जागतिक पर्यटनस्थळांत दुसऱ्या क्रमांकावर असलेलं हे अप्रतिम स्थळ एकदा तरी नक्की बघा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
आपला देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. समुद्रापासून ते बर्फापर्यंत आणि वाळवंटापासून ते घनदाट जंगलांपर्यंत सगळ्यांचीच रेलचेल आपल्या देशात आहे. तसेच प्राचीन संस्कृतीची भेट लाभल्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू सुद्धा आपल्या देशात ठिकठिकाणी दिमाखात उभ्या आहेत.
आपण ह्या सगळ्याची हवी तशी काळजी घेत नाही हा भाग वेगळा पण परदेशातील पर्यटनस्थळांच्या तोडीस तोड जागा आपल्या देशात सुद्धा आहेत हे आता परत सिद्ध झाले आहे.
द न्यूयॉर्क टाइम्सने “बघायलाच हवीत ” अश्या पन्नास जागतिक पर्यटनस्थळांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे आणि त्यात आपल्या देशातील एका पर्यटनस्थळाची दुसऱ्या स्थानावर वर्णी लागली आहे.
ते पर्यटनस्थळ आहे कर्नाटक राज्यातील हंपी हे शहर!

विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हंपी हे शहर तिथल्या नितांत सुंदर देवळांसाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी ह्या शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले गेले होते.
तसेच काहीच दिवसांपूर्वी तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे देऊळ आशियातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ म्हणून नावाजले गेले होते.
अनेक प्रसिद्ध ब्लॉगर्सनी आणि ट्रॅव्हल इन्फ्ल्यूएंसर्सच्या एका पॅनलने हे स्थळ आशियातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ असल्याचे मत व्यक्त केले होते. आता मध्ययुगीन भारतातील समृद्ध शहर असलेल्या ह्या स्थळाची जगातील दुसरे सर्वोत्तम पर्यटनस्थळ म्हणून यादीत वर्णी लागली आहे.
पोर्तो रिको हे कॅरिबियन बेट जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून निवडले गेले आहे.

गोलाकार डोंगरांच्या मधोमध वसलेले हंपी हे स्थळ म्हणजे एक जागतिक वारसा स्थळ आहे. इथले विरुपाक्ष मंदिर जगप्रसिद्ध आहे. ह्या ठिकाणी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली १००० मंदिरे व स्मारके आहेत.
१५६५ साली झालेल्या तालिकोटच्या युद्धात मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी हे शहर उध्वस्त केले होते.
तरीही हे अवशेष आजही समृद्ध इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. हंपी हे गाव पम्पा क्षेत्र, भास्कर क्षेत्र किंवा किष्किंधा क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. तुंगभद्रा नदीलाच पूर्वी पम्पा नदी म्हणत असत.
ह्या नदीच्या नावावरूनच ह्या स्थळाला हंपी असे नाव पडले. हंपीलाच पूर्वी विरुपाक्षपुरा असेही म्हटले जाई.
इथल्या विठ्ठल मंदिर परिसरातील मुख्य हॉलमध्ये असलेल्या ५६ स्तंभांवर हातांनी मारले असता त्यांतून संगीताच्या लहरी निघतात. ह्याच ठिकाणी प्रसिद्ध शिला रथ आहे जो पूर्वी खरंच दगडी चाकांवर चालत असे.

इथली सुंदर मंदिरे ह्या स्थळाला आकर्षक बनवतातच त्याशिवाय नजीकच्या काळात येथे जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने ह्या स्थळाची न्यूयॉर्क टाइम्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वर्णी लागली.
हंपीला तुम्ही बस, रेल्वे किंवा विमानानेही जाऊ शकता.
जिंदाल ह्यांनी हैद्राबाद व बंगळुरू येथून हंपीजवळ असलेल्या त्यांच्या बेसपर्यंत जाण्यासाठी विमानसेवा सुरु केली आहे.
हंपीला आल्यावर पर्यटक इथली मंदिरे, स्मारके तर बघू शकतातच शिवाय रॉक क्लाइंबिंग आणि बास्केट बोट (कोराक) मध्ये नदीत बोटिंगचा आनंद घेऊ शकतात.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी, इतिहासकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी हंपीला प्राप्त झालेल्या ह्या गौरवाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
जागतिक स्तरावरील ईतक्या मोठ्या वर्तमानपत्राने हंपीची दखल घेणे आणि ह्यास स्थळाचा आपल्या यादीत दुसऱ्या स्थानावर समावेश करणे ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. ह्यामुळे पर्यटकांची संख्या तर वाढेलच शिवाय भारतातील समृद्ध संस्कृतीचा व इतिहासाचा वारसा संपूर्ण जगापर्यंत पोचेल.

पण आता मात्र आपली जबाबदारी वाढली आहे. ह्या जागतिक वारसा असलेल्या स्थळाचे व्यवस्थित जतन करणे ही आपली मुख्य जबाबदारी आहे.
पर्यटक म्हणून आपण सुद्धा तिथे जाऊन विद्रुपीकरण न करता तिथल्या सुंदर शिल्पकलेचा आनंद लुटला पाहिजे आणि हे स्थळ अधिकाधिक चांगले कसे राहील ह्यासाठी सरकार आणि पुरातत्व विभागाला सहकार्य करायला हवे.
पुरातत्व विभाग सुद्धा येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा कश्या उपलब्ध होतील ह्यासाठी उपाययोजना करण्याच्या प्रयत्नात आहे असे पुरातत्व विभागाचे उप अधीक्षक पी कलीमुत्तू ह्यांनी सांगितले.
हंपी कन्नड विद्यापीठाचे प्राचीन इतिहास आणि पुरातत्वशास्त्राचे प्राध्यापक सी एस वासुदेवन ह्यांचे असे मत आहे की,
“सरकारने पर्यटकांना ह्या ठिकाणी येणे सोपे व्हावे ह्यासाठी बदामी-पट्टाडकल-एहोल-हम्पी असा मार्ग तयार करायला हवा. तसेच येथे पायाभूत सुविधांचा विकास करायला हवा जेणे करून इथे पर्यटकांची संख्या वाढेल.”
परंतु हंपीचे रहिवासी आणि पर्यावरणवादी असलेले शिवकुमार मालागी म्हणतात की “पायाभूत सुविधा, रस्ते वगैरे बांधताना हंपीचा निसर्ग सुद्धा जतन केला जावा. इथल्या निसर्गावर वाईट परिणाम होता कामा नये.”

आपल्या देशात अशी अनेक स्थळे आहेत ज्यांचे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्व आहे तसेच ती स्थळे नितांतसुंदर निसर्गसौंदर्याने नटलेली आहेत. पण दुर्दैवाने आपल्याकडे ह्या स्थळांचे जतन झाले नाही.
आता तरी आपण धडा घेऊन ही स्थळे पुनरुज्जीवित केली पाहिजेत, त्यांचे संवर्धन केले पाहिजे, तेव्हाच जगातील सर्वांपर्यंत आणि आपल्या देशातील पुढच्या पिढीपर्यंत आपल्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा वारसा पोचेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
अप्रतिम अशी माहिती आहे
fine