' “वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक पराक्रमी”: गनिमांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज! – InMarathi

“वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक पराक्रमी”: गनिमांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – परीक्षित शेवडे 

===

गनिमांच्या देखता फ़ौजा। रणशूरांच्या फ़ुर्फ़ुरती भुजा।

ऐसा पाहिजे की राजा । कैपक्षी परमार्थी ॥

राजा कसा असावा? याचे उत्तर देताना समर्थ रामदास स्वामी वरीलप्रमाणे वर्णन करतात. शत्रूला पाहताच ज्याचे बाहू स्फुरण पावतात असा राजा असावा. छत्रपती संभाजी महाराज हे असेच समरधुरंधर राजे होते.

इतिहास अभ्यासत असता तो एखादा विशिष्ट हेतुप्रेरित चष्मा लावून अभ्यासला जावू शकत नाही.

उपलब्ध असलेले सर्व समकालीन कागदोपत्रीचे पुरावे सर्व बाजूंनी अभ्यासून मगच इतिहासाची मांडणी होवू शकते. त्यातही दोन्ही बाजूंचे असे पुरावे अभ्यासल्यास चित्र अधिक स्पष्ट होत जाते.

 

Sambhaji-godawari-inmarathi04

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या लिखाणातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलू आपल्यासमोर जसे उलगडतात.

त्याचप्रमाणे त्याकाळात त्यांनी अंगावर घेतलेले पोर्तुगीज, इंग्रज, मुघल इत्यादि शत्रू देखील महाराजांबद्द्ल नेमके काय लिहितात हे पाहिल्यास शंभूराजांची किती भीती या शत्रूंना वाटत होती याचे प्रत्यक्षपुरावेच मिळतात.

बलाढ्य आरमार असलेल्या पोर्तुगीजांवर शंभूराजांनी गोव्यात शिरून आक्रमण केले.

 

या मोहिमेत स्वतः महाराज आघाडीवर लढत होते. त्यांनी पोर्तुगीजाना इतका चोप दिला की पोर्तुगीज विजरई फ्रान्सिस्को द ताव्होर कोंद दे अल्व्होर याने २४ नोव्हेंबर १९८३ रोजी खानदानी पोर्तुगीज, पाद्री आणि अधिकारी यांची सभा बोलवली. या सभेत तो म्हणतो;

“चौलचा वेढा शत्रूने आवळला आहे. आता तर तो गोव्यात शिरला आहे. त्याने सगळीकडे लुटालूट आणि जाळपोळ सुरु केली आहे.

अगदी चर्चेसनादेखील त्याने यातून सोडलेले नाही….” (मराठ्यांच्या इतिहासाची साधने: खंड तिसरा; लेखक: ए.बी.डी.ब्रागांस परेरा; गोवा पुरातत्व विभागप्रमुख १९४०)

 

attack-on-portuguese-inmarathi

 

अवघ्या महिन्याभरातच जवळपास ३/४ गोवा काबीज करत शंभूराजे आणि मराठा सैन्याने इतकी धामधूम केली होती की; पोर्तुगीजांना चर्चमधले पाद्री आणि आपल्या कैदेतले गुन्हेगार सोडून त्यांनाही लढायला पाठवावे लागले होते असे समकालीन संदर्भ सांगतात.

विशेष म्हणजे या मोहिमेनंतर पोर्तुगीजांना इतकी जरब बसली की; त्यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज’ असा संपूर्ण बिरुदांसह पत्रांत उल्लेख करायला सुरुवात केली.

यापूर्वी ते ‘संभाजीराजे’ असा उल्लेख करीत. हा बदल म्हणजे शंभूछत्रपतींच्या जरबेची साक्षच नव्हे काय! अशीच जरब स्वतः औरंगजेबलादेखील बसली होती.

“संभाजीला ठार वा कैद केल्याशिवाय डोक्यावर किमांश धारण करणार नाही आणि तलवार हातात उचलणार नाहीं असा पण त्याने केला आहे.” असे कारवारकर इंग्रजांनी आपल्या पत्रात नमूद केले होते. (हिस्ट्री ऑफ औरंगजेब; लेखक: जदुनाथ सरकार)

 

aurangjeb-marathipizza

 

फार कशाला? ‘तारीख-ए-खाफीखान’ या आपल्या ग्रंथात महमद हशीम खाफीखान हा शंभूराजेंना ‘आपल्या वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक तापदायक’ असे म्हणतो.

खाफीखानाने तर अनेक ठिकाणी महाराजांचा उल्लेख ‘नरकवासी’ या विशेषणाने केला आहे.

हे विशेषण मुघलांच्या वैफल्यातून आलेले आहे हे अर्थातच सांगायला नको. थोड्क्यात; हे संदर्भदेखील शंभूराजांच्या समशेरीच्या धाकाचे पुरावेच आहेत.

स्वाभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सुपुत्र. अत्यंत क्रूरतेने त्यांची हत्या औरंगजेबने केली. त्याच्यासाठी अशा हत्यांत नाविन्यपूर्ण असे काहीच नव्हते म्हणा!

आपला भाऊ दारा शिकोह व शीखांचे नववे गुरु तेगबहादूरजी यांना तसेच त्यांच्या तीन शिष्यांनाही औरंगजेबने असेच निर्घृणपणे मारले होते.

हे ही वाचा –

===

 

sambhaji-maharaj-inmarathi

 

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या दरबारात उभे केल्यावरही ते मुळीच झुकले नाहीत. या घटनेचा औरंगजेबाच्या दरबारी असलेला आणि या प्रसंगाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला ईश्वरदास नागर म्हणतो;

‘”……पण संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याची अशी अवस्था झाली तरी त्याने बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून यत्किंचितही मान लवविली नाही. इखलास खान आणि हमिदुद्दिन खान यांनी त्याला पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. बादशाहने आज्ञा केली की सिकंदरखानाच्या तंबूजवळ एक जागा ठरवून संभाजीला अशाच स्थितीत ठेवण्यात यावे. कवी कलश आणि त्याचे साथीदार यांच्यावर कडक नजर ठेवण्यात यावी. त्यांच्या पायात बेड्या ठोकण्यात याव्या. यानंतर दोन दिवसांनी बादशहाने रुहुल्लाखन यास खालीलप्रमाणे आज्ञा केली. तुम्ही जाउन संभाजीपाशी चौकशी करावी की तुझे खजिने, जडजवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे?? तसेच बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवीत होते. पण माणसाची जीविताची आशा सुटली की तो मनात येईल ते बडबडत सुटतो. संभाजी हा गर्विष्ठ होता. त्याने बादशहा संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले आणि त्यांची निंदानालस्ती केली. त्याने जे काही म्हटले ते रुहुल्लाखानाने बादशहाला सांगितले नाही. पण ते बोलणे कशाप्रकारचे होते याचा त्याने बादशाहाला इशारा दिला. यावर बादशाहने आज्ञा केली की, संभाजीच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला ‘नवी दृष्टी’ द्यावी. (गरम लोखंडी सळईने डोळे फोडण्यात यावे.) त्याप्रमाणे करण्यात आले. पण संभाजी गर्विष्ठ आणि स्वाभिमानी होता. त्याने त्या दिवसापासून जेवणखाण सोडले. त्याच्या पहारेक-यांनी त्याला अन्नसेवन करण्याबद्दल पुष्कळ सांगितले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला काही उपास घडले. शेवटी ही बातमी बादशाहाला कळवण्यात आली. संभाजीचे दिवस भरले होते. बादशाहाच्या आज्ञेने त्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले…….’

(फुतुहात-ए-आलमगिरी लेखक: ईश्वरदास नागर, अनुवाद: सेतुमाधवराव पगडी)

 

aurangzeb-inmarathi

 

अन्य एक प्रत्यक्ष साक्षीदार असलेला साकी मुस्तैदखान यानेही ‘मासीर-ई-आलमगिरी’ या आपल्या ग्रंथात असेच वर्णन केले आहे.

काझींनी काढलेला आणि उमरावांनी मंजूर केलेला मृत्यूच्या फतव्याची औरंगजेबने अंमलबजावणी केली असेही तो नमूद करतो. इतकेच नाही तर शंभूराजे आणि कवी कलश यांच्या शवांची जी विटंबना करण्यात आली त्याबद्दलही याच प्रत्यक्षदर्शींनी केलेले वर्णन वाचून अंगावर काटा येतो.

 

deathofshambaji-inmarathi

 

फाल्गुन अमावस्येला हैन्दव स्वराज्याच्या (हा शब्दही शंभूराजांनीच नमूद केला आहे.) दुसऱ्या छत्रपतींची नृशंस हत्या केली गेली. मात्र यानंतरही शिवप्रभूंचे हे स्वराज्य झुंजत राहिले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे महाराष्ट्र लढला.

अखेरीस दक्खन मुठीत काबीज करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबला याच मातीत मूठमाती घ्यावी लागली. नियतीचे खेळ असेच असतात!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :


===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?