रुळावरून धावणाऱ्या रेल्वेच्या आवाजातील बदलावरून संभाव्य अपघात टाळणाऱ्या अवलियाची अचाट कहाणी…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्या भारतात खूप महान लोक होऊन गेले. ज्यांनी भारताच्या प्रगतीमध्ये खूप मोलाची कामगिरी बजावली आहे. अशी कितीतरी नावे आपल्या भारतामध्ये होऊन गेली आहेत, ज्यांनी आपले आयुष्य या देशाच्या हितासाठी घालवलेले आहे.
या महान लोकांपैकीच एक डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरया हे होते.
इंजिनियर्स डे म्हणून साजरा करण्यात येणारा १५ सप्टेंबर हा दिवस त्यांचा जन्मदिवस होय… त्यांचा जन्मदिवस ‘इंजिनियर्स डे’ म्हणून का साजरा करतात हे आज जाणून घेऊ.
मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यामधील चिकबळ्ळापूर तालुक्याच्या मुद्देनहळ्ळी या गावामध्ये झाला होता.
ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते. विश्वेश्वरया यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असताना निधन झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले.

ते १८८१ साली मद्रास येथुन बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.
आज आपण भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केल्या गेलेल्या याच विश्वेश्वरया यांची एक रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत.
रात्रीची वेळ होती, सगळीकडे शांतता पसरली होती आणि याच शांततेमध्ये एक रेल्वे आवाज करत आपल्या पुढच्या स्टेशन कडे वाटचाल करत चालली होती. त्या रेल्वेमधील सगळे लोक या रात्रीच्या भयाण शांततेमध्ये झोपी गेले होते.
त्यातीलच एक व्यक्ती ही या रेल्वेच्या डब्यामध्ये खिडकीला डोके टेकून झोपली होती.
अचानक तो मनुष्य झोपेतून गडबडून जागा झाला. तो एकदम लगेचच आपल्या सीटवरून उठून उभा राहिला आणि त्याने त्याच्या डोक्यावर लटकणारी धोक्याची चेन ओढली.

चेन ओढताच रेल्वे स्लो झाली आणि थोड्या अंतरावर जाऊन थांबली. रेल्वेचे कर्मचारी, त्यांच्यासोबत त्या रेल्वेमधून प्रवास करणारे प्रवासी आणि इतर डब्यांमधील लोक त्या डब्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी आले की, नक्की काय झाले आहे.
काही लोकांना असे वाटले की, कदाचित या माणसाने झोपेमध्ये असताना चुकून चेन ओढली असेल. असा विचार करून काहीजणांना राग देखील आला होता.
सर्व लोकांनी त्या माणसाला घेरले आणि त्याने असे का केले याबद्दल विचारणा केली. त्या माणसाने त्यांच्या या वागण्याचे काहीही वाईट न वाटून एकदम आरामात उत्तर दिले. तो म्हणाला की,
“ रेल्वे रुळावर काही मीटर पुढे फट आहे, जर रेल्वे त्यावरून गेली असती तर अपघात होऊ शकत होता.”

लोकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटले आणि ते त्या माणसाला म्हणाले,
“काय सांगता, या काळोख्या रात्री रेल्वेमध्ये बसल्या – बसल्या तुम्हाला कसे माहित पडले की, पुढे रेल्वे रुळामध्ये फट आहे? काय मस्करी करता तुम्हीपण!”
त्यानंतर तो चेन खेचणारा माणूस म्हणाला,
“मला चेन खेचून तुम्हाला सर्वांना त्रास द्यायचा नव्हता. तुम्ही जाऊन रेल्वे रूळ तपासा आणि त्यानंतर मला येऊन सांगा.”
रेल्वे कर्मचारी रेल्वेमधून उतरून बॅटरी घेऊन रेल्वे रूळ चेक करू लागले. रेल्वे जिथे थांबली होती, त्याच्याच पुढे थोड्या अंतरावर रुळामध्ये मोठी फट पडली होती. जर रेल्वे त्या रुळाच्या फटीवरून गेली असती, तर या काळोख्या रात्री, त्या भयाण जागेवर खरंच एक मोठा अपघात झाला असता.
सर्व लोक परत त्या माणसाकडे पोहोचले, ज्याने या धोक्याबद्दल पूर्वसूचना दिली होती आणि त्यांनी त्याला विचारले की, तुम्हाला ही गोष्ट कशी काय माहित झाली?

त्या माणसाने सांगितले की,
“मी झोपेमध्ये रेल्वे आणि रूळांचा आवाज ऐकत होतो आणि अचानक त्यांचा आवाज बदलला. रुळाच्या कंपनाने होणाऱ्या आवाजामध्ये अचानक आलेल्या मोठ्या फरकामुळे मला समजले की, रुळामध्ये पुढे नक्कीच एक मोठी फट आहे.”
आश्चर्यकारकपणे रेल्वेचा अपघात थांबवणारा हा माणूस दुसरा कुणीही नसून महान भारतीय अभियंते डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरया हे होते. त्यांच्याच या तत्परतेमुळे इतक्या लोकांचे प्राण वाचले होते.
डॉ. विश्वेश्वरय्या यांनी कर्नाटक राज्यात आधुनिकतेचा आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात तर सिंहाचा वाटा उचलला होता. भारत पारतंत्र्यात असताना त्यांनी तिथे कृष्णासागर बांध, भद्रावती स्टील वर्क, मैसूर तेल आणि साबण कंपनी या बड्या कंपन्यांची स्थापना केली.
बँक ऑफ मैसूर सारख्या प्रथितयश बँकेची उभारणी त्यांच्याच प्रयत्नातून शक्य झाली. या योगदानासाठी त्यांना “कर्नाटकचे भगीरथ” ही पदवीही मिळाली आहे.
–
- पडद्यामागचा सूत्रधार : मेट्रोमॅन ई श्रीधरन
- ISRO चा अजून एक पराक्रम – एकाच वेळी प्रक्षेपित केले २० उपग्रह!
–
डॉक्टर विश्वेश्वरय्या अवघ्या तिशीच्या वयात असताना त्यांनी दुष्काळात असल्याला कुक्कुर भागाला सिंधू नदीचे पाणी पुरवण्याची योजना तयार केली.
ही योजना सरकारी अभियंत्यांच्या डोळ्यातून सुटली नाही. सरकारने सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी एक समिती बनवली व त्या समितीत विश्वेश्वरय्या यांना स्थान दिले. हे काम करत असताना त्यांनी धरणाच्या एका नव्या तंत्रज्ञानाचा शोध लावला.
त्यांनी धरणाचे पाणी अडवण्यासाठी स्टीलचे दरवाजे बनवले. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांच्या या योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आजही हे तंत्रज्ञान जगभरात धरण बांधकामात वापरले जात आहे.
याव्यतिरिक्तही भारतभरात अनेक ठिकाणी धरण बांधकाम आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीत डॉ. विश्वेश्वरय्या यांनी मोलाचे योगदान दिले. सुदृढ शरीरयष्टी आणि आरोग्याच्या जोरावर विश्वेश्वरय्या शंभरीपेक्षा जास्त काळ जगले.. आणि जाताना भारतातील अभियांत्रिकीच्या क्षेत्रात कधीच पुसला न जाणारा ठसा सोडून गेले..

१५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस भारतात “इंजिनियर्स डे” म्हणून साजरा केला जातो.
–
- विज्ञान-अभियांत्रिकी क्षेत्रात महिला कमी असण्याच्या या कारणांची तुम्ही कल्पनाही केली नसेल!
- मानवी कल्पनाशक्तीचा अविष्कार : पाण्यावर तरंगणारे विमानतळ
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
या महा पुरुषाला दंडवत.