' JNU: देशद्रोही नारे आणि अभाविपचा दीर्घ संघर्ष… – InMarathi

JNU: देशद्रोही नारे आणि अभाविपचा दीर्घ संघर्ष…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : नचिकेत शिरुडे 

===

९ फेब्रुवारी २०१६ रोजी संध्याकाळी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तिथल्या स्थानिक विद्यार्थी संघाकडून ज्याला JNUSU म्हटले जाते, एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता संसदेवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या अफजल गुरू आणि १९९३ च्या बॉम्बब्लास्टचा आरोपी असलेला याकूब मेनन यांना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा निषेध नोंदवणे.

बघता बघता संध्याकाळी विद्यार्थ्यांचा जमाव जमला आणि अचानकपणे घोषणाबाजी सुरू झाली, त्यावेळी काही प्रमुख घोषणा होत्या,

“भारत तेरे तुकडे होंगे इंशा अल्लाह, इंशा अल्लाह”, “भारत की बरबादी तक जंग रहेगी” इत्यादि.

 

kanhaiya-kumar-jnu-reuters-inmarathi
theweek.in

देशविरोधी गतीविधी करणाऱ्या आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अश्या घोषणा दिल्या जात आहेत, याची माहिती तिथल्या अभाविप कार्यकर्त्यांच्या कानावर पडली.

त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि देशभक्तीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली आणि तिकडे देशविरोधी नारे देणाऱ्या लोकांच्या चित्रफिती काढण्यास सुरुवात केली.

ह्या चित्रफिती काही क्षणात मीडियात पसरल्या व देशभर खळबळ उडाली की देशाच्या एका प्रतिष्ठित विद्यापिठात देशविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. ह्या प्रकरणाने देश ढवळून निघाला.

ह्या घोषणा देणाऱ्यात प्रमुख नाव होतं कन्हैया कुमार, उमर खालिद, शेहला रशीद, अनिरबन भट्टाचार्य इत्यादी जेएनयुमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं. ह्यांच्यापैकी कन्हैया कुमार हा त्या जेएनयु छात्रसंघाचा ( JNUSU) अध्यक्ष होता.

हे व्हिडिओ मीडियात व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ह्यांना अटक केली आणि जेलमध्ये टाकले. यांच्या विरोधात असलेले पुरावे अभाविपने पोलिसांना सुपूर्द केले.

पोलिसांनी ह्या प्रकरणी आरोपपत्र मात्र दाखल केले नाही. पुराव्यांची सत्यता तपासायचे कारण देण्यात आले.

कारण ज्यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते त्यांनी ह्यात आपला सहभाग नव्हता अशी भूमिका कोर्टापुढे मांडली व देण्यात आलेले पुरावे हे खोटे असल्याचा दावा केला.

 

kanhaiya-kumar-jnu_inmarathi
khabar.ndtv.com

दिल्ली पोलिसांनीही ह्या प्रकरणी दिरंगाई केली. तसेच न्यायपालिकेने ह्या प्रकरणात चार्जशिट नसल्याने सुनावणी करण्यास नकार दिला. परिणामत: आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली.

दरम्यानच्या काळात पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला व पुराव्यांची सत्यता तपासली. पण ह्या सर्वात मोठा कालावधी गेला.

अखेरीस आज तब्बल तीन वर्षांनंतर जेएनयुमधील देशविरोधी नारे देणाऱ्यात हे आरोपी असल्याचे सबळ पुरावे पोलिसांचा हाती लागले आणि त्यांनी १४ जानेवारीला १० जणांविरोधात १२०० पानी आरोपपत्र दाखल केले.

आता ह्यामुळे कोर्टाला ह्या लोकांच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू करता येणार आहे.

पण ह्या सर्व प्रकरणात झालेल्या दिरंगाईमुळे आज बऱ्याच गोष्टीत बदल झाला आहे. ज्या लोकांनी विद्यापीठात देशविरोधी नारे दिले आज त्यांचं देशभरात एक युवा नेते म्हणून चित्र रंगवण्यात आलं आहे.

त्यांना मोठ मोठ्या राजकीय व्यसपीठांवर चर्चेसाठी आमंत्रण दिलं गेलं आहे.

 

kanhaiya-indiatoday-inmarathi
indiatoday.in

ते कसे निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातून, समाज माध्यमातून त्यांच्यासाठी सहानुभूती निर्माण करायचं काम करण्यात आलं आहे.

याउलट ज्या अभाविप कार्यकर्त्यांनी हे सर्व प्रकरण बाहेर आणलं त्यांनाच या देशात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं.

माध्यमांतून अभाविप ही संघटना खोटं बोलत आहे, असे आरोप करण्यात आले. सोबतच अभाविप विद्यार्थ्यांचा आवाज दाबत आहे, असा देखील आरोप करण्यात आला.

अतिरेकाची सीमा म्हणजे अभाविपनेच देशद्रोही नारे दिल्याची बतावणी करण्यात आली. भारतातील प्रमुख विरोधी पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी देखील अभाविपला ह्या प्रकरणात दोषी ठरवलं.

त्यांनी अभाविप संघाचा अजेंडा राबवत मोदी सरकारच्या विरोधात असलेल्या विद्यार्थ्यांचा आवाज दाबून टाकत आहे, असा आरोप करण्यात आला.

यावेळी सर्वच नेत्यांनी ह्या आरोपी असलेल्या विद्यार्थ्यांची तळी उचलून धरली. परंतु इतकं सर्व असतानाही अभाविपचा संघर्ष हा सुरूच होता. अभाविपला त्यानंतर जेएनयुमध्ये प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला.

 

abvp-jnu-inmarathi
indiatoday.in

बऱ्याचदा अभाविपने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हिंसक विरोध करण्यात आला. अभाविप कार्यकर्त्यांना मारहाण देखील करण्यात आली. परंतु मीडियाने याची दखल घेतली नाही.

अभाविपला ह्या विद्यापीठात असहिष्णू वागणूक तिथल्या तमाम डाव्या संघटनांनी दिली. परंतू जेएनयुमधले अभाविप कार्यकर्ते न डगमगता संघर्ष करत राहिले.

जेएनयु मधील सामान्य विद्यार्थी हे सर्व बघत होता आणि त्याचे परिणाम छात्र संघाच्या  निवडणुकीत दिसून आले.

अभाविपला मोठा जनाधार मिळाला, ज्याचा परिणाम असा झाला की ह्याचा धसका घेत तमाम डाव्या संघटनांनी युती केली.

आज अभाविप जेएनयुमध्ये वोट परसेंटमध्ये सिंगल लार्जेस्ट स्टुडंट ऑर्गनाईजेशन बनली आहे. जरी विजय हा डाव्या संघटनांच्या युतीचा असला तरी अभाविपच्या दमदार कामगिरीचा त्यांच्यावर निश्चित परिणाम झाला होता.

 

abvp-left-inmarathi
indiatoday.in

आज जेव्हा पोलिसांनी या १० लोकांविरोधात आरोप पत्र दाखल केले. तेव्हा जेएनयुच्या प्रत्येक अभाविप कार्यकर्त्यांचा तोंडावर आनंद ओसंडून वाहत होता.

अखेरीस राष्ट्रीय स्तरापासून कॅम्पसपर्यंत प्रत्येक ठिकाणी होणारा विरोध पचवून अभाविपचा संघर्ष यशस्वी झाला आहे.

ह्या सर्व प्रकरणात अभाविप जी देशविरोधी नारे देणाऱ्यांचा विरोध करत होती तिच्यावरच आरोप करण्यात आले आणि ज्यांनी ते नारे दिले त्यांचा बचाव करण्यात आला, ह्यात मीडियाचा मोठा हात आहे.

पण आज सत्य समोर आलं आहे आणि स्वतःला लोकशाहीवादी, संविधानवादी म्हणवून घेणाऱ्याचा राष्ट्रविरोधी चेहरा उघडकीस पडला आहे.

आता ह्या प्रकरणी कोर्ट काय निर्णय घेणार बघण्यासारखं ठरणार आहे.

तूर्तास अभाविपचा संघर्ष यशस्वी झाला असून सत्य जगासमोर आलं आहे. सोबतच ह्याचं समर्थन करणारे मीडिया व विरोधी पक्ष नेते उघडे पडले आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?