' सचिनने जर “तो” निर्णय घेतला असता तर भारतीय क्रिकेटची परिस्थिती काहीशी वेगळी असती! – InMarathi

सचिनने जर “तो” निर्णय घेतला असता तर भारतीय क्रिकेटची परिस्थिती काहीशी वेगळी असती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज क्रिकेटमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत.

२ वर्षांपूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली ती म्हणजे ४८१-६. जास्त नाही पण दहा वर्षांपूर्वी असं भाकीत कुणी वर्तविले असते तर किती लोकांनी यावर विश्वास ठेवला असता.

या सामन्या नंतर एका व्यक्ती ने ट्विटर वर एक ट्विट केले..

‘आज जरी एकवेळ सहज शक्य वाटत असताना इंग्लंड ला ५०० धावा करता आल्या नसल्या तरी एकदिवसीय सामन्यात ५०० धावा फार दूर नाहीत..’

 

england 481 inmarathi
youtube.com

 

यावर हजारो लोकांनी सहमती दर्शवली. परंतु दहा-बारा वर्षांपूर्वी स्थिती अशी नव्हती.

२०-२० क्रिकेटनंतर क्रिकेटचे स्वरूप बदललेले दिसते. या क्रिकेटचे ढोबळमानाने २ भागात विभाजन करता येईल. टी ट्वेंटी पूर्वीचे क्रिकेट आणि नंतरचे क्रिकेट.

आणि या दोन्ही क्रिकेटला जोडणारा एखादा खेळाडू असेल तर तो सचिन तेंडुलकर.

आज निदान भारतात तरी सचिन म्हणजे क्रिकेट हे एक समीकरणच बनले आहे! क्रिकेट विश्वातला देव म्हणजे सचिन हे भारतातला प्रत्येक जण सांगेल!

आज आपल्या पाल्याला क्रिकेटर व्हायचा असेल तर सचिन सारखा हो हे प्रत्येक पालक आपल्या क्रिकेट वेड्या मुलाला सांगताना दिसतात!

धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा असे तगडे खेळाडू असून देखील त्यांची सुद्धा सचिनशी तुलना होतेच! कारण सचिन हा एकच आहे आणि राहील!

 

Sachin-inmarathi
media3.bollywoodhungama.in

 

नुसतं क्रिकेट नव्हे तर माणुसकी आणि फेम यांच्यात योग्य समतोल साधणारा सचिन हा बहुतेक एकमेव भारतीय खेळाडू असेल!

त्याने त्याच्या यशाची हवा कधीच डोक्यात जाऊ दिली नाही!

भारता सारख्या देशात क्रिकेटला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यात त्याचा वाटा मोठा आहे.

१९८९ साली पदार्पण केल्यापासून २०१३ साली निवृत्ती घेईपर्यंत २४ वर्षात त्याने क्रिकेटचे हे बदलते स्वरूप पाहिले आणि प्रत्येक बदलाला आत्मसात करत गेला. सचिन नसता तर आज क्रिकेट त्यातही भारतीय क्रिकेट कसे असते?

जर तर ला काही अर्थ नसतो म्हणतात पण एकदा विचार करून बघा…. कदाचित तो निर्णय सचिन ने नसता घेतला तर तो क्रिकेट खेळला नसता.

१९८४ साली, नुकताच भारताने एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकला होता. देशभर क्रिकेटचे वारे वाहत होते. मुंबई हे शहर त्यात आघाडीवर होते.

 

1984 world cup inmarathi
icc-cricket.com

 

सचिन तेव्हा ११ वर्षांचा होता. सचिन घरात सर्वात धाकटा. क्रिकेट तो खेळायचाच पण एक अडचण होती, सचिन ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायचा त्या शाळेची क्रिकेट टीम नव्हती.

वडील लेखक असल्याने सचिनचे घर बांद्र्याला साहित्यसहवास येथे होते. शाळाही जवळच.

परंतु शाळेचा क्रिकेटचा संघ नसला तरी सचिनने क्रिकेट शिकावं म्हणून त्याचा भाऊ अजित त्याला घेऊन रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेला.

 

sachin_tendulkar_inmarathi
imgci.com

 

आचरेकर सर शारदाश्रम विद्यालयातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या क्रिकेट संघाचे कोच होते. त्यांनी सचिनला मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली पण त्यासाठी त्याने शारदाश्रममध्ये प्रवेश घ्यावा अशी अट ठेवली.

शारदाश्रम विद्यालय आहे दादरला आणि सचिन राहायचा बांद्राला शिवाय बांदर्याहून दादर पर्यंत सरळ बससेवा नव्हती म्हणजे सचिनला बस बदलून जावे लागले असते.

अकरा वर्षाच्या सचिनला दररोज सकाळी सात वाजेपर्यंत २ बस बदलून शाळेत जावे लागणार होते.

शाळा बदलाचा निर्णय घेण्याची जबाबदारी आता सचिनच्या वडिलांवर होती, त्यांनी मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न केला, तो असा, की उन्हाळी सुट्ट्यात क्रिकेट खेळायचे आणि पूर्णवेळ आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचे.

सचिन घरात सर्वात लहान होता, परंतु सर्वांनी सचिनला तू जो निर्णय घेशील त्याला आमचा पाठिंबा राहील असा विश्वासही दिला.

सचिनने शाळा बदलायचा निर्णय घेतला. आपली आवड जोपासताना कराव्या लागणाऱ्या त्यागाची तयारी तेंव्हाच त्याने केली होती. त्याचा हाच निर्णय पुढे भारतीय क्रिकेटचे भविष्य बदलणार होता.

सचिनच्या ह्याच निर्णयामुळे आज भारताला क्रिकेटचा देव गवसला, साऱ्या जगाने १०० सेंच्युरिज पाहिल्या आणि अशा कित्येक आठवणी सचिनमुळेच क्रिकेटप्रेमींना मिळाल्या!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?