरोध आणि सहिष्णुता हा रविश यांच्या विचारसरणीचा प्रमुख भाग आहे.

७. लोकशाही प्रेम –

रविशला भारतीय लोकशाही व्यवस्थेबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे. म्हणूनच हॉवर्ड युनिव्हर्सिटीत दिलेल्या भाषणात ते म्हणतात, “भारतातील लोकशाही हा आमचा आत्मा आहे.”

 

ravish inmarathi
DW

भारतीय प्रसार माध्यमांनी लोकशाहीचा विस्तार करण्याऐवजी भयशाहीला झुकते माप दिल्याबद्दलही ते सातत्याने संताप व्यक्त करत असतात. भारतातील माध्यमांनी वास्तव प्रश्न सोडून भावनिक मुद्द्यांना भडकावणे सोडले तर भारतीय लोकशाहीचे दिवस पालटतील.

८. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता –

रविश कुमार हे अभिव्यक्ती स्वन्तात्र्याचेही सच्चे पुरस्कर्ते आहेत. फक्त टीव्ही शोज मधूनच नाही तर, ब्लॉग, पुस्तक, आणि आपल्या भाषणातून देखील ते अभिव्यक्तीचा पुरस्कार करतात.

 

report inmarathi
Youth Ki Awaaz

त्यांची पुस्तके आणि त्याचे विषय या गोष्टीची साक्ष देतात. म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणाऱ्या गळचेपी विरोधातही ते सातत्याने आवाज उठवत असतात. खरे तर, त्यांची निर्भीड पत्रकारिता हेच त्यांच्या अभिव्यक्ती पुरस्काराचे एक जिवंत उदाहरण आहे.

अशा पत्रकाराला रेमन मॅगसेसे पुरस्कार देणाऱ्या समितीने देखील “आवाज नसलेल्यांचा आवाज” बनल्याबद्दलच हा पुरस्कार त्यांना जाहीर करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?