ग्रेनेड लॉन्चर ते मशीन गन्स: शहरी नक्षलवाद्यांचा अंगावर काटा आणणारा पत्रव्यवहार
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
“दर वर्षी M ग्रेनेड लॉन्चर्स आणि ४ लाख राउंड्स पुरवण्यासाठी आम्हाला ८ कोटी रूपये हवेत. “बसंता” ही डील करून देणार आहे.”
“कॉम्रेड किसन आणि इतर काही कॉम्रेड्स नी मोदी राज संपवण्याचा एक प्लॅन सुचवला आहे. राजीव गांधी प्रकारच्या घटनेद्वारे.”
“आम्ही नेपाळच्या “सप्लायर्स” च्या संपर्कात आहोत. आपले मणिपूरचे कॉम्रेड ह्यात मदत करू शकतील.
पण फक्त “VV” लाच त्यांच्याशी संपर्क करण्याची ऑथॉरिटी आहे. आपण आपलं काम जलद गतीने करायला हवं आणि सर्व सामुग्री ऑन ग्राऊंड आणायला हवी. आपण वेगवेगळ्या राज्यांत डझन डझन कॉम्रेड्स ना एनकॉउंटर मधून गमावत आहोत.”
“आणि हे वाढतच जाणार आहे. सुरेंद्र आणि VV, दोघांनाही असं वाटतं की शत्रूच्या फोर्सेसवर जोरदार आक्रमण करण्याची तातडीची गरज आहे. जे आपण २०१३ च्या दरभा हल्ल्यानंतर कधीच करू शकलो नाही आहोत.
मी ह्या पॅकेज बरोबर सध्या उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीचा कॅटलॉग पाठवत आहे.”
===
हे कम्युनिकेशन आहे रोना विल्सनचं. कॉम्रेड प्रकाशसोबत केलेलं. ३० जुलै २०१७ चं.

हा कॉम्रेड प्रकाश कोण?
२००९ साली केंद्र सरकारने “अतिरेकी संघटना” म्हणून बंदी घातलेल्या CPI (Maoist) ह्या संघटनेच्या अध्यक्ष, गणपती, आणि सेंट्रल कमिटीचा संपर्क प्रमुख. सर्व कम्युनिकेशन करण्याची जबाबदारी प्रकाशची असते.
वरील संभाषणाच्या तिसऱ्या तुकड्यात उल्लेख असलेले सुरेंद्र आणि VV कोण? – सुरेंद्र गडलिंग आणि वरवरा राव.
आजच्या पुणे पोलिसांच्या पत्रकार परिषदेत हीच सगळी माहिती समोर ठेवली गेली आहे. हे चित्र समोर उभं राहिलं – आणि त्याचा परिणाम स्वरूप म्हणून दोन दिवसांपूर्वी देशव्यापी अटक सत्र घडून आलं.
आणि हो – जो “कॅटलॉग” पाठवला आहे, साधनसामुग्रीचा, त्यात काय आहे?
गरीब आदिवास्यांसाठी औषधं? पुस्तकं? कपडे? उत्पन्नाचं साधन म्हणून शिलाई मशिन्स वगैरे? नाही.
रशियन GM94 ग्रेनेड लॉन्चर.
चायनीझ QLZ 87 ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर.
मशीन गन.
कशासाठी बरं? दलितांना हक्क मिळवून देण्यासाठी? नाही.
मग?
तो जो “२०१३ चा दरभा हल्ला” चा संदर्भ आहे, तो काय आहे माहितीये?
छत्तीसगढ मधील सुकमा जिल्ह्यातील दरभा ह्या डोंगराळ भागात काँग्रेस नेत्यांच्या “परिवर्तन यात्रा”च्या एका मोठ्या चमूवर २५ मे २०१३ साली CPI माओइस्टस च्या सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला केला. जीवित हानी किती झाली? २८. एकूण २८ लोक मृत पावले.

सामुग्री ह्यासाठी हवीये.
पी चिदंबरमना आधीच ह्या अतिरेक्यांचा बंदोबस्त करायचा होता. बस्तरच्या अक्ख्या रेड कॉरिडॉरमध्ये “काऊंटर ऑफेन्सिव्ह” करायचं होतं. पण करता आलं नाही. विरोध झाला म्हणून.
कुणी केला विरोध?
दिग्विजय सिंग. आणि सोनिया गांधींना “काउन्सिल” करणाऱ्या नॅशनल ऍडव्हायजरी कमिटीच्या सदस्यांनी.
परिणामस्वरूप, पी चिदम्बरम काही करू शकले नाही आणि २८ जणांचे मुडदे पडले.
लक्षात घ्या, आपले पोलीस ह्या लोकांना नडलेत. तुषार दामगुडे, स्मिता गायकवाड सारखे निस्पृह लोक ह्यांच्याशी युद्धाची आघाडी उघडून बसलेत.
आपला देश ह्या लोकांच्या विळख्यात सापडू नये म्हणून हे सगळं चाललं आहे.
आपल्या पोलिसांवर केवढा मोठा मानसिक तणाव असेल कल्पना करा.
एकीकडे विविध राजकीय खेळी आहेत. दुसरीकडे अश्या तयारीचे माओवादी. तिसरीकडे – जरा कुठे एक पाऊल उचललं की धिंगाणा घालणारे, सर्वत्र पेरले गेलेले – पेरून ठेवलेले लोक. लोक, जे इतक्या महत्वपूर्ण जागा बळकावून बसले आहेत की कुणालाही सहज इन्फ्लुएन्स करू शकतील. कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करू शकतील.

आजच्याच पत्रकार परिषदेत “कोणती मुलं कुठे पाठवायची”, “TISS, JNU मधील लोक कोणकोणत्या कामांत वापरले जाणार आहेत” ह्याचा उल्लेख असणारं पत्र देखील वाचून दाखवण्यात आलं आहे. आंबेडकरी, विद्रोही, माहिती अधिकार, मानवाधिकार – सर्व प्रकारच्या कार्यकर्त्यांचं ब्रेन वॉश करून त्यांना वापरणे हेच बेसिक तत्व आहे ह्यांचं.
किती तयारी आहे बघा. वर जो दिगविजय सिंग आणि NAC चा उल्लेख केला, तो देखील दोषारोपण म्हणून अजिबात नाही. सहानुभूतीदार कुठवर आहेत ह्याची जाणीव असावी म्हणून.
हेच लोक, कार्यकर्ते मग “आपल्या” लोकांविरोधात काही कार्यवाही झाली की रस्त्यावर उतरतात. फ्लेक्स घेऊन. माईक घेऊन. आणि गगनभेदी गर्जना करतात.
अश्या वातावरणात आपली प्रतिष्ठा पणाला लावून काम करणाऱ्या पोलिसांच्या मनोधैऱ्याची कसोटी असते. आणि कसोटी असते आपल्या मॅच्युरिटीची.
लक्षात घ्या, हा प्रश्न राजकीय पक्ष, उजवे-डावे, पुरोगामी-प्रतिगामी हा नाहीच. हा प्रश्न आहे व्यवस्थेचा.

लोकशाही प्रक्रियेद्वारे निर्माण झालेल्या आणि लोकशाही प्रक्रियेवरच उभ्या असलेल्या व्यवस्थेच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे.
भारतात लाख समस्या आहेत. आम्हाला त्यांची जाणीव आहे. पण घरात कटकट आहे म्हणून आम्ही घराला आग लावणार नाही आहोत.
घर सुधारायचं आहे, पक्कं करायचं आहे की जाळायचं आहे – हे आपलं आपल्यालाच, स्वतःच स्वतःला विचारायची वेळ आहे ही.
भारताचं वर्तमान आपल्या समोर आहे. भविष्य कसं असावं हे ठरवण्याची वेळ आहे ही.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.