' सत्ताधीशांना हादरा देणाऱ्या लोकप्रिय नेत्याच्या हत्येचे गूढ आजही उलगडलेले नाहीये! – InMarathi

सत्ताधीशांना हादरा देणाऱ्या लोकप्रिय नेत्याच्या हत्येचे गूढ आजही उलगडलेले नाहीये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुंबई ह्या मायानगरीच्या क्षितिजावर अनेक तारे होऊन गेले आहेत, ज्यांनी ह्या शहराला एक इतिहास दिला आहे. ह्या शहराला घडवण्यात त्या लोकांचा एक मोठा वाटा राहिला आहे.

मुंबई ही तशी देशाची आर्थिक राजधानी, एक संपन्न शहर, ह्या शहरात जसा औद्योगिकीकारणाने वेग पकडला तसा इथे त्या उद्योगाना चालवायला गरज पडू लागली ती मनुष्यबळाची!

त्यातून निर्माण झाला रोजगार आणि तो रोजगार मिळवण्यासाठी ह्या शहरात येऊन वसू लागला कामगार..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

परंतु ह्या मुंबईनगरीत कामगाराला आपल्या हातचं बाहुलं समजून वापरण्यात येऊ लागलं. त्याच्या माणूसपणाकडे दुर्लक्ष करत त्याला राब राब राबविलं जाऊ लागलं, तटपुंज्या पगारात त्या कामगारांकडून जनावरा सारखं काम करून घेतलं जाऊ लागलं.

ह्यामुळे ह्या कामगार वर्गात असंतोषाची ठिणगी पडली, ह्यातून ह्या सर्व कामगारांच्या संघर्षाला संघटित रूप प्राप्त झाले.

 

mumbai-mills-worker-inmarathi
cgpi.com

 

ह्या संघटिकरणाला आधार मिळाला तो साम्यवाद आणि समाजवादाचा, त्यातून उभ्या राहिल्या कामगार संघटना, ह्या कामगार संघटना व संघटित कामगारांचे नेतृत्व करणारे अनेक नेते मुंबईत होऊन गेले.

त्या सर्व नेत्यांमध्ये एक नेता असा होता ज्याने तब्बल तीन दशकं मुंबईच्या कामगार विश्वावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करून ठेवलं होतं, त्या कामगार नेत्यांचं नाव होतं “डॉ. दत्ता सामंत”!

डॉ. दत्ता सामंत यांचा जन्म कोकणातील देवगडचा.. त्यांचे वडील साधारण शेतकरी व वैद्य होते. ते आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि जडीबुटीच्या आधारावर लोकांचे उपचार करत. वडीलांना त्या कामात मदत करताना, दत्ता सामंत यांना ह्या पेशात रस निर्माण झाला आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले.

शिक्षण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या घाटकोपर उपनगरातील पंत नगरात आपला दवाखाना उघडला.

पंत नगरचा एरिया हा खाणकाम मजुरांचा होता. हे मजूर डॉ. सामंताकडे उपचार घेण्यासाठी येत असत. त्यांची दयनीय अवस्था बघून डॉ. सामंत अगदी माफक दरात त्यांचे उपचार करत असत.

मजुरांच्या नेहमीच्या येण्याने व जगण्याचा संघर्षाला बघून तसेच त्यांचा पदरी अथक मेहनत करून देखील आलेल्या अठरा विश्वे दारिद्र्याला बघून डॉ सामंत व्यथित झाले होते.

अखेरीस त्यांनी ह्या कामगारांसाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी कामगारांचे संघटन उभे केले. हे करण्यासाठी त्यांना तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी मदत केली.

 

Shripad-Amrut-Dange-inmarathi
india.com

 

दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली बघता बघता खाणकाम मजुरांचा मोठा लढा उभा राहिला आणि संघर्षाला सुरुवात झाली. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपोषणं, काम बंद आंदोलन करण्यात आले. ज्याचा परिणाम स्वरूप कामगारांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत झाली.

दत्ता सामंत यांचे नेतृत्व बघता , इतर कामगार संघटनाही त्यांच्याकडे येऊ लागल्या. त्यांना नेतृत्व स्वीकारण्याचा मागण्या करू लागल्या आणि दत्ता सामंत यांनी त्या कामगार संघटनांचे नेतृत्व स्वीकारले.

दत्ता सामंत यांनी अनेक विविध उद्योगात काम करणाऱ्या अश्या वेगवेगळ्या २०० कामगार संघटनांचे अध्यक्षपद आणि ५०० संघटनांचे उपाध्यक्षपद भूषवले होते.

१९७० च्या दशकात क्षितिजावर आलेल्या ह्या ताऱ्याने पुढील दोन दशके कामगार चळवळीचे नेतृत्व करत मायानगरीचे नभ झाकोळले होते.

दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांसाठी केलेल्या संघर्षामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती.

 

datta-inmarathi
india.com

 

मुंबईतल्या गिरण्या बंद पडून स्थलांतरीत होत होत्या. आजूबाजूच्या भिवंडी, मालेगाव, सुरत ह्या भागात ह्या गिरण्या जात होत्या. त्यामुळे मोठ्या संख्येत कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळले होते.

ह्यात गिरणी व्यवसाय बंद पडून तिथे असलेल्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी बांधकाम उद्योजकांचा नजरा भिडल्या होत्या.

गोदरेज पासून इतर गिरणी कामगारांचे नेतृत्व स्वीकारत दत्ता सामंत यांनी कामगारांचा एक मोठा मोर्चा मुंबईत काढला. त्या मोर्चावर पोलिसांनी फायरिंग केली. त्यानंतर तो संघर्ष अजून चिघळला. यात ५० जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ह्यात डॉ दत्ता सामंत यांचे पण नाव होते.

परंतु दोनन वर्षांनी त्यांची सुटका करण्यात आली. ह्या घटनेमुळे दत्ता सामंत हे मुंबईच्या कामगार वर्तुळातले एक सर्वात मोठे नेतृत्व म्हणून उभे राहिले.

दत्ता सामंत ह्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते त्यांच्या भागातून आधी निष्पक्ष नंतर काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले आणि निवडून आले.

त्यांनी विधानसभेत असंख्य प्रश्न विचारले. कामगार प्रश्नापासून मुस्लिम पर्सनल लॉ पर्यंत अनेक प्रश्न दत्ता सामंत ह्यांनी विधान सभेत उपस्थित केले. ह्या प्रश्नांना मोठी व्हॅल्यु प्राप्त झाली होती. एका दिवसात सलग तीनवेळा प्रश्न विचारण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता.

 

samant-inmarathi
janchowk.com

 

पुढे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत लाल निशाण ह्या पक्षाची स्थापना केली. ज्या मार्फत त्यांनी डाव्या चळवळीच्या संघटनांना एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केला कारण त्याकाळी उदयास आलेल्या शिवसेनेने तिथे मोठा वर्ग आपल्या पाठीशी उभा करत कामगार चळवळी व कम्युनिस्ट पक्ष्याला घर घर लावली होती.

अश्यावेळी डॉ सामंत ह्यांनी कामगार संघटनांची मोट बांधली होती.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी ज्या निवडणुकीत निवडून आले, त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भरघोस मतं पडली होती. त्या लाटेत ही डॉ. सामंत हे कॉंग्रेसविरोधात उभे राहून निवडून आले होते.

खासदार झाल्यावर देखील त्यांनी राष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रश्न मांडणे चालू ठेवले होते. त्यांनी सांसद म्हणून उत्कृष्ट कारकीर्द निभावली होती. पुढे जाऊन त्यांनी पुन्हा कामगार चळवळीच्या लढ्यात लक्ष घातले.

१९९१ ला आलेल्या जागतिकीकरणाच्या लाटेत पण त्यांनी कामगारांवर मोठे संकट कोसळले होते तेव्हा देखील दत्ता सामंतांनी लढा दिला होता. गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी ते लढत होते.

 

datta-samant-inmarathi
theprint.com

 

१६ जानेवारी १९९७ रोजी, आपल्या पवईच्या घरातुन आपल्या सुमो गाडीत निघालेल्या दत्ता सामंतांची अज्ञात भाडोत्री हल्लेखोरांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रस्त्यावर सायकल घेउन खुनी उभे होते त्यांनी बरोबर वेळ साधून हल्ला केला.

त्यांची हत्या कुणी घडवून आणली हे आजपर्यंत न उलगडलेले रहस्य आहे. पण ह्यात भांडवलशाही समर्थक काही राजकीय प्रभुती होत्या असा आरोप त्यांचे अनुयायी करत असतात.

डॉ दत्ता सामंत हे एका वादळाप्रमाणे मुंबईच्या कामगार चळवळीत वावरले होते. इतर नेत्यांप्रमाणे सत्ता मिळाल्यावर त्यांनी कामगारांना वाळीत सोडून न देता एक मोठा संघर्ष उभारला होता. त्यांचा पाठीशी उभे राहिले. त्यांचे नेतृत्व केले. त्यांना संघटित केले.

काँग्रेस व शिवसेना ह्यांच्या राजकीय डाव पेचात ही त्यांनी कामगार चळवळ बांधून टिकवून ठेवली. कदाचित त्यांचा ह्या कार्यामुळेच हितशत्रूनी त्यांची हत्या घडवून आणली होती.

 

Union protests Inmarathi

 

त्यांचा हत्येनंतर त्यांनी आयुष्य ज्या शहरात त्यांनी हा मोठा संघर्ष उभा केला होता ते शहर देखील हादरुन स्तब्ध झालं होतं आणि कामगार संघटना पोरक्या झाल्या होत्या…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?