' अन्न वाया जाऊ द्यायचं नाही का? मग हे दहा उपाय लक्षात ठेवा – InMarathi

अन्न वाया जाऊ द्यायचं नाही का? मग हे दहा उपाय लक्षात ठेवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? तर अन्न वस्त्र आणि निवारा. अन्न त्यातला प्रमुख घटक. आपली संस्कृतीच मूळात“अन्न हे पूर्णब्रह्म” ह्या संस्कारांची.

मात्र काळाच्या ओघात आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले, प्रगतीच्या नावाखाली हळूहळू पारंपरिक सवयी बदलत गेल्या, ह्याचा परिणाम आपल्या वेशभूषा आणि आधुनिक विचारांखेरीज खाण्यापिण्याच्या सवयीवरही झाला.

ह्या बदलामुळे कामं सोपी झाली असली किंवा राहणीमान सोयीचं झालं असलं तरी त्याचे अनेक तोटेही पुढे यायला लागले.

जे येणार्‍या काळात मानवजातीला मुळीच परवडणारे नाहीयेत. हयातलाच एक तोटा म्हणजे, तोटा नव्हेच खरंतर ही मोठीच समस्या आहे, ती म्हणजे अन्नाची नासाडी.

आज केवळ मोठ्या समारंभातच नव्हे तर घरोघरी अन्नाची मोठ्या प्रमाणावर नासाडी होताना दिसू येते, जे निश्चितच वाईट आहे.

 

 

तशी तर प्रत्येकच गृहिणी अन्न वाया जाऊ नये ह्या प्रयत्नात असते. मात्र कधीकधी कामाच्या भानगडीत किंवा कुठल्याही इतर कारणाने असे प्रसंग उद्भवतात जेव्हा उरलेल्या अन्नाचे काय करावे हा प्रश्न आपल्यासमोर आ वासून उभा असतो.

आणि जवळजवळ प्रत्येकचवेळी आपण अन्न टाकून देणे हा पर्याय निवडतो. मन मानत नसले तरी इतर पर्याय नसल्याने आपला अगदी नाईलाज होतो.

आपण कचर्‍यात टाकलेले आणि जेव्हा कचर्‍याच्या ढीगात जाऊन पडते तेव्हा तिथे कुजून त्यातून अनेक हानिकारक वायु बाहेर पडतात आणि मोठ्या प्रमाणावर वातावरण प्रदूषित करतात ज्याचा त्रास आपल्यालाच होतो.

हे भयंकार आहे आणि असे घडायला नकोय, त्यामुळे हे टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्याच्या काही सहज सोपे 10 उपाय आज ह्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

बघूया काय आहेत हे उपाय,

१) स्मार्ट खरेदी :

बरेचदा आपण बाहेर असताना आवडल म्हणून खाण्याचं सामान किंवा भाजी घेऊन टाकतो नंतर लक्षात येतं की हे आधी फ्रीज मध्ये पडलेल होतं आणि सामान तर वाया जातेच वर पैसे सुद्धा जातात.

 

 

अशावेळी, आपण जेव्हा बाहेर असतो किंवा बाजारात खाण्याच्या समानाची खरेदी करण्यासाठी बाहेर पडतो त्यावेळी घरात खाण्याचं नक्की काय काय काय सामान आहे ह्याची आपल्याला कल्पना असतेच.

ती तशी नसल्यास घरातून निघण्यापूर्वी घरात काय आहे ते बघा म्हणजे कोणतं समान नाही हे लक्षात येईल आणि त्यामुळे ज्याची खरच गरज आहे ते घेणं सोपं होईल.

शक्य असल्यास हव्या त्या अन्न पदार्थांची किंवा भाजीची यादी करा म्हणजे उगाच जास्तीचं काही घेतलं जाणार नाही.

२) योग्य प्रकारे अन्न साठवा :

बाजारातून आणलेले अन्नपदार्थ आणि भाज्या नीट साठवा जेणेकरून दुर्लक्ष झाल्याने ते खारण होणार नाहीत.

 

 

उरलेले अन्नपदार्थ बाहेर न ठेवता नीट झाकून फ्रीज मध्यी ठेवा, फळभाज्या नीट धुवून साठवा आणि पालेभाज्या निवडूनच साठवा जेव्हा वापरायच्या असतील तेव्हा आयत्यावेळी धुवा.

पालेभाज्या धुवून साठवल्या की जास्त टिकत नाहीत.

३) फ्रीज वरचेवर आवरा :

फ्रीज सोय म्हणून आपल्या घरात आला मात्र बरेचदा आपण काय करतो उरलं काही की ढकल फ्रीजमध्ये, जास्त काही आणलं की ढकल फ्रीज मध्ये त्यामुळे नवे पदार्थ जागा व्यापतात आणि जुने पदार्थ मागे पडत जातात.

 

 

कित्येक दिवस तसेच पडून राहतात इतर कामांच्या गडबडीत आपणही ते विसरून जातो. आणि जेव्हा ते हाती लागतात तेव्हा त्यांचा टाकून देण्याव्यतिरिक्त काही उपयोग उरलेला नसतो.

म्हणून आपला फ्रीज वरचे वर आवरा म्हणजे काहीही साठून राहणार नाही पदार्थ वेळेत संपवता येतील.

४) सालांचा उपयोग करा :

स्वयंपाक करताना आपण बर्‍याच भाज्यांची सालं काढून टाकतो आणि कचर्‍यात भर घालतो. त्यापेक्षा त्याच्या उपयोग करायला शिका, बटाट्यांची सालासहित केलेली भाजी अप्रतीम लागते.

 

 

काकडी न सोलता केलेली कोशिंबीर आणखी लज्जत वाढवते तर दुधीच्या सालांची तव्यावर थोडी परतून केलेली चटणी म्हणजे अहाहा.

शिवाय आंबा, चिकू ही फळे सुद्धा सालासहित खावीत म्हणजे आल्याला शरीराला त्यातील परिपूर्ण घटक लाभतील.

५) बेताचा स्वयंपाक :

पूर्वी जास्त स्वयंपाक झाला की हातात अन्नपूरना आहे असं म्हणत त्यावेळी घरी येणारे जाणारे असत त्यामुळे मग ते जास्त रांधलेले अन्न वाया जात नसे.

 

 

मात्र हल्ली सगळेच आपआपल्या कामात व्यस्त असल्याने आपल्याकडे कोणी येत नाही आणि येणार असले की आगाऊ सूचना देऊन येतात. त्यामुळे हाली अन्नपूर्णा म्हणवून घेणे परवडणारे नाही.

आपल्या रोजच्या जेवणाचा आपल्याला अंदाज असतोच,त्यानुसारच स्वयंपाक करा किंवा बाहेरून ऑर्डर करा जोडीला फळं वगैरे ठेवा म्हणजे चुकून कमी पडल्यास उपाशी न राहता वेळ निभावता येईल आणि काही वायाही जाणार नाही.

६) एक्सपायरी डेट :

बरेचदा घेताना आपण डबाबन्द पदार्थ उत्साहाने खरेदी करतो आणि त्यावरची “युज बिफोर” बघत नाही मग उरलेल्या दिवसात ती वस्तु झटपट संपवावी लागते किंवा कधी लक्ष राहीलं नाही तर टाकून द्यावी लागते.

 

 

अशावेळी खरेदी करतानाच शेवटची तारीख नीट तपासून घ्यावी शिवाय घरी आणल्यावरही अध्येमध्ये तपासावे.

म्हणजे पदार्थ वाया न जाता वेळेत वापरला जातो आणि पैसे आया जात नाहीत.

७) खत तयार करा :

 

 

तुम्हाला माहिती आहे का, रोजच्या स्वयंपाकातल्या भाज्या निवडताना निघणारी साल आणि देठ, कुजलेली पानं ह्यांचा वापर करून तुम्ही कंपोस्ट तयार करू शकता जे तुमच्या बागेतील झाडांसाठी संजीवनी आहे.

८) खाण्यात निरनिराळे प्रयोग करा :

रोज वेगळे काय बनवायचे हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर नेहमीच असतो अशावेळी आधीच्या रात्रीचे उरलेले पदार्थ तुमच्या चमचमीत न्याहरीची सोय ठरू शकतात.

 

 

जसे उरलेल्या भाजीची आणि भाताची खमंग थालीपीठे किंवा कटलेट्स, वेगवेगळ्या स्टफींग ची सॅंडवीचेस इत्यादी. नक्की करून पहा हे पदार्थ

९) टिकणार्‍या पदार्थांची बेगमी :

आपल्या रोजच्या आहारात आपण ताज्या पदार्थांना आपल्या जेवणात पहिलं स्थान देतो मात्र आपल्याला असे बरेचसे प्परामपारिक पदार्थ लाभलेले आहेत ज्याची बेगमी करता येऊ शकते.

जसे पोहयांचा चिवडा, मक्याचा आणि कुरमुरयांचा चिवडा, नमकपारे, लाडू आणखीही बरच काही.

 

 

हीच बेगमी आपल्याला आयत्या वेळी कामात येऊ शकते ज्यामुळे आपला पैसा आणि वेळ दोन्ही वाचतात आणि हे पदार्थ वाया जाण्याची भीतीही नसते.

कारण ह्याला जरी एक्स्पयरी असली तरी चविष्ट असल्याने हे पदार्थ सहसा वाया जाण्यासाठि शिल्लकच राहत नाही.

१०) हवे तेवढेच घ्या : 

आतापर्यंत आपण घरात वाया जाणार्‍या आणणाबद्दल बोललो मात्र कार्यक्रमात वाया जाणार्‍या अन्नाचे काय? तिथे तर प्रचंड प्रमाणात नासाडी होते. आपण घरात असू वा बाहेर ताटात तेवढेच अन्न वाढून घ्या जेवढे तुम्हाला संपवता येईल.

 

 

एखाद्या चविष्ट पदार्थाच्या मोहापाई आपण जास्त वाढून घेतो आणि नंतर संपवता आलं नाही की ते वाया जातं.

ऊष्टे म्हणून ते कोणाला दिलेही जात नाही आणि नंतर त्याची रवानगी थेट कचर्‍यात होते, अशावेळी आधीच वाढून घेताना जेवढे संपवता येईल तेवढेच वाढून घ्या.

तर मंडळी ह्या होत्या अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी काही साध्या सोप्या कल्पना आणि उपाय. ज्या आपल्यापैकी प्रत्येकाला अमलात आणणे सहज शक्य आहे.

तुमच्या आयुष्यात ह्या कल्पनांनांचा समावेश जरूर करा आणि इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा. अन्न वाचवा, आपले कष्टाचे पैसे वाचवा आणि पर्यायाने पर्यावरण वाचवा. देशाचे आरोग्य सांभाळण्याच्या कार्यात हातभार लावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?