' तुमच्या नकळत “आधार फोन नंबर” मोबाईलमध्ये सेव्ह झालाय? हे असू शकतं पडद्यामागचं कारण – InMarathi

तुमच्या नकळत “आधार फोन नंबर” मोबाईलमध्ये सेव्ह झालाय? हे असू शकतं पडद्यामागचं कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – अनय जोगळेकर

दोन वर्षांपुर्वी आपल्या मोबाइलवरUIDAI चा क्रमांक सेव्ह झाल्याचा ट्रेंड सुरू झाला. सुरूवातीला वाटले होते की, केवळ अ‍ॅंड्रॉइड फोनबाबत असे झाले आहे.

पण नंतर लक्षात आले की, आयफोन वापरणाऱ्या काही लोकांच्या मोबाइलमध्येही हा क्रमांक आहे.

आधार क्रमांक नसलेल्याही काही लोकांच्या फोन बुकमध्ये हा क्रमांक आहे. माझ्या स्वतःच्या तसेच वडिलांच्या फोनमध्येही हा क्रमांक सेव झालेला आढळल्याने मलाही धक्का बसला.

शेजाऱ्यांकडे एमटीएनएल डॉल्फिन फोन आहे. त्यांच्याकडे मात्र हा क्रमांक नाही. 

फ्रेंच सायबर सुरक्षा तज्ञ एलियट अ‍ॅंडरसेनने २ ऑगस्टच्या मध्यरात्री याबाबत UIDAI ला ट्विट करुन प्रश्न विचारला. काही ट्विटर हॅंडलनी त्याला उत्तर दिले की, हा क्रमांक वैध नाही.

३ ऑगस्टला दुपारी २.५७ वाजता UIDAI ने ट्विट करून त्याला उत्तर दिले की,

आम्ही कोणत्याही मोबाइल फोन उत्पादकाला किंवा सेवा पुरवणाऱ्या कंपनीला असे करायला सांगितले नाही. काही हितसंबंध गुंतलेले लोक असे करून लोकांमध्ये अकारण गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 १८००३००१९४७ हा टोल फ्री क्रमांक चुकीचा असून गेली दोन वर्षं केवळ १९४७ हा क्रमांक वैध आहे. 

यावर अ‍ॅंडरसनने २०१४ साली दिल्या गेलेल्या आधार कार्डाचा फोटो टाकून त्यावर हा क्रमांक असल्याचा खुलासा केला. ही बातमी जवळपास सर्वच वृत्तपत्रांच्या वेबसाइटवर झळकल्याने UIDAIनेही त्या सर्व वृत्तपत्रांना ट्विटमध्ये टॅग करुन ही माहिती पुरवली.

हे होत नाही तो लगेच ट्विटरवर सरकारनेच असे सांगितले असावे, आधारचा डेटाबेस हॅक झाला असावा… ते पुढच्या निवडणुकीत मतदार यादीतील हेराफेरीसाठी तयार रहा अशा शंका कुशंकांना उधाण आले.

भारतात आधारच्या मुद्याचे राजकीयीकरण झाले आहे. असे दिसून येते की, सत्ताधारी पक्षाकडून आधारचे समर्थन करता येते तर विरोधी पक्षांकडून त्याला विरोध केला जातो.

 

aadhar-marathipizza
http://www.financialexpress.com

सरकार बदलले की, भूमिकाही बदलते. सध्या शिवसेनेसारख्या सरकारमधील असंतुष्ट पक्षांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळून आधारला विरोध केला आहे.

आधारच्या सक्तीबाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून लवकरच त्यावर निर्णय येणे अपेक्षित आहे.

दोनच दिवसांपूर्वी ट्रायचे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी आपला आधार क्रमांक ट्विट करून माझे जे बरेवाईट करायचे ते करा असं आव्हान दिले होते.

त्याला उत्तर म्हणून काही लोकांनी शर्मा यांनी गेल्या काही दिवसात काय खरेदी केली आहे तसेच त्यांचा पत्ता इ. माहिती टाकली होती.

नंतर असे उघड झाले की, यातील काही माहिती खोटी होती तर काही माहिती अन्य स्त्रोतांतून मिळाली होती. यामुळे पुन्हा आधार हवे का नको ही चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर अशी घटना महत्त्वाची आहे.

कोट्यावधी लोकांच्या मोबाइल फोनवर हा क्रमांक कसा पोहचला यामागचे खरे कारण अजून स्पष्ट व्हायचे आहे. त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात.

एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.

आपण मोबाइलवर अनेक अ‍ॅप डाउनलोड करतो तेव्हा आपण त्यांना अनेक प्रकारच्या परवानग्या देतो. आपण कोणत्या परवानग्या देतो हे बघायची आपल्याला सवड नसते.

अनेक अ‍ॅप आपले फोनबुक बघायचे त्यात बदल करायची, त्याला दुसऱ्या क्रमांकांना फोन करायची परवानगी मागतात आणि त्या आपण देतो.

उदा. बुकमाय शो अ‍ॅपवरुन जेव्हा तुम्ही तिकिट बुक करता किंवा स्विगीवरुन जेवण ऑर्डर करता, तेव्हा ही अ‍ॅप तुमच्या वॉट्सअपवर बुकिंग कन्फर्मेशनचे संदेश किंवा स्टेटस अपडेट पाठवतात.

आपण डाउनलोड करणाऱ्या सगळ्याच अ‍ॅपची डेटा सुरक्षा सर्वोच्च प्रतीची असतेच असे नाही.

समजा यापैकी एखाद्या अ‍ॅपना हॅक केले तर त्यांच्याच माध्यमातून किंवा स्वतंत्रपणे त्यांच्या डेटाबेसमधील मोबाइल फोनच्या फोनबुकमध्ये शिरुन एखादा संपर्कटाकणे फारसे अवघड नाही.

 त्यामुळे केवळ UIDAI चा जुना क्रमांक कोणी टाकला हे शोधून उपयोगाचा नाही तर त्यांनी तो का टाकला असावा त्यामागचे हेतू शोधून काढणे गरजेचे आहे.

यामागे एखादा एथिकल हॅकर असू शकतो, ज्यांनी व्यवस्थांची भंबेरी उडवून लोकांना सावध करायला असे केले असू शकते.

 

ethical-hackers-inmarathi
Simplilearn.com

कदाचित यामागे  एखादी सायबर दहशतवादी संघटना असू शकते किंवा भारतातल्या आगामी निवडणुकींत आधारवर आणि इव्हीएमवर संशय निर्माण करण्याचा हेतू असलेला देश किंवा त्याची गुप्तहेर संघटनाही असू शकते.

असे प्रकार हल्ली महत्त्वाच्या लोकशाही देशांतील निवडणुकांत वारंवार घडताना दिसत आहेत.

२०१९ साली भारतात होणाऱ्या निवडणुकांकडे सगळ्या जगाचे लक्ष असेल.

जर तुम्हाला एखाद्याला पराभूत करता येत नसेल तर त्याला गोंधळात टाका हा युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचा नियम आहे.

सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी या घटनेची तातडीने चौकशी करून हे काम कोणाचे असावे हे स्पष्ट न केल्यास, आधारवर संशय घेतला जाऊन आधार हद्दपार करायची मागणी जोर पकडू शकेल.

या घटनांवर अधिकृत सूत्रांकडून आणि समाधानकारक खुलासा व्हायची वाट पाहा.

तुमच्या आधारचा डेटा हॅक झाला आहे असे संदेश वॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून आले तर त्यावर विश्वास ठेवू नका. सावध राहा, रात्र वैऱ्याची आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com | वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com  त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. |आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?