' ‘गुगलने’ दखल घेतलेला पण आपल्यालाच माहीत नसलेला भारतीय “गणितज्ञ”! – InMarathi

‘गुगलने’ दखल घेतलेला पण आपल्यालाच माहीत नसलेला भारतीय “गणितज्ञ”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

१९१५ चा काळ असेल ज्यावेळी एक भारतीय तरुण केम्ब्रिज विद्यापीठातून आपली डिग्री यशस्वीपणे घेवून बाहेर पडला होता.

शिक्षण संपवल्या नंतर तो घरी येण्यासाठी निघाला. तेव्हा त्याला बातमी कळली की ज्या जहाजाने तो घरी जात आहे ते जहाज युद्धाचे दिवस असल्याने ठरलेल्या तारखेवरून न निघता काही दिवस उशीरा निघणार आहे.

त्याकाळी जहाज हे एकच साधन प्रवास वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याने त्या तरुणाला घरी जाण्यासाठी दुसरे कुठले साधन नव्हते.

तो बिचारा आपला बोऱ्या बिस्तर आवरून आपल्या केम्ब्रिजच्या वसतीगृहात पोहोचला आणि उरलेले दिवस काय करावे म्हणून किंग्ज कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसून पुस्तके वाचण्यात वेळ घालवू लागला.

तिथेच त्याच्या हातात एक दिवस “बायोमेट्रिका” या नावाचा एक खंड लागला.

एकूण ९ खंडात विभागलेल्या पुस्तकाचा तो पहिला भाग होता. हे पुस्तक त्याकाळी “सांख्यिकी शास्त्र” या विषयाचा समग्र अभ्यास आणि माहिती असणारे एकमेव बायबल होते.

त्या तरुणाने झपाटल्या सारखे ते पुस्तक वाचून पूर्ण केले. दरम्यानच्या काळात त्याचे जहाज भारतात त्याच्या घरी कलकत्त्याला येण्यासाठी बंदराला लागले.

तो तरुण भारतात तर आला पण बरोबर “बायोमेट्रिका” चे ९ च्या ९ खंड देखील घेवून आला. आणि अशा रीतीने जन्म झाला स्वत: वाचून आणि ज्ञान घेवून बनलेल्या एका महान भारतीय सांख्यिकीशास्त्रज्ञाचा!

 

statistics-inmarathi
study.com

 

सांख्यिकी शास्त्र हे तस पाहायला गेलं तर कुणालाही जास्त माहीत नसलेलं शास्त्र आहे.

इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र अशी समाजशास्त्रे विज्ञान आणि त्या अंतर्गत येणारे विषय, वाणिज्य आणि व्यापार उदीम या अंतर्गत शिकवले जाणारे विषय, डॉक्टरी, इंजीनिअरिंगचे विषय हे सर्वमान्य आणि समाजमान्य असतात.

त्या तुलनेत काही विषय आणि त्याच ज्ञान समाजमानसा पर्यंत पोहोचलेलं नसतं.

सांख्यिकी शास्त्र किंवा इंग्रजी मध्ये ज्याला statistic अस म्हणतात त्याविषयी आपल्या समाजात तसे अजून घोर अज्ञान आहे.

वेगवेगळ्या प्रकारचा माहितीचा साठा जमवून त्याचे विश्लेषण आणि वर्गीकरण करणे त्याच्यावर संशोधन करणे आणि त्यावरून निष्कर्ष काढणे याचा या सांख्यिकीशास्त्रांमध्ये सामावेश होतो.

मात्र आपल्या कडील अभ्यासक्रमात हा विषय तसा पहिल्या पासून शिकवला जात नाही.

युरोप, अमेरिकेमध्ये या विषयाबाबत अनेक सखोल संशोधन झालेले असून त्याबाबतच्या कार्यशाळा, डिग्र्या, नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर त्या देशात उपलब्ध असतात.

पण तुम्हाला माहीत आहे का या सांख्यिकी शास्त्रामध्ये जगामध्ये नावलौकिक मिळवलेला एक सांख्यिकी शास्त्रज्ञ आहे जो की भारतीय आहे.

त्याचा लौकिक इतका मोठा आहे की चक्क गुगलने त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ २९ जूनला आपल्या डूडल द्वारे त्याला अनोखी मानवंदना दिली आहे.

त्यादिवशीचं गुगल सर्च इंजिन उघडून बघितलं तर एक अनोख डूडल दिसत होतं. त्याच्यावर क्लिक केल्यावर “प्रशांत चंद्र महालनोबीस” यांच्या १२५ व्या जयंती निमित्त अशी अक्षरे येत.

 

prashant-chandra-inmarathi
thefamouspeople.com

 

आज अनेक लोक असे सतील ज्यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा प्रशांत चंद्र महालनोबीस याचं नाव ऐकलं असेल.

२९ जून हा प्रशांत चंद्र महालनोबीस यांचा जन्मदिवस. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये PCM या नावाने परिचित असलेले प्रशांत चंद्र यांचे कार्य अनोखे आहे.

भारतात सांख्यिकी शास्त्राचा पाया त्यांनीच घातला. Indian statistical Institute ही भारतातील अग्रगण्य सांख्यिकी शास्त्राची शिक्षण देणारी संस्था त्यांनी १९३२ साली काढली.

ISI या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेने भारताला अनेक मानवरत्ने बहाल केली आहेत.

सी रंगराजन, प्रणब बर्धन, टी. श्रीनिवासन यांच्यासारखे अर्थतज्ञ इतकेच नव्हे तर २००१ साली मायकेल स्पेन्झ आणि जोसेफ स्टीग्लीटझ यांच्याबरोबर विभागून अर्थशास्त्रामधले नोबेल मिळवणारे जॉर्ज अक्र्लोफ हे याच ISI ने तयार केलेले आहेत.

आज National Sample Survey Office (NSSO) आणि the Central Statistical Organisation (CSO). या नावाने भारतात सांख्यिकी शास्त्रामध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या पायाभरणीमध्ये देखील प्रशांत चंद्र यांचा सिंहाचा वाटा आहे.

सांख्यिकी शास्त्रात Distance of Mahalnobis किवा महालनोबीस अंतर अशी संज्ञा वापरली जाते. कारण त्याचे जनक खुद्द प्रशांत चंद्र महालनोबीस आहेत.

 

doodle-inmarathi

 

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिले वाहिले जे planning commission बनवले गेले त्याच्यात प्रशांत चंद्र यांचा समावेश होता.

anthropometry ज्याला मराठीमध्ये मानवमिती असे म्हटले जाते ज्याच्यात मानवी शरीराची उंची, वजन, शरीरातील भेद इत्यादि भागांची तौलनिक मापन केले जाते त्या शास्त्राचा पाया रचण्याचा मान देखील प्रशांत चंद्र यांच्याकडे जातो.

प्रशांत चंद्र यांचे कार्य फक्त संशोधनापुरते मर्यादित नाही.

त्यांनी या शास्त्राचा पाया घातला आणि त्यांची उपयोगिता देखील सिद्ध केली. १९२६ साली त्यांनी ओरिसा मध्ये पूर का येतो यासाठी जवळजवळ ६० वर्षाचा माहीतीचा संपूर्ण साठा गोळा करून त्यावर संशोधन केले होते.

या संशोधनाचा निष्कर्ष म्हणजे आसाम मधील महानदी वर तीन दशका नंतर बांधले गेलेले हिराकूड धरण! प्रशांत चंद्र यांनी रवीन्द्रनाथ टागोर यांच्या बरोबर सुद्धा अनेक काळ वास्तव्य केले आहे.

वयाच्या ७८ व्या वर्षी २८ जून १९७२ ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

प्रशांत चंद्र यांनी आपल्या पाठीमागे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल इतका मोठा दैदिप्यमान वारसा ठेवला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?