' प्रशासनाची इच्छा असेल तर काय घडू शकतं ह्याची साक्ष : कचरा मुक्त इंदौर – InMarathi

प्रशासनाची इच्छा असेल तर काय घडू शकतं ह्याची साक्ष : कचरा मुक्त इंदौर

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

स्वच्छ भारत अभियन ही मोदी सरकारची मोहीम, ज्यामुळे दरवर्षी देशातील शहरांचा स्वच्छतेच्या गुणांवर निकाल लावला जातो. याच परीक्षेत इंदूर हे शहर सतत मागे पडत होते. २०११-१२ मध्ये इंदूर ६१ व्या क्रमांकावर होते, तर २०१४ मध्ये ते आणखी खाली घसरले आणि १४९ व्या क्रमांकावर आले. पण, या शहराच्या प्रशासनाने असं काहीतरी केलं की, हे शहर १४९ व्या क्रमांकावरून चक्क १ ल्या क्रमांकावर आलं आणि देशातील सर्वात स्वच्छ शहर असण्याचा सन्मान मिळविला…! इंदूर शहराने स्वच्छेतेच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविण्यामागे आहे प्रचंड नियोजन आणि कठोर मेहनत! ही मेहनत काय आहे? नियोजन कसं केलं? कोण होतं ह्या आमूलाग्र बदलामागे? ह्या प्रश्नांची इत्यंभूत माहिती देणारा रिपोर्ट बिझनेस स्टॅंडर्ड ने प्रसिद्ध केला आहे. हा रिपोर्ट द बेटर इंडियाने देखील प्रसिद्ध केला आहे. त्या रिपोर्टमधून इंदूरच्या कायापलटाचा प्रवास उलगडत जातो.

indore01-marathipizza
skymetweather.com

आधी ६१ आणि मग १४९ व्या क्रमांकावर घसरल्याचा धसका या शहरातील प्रशासनाने घेतला आणि त्यानंतर तेथील महापौर मालिनी गौड, आयुक्त, नगरसेवक, अधिकारी, सफाई कर्मचारी व नागरिक यांनी आपापले कर्तव्य बजावण्यास सुरवात केली.

त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिले व इंदूरच्या शिरपेचात देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मानाचा तुरा रोवला गेला…

इंदूर शहराच्या सद्यस्थितीचं श्रेय जातं ते इथल्या प्रशासनाला. इथले ४९ वर्षीय नगरपालिका आयुक्त मनीष सिंग यांनी केवळ लिखित अथवा तोंडी आदेश देऊन ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे असे नाही. याआधी त्यांनी भोपाळ येथे देखील नगरपालिका आयुक्त पद सांभाळले आणि मे २०१५ ला इंदूर शहरात रुजू झाले. ते रुजू झाले तेव्हा तिथे एक खाजगी कंपनी हे काम सांभाळत होती, जे की निष्फळ असून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची सेवा पुरविली जात नव्हती. हे शहर अक्षरशः घाणेरड्या अवस्थेत होते, हे तिथे राहणाऱ्या आणि या शहराला भेट देणारे लोक अनुभवत होते. एका सामाजिक कार्यकर्त्याने अधिकाऱ्यांविरोधात एक जनहित याचिका देखील दाखल केली होती.

manish-singh IAS Indore-marathipizza
youtube

या सर्व समस्या सोडविण्यासाठी आयुक्त मनीष सिंग यांनी प्रत्येक युक्ती वापरली आणि त्यात त्यांना एका समर्पित आणि हिम्मती व्यक्तिमत्वाचा पाठिंबा होता, तो म्हणजे इंदूर शहराच्या महापौर मालिनी गौड. सुरवातीला त्यांनी सर्वात बेसिक गोष्टींपासुन सुरवात केली, ते म्हणजे घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, जे तिथल्या नगर पालिकेला करायला हवे होते.

हे शहर एका दिवसात सुमारे 1100 मेट्रिक टन नगरपालिका घनकचरा (municipal solid waste-MSW) तयार करते.

इथे दर दुसऱ्या दिवशी Mechanical Sweeper ने रस्ते स्वच्छ केले जातात. एवढंच काय तर प्रेशर जेटच्या मदतीने रोज रात्री इथले रस्ते धुतले जातात, शहर धूळ मुक्त राहावं यासाठी हा सारा खटाटोप इथली नगरपालिका करते. शहरातील नगरपालिकेचे कचरा उचलणारे ट्रक्स देखील नेहेमी धुतल्या जातात, त्यासाठी ट्रेंचिंग ग्राउंडमध्ये भले मोठे शेड तयार करण्यात आले आहे. यामुळे इतर शहरांसारखं कचरा उचलणाऱ्या ट्रकमधूनच कचरा पडताना किंवा त्याला कचरा चिटकलेला इथे दिसत नाही. हे सर्व एका भारतीय शहरात होतयं यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच.

indore04-marathipizza
twitter

 

यातली आणखी एक आश्चर्याची बाब म्हणजे, शहरातील जवळजवळ १४०० कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. आता तुम्ही विचार करत असणार की, कचरा कुंडी वाढविण्यापेक्षा त्या हटविल्या का गेल्या? तसा प्रश्न बरोबरच आहे, कारण कचरा कुंडी नसेल तर लोक कचरा टाकणार कुठे ? पण यावर इंदूर नगरपालिका आयुक्तांनी एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांच्या नुसार जर सार्वजनिक कचरा कुंड्या नसेल तर तिथल्या लोकांना पिशवीत कचरा भरून तो सार्वजनिक कुंड्यांमध्ये टाकण्याचा पर्यायच निघून जाईल. मग त्यांना कचरा कलेक्ट करणाऱ्यांची वाट बघणं हाच एक पर्याय उरेल. तसेच रस्त्यात चालत असताना दिसेल त्या कचरा कुंडीत कचरा टाकणे, जेव्हा की तो कचरा कुंडीत कमी आणि बाहेर जास्त दिसतो, त्यातच मग त्या कुंडी भोवती फिरणारे जनावरं यामुळे तो परिसर अगदी घाणेरडा आणि दूषित होऊन जातो. या युक्तीमुळे आणखी एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते ती म्हणजे घरा-घरांतून कचरा नीट उचलला जातो आहे की नाही, तसेच कर्मचारी त्यासाठी पुरेसे आहेत का हे देखील लक्षात येत. यावरून पुढील योजना आखता येते. सध्या येथे पादचारी मार्गांवर लहान कचरा कुंड्या बसविण्यात आल्या असून १७५ सामुदायिक आणि पब्लिक शौचालय देखील बसविण्यात आले आहेत.

 

indore03-marathipizza
business-standard.com

 

गेल्या १८ महिन्यांत या शहरातील ८५ वॉर्ड्स मधील जवळपास १८५ उघड्यावरील कचऱ्याचे स्पॉट काढण्यात आले आहेत. हे ठिकण शहरातील श्रीमंत लोकांच्या वस्तीतील तसेच मार्केट मधील होते जिथे लोक उघड्यावर कचरा टाकत असे.

सराफा ही इथली प्रसिद्ध अशी हँग आऊट प्लेस आहे, जी तिथल्या स्ट्रीट फूड साठी देखील प्रसिद्ध आहे. पण इथले रहिवासी फार कमी इथे जायचे आणि याला कारण म्हणजे तिथली अस्वच्छता. पण आता तिथले चित्र पालटल्याचे नागरिक सांगतात, आता तिथे स्वच्छता असते, तिथल्या स्टॉल्सवर गेलं की पैसे घेण्याआधी ठेलेवाला तुम्हाला कचरा पेटी दाखवून कचरा त्यात टाकण्यास सांगतो. कारण त्यांच्या स्टॉल भोवती अस्वच्छता ठेवणे म्हणजे त्याची जागा आणि धंदा गमावणे.

सध्या इथे सर्वात कॉमन कुठलं वाहन असेल तर ते म्हणजे पिवळ्या रंगाचे नगर निगमचे ट्रक. त्यांची शहरातील संख्या ८०० आहे आणि ते दिवसभर शहरातील वसाहतींमध्ये कचरा गोळा करण्याकरिता फिरत असतात. तर तेथील नगर प्रमुखांना देखील ५०-६० जीप्स देण्यात आल्या आहे ज्यामुळे ते आता कुठल्याही प्रकारचा कामचुकारपणा करू शकत नाही. सध्या येथे ६०० सफाई कर्मचारी आहेत. भरमसाठ कारभाऱ्यांची भरती करण्यापेक्षा कमी पण काम करणारे कर्मचारी कधीही बरे असे इथल्या आयुक्तांचे म्हणणे.

इथल्या नियमांना न मानणाऱ्या प्रत्येकावर दंड आकारण्यात येतो, कुठलाही प्रसंग असो तुम्हाला user charges द्यावे लागतात. यातून मोठमोठे राजकारणीही सुटलेले नाहीत, त्यांना देखील त्यांचा प्रचार रॅलीअथवा इतर कार्यक्रमांवेळी नगर पालिकेला त्याचे चार्जेस द्यावे लागतात आणि असे न केल्यास वृत्तपत्र त्यांचा समाचार घेतात.

येथील ७-८ हजार झोपड्या देखील उठविण्यात आल्या आहेत. तसेच जनावर पाळणारे जे आपल्या जनावरांना दिवसा बाहेर सोडतात यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. तर तात्पुरते कामगार राहणाऱ्या जागांवर देखील कठोर कारवाई करण्यात आली आहे.

येथील प्रशासना सोबतच येथील ६ NGO आणि त्यांचे ४०० स्वयंसेवक शहरातील स्वच्छतेवर लक्ष ठेऊन असतात. तसेच ते जनगागृतीही करत असतात. तसेच मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात जनगागृती करण्यात आली.

एक शहर जे २०१४-१५ मध्ये स्वच्छतेच्या रेस मध्ये १४९व्या क्रमांकावर होत त्याला पहिल्या क्रमांकावर आणण म्हणजे काही खायचं काम नाही आहे. यासाठी एका मजबूत राजकीय इच्छाशक्तीची गरज असते, जी इथल्या प्रशासनाने आणि महापौरने दाखविली. एवढच नाही तर इथली नगर पालिका, नगर पालिका आयुक्त, स्वयंसेवी संघटना, मीडिया आणि इथली जनता यासर्वांच्या सहभागातून या शहराने हा मान मिळविला आहे. २०१५ मध्ये हे शहर ८६ क्रमांकावर होते, तर ४ मे २०१७ इंदूर या शहराला “भारतातील सर्वात स्वच्छ शहर” म्हणून घोषित करण्यात आले. हे नक्कीच इथल्या नगर पालिकेच्या आणि इतर सर्वांच्या श्रमाचं फळ आहे.

तुम्हाला काय वाटतं – अशी नगर पालिका असे महापौर आणि नगर पालिका आयुक्त आपल्याही शहरात असायला हवे की

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?