' गंभीर जखम झाल्यावर जखमीला पूर्णतः शुद्धीत ठेवण्यामागे हे महत्वाचं कारण आहे – InMarathi

गंभीर जखम झाल्यावर जखमीला पूर्णतः शुद्धीत ठेवण्यामागे हे महत्वाचं कारण आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अनेकदा आपण सिरियल्स किंवा सिनेमात बघतो की एखाद्या जखमी झालेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूची माणसे, किंवा पॅरामेडिक्सवाले लोक, हॉस्पिटलमधील उपचार करणारे लोक पूर्णपणे शुद्धीत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.

 

patient-inmarathi

 

“कम ऑन! स्टे विथ मी!” ,”डोळे बंद करू नकोस” असे बोलून किंवा विविध प्रश्न विचारून हे लोक जखमी व्यक्ती शुद्धीत राहील आणि रीस्पॉन्ड करत राहील ह्यासाठी प्रयत्न करतात. अर्थात सिनेमांमध्ये हे फक्त फिल्मी ड्रामासाठी व लोकांना इमोशनल करण्यासाठी करतात.

प्रत्यक्षात सुद्धा गंभीर जखमी व्यक्तीची शुद्ध न हरपू देण्याचे प्रयत्न करण्यात येतात. जितके शक्य होईल तितके जखमी व्यक्ती संपूर्ण शुद्धीत राहील ह्यासाठी प्रयत्न केले जातात. ह्याचे कारण काय असावे?

ह्या प्रश्नाचे उत्तर देताना न्यूयॉर्क येथील एका हॉस्पिटलमध्ये हेड ऑफ ट्रॉमा सर्जरी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर सौमित्र आर. इचेमपटी म्हणतात की,

“व्यक्ती जर गंभीर जखमी असेल तर भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव झालेला असतो. त्यामुळे शरीराचा रक्तदाब कमी होत जातो. अशावेळी जर ती व्यक्ती शुद्धीत असेल तर, बॉडीमधील केमिकल्स जास्त प्रमाणात स्रवतात आणि ह्याने रक्तदाब वाढण्यास किंवा कमी न होण्यास मदत होते. तणावाच्या प्रसंगी शरीरात झालेले हे बदल शरीराला त्या गंभीर परिस्थितीशी लढण्यास तयार करतात.”

ऍड्रेनलीन किंवा एपिनेफ्रिन हे हॉर्मोन्स प्रमुख catecholamines पैकी आहेत. Catecholamines म्हणजे सिम्पथेटीक मज्जातंतूंना चेतना देणाऱ्या हॉर्मोन्सचा एक प्रकार होय. हे हॉर्मोन्स ऍड्रिनल ग्रंथींतून स्रवतात. हे हॉर्मोन्स न्यूरोट्रान्स मीटर्सचे काम करतात.

 

harmones-inmarathi

 

तसेच दोन न्यूरॉन्समध्ये सिग्नल्स ट्रान्सफर करतात. हृदयाचे ठोके व श्वासाची गती ह्या महत्वाच्या शारीरिक क्रियांचे नियमन करतात. जेव्हा व्यक्ती शारीरिक किंवा मानसिक तणावाखाली असते तेव्हा सिम्पथेटीक नर्व्हस सिस्टीम आणि हायपोथॅलॅमसच्या स्टिम्युलेशन मुळे ऍड्रिनल मेड्युलामधून एपिनेफ्रिन किंवा ऍड्रिनलीन ह्या हॉर्मोन्सचे रक्तात स्रवण होते.

ही आपल्या शरीराची स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा (डिफेन्स मेकॅनिजम) आहे. ही सगळी रासायनिक क्रिया एका मिनिटाच्या आत घडते. ह्याने आपले शरीर एखाद्या तणावाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार होते.

व्यक्ती जर संपूर्ण शुद्धीत असेल तर ही रासायनिक क्रिया आपोआप घडते. त्यामुळे व्यक्तीचा रक्तदाब व हृदयाचे ठोके नियमित राहण्यास मदत होते. अशा गंभीर परिस्थितीत जर रक्तस्त्राव जास्त झाल्याने रक्तदाब कमी झाला तर अनेक अवयव निकामी होऊन मृत्यू ओढवू शकतो.

माणूस शुद्धीत राहिला तर त्याच्या शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत सुरु राहून संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरु राहतो. शरीराला इमर्जन्सी परिस्थितीशी दोन हात करण्याची शक्ती मिळते. म्हणूनच जखमी व्यक्ती शुद्धीत राहणे अतिशय आवश्यक आहे.

तसेच ह्याचे दुसरे कारण म्हणजे शुद्धीत राहिल्याने व्यक्तीच्या श्वसनाच्या मार्गाचे संरक्षण होते व श्वसनाचा मार्ग सुरळीत सुरु राहतो. ऍस्पिरेशन होण्यास प्रतिबंध होतो. ऍस्पिरेशन म्हणजे श्वसनाच्या मार्गिकेत अडथळा निर्माण होतो.

 

soldier-inmarathi

 

कधी कधी हे शरीरातील फ्लुईड्स श्वसनलिकेत किंवा फुफ्फुसांत अडकल्याने किंवा ब्रीदिंग फ्ल्यूईड्स फुफ्फुसांत गेल्याने किंवा फॉरेन बॉडीज फुफ्फुसांत गेल्याने श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो.

श्वास घेता न आल्याने गुदमरून पेशण्टचा मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच जखमी व्यक्ती शुद्धीत असणे आवश्यक आहे.

===

हे ही वाचा –  रेल्वे अपघात ७५% नी कमी करणारा रेल्वे प्रशासनाचा “वडाळा प्रयोग” !

===

तसेच जखमी व्यक्तीला शुद्धीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यामागे आणखी काही कारणे आहेत. जखमी व्यक्तीच्या आजूबाजूला त्याला उपचार मिळेपर्यंत जी सामान्य माणसे असतात (म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नसलेली) त्यांना ती जखमी व्यक्ती शुद्धीत आहे व बोलतेय ह्याने एक दिलासा मिळतो की ती व्यक्ती कोमात गेली नाहीये.

वैद्यकीय मदत मिळेपर्यंत सामान्य व्यक्ती फक्त जखमी व्यक्तीला शुद्धीत ठेवण्याचा प्रयत्न करणे इतकेच करू शकते. कारण ह्याने त्यांचा श्वसनमार्ग सुरळीत राहील व रक्तप्रवाह सुरु राहिल्याने शरीरातील महत्वाचे अवयव सुरक्षित राहतील.

तसेच संपूर्ण शुद्धीत असलेली व्यक्ती स्वतःच्या शरीरा संदर्भात सर्व माहिती डॉक्टरांना देऊ शकते.

जसे की स्वतःचे आजार, सुरु असलेली औषधे, एखाद्या गोष्टीची किंवा औषधाची ऍलर्जी, ऍक्सिडेंट कसा झाला, शरीराचा कुठला भाग जखमी झालाय, कुठे सर्वात जास्त दुखते आहे. मग उपचार करणे सोपे जाते व पटकन उपचार होऊ शकतात.

 

wounded-soldier-inmarathi

 

जर इंटर्नल इंज्युरी असेल तर शुद्धीत असलेल्या व्यक्तीवर उपचार करून त्यांना वाचवणे डॉक्टरांना सोपे जाते. कारण बऱ्याच महत्वाच्या गोष्टींची डॉक्टरांना रेडी माहिती मिळालेली असते .

तसेच उपचार सुरु करताना सर्वात आधी बेशुद्ध पेशन्टचा श्वसनाचा मार्ग डॉक्टरांना तपासावा लागतो तसेच जखमेवर सुद्धा त्याच वेळी उपचार करावे लागतात.

जर व्यक्ती शुद्धीत असेल तर डॉक्टरांना शंभर टक्के गॅरंटी असते की, ह्या व्यक्तीचा श्वसनाचा मार्ग सुरळीत आहे आणि ते महत्वाच्या व मोठ्या जखमेवर उपचार करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकतात.

तसेच डोक्याला जर मार लागला असेल त्या व्यक्तीच्या संज्ञानात्मक क्षमता (कॉग्निटिव्ह ऍबिलिटीज) उपचार मिळेपर्यंत हळू हळू कमी होऊ शकतात. कॉग्निटिव्ह ऍबिलिटीज म्हणजे ऐकणे, बोलणे, स्मरणशक्ती, लॉजिकल रिझनिंग ह्या असतात.

जर व्यक्ती शुद्धीत असेल तर तुम्ही तिच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेऊ शकता. डोक्याला मार लागला असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला तिच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठी व मेंदूतील क्रिया सुरळीत सुरु आहेत की नाही ह्याचा अंदाज लावण्यासाठी नाव, आजची तारीख, पत्ता असे साधे प्रश्न विचारू शकता.

जर जखमी व्यक्ती कमी तापमान असलेल्या ठिकाणी अडकली असेल तर शुद्धीत राहणे हे जिवंत राहण्यासाठी सर्वात आवश्यक असते. शुद्धीत राहिल्याने शरीराची हालचाल होते व शरीराचे तापमान कायम राहते.

 

saving-private-ryan-inmarathi

 

बेशुद्ध किंवा झोपलेल्या जखमी व्यक्तीला शारीरिक हालचाल न करता आल्याने शरीराचे तापमान कमी होऊन मृत्यू येऊ शकतो. म्हणूनच जखमी व्यक्ती शुद्धीत राहणे अतिशय आवश्यक आहे.

तसेच उपचार मिळेपर्यंत व्यक्ती शुद्धीत राहिली तर डॉक्टरांना व इतरांनाही ती व्यक्ती कोमात नेमकी केव्हा गेली हे कळू शकते व त्यानुसार ते त्यांच्या उपचारांची दिशा ठरवू शकतात. व्यक्ती जर बेशुद्ध असेल तर ती केव्हा कोमात गेली हे सांगणे कठीण असते.

तसेच व्यक्ती जर शुद्धीत असेल तर डॉक्टर त्या व्यक्तीला अनेक प्रश्न विचारून तिच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा अंदाज लावू शकतात. व्यक्तीच्या उत्तरांवरून व बोलण्याच्या पद्धतीवरून त्यांना अंदाज येऊ शकतो की इंज्युरी किती घातक आहे.

म्हणूनच पुढच्या वेळी तुमच्या आजूबाजूला जर कुणाचा अपघात झाला किंवा त्यांना कसलाही अटॅक आला तर उपचार मिळेपर्यंत पेशन्टला शुद्धीत ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी बोलत राहा, त्यांना झोपू देऊ नका. आणि त्यांना लवकरात लवकर उपचार मिळतील ह्यासाठी प्रयत्न करा.

===

हे ही वाचा – चिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने ऑलम्पिकमध्ये कमावलेले सिल्वर मेडल विकले !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?