मासिक पाळीच्या वेदना सुसह्य करणारे १० अत्यंत सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
स्त्रियांसाठी पाळीच्या वेदना हा काही नवीन विषय नाही.
पाळीच्या ५ दिवसात खरे तर शरीराला आरामाची नितांत गरज असते. पण ह्या धावपळीच्या युगात तेही अवघडच आहे. शाळा, कॉलेजात जात असणाऱ्या मुलींना किंवा नोकरदार महिलांना अजिबात आराम नसतो.
नोकरी करणाऱ्या महिला यासाठी सुट्टी काढून घरात आराम करण्यासाठी बसू शकत नाहीत.
काही जणी म्हणतात पूर्वी महिन्याचे ते ४-५ दिवस बाजूला बसवायचे तेव्हा आराम होता. पण तेही खरे नाही. कारण बाजूला बसले किंवा दुसऱ्या खोलीत राहिले तरीही धान्य निवडणे, कपडे गोधड्यांची शिलाई करणे अशी काही बाही कामं करून घेतली जात असत.
त्यामुळे घरात असलेल्या स्त्रीला सुद्धा म्हणावा तसा आराम नाहीच मिळत.
विश्रांती घेता येत नसली तरी पाळीच्या वेळी होणारा त्रास आपण जरा कमी करू शकतो.
मेडिकल मध्ये मिळणारे अँटीबायोटिक हाच पर्याय सहसा निवडला जातो. पण तात्पुरते बरे वाटले तरी त्याचे दुष्परिणाम नक्कीच असतात.

त्यापेक्षा आजीच्या बटव्यातून आलेले काही घरगुती उपाय आपण पाहुयात. ज्यांनी तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.
१. खास तेलाने मालिश:
संशोधकांनी तेल मालिश ने पाळीचा त्रास कमी होतो हे सिद्ध केले आहे.
हे खास तेल म्हणजे झाडांच्या काही भागांचा अर्क असतो. हे अर्क असलेले तेल आपल्या घरात नेहमीच्या वापरातल्या तेलात मिसळून मग लावणे योग्य.
पाळीच्या वेळी ओटीपोटाला कोमट तेलाने हलक्या हाताने मालिश करावी. ओटीपोट, कंबर आणि मागची बाजू अशा सगळ्या बाजूने मालिश केले तर शरीराचे काही पॉईंट्स दाबले जातात. ऍक्युप्रेशर प्रमाणे ह्याचा उपयोग होतो.
खालील व्हीडिओ पाहिल्यास तुम्हाला स्वतःचे स्वतः व्यवस्थित मालिश करता येईल.
२. गरम पाण्याच्या पिशवीचा शेक:
एखाद्या पेन किलर औषधाप्रमाणे गरम पाण्याचा पिशवीचा शेक काम करतो. तितक्याच वेळात दुखणे कमीही करतो.
ओटीपोटाचे, कंबरेचे स्नायू आकुंचन पावल्याने वेदना होतात. तो भाग शेकला गेला, त्याला हवी तितकी गर्मी मिळाली की ते आकुंचन पावलेले स्नायू परत पूर्ववत होतात.

गरम पाण्याची पिशवी नसल्यास एखादी काचेची किंवा जाड प्लास्टिक ची बाटली ही गरम पाणी भरून वापरल्यास चालते.
३. व्यायाम करणे:
खूप त्रास होत असताना व्यायाम करणे म्हणजे भलताच उपाय वाटत असला तरी काही वेळेला व्यायामाचा फायदा होतोच.
चालणे अथवा घरातील काम करणे ह्याने अंग मोकळे होते. अर्थात यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

व्यायाम केला तर हृदयाला जास्ती रक्तपुरवठा होतो. त्यामुळे एन्डोर्फीन नावाचे रसायन तयार होते जे पाळीच्या कळांना आणि ओटीपोटात उठणाऱ्या शूळांना कमी करते.
तसेही व्यायामाचा उपयोग सगळ्याच दृष्टीने शरीरास उत्तम असतो.
४. व्हिटॅमिन डी चे प्रमाण योग्य राखा:
व्हिटॅमिन डी ची कमतरता स्त्रियांच्या शरीरात असल्यास पाळीच्या ३-४ दिवस आधीही अंग दुखणे, पोटऱ्यामध्ये गोळा येणे, कंबर दुखणे असे त्रास होऊ शकतात.

त्यामुळे आहारातून व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर केल्यास फरक नक्कीच जाणवेल. कोवळी उन्हे देखील व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत आहेत.
५. काही अन्नपदार्थ टाळावेत:
काही अन्नपदार्थ पाळीच्या काळात टाळले तरीदेखील आपल्याला होणार त्रास टळू शकतो.
फॅटी अन्नपदार्थ, चहा कॉफी, खारट पदार्थ, कार्बन असलेली शीत पेये, दारू ह्या पदार्थांपासून दूरच असलेले उत्तम.

ह्या पदार्थांमुळे ‘ब्लोटिंग आणि वॉटर रिटेन्शन’ म्हणजेच पोटफुगी आणि जास्तीच पाणीसाठा असा त्रास पाळीच्या दरम्यान होतो.
६. काही अन्नपदार्थ सेवन करणे उपयुक्त:
अँटीटॉक्सिन, गॅस/पोटफुगी दूर करणारे, शरीराला ताजे तवाने करणारे पदार्थ आहारात सामील केल्यास पाळीचा त्रास अपण सुसह्य करू शकतो.

कॅमोमाईल टी किंवा हर्बल टी, बडीशोप, दालचिनी आलं, शेपू, इतर हिरव्या पालेभाज्या मांसाहारी असल्यास चिकन, मासे, अक्रोड, बदाम, पपई, केळी आणि पाणीदार फळे, ब्राउन राईसह्यांचा जेवणात समावेश नक्की करावा.
स्नायू आकुंचणे, मळमळणे, अशक्तपणा, अंगदुखी ह्यातून सुटकारा निश्चित.
७. भरपूर कोमट किंवा गरम पाणी पिणे:

गरम पाणी पिण्याची स्नायूंना आराम मिळतो. त्वचेला भरपूर रक्तपुरवठा होतो. शरीरातील पोटफुगी किंवा अतिरिक्त पाणीसाठा कमी करायचा असल्यास ५ गरम पाणी पीत राहणे उपयुक्त आहे.
८. गरम पाण्याची अंघोळ:
गरम पाणी जंतुनाशक असते. अशा पाण्यात अरोमॅंटिक एस्सेन्स म्हणजे सुगंधित द्रव्य घालून अंघोळ केल्यास प्रसन्न वाटते.

शरीर गरम पाण्याने शेकले गेले की स्नायू शिथिल होतात. पाठ, कंबर दुखी कमी होते.
९. मेथ्यांचे पाणी पिणे:
मेथीचे लाडू बाळंतिणीला आवर्जून देतात. कारण कंबरदुखी, अंगदुखी वर जालीम उपाय म्हणजे मेथ्यांचे दाणे. मासिक पाळीच्या दरम्यान ह्यांचे सेवन केल्यास सगळ्या वेदनांपासून आराम मिळतो.

मेथीचे दाणे १२ तास पाण्यात भिजवून ठेवावे आणि ते पाणी सकाळी पिऊन टाकावे. असे रोज ४-५ दिवस करावे. शरीरास आराम नक्की मिळेल.
१०. लहान बाळासारखी झोप घ्या:
पाळीमध्ये शरीरास वेदना होत असल्याने शरीरास विश्रांती देण्याचा सगळ्यात छान उपाय म्हणजे झोप घेणे. तीही अगदी लहान बाळासारखी. म्हणजे सगळ्या चिंता कटकटी बाजूला ठेऊन.
दिवसा एक दोन तास विश्रांती घेतली तर होणारा त्रास जाणवणार नाही.

रात्री सुद्धा पूर्ण ८ तास झोप होईल ह्याकडे लक्ष द्यावे.
बाजारात ‘नाईट लॉंग’ प्रकारचे मोठे सॅनिटरी नॅपकिन/पॅड उपलब्ध असतात. ते वापरून झोपल्यास रात्री झोपमोड करून ते बदलण्यासाठी उठावे लागत नाही. आणि छान विश्रांती मिळाली की शरीराला काम करायला शक्ती मिळते.
अति त्रास होत असल्यास डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा. पण नेहमीचाच त्रास आपण वरील काही उपायांनी कमी करू शकतो.
मासिक पाळीला पर्याय तर नाही पण ती सुकर करण्यास आपण नक्कीच अशी स्वतःची मदत करायला हवी. आणि अशा घरगुती उपायांमध्ये अपायकारक सुद्धा काहीही नाही..
मग पुढच्या वेळी हे उपाय नक्की करून पाहा आणि ते ५ दिवस आरामात घालवा..!!
—
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
अनमोल माहिती दिली आहे. त्यामुळे अज्ञान दूर होईल.