डॉक्टरांचं हस्ताक्षर इतकं वाईट का असतं? वर्षानुवर्ष अनेकांना पडणारं हे कोड अखेर सुटलं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
तपासून झाल्यावर डॉक्टर आपल्याला सांगतात कोणत औषध घ्यायचं कधी घ्यायचं आणि याचवेळी ते काही बाहेरची औषधे देखील आपल्याला सांगतात जी आपल्याला मेडिकल मधून घ्यावी लागतात.
अश्या वेळेस डॉक्टर एका कागदावर आपल्याला औषधांची नाव लिहून देतात.
मात्र त्या कागदावरची औषधांची नावं तुम्हाला एका नजरेत वाचता आली असं कधी झालंय का?
बहुतेक सगळ्यांचंच उत्तर नकारार्थी येणार.
कारण सगळ्याच डॉक्टरांची अक्षरं वेगवेगळी असतात, आणि त्यावरची वळणं कायमच वाचणा-या बुचकळ्यात टाकतात.
म्हणूनचं त्या कागदावर काय लिहिलंय हे आपल्याला कधीच वाचता येत नाही.
या कागदावर किंवा प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टर इतक्या भरभर आणि विचित्र अक्षरात लिहितात की खुद्द शेक्सपिअरची देखील वाचताना दमछाक व्हायची.
मात्र याची सगळ्या मोठी गंमत म्हणजे हे डॉक्टरांचं अक्षर मेडिकलवाल्याला मात्र बरोबर कळतं…!
आपण केमिस्टकडे गेल्यानंतर आपल्याला न कळणारी अक्षर केमिस्टला कशी कळतात, हा प्रश्न आजपर्यंत लाखो लोकांना पडला आहे.
तर तुमच्याही मनात प्रश्न येत असेल की हे डॉक्टर लोक एवढे सुशिक्षित मग यांचं अक्षर इतकं गलिच्छ का? तर आज याचचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
खरंतर या मागचं कारण ऐकुन तुम्हाला देखील हसू येईल.
आपल्याला पडलेला हाच प्रश्न जेव्हा एका डॉक्टरला विचारण्यात आला. तेव्हा त्याने दिलेलं उत्तर हेच या प्रश्नाचं वैध उत्तर मानायला हरकत नाही, कारण ते पटण्यासारखं आहे.
हा डॉक्टर म्हणतो की,
शाळेमध्ये मी खूप सुरेख अक्षर काढायचो. मला हस्ताक्षर स्पर्धेत बक्षीस देखील मिळालं होतं. परीक्षेमध्ये तर मी अधिक मन लावून शक्य तितकं नीटनेटक आणि सुंदर अक्षर काढायचो. शाळेतले सगळे शिक्षक इतर विद्यार्थ्यांना माझ्यासारखं अक्षर काढण्यास सांगायच्या. त्यामुळे मला माझ्या अक्षराचा अभिमान होता. परंतु मी डॉक्टरकी करायची ठरवली आणि माझ्या अक्षराला जी उतरती कळा लागली ती कायमचीच !
…! म्हणजेच खराब अक्षराचा “डॉक्टर”की शी काहीतरी संबंध आहेच!
पुढे आपला डॉक्टर मित्र म्हणतो
डॉक्टरकीची कोणतीही परीक्षा घ्या तुम्हाला कमी वेळात भलीमोठी उत्तरे लिहावी लागतात. हेच कारण होतं की माझ अक्षर खराब झालं. पेपर सोडवायला वेळ कमी असायचा त्यातच उत्तर पूर्ण लिहावी लागायची, मुख्य म्हणजे काहीही फेकून उत्तर लिहिलेलं चालायचं नाही. उत्तर अगदी अचूक हव असायचं. त्यामुळे अक्षराकडे लक्ष देण्यास वेळ मिळायचा नाही.
“जे मनात यायचं ते वाऱ्याच्या गतीने लिहिण्याशिवाय पर्याय नसायचा.
आणि सगळ्याच परीक्षेमध्ये ही गत असल्यामुळे पटापट लिहायची सवय लागून गेली. त्यामुळे मी काय लिहितो ते फक्त मलाच कळतं….”
आणि हे फक्त माझ्याबरोबरचं नाही तर डॉक्टर झालेल्या प्रत्येकाबरोबर घडलेलं आहे आणि जोवर लिखाणाची परीक्षा आहे तोवर असंच घडत राहणार.
स्रोत
या डॉक्टरनी दिलेलं उत्तर काहींना पटणार नाही.
मात्र ब-याच डॉक्टरांकडून अशाच प्रकारचं कारण सांगितलं जातं आणि हे कारणही आपल्याला मान्य करावंच लागेल, कारण एमबीबीएस सारखी डिग्री घेताना विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण असतो.
दिवसरात्र जागून अभ्यास करायचा आणि त्यानंतर पेपर्स लिहायचे. त्यातही मोठमोठे पेपर्सचं लिखाण म्हणजे नवं टेन्शन.
पेपर पुर्ण करताना अक्षराकडे लक्ष न देण्याचं कारण योग्यच वाटतं. आता तुमच्याही लक्षात आलं असेल की या डॉक्टर वर्गाच्या या समस्येचं मूळ परीक्षेमध्ये आहे.
अर्थात डॉक्टरांची परिक्षा ही त्यांनी केलेल्या उपचारांमध्ये आहे. त्यांच अक्षऱ हे तितकंस महत्वाचं नाही, जितके त्यांचे उपचार महत्वाचे आहे.
कोणत्याही रोगांत रुग्णाला वाचविणारा डॉक्टर हा देवासमान मानला जातो.
आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करणारा, कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला बरं करणारा, त्याच्या कुटुंबाला आधार देणारा डॉक्टर हा सर्वार्थाने मोठाच असतो.
सध्याच्या कोरोनाच्या संकटात तर डॉक्टरांची भुमिका किती महत्वाची आहे हे काही वेगळं सांगायला नको.

मात्र त्यांच्या अक्षराबाबत कायमच सगळ्यांकडून विचारला जाणारा हा प्रश्न आणि त्याचं उत्तर शोधण्याचा हा गमतीशीर प्रयत्न.
त्यामुळे डॉक्टरांच अक्षर ही समस्या जगाच्या शेवटपर्यंत न संपणारी आहे. म्हणजे उत्तम हस्ताक्षर असणाऱ्या डॉक्टरचे दर्शन आपल्या नशिबी नाहीच मुळी !
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.