' आधुनिक जीवनशैलीमुळे मानवी सांगाड्यात होत आहेत “हे” अविश्वसनीय बदल! – InMarathi

आधुनिक जीवनशैलीमुळे मानवी सांगाड्यात होत आहेत “हे” अविश्वसनीय बदल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मानवाची उत्क्रांती माकडापासून झाली असे मानले जाते. एप आणि ओरांग उटांग या माकडांमधे बदल होत गेले आणि त्यांचे मानवात रूपांतर झाले असे संशोधनातून सिद्ध झालेय.

अर्थातच हा काही थोड्याफार वर्षात किंवा एखाद्या शतकाच्या कालावधीत घडलेला बदल नाहीय.

हा लाखों वर्षांच्या जडणघडणीतून झालेला बदल आहे.  म्हणजेच आत्ताचे मानवाचे रूप हे इतक्या प्रचंड कालावधीतून निर्माण झालेले आहे.

विश्वास नाही ना बसत? पण हे बदल घडत असतानाच काही नको असलेले अवयव हळूहळू संकोचत गेले तर काही अवयव बदलत गेले.
हाडांची रचना बदलत गेली.

 

humanevolution-inmarathi
fthmb.tqn.com

 

हे कसे घडले गेले?

माकड जमिनीवर तसेच उंच झाडांवर रहाणारे प्राणी, फळं फुलं आणि पानांवर उदरनिर्वाह करतात. शेपटीचा उपयोग झाडाच्या फांद्यांवर आधार घेण्यासाठी करतात.

पण त्याची उत्क्रांती होत असताना ते दोन पायांवर उभं राहू लागलं आणि शेपटीचा आधार म्हणून उपयोग करायचे काम पडेनासे झाले म्हणून उत्क्रांतीच्या काळात हळूहळू शेपटी आखूड होत नाहीशी झाली.

मानवाची उत्क्रांती होण्याच्या टप्प्यात तो जमिनीवर उगवणारे धान्य खाऊ लागला, शेतीचे तंत्र त्याला उमगले,शिकार भाजून किंवा शिजवून मऊ करून खाऊ लागला त्यामुळेच दातांची रचना बदलली आणि साहजिकच जबड्याची रचना बदलली.

लाखो वर्षांच्या काळात हे बदल घडत गेले. घर बांधून राहण्याच्या मानवाच्या शोधाने आणि सवयीने उघड्यावर रहात असताना थंडीपासून बचाव करणारे केस गळून गेले.

आत्ताच या गोष्टींची आठवण मुद्दाम काढायची गरज का निर्माण झालीय ?

याचे कारण असे, की अलीकडील काळात मानवीय सांगाड्यात होणारे बदल शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकत आहेत. असं काय घडलं, की शास्त्रज्ञांना या बाबतीत नव्याने संशोधन करायची गरज पडली?

नेदरलँड मध्ये १९३९ साली एक कोकरू जन्माला आलं ते चार ऐवजी फक्त तीन पाय घेऊन. त्याच्या डावीकडील पायाच्या जागी चामडीवरील केसांच्या पुंजक्यांवरून इथं पाय असायला हवा होता इतकीच खुण होती.

तर उजवीकडील पुढील पायात बरेच दोष होते. एखादा खुंट असावा तसा पाय दिसत होता.

त्याच्या अशा पायांमुळे ते तीन महिन्यांचे असताना जनावरांच्या डॉक्टरांनी त्याला दत्तक घेतले आणि त्याला चरायला गवतात सोडले.
कोकरू थोडेसे धडपडले पण स्वतःला सांभाळत ते मागील पायावर उड्या मारत गवत खाऊ लागले.

कांगारुंचे मागील पाय लांब असतात पण पुढील पाय आखूड असतात, तरीही ते उड्या मारत चालत किंवा धावत जाते, अगदी तसेच हे कोकरू गवतात उड्या मारत चरू लागले व आपले पोट आरामात भरू लागले. पण ते वर्षभराचे झाले आणि एका अपघातात मरण पावले.

 

kangaroo inmarathi
ABC

 

आता ही कोकराची गोष्ट आणि मानवीय सांगाड्यात होणारे बदल यांचा परस्परांशी काय संबंध असे तुमच्या मनात आले असेलच.

ते कोकरू मरण पावल्यावर त्याच्या सांगाड्याचे निरीक्षण करताना एक गोष्ट डॉक्टरांच्या लक्षात आली, की त्याच्या ‘हिप बोन्स’ आणि पायांची हाडे जाड झाली होती आणि त्यामुळे इतर हाडांची रचना बदलली होती व त्यांची रचना उड्या मारणाऱ्या जनावरांसारखी झाली होती.

थोडक्यात त्याच्या शरीराने आपल्यात परिस्थिती नुसार बदल घडवून वातावरणाशी मिळतेजुळते घ्यायला सुरुवात केली होती.

यावर संशोधन चालू असतानाच जर्मनीतील युवा वर्गाचे जबडे व हाताची हाडे आधीच्या पिढीच्या मानाने लहान होत चालली आहेत असे डॉक्टरांच्या लक्षात आले होते व त्यावर त्यांचे संशोधन चालू झाले होते.

ही नव्याने लक्षात आलेली गोष्ट संशोधकांना बुचकळ्यात पाडणारी ठरली.एखाद्या व्यक्तीच्या शरीरात असे बदल अपवादात्मक रुपात होतात पण जेंव्हा अनेकांच्या शरीरात असे बदल होणे हे नक्कीच आश्चर्यकारक होते.

म्युझियममध्ये दिसणारे सांगाडे पांढरे आणि भरीव आणि अचल दिसतात.

पण शरीरात असताना हाडे मांसाच्या आवरणाखाली असतात आणि गुलाबी रंगाची दिसतात आणि त्यांच्यावर अनेक रक्तवाहिन्या दिसतात व त्यांच्यात अनेक टिश्यू,अस्थीमज्जा असतात म्हणजेच हाडे जिवंत असतात.

पूर्वी ही समजूत होती की शरीरातील हाडांची रचना DNA नुसार विशिष्ट पद्धतीची व आकाराची असते.

नवजात शिशूच्या शरीरात जन्मतः ३०५ हाडे असतात व त्याच्या वाढीच्या काळात ती हाडे एकमेकांना जोडली जातात व मोठ्या व्यक्तींच्या शरीरातील एकूण हाडांची संख्या २०६ इतकीच रहाते.

शरीराचा तोल सांभाळणे, चालणे, पळणे या क्रिया कशा होतात हे हाडांच्या रचनेवरून समजते. यालाच ‘ऑस्टिओबायोग्राफी‘ असे म्हणतात. म्हणजेच हाडांचा वृत्तांत..थोडक्यात हाडांची जनुकीय रचना.

आता हे कार्य कसे होते यासाठी संशोधक एक उदाहरण देतात ते ‘गुआम आणि मारीआना’ या बेटांवरील ‘स्ट्रॉंग मॅन‘चे.

 

neandarthals inmarathi
Sci-News.com

काय आहे हे संशोधन?

तर मंडळींनो, या साठी या बेटांवर सापडलेल्या मानवी सांगाड्याचे संशोधन करताना एक आश्चर्यकारक गोष्ट आढळली. ती म्हणजे या सांगाड्यांची उंची आणि हाडांच्या रचनेवरून लक्षात आलेली गोष्ट म्हणजे ही माणसं तगडी आणि उंच तसेच शक्तिमान होती.

याची सुरवात झाली ती तितीआन या पॅसिफिक महासागरातील एका बेटावर सापडलेल्या सांगाड्यांची तपासणी करताना. १९२४ मध्ये हे सांगाडे सापडले होते.

त्यांच्या खांद्याची तसेच हातापायांची हाडे बघता ही माणसे अक्षरशः अवाढव्य आकाराची आणि खुप उंच असावीत असे लक्षात आले.

पुरातत्व अभ्यासकांनी त्यांना नाव दिले ‘ताओ ताओ तागा’.

पौराणिक कथेनुसार तागा हा तेथील जमातीचा प्रमुख त्याच्या अमानवीय शक्तीसाठी प्रसिद्ध होता. म्हणूनच ‘तागाचा माणूस’ असे सांगाड्याचे बारसे करण्यात आले.

 

tao tao taga inmarathi
publish.illinois.edu

 

ह्या तागा चे थडगे त्यांना सापडले होते ज्या भोवती १२ नक्षीदार दगडांचे खाम्ब उभे केले होते.त्याच्या सांगाड्याचे जवळून निरीक्षण केल्यावर दक्षिण पॅसिफिक मधील टोंगो जमातीच्या लोकांशी यांचे साधर्म्य आढळले.

टोंगो हे दगडांचे काम करणारे आणि दगडांपासून घरे बांधणारे होते.यांचे जे घर सापडले होते त्याची उंची १६ फूट होती व दगडी खांबांवर ते उभारले होते.

त्या दगडांचे वजन केले असता ते १३ टन इतके भरले. याचाच अर्थ त्यांच्यात प्रचंड शक्ती होती.

मग इतकी उंच आणि प्रचंड शक्ती असलेली माणसे जर तीनशे वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, तर आताच असे काय झाले म्हणून उंची कमी होतेय?किंवा जबडा लहान होत चाललाय? का हाताच्या कोपराचा आकार लहान होतोय?

वीस वर्षे ‘हेल्थ सायंटिस्ट’ म्हणून ऑस्ट्रेलियाच्या सनशाईन युनिव्हर्सिटीत काम करणाऱ्या डेव्हिड शहर याना गेल्या दहावर्षात आणखी एक बुचकळ्यात टाकणारी गोष्ट लक्षात आली, की मानवी कवटीच्या मागील भागात मानेच्या वरच्या भागात एखाद्या काडीसारखी वेगळीच वाढ दिसून आली.

पुढील बाजूस वाकून काम करणाऱ्या लोकांच्या मानेला आधार मिळावा म्हणून कदाचित ही योजना असावी असे त्यांना वाटतेय.

१८८५ मधे जेव्हा पहिल्यांदा अशा प्रकारची अनैसर्गिक वाढ दिसली होती तेव्हा ती दुर्मिळ केस होती.पण त्यावर खूप मोठे संशोधन झाले नव्हते परंतु डेव्हिड शहर यांनी हजारपेक्षा जास्त एक्स रे गोळा केले,वयोगट होता १८ ते ८६ वर्षे.

ह्या सर्व एक्सरेंची तपासणी केल्यावर त्यांनी हा निष्कर्ष काढला की, १८ ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये दर चार पैकी एक तरुणामध्ये ही वाढ दिसून येतेय.

स्मार्ट फोन, टॅब यांच्या वापराने डोके जास्त खाली झुकते आणि डोक्याचे वजन साधारण साडेचार किलो असते. हे वजन पुढील बाजूस झुकल्याने मानेवर ताण येतो.

 

mobile inmarathi
theashaleader.com

 

पूर्वी लोक वाकून काम करत नव्हते का? तर करत होतेच पण सतत मान झुकवावी लागत नव्हती. अभ्यास करताना पुस्तक डोळ्यांसमोर धरले जायचे. आता फोन बघताना तो खाली धरला जातो आणि मान खाली झुकवावी लागते.

साधारणपणे किमान चार तास तरी फोन वापरला जातो. भारतात हे प्रमाण जास्त आहे. तुम्हाला वाटत नाही का हे गंभीर आहे म्हणून?

हेच चालण्याच्या बाबतीत होते. शरीराची रचना रोज तीस किलोमीटर चालण्यासाठी बनलेली आहे. कारण पूर्वी शिकारीसाठी जास्त चालावे लागायचे, वाहनांची निर्मिती होण्यापूर्वी कोठेही चालतच जावे लागायचे.

आता मुलं रिक्षातून किंवा बसने जातात. मैदानी खेळांचे कमी झालेले प्रमाण आपल्या हाडांच्या रचनेवर परिणाम करू लागलेय.
शारीरिक हालचाली कमी होऊ लागल्या आहेत हे तुमच्या लक्षात येतेय का?

आपली दैनंदिन कार्यपद्धती कशी आहे याचे एकदा अवलोकन करा म्हणजे तुमच्याच लक्षात येईल की आपल्या हालचाली कमी होत आहेत.

आयटी क्षेत्रातील तरुणांमध्ये ‘फ्रोजन शोल्डर’ या तक्रारींचे प्रमाण वाढलंय. कारण एकाच जागी बसून कॉम्प्युटरवर काम करणे. हातांच्या आणि पायांच्या हालचाली मर्यादित होऊ लागल्यात.

कॉम्प्युटर किंवा फोनचा वापर वाढल्याने चमकणाऱ्या स्क्रीनचा डोळ्यांवर परिणाम होतोय.

 

work from home featured inmarathi
americanoptometric association.com

 

‘फास्ट फूड आणि सॉफ्ट फूड’ याच्या वापराने दातांचा वापर म्हणावा तसा होत नाहीय. परिणामी जर्मनी प्रमाणे जगात सर्वत्र जबड्याच्या आकारात फरक पडू लागलाय. दात कमकुवत होऊ लागलेत.

तंबाखूमुळे कर्करोग होऊन तोंडाचा आकार बदलू लागलाय. चालणे कमी होत असल्याने गुढगे आणि नडगीची हाडे ठिसूळ होऊ लागली आहेत. हळूहळू उंची कमी होऊ लागलीय.

सुरवातीला दिलेले उदाहरण लक्षात ठेवा. माकडाचे मानवात रूपांतर होताना ज्या अवयवांचा वापर कमी ते कालांतराने लहान होत नाहीसे होतात हे सिद्ध झालेय.

 

body posture inmarathi
Quora

 

आपल्या सांगाड्यात जे बदल होत आहेत ते याच आधुनिक जीवनशैलीमुळे हेच लक्षात घेणे आवश्यक आहे.

आजच जागे होऊन आधुनिक जीवनशैलीमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन आपल्या दैनंदिन कार्यात योग्य ते बदल घडवून आणणे आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा माणसाचे माकड बनण्यास वेळ लागणार नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?