' ह्या कारणामुळे “डिजिटल इंडीया” चं स्वप्न अशक्यप्राय भासतंय – InMarathi

ह्या कारणामुळे “डिजिटल इंडीया” चं स्वप्न अशक्यप्राय भासतंय

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आज भारत सरकार देशाला डिजिटल बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. त्या दृष्टीने त्यांनी काही पाउले देखील उचलली आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारत कॅशलेस इकोनॉमी होणार अश्या अंदाजांचे वादळ उठले. बऱ्याच जणांनी त्याला विरोध केला. भारतात कॅशलेस इकोनॉमी अजिबात टिकणार नाही असे देखील अनेकांनी छातीठोकपणे सांगितले. काही प्रमाणात त्यांचाही विरोध योग्य आहे कारण कॅशलेस इकोनॉमी ही जरी भारताला विकासाच्या दिशेने अग्रेसर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असली तरी त्यासाठी सर्वप्रथम देशाच्या तळागाळाच्या घटकापर्यंत कॅशलेस इकोनॉमीचा प्रसार करणे गरजेचे आहे. मुळात हाच प्रसार मंदावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न पहाणाऱ्या सरकारला ते पूर्ण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार हे मात्र नक्की! आणि आता तर त्यातील सर्वात महत्त्वाची अडचण पुढे आली आहे ती म्हणजे-

भारतातील ७६% लोकांना इंटरनेटबद्दल काडीचीही माहिती नसल्याचे एका अहवालामधून दिसून आले आहे.

 

indian-population-marathipizza01

स्रोत

जगातील सर्वात जास्त इंटरनेट वापरणाऱ्या देशांमध्ये भारताचा जरी दुसरा क्रमांक लागत असला तरी भारतातल्या अजून ९५ कोटी नागरिकांपर्यंत इंटरनेट पोचायचे बाकी आहे असे एका अहवालामधून स्पष्ट झाले आहे.

Assocham-Deloitte joint study यांच्या अहवालानुसार,

भारतातील डेटा प्लान्स हे जगातील अतिशय स्वस्त डेटा प्लान्समध्ये मोडले जातात. तसेच भारतात स्मार्टफोन्स देखी अतिशय कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच इंटरनेट वापरण्याची अनुकूल स्थिती असून देखील भारतातील ९५० दशलक्ष लोक आजही इंटरनेटचा वापर करीत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

चीन नंतर भारताचा सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्या देशांमध्ये जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात सध्या ३५० दशलक्ष लोक इंटरनेट वापरतात.

indian-internet-users-marathipizza

स्रोत

या स्थितीवर भाष्य करताना हा अहवाल म्हणतो की, 

भारतात इंटरनेटबद्दलच्या जागरुकतेमध्ये वाढ होत आहे. पण प्रसाराची ही गती अजून वाढवण्याची गरज आहे. डिजिटल इंडिया करण्यापूर्वी लोकांना डिजिटल युगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. गावपट्ट्यातील तसेच दुर्गम भागातील लोकांना इंटरनेट सोडा साधा मोबाईल वापरता देखील येत नाही. डिजिटल इंडिया अश्या लोकांच्या काय कामाचं? हा प्रश्न उरतोच. जोवर लोकांना डिजिटल गोष्टींचे फायदे पटवून देणार नाही तोवर लोक स्वत:ला डिजिटल बनवण्यास तयार होणार नाहीत.

अहवालामध्ये काही उपाययोजनाही सांगितल्या आहेत,

शाळा, महविद्यालये, विद्यापीठे यांमध्ये देखील डिजिटल साक्षरतेचे धडे द्यायला सुरुवात केले पाहीजे. विशेष करून गावाकडच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये हा उपक्रम प्राधान्याने राबविला गेला पाहिजे. त्याचा निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल. स्टार्ट-अप्सना चालना देऊन लोकांच्या सोयीसाठी निरनिराळे अॅप्स बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणजे लोकांना त्या अॅप्सचा वापर करायला लावून डिजिटल साक्षरता कार्यक्रम प्रभावीपणे राबविता येईल.

cashless-economy-marathipizza00

स्रोत

डिजिटल इंडियाचे ध्येय गाठण्यासाठी अडचणी तर खुप आहेत. पण त्या अडचणी ओळखून योग्य त्यावर उपाययोजना केल्यास हे काम अशक्य ठरणार नाही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?