' महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांचं भविष्य बदलतंय! “समृद्धी”चा महामार्ग येतोय!!! – InMarathi

महाराष्ट्रातल्या २४ जिल्ह्यांचं भविष्य बदलतंय! “समृद्धी”चा महामार्ग येतोय!!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक : रुपेश पाटील 

===

महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातली एक व्यक्ती अन ठाणे जिल्ह्यातली एक व्यक्ती यांना उपलब्ध असलेल्या प्रगतीच्या संधी, रोजगाराच्या संधी, उपलब्ध सोयीसुविधा याबाबतीत आपण तुलना केली तर काय समोर येईल? यातल्या हिंगोलीच्या व्यक्तीला संधींची अतिशय वानवा असल्याचा निष्कर्ष निघेल.

हे उदाहरण सांगण्याचे कारण म्हणजे आज महाराष्ट्र हे देशातील तुलनात्मकदृष्ट्या विकसित राज्य आहे असे म्हटले जात असले तरी विकासाचा असमतोल हा खूप मोठा आहे.

उद्योगधंदे, रोजगार व आर्थिक सुबत्ता मोठ्या प्रमाणात मुंबई-पुणे क्षेत्रात केंद्रित झालेल्या आहेत. आजवर ही दरी भरून काढण्याचे म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत किंवा झाले असतील पण त्याचे सकारात्मक परिणाम काही समोर आले नाहीत असे म्हणूया.

त्यामुळेच विदर्भाचा अनुशेष, मराठवाड्याचे मागासलेपण, खान्देशचा स्तब्ध झालेला विकास ही परिस्थिती आज आहे.

 

vidarbha-inmarathi
lokmat.com

महाराष्ट्राच्या मागील सरकारचे मत असे होते  कि पायाभूत सुविधांचा विकास झाला तर आपोआप प्रगतीच्या संधी वाढतात.

अन यातूनच सरकारने घात घातलाय एका नव्या प्रकल्पाचा, तो म्हणजे समृद्धी महामार्ग!

काय आहे समृद्धी महामार्ग :

मुख्यमंत्री फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला प्रकल्प म्हणजेच ‘नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे’ किंवा ‘समृद्धी महामार्ग’. जगातील एक प्रमुख आर्थिक केंद्र असलेली राज्याची राजधानी मुंबई व देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेली उपराजधानी नागपूर यांच्यातील ७०० किलोमीटरचे अंतर कापणे अतिशय वेगवान व प्रगतरित्या शक्य व्हावे म्हणून हा प्रकल्प शासनाने २०१५ मध्ये हाती घेतला.

थक्क करणारी गोष्ट अशी आहे की प्रचंड विरोध व टीका होऊनही फक्त साडेतीन वर्षात सरकारने ७०० किमी लांबीच्या या आठपदरी महामार्गाचे ९० टक्क्याहून अधिक भूसंपादन पूर्ण केले आहे.

इतक्या मोठ्या विस्तृत क्षेत्रावरील भूसंपादन इतक्या वेगाने पूर्ण होणारा अलीकडचा हा एकमेव प्रकल्प असावा, कारण आपल्याकडे भूसंपादन अन त्यामुळे होणारे वाद व प्रकल्पाला होणारा उशीर किंवा प्रकल्प पूर्णपणे गुंडाळले जाणे हे काही नवीन नाही.

कोणते जिल्हे समृद्धी महामार्गाच्या क्षेत्रात येतात? :

महामार्ग जाणारे १० जिल्हे-

नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक, ठाणे.

 

samruddhi-inmarathi
Hitavada

लगतचे जोडले जाणारे १४ जिल्हे –

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर, रायगड.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?

हा प्रकल्प ग्रीनफिल्ड म्हणजे पूर्णपणे नव्याने विकसित होत असलेला प्रकल्प आहे.

वेगमर्यादा १५० किमी प्रतितास असलेल्या या महामार्गावरून मुंबई ते नागपूर हे अंतर ८ तासात कापले जाईल.

मुंबई ते औरंगाबाद व औरंगाबाद ते नागपूर हे अंतर प्रत्येकी ४ तासात कापले जाईल. हा द्रुतगती महामार्ग ७०० कि.मी. लांबीचा असेल आणि १० जिल्ह्यांतील २६ तालुक्यांना आणि ३९२ गावांना थेट जोडेल.

या महामार्गामुळे अनेक औद्योगिक क्षेत्रं एकमेकांशी जोडली जाणार आहेत.

जसे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर (डीएमआयसी), वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डब्ल्यूडीएफसी), वर्धा व जालना येथील ड्राय पोर्ट आणि मुंबईचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे बंदर ही सर्व ठिकाणं एकमेकांना जोडली जातील.

 

corridord-inmarathi
99Acres

यात समाविष्ट २४ जिल्हे मुंबईतील JNPT सारख्या देशातल्या एका सर्वात मोठ्या मालवाहू बंदराशीही जोडले जातील. यामुळे राज्याच्या आयात-निर्यातीमध्ये वाढ होईल.

या द्रुतगती महामार्गालगत असलेली महत्त्वाची पर्यटन स्थळंही जोडली जाणार आहेत, ज्यात पेंच, ताडोबा, सेवाग्राम, शेगाव, लोणार, अजिंठा, वेरूळ, शिर्डी यांचा समावेश आहे. म्हणजे हा पर्यटन महामार्गही होणार आहे.

पूर्णपणे वायफाय सुसज्ज असलेला हा द्रुतगती महामार्ग ‘शून्य अपघात महामार्ग’ असेल.

यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यानी नजर ठेवली जाईल आणि प्रत्येक ५ कि.मी वर दूरध्वनी सेवा असेल, ज्यामुळे जर अपघात झालाच तर किंवा इतर निकडीच्या प्रसंगांमध्ये परिस्थितीची सूचना लवकरात लवकर देता येऊ शकेल.

समृद्धी महामार्गाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ‘कृषी समृद्धी केंद्रे किंवा नव-नगरे’. या वैशिष्ट्यामुळेच हा प्रकल्प म्हणजे केवळ महामार्ग नव्हे तर राज्याच्या समृद्धीत भर घालू शकणारा अतिमहत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.

 

samruddhi-mahamarg-inmarathi
youtube.com

तर जाणून घेऊया या मुद्द्याविषयी-

काय आहेत कृषी समृद्धी केंद्रे ?

सरकारने असे ठरविले आहे कि या महामार्गावर पूर्णतः नवी २० पेक्षा जास्त शहरे (Greenfield Cities) वसवायाची. ज्यांना कृषी समृद्धी केंद्र किंवा नवनगर म्हटले जाईल.

या द्रुतगती मार्गास जिथे इतर राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग छेदतील तिथे ही कृषी समृद्धी केंद्रं विकसित केली जाणार आहेत.

अशा दोन नगरांमधलं सरासरी अंतर ३० कि.मी. असणार आहे. केंद्रामध्ये शेतीवर आधारित अन्न व फळ प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य असेल आणि त्याशिवाय तिथे अन्य उत्पादन आणि व्यापार केंद्रही असेल.

याबरोबरच इथे सर्व मूलभूत सोयीसुविधांसकट रहिवासी क्षेत्र देखील असेल. आधुनिक नगररचनेच्या नियमांनुसार इथले जमीन वापराचे प्रमाण ठरविले जाईल.

प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र, त्या त्या भागात व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करेल. यामुळे विकासाला चालना मिळेल आणि विविध प्रकारच्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यामुळे स्थानिकांना कौशल्य विकासाची संधी मिळेल.

यामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या विविध संधी निर्माण होतील व ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर थांबवता येईल.

 

roads-inmarathi
deccanchronicle.com

आता या लेखाचा शेवटचा अन अतिमहत्त्वाचा मुद्दा:

समृद्धी महामार्ग तुमचं भविष्य कसं बदलू शकतो?

यशस्वी ते होतात ज्यांना काळाची पावलं इतरांच्या आधी ओळखता येतात. जगात अफाट वेगाने बदल घडत असतात मात्र जे या बदलांना अचूक ओळखतात त्यांना काळावर आपला ठसा उमटवता येतो.

आपण ९९ टक्के मध्यमवर्गीय लोक बऱ्याचदा आपल्या मोठ्या क्षमतांना न ओळखता आपली गुजराण होण्याइतपत नोकरीत स्वतःला गुंतवून घेतो अन आयुष्यभर तेच करत राहतो.

काही मित्र/ मैत्रिणी तर सरकारी नोकरीच असावी म्हणून ७-८ वर्ष स्पर्धापरीक्षा तयारी करण्यात घालवतात. पण खरच त्यासाठी इतके प्रयत्न करणे worth आहे का? मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आपण फक्त ऐकतो अन वाचतो पण आपण रिस्क घेत नाही.

लहानसा का होईना पण स्वतःचा काही उद्योग व्यवसाय करण्याकडे आपला कल नसतो.

मात्र एखाद्या इंजिनियरने चहाचे दुकान सुरु करून स्वताचा brand बनविल्याची आणि तत्सम उदाहरणेही कानावर येतात.

समृद्धी महामार्ग हि म्हणूनच आपण संधी मानायला हवी. आता त्यासाठी ‘माझ्याकडे जमीन नाही’, ‘मोठे भांडवल नाही’ अशी कारणे पुढे करू नकाच, कारण योग्य क्षमता असणाऱ्याला कर्ज देण्यासाठी बँका कधीही तयार असतात.

 

Bank customer rights.marathipizza
pbs.twimg.com

सर्वात पहिले म्हणजे तुम्ही जर शेती करत असाल आणि पारंपारिक पिकापेक्षा तुम्हाला काही वेगळे पिक घेऊन ते थेट मुंबईच्या mall मध्ये विकायचे आहे (पुण्याजवळचे अनेक शेतकरी mall सोबत करार करून हव्या त्या भावात आपला माल विकतात. त्यांच्या प्रमाणेच आता मार्केट तुम्हालाही जवळ येणार आहे.) किंवा शेतमाल JNPT बंदरातून निर्यात करायचा आहे तर ते आता अधिक सोपे होणार आहे.

पाहिजे फक्त इच्छाशक्ती अन ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा. आणि अमर्याद इंटरनेट, युट्यूब, गुगल आज सर्वांनाच उपलब्ध आहे.

सरकारच्या प्लान नुसार या महामार्गावर दर ५ किमी अंतरावर फूडजंक्शन असणार आहेत, इथेही व्यवसायाच्या अनेक संधी असणार आहेत.

उद्योग, व्यापार, पर्यटन अशा सर्व बाबींच्या निमित्ताने समृद्धी महामार्गावरून मोठ्या लोकसंख्येची ये जा असणार आहे त्यामुळे याच्या आजूबाजूला अनेक व्यवसाय वाढू शकतात.

शेवटची महत्वाची संधी म्हणजे पूर्णपणे नव्याने निर्माण होणारी कृषी समृद्धी केंद्रे!

या नव्याने विकसित होणाऱ्या मिनी शहरांमध्ये सरकार सर्व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे. शेती आधारित व्यवसाय, उद्योगांना चालना इथे मिळणार आहे. अन्न प्रक्रिया उद्योग (Food Processing Industry) हि सध्या चलती असणारी आणि ज्यात कधीच मंदी येत नाही अशी इंडस्ट्री आहे. सरकारचाही यावर खूप भर आहे.

 

food-inmarathi

 

या उद्योगांना सरकार अनेक सवलती आणि सबसिडी सुद्धा देते. अशा एखाद्या लहान उद्योगाचाही विचार करायला हरकत नाही.

आता तुम्ही आम्हाला कदाचित म्हणाल कि प्रकल्प अजून खूप लांब असताना तुम्ही खूपच स्वप्नरंजन नाही करत आहात का?

एकाच वेळी १६ वेगवेगळ्या ठिकाणाहून काम सुरु करण्याच्या ऑर्डर्स कंत्राटदारांना दिल्या गेल्या आहेत. भूसंपादन जवळपास पूर्ण झाले असल्याने आणि काम सुरु झाल्याने पुढे हेच सरकार राहिले किंवा बदलले तरी फरक पडण्याची शक्यता कमी आहे.

निदान सकारात्मक राहून आपले ध्येय ठरवून त्या दृष्टीने विचार करायला तरी काय हरकत आहे?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?