' राजीव-सोनियांच्या लग्नानंतर “चारच” महिन्यांत राहुलचा जन्म : निवडणूक आली, फेक न्यूज बहरली – InMarathi

राजीव-सोनियांच्या लग्नानंतर “चारच” महिन्यांत राहुलचा जन्म : निवडणूक आली, फेक न्यूज बहरली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

निवडणुका जवळ आल्या की पक्ष कार्यकर्ते जोमाने प्रचाराच्या कामाला  लागतात. ह्यातील काही कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या प्रचाराचे काम करतात तर काहींना दुसऱ्या पक्षाच्या अपप्रचाराचे काम दिले गेलेले असते.

त्यामुळे काहीही करून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या नावावर काहीही खपवून त्यांची बदनामी करायची ह्या उद्देशाने अनेक खोट्या बातम्या, किस्से पसरवले जातात.

अशीच एक बातमी सध्या सगळीकडे पसरली आहे. ती म्हणजे राजीव गांधी व सोनिया गांधी ह्यांच्या लग्नानंतर चारच महिन्यांत राहुल गांधी ह्यांचा जन्म झाला असा मेसेज सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. ह्या मेसेजमध्ये असे दिले आहे की,

“हे संपूर्ण कुटुंबच घोटाळेबाज आहे! राजीव गांधी व सोनिया ह्यांचा २५ फेब्रुवारी १९६८ रोजी विवाह झाला व केवळ चार महिन्यांच्या आतच म्हणजे १३ जून १९६८ रोजी राहुल गांधी ह्यांचा जन्म झाला, असे कसे झाले बरं ?”

 

fake-news-inmarathi

 

काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा मेसेज मुद्दाम व्हायरल केला आहे अशी कुजबुज आहे. अनेक सोशल मीडिया पेजेसवर हा मेसेज सध्या बघायला मिळतो आहे.

राजीव गांधी व सोनिया ह्यांचा विवाह २५ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला हे सत्य आहे. हे दोघे एकमेकांना १९५६ साली भेटले तेव्हा सोनिया केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेत होत्या. दोघेही एकमेकांना आवडले आणि नंतर दोन्ही कुटुंबांच्या परवानगीने ह्या दोघांचा विवाह झाला.

लग्नानंतर दोन वर्षांनी सोनिया ह्यांनी १९ जून १९७० रोजी पहिल्या अपत्यास जन्म दिला. हे अपत्य म्हणजे राहुल गांधी आहेत.

त्यानंतर दोन वर्षांनी १२ जानेवारी १९७२ रोजी सोनिया ह्यांनी कन्यारत्नास जन्म दिला व त्या कन्यारत्नास आपण प्रियांका गांधी म्हणून ओळखतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचे तर ही बातमी म्हणजे बदनामी करण्याच्या दृष्टीने पसरवलेली निव्वळ एक अफवा आहे.

 

fake-news-inmarathi

 

राजकारणात शह -काटशह ,धूर्त डावपेच चालतातच. आणि निवडणुका जवळ आल्या की एकमेकांना पराजित करण्याच्या दृष्टीने अनेक डावपेच रचले जातात. अर्थात हा राजकारणाचा एक भाग आहे.

परंतु ह्या सर्व भानगडीत एकमेकांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण आहे. विरोध करण्यात काहीच चूक नाही, परंतु विरोधाच्या नावाखाली एकमेकांच्या बाबतीत असली घाणेरडे  राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे.

एखाद्याच्या चारित्र्यावर बोट ठेवून त्याला खाली पाडणे म्हणजे सद्सद्विवेकबुद्धीचा पराभव आहे.

ह्या पोस्टमध्ये असे सिद्ध करण्याचा प्रयत्न होतो आहे की  सोनिया गांधी ह्या लग्नापूर्वीच गर्भवती होत्या म्हणूनच लग्नानंतर चारच महिन्यात राहुल गांधींचा जन्म झाला. म्हणजेच राजीव व सोनिया गांधी ह्यांनी अनैतिक कृत्य केले.

 

fake-news-inmarathi

 

अशी खोटी बातमी व्हायरल करून एखाद्याला काय मिळते? अनेक लोक गुगल सर्च करून सत्य पडताळून बघू शकतात पण अनेक लोक मात्र शहानिशा न करता वाटेल ते पुढे फॉरवर्ड करून मोकळे होतात. म्हणूनच hoax  इतके झटपट पसरतात.

अज्ञान किंवा शहानिशा न करण्याचा आळस ह्या दोन गोष्टी खोट्या बातम्या व्हायरल होण्यास कारणीभूत आहेत.

व्हायरल करणाऱ्याला माहित असते की बहुसंख्य लोक सत्य पडताळून बघत नाहीत व इथेच त्यांचा विजय होतो.

हे लोक टेक्नोसॅव्ही तर झाले आहेत. परंतु एखाद्या गोष्टीचा चांगला उपयोग करण्यासाठी जी सद्सद्विवेकबुद्धी किंवा सध्या शब्दात बोलायचे झाल्यास जी अक्कल लागते, ती लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या या अज्ञानी लोकांना अजूनही आलेली नाही.

हे असे लोक आपल्या आयफोन एक्सआर वरील आयओएस 12 वापरून दूध पिणाऱ्या गणपतीचीची बातमी किंवा हा ११ लोकांना पाठवा नाहीतर तुमच्या आयुष्यात काहीतरी भयानक वाईट घडेल अशा स्वरूपाचे मेसेज फॉरवर्ड करतात.

टेक्नॉलॉजीचा उपयोग खोट्या बातम्या पसरवण्यासाठी करतात. लोक लेटेस्ट गॅजेट्स वापरून सोशल मीडिया वापरणे शिकले आहे परंतु खऱ्या खऱ्या खोट्याची शहानिशा करायला अजूनही शिकले नाहीत. फक्त “वन क्लिक अवे असलेले” गुगल सर्च करून सत्य पडताळून बघणे इतके कठीण किंवा कष्टाचे काम आहे का?

एखाद्याने त्याच्या खाजगी आयुष्यात कोणावर प्रेम करावे आणि केव्हा लग्न करावे हे ठरवण्याचा अधिकार तिसऱ्या व्यक्तीला नाही. आणि जन्मावरून एखाद्याला कमी लेखणे, द्वेष करणे चुकीचे आहे.

 

fake-news-inmarathi

 

एखादे मूल जन्माला येते तेव्हा त्यात त्याची काहीच चूक नसते. मूल नैतिक/अनैतिक नसते.

आणि जर एखाद्याला परस्परसंमतीने अपत्य जन्माला घालायचे असेल तर त्यात तिसऱ्या व्यक्तीने लग्न हा विषय मध्ये आणू नये. लग्न न करता मूल जन्माला येणे हा भारतात गंभीर अपराध समजला जातो पण इतर देशांत ही अतिशय कॉमन गोष्ट आहे.

अनेक जोडपी लिव्ह इन मध्ये राहून अपत्य जन्माला घालायचा निर्णय घेतात आणि त्यांना वाटेल तेव्हा लग्न करतात किंवा करतही नाहीत. आपल्याकडे समाजाने आखून दिलेल्या काही चौकटी आहेत. त्या मोडल्या गेल्या की गजहब  होतो.

आम्ही लग्नाआधी मूल  होणे किंवा लग्न न करता मुलं  जन्माला घालणे हे चांगले किंवा वाईट असे म्हणत नाही. त्या वादात पडायचेही नाही.

परंतु खोट्या बातम्या पसरवून राजकारणाच्या नावाखाली एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे मात्र शंभर टक्के चुकीचे आहे. आणि जे चूक आहे ते कुणीही केले तरी चूकच आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?